पाठीवरती हात ठेवून,तुम्ही फक्त लढ म्हणा.

पाठीवरती हात ठेवून,तुम्ही फक्त लढ म्हणा.


रणजित शिवाजी पाटील,कोल्हापूर.
सर्वप्रथम मी आपला आभारी आहे..आपले विचार व्यक्त करण्याच्या या व्यासपीठावर आपण मला सहभागी केले त्याबद्दल मी सर्व वि४ वाचकप्रेमिंचा ऋणी आहे.
     उलगडूया या सदरातून बोलताना मला माझे बालपण आठवले..पाठीवरती हात ठेवून,तुम्ही फक्त लढ म्हणा कवी कुसुमाग्रजांच्या कणा या कवितेतून आपण जर आपल्या आयुष्यात डोकावून पाहिले तर नक्कीच त्याचा आपल्या आयुष्याशी संबंध आहे हे उमजून येईल..खरेतर कुसुमाग्रजांची ही कविता प्रत्येक मराठी मनाच्या जवळची आहे..अगदी साधी,सरळ मांडणी असणारी ही कविता प्रत्येक मराठी मनाला जगण्याचे धैर्य देते..तेव्हा लहानपणी या कवितेचा अर्थ इतका उमगत न्हवता पण आज आयुष्य जगताना या कवितेचा खरा अर्थ उमगतो..तसा कवितेचा अर्थ वाचनाऱ्याच्या मानसिकतेनुसार आणि अनुभवानुसार बदलत असतो पण आशय हा तोच राहतो.
     मला आठवते आम्ही लहान असताना आमची आजी आम्हा भावंडांना तिचे अनुभव रात्री एकांतात उलगडून सांगत असे..तिच्या सांगण्यानुसार तिच्या आयुष्यातील मी अनुभवलेला एक किस्सा मी इथे मांडतो..आमची आजी तिच्या मुलांसह म्हणजे माझ्या वडिलांसोबत २ चुलते आणि आत्याचा सांभाळ करताना किती अडचणी आल्या याचे केलेले कथन म्हणजे एक जीवनपटच..माझे वडील म्हणजे शेंडेफळ,माझे वडील २ वर्षाचे असतानाच माझे आजोबा देवाघरी गेले..त्याच वेळी माझी आजी रस्त्याच्या एका बाजूला ३ फूट खाली एका झोपडीवजा छप्पर नसलेल्या घरात राहत होती..पावसाळ्यात तर खूपच विदारक चित्र व्हायचे घरातील भांडी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाणे हे नित्याचेच ठरलेले ते सावरता सावरता या लहान मुलांचा सांभाळ करणे म्हणजे तिची तारेवरची कसरत व्हायची..अश्याच एका पावसाळ्यात आजोबा गेले आणि आजीचा होता न्हवता तोही आधार गेला..जिथे एक वेळ जेवणाचे हाल व्हायचे तिथे इतक्या मुलांचा सांभाळ आणि ते ही एकटीने हे येरा गबाळयाचे काम न्हवे?..पण हे माझ्या आजीने एकटीने पेलले..माझे थोरले चुलते शिक्षण अर्धवट सोडून आजीला साथ देऊ लागले..ती दुसऱ्याच्या शेतात राबत तर होतीच पण त्याचबरोबर थोरले चुलते ला भावंडांच्या जबाबदारीची जाणीव करून देऊन दुसऱ्याच्या घरी धूनी भांडी करून स्वतः उपाशी राहून मुलांना खाऊ घालत असे.. गावातीलच जिथे आजी धुनी भांडी करत असे त्या घरातील आजीची मालकीण खूपच मायाळू होती ती तिला कामाच्या मोबदल्याबरोबर भविष्यातील मुलांच्या शिक्षणासाठी आणि राहत्या घराच्या बांधकामासाठी प्रोत्साहन देत असे तिला गुंतवणुकीचे योग्य सल्ले देत असे...त्या माऊलीच्या प्रोत्साहनाने आणि आजीच्या आणि थोरल्या चुलत्याच्या कष्टाने घर राहण्यायोग्य बांधून पूर्ण केले..आजी सांगते  जर मला माझ्या मलकिनीचा आपुलकीचा हात पाठीवर नसता तर कदाचित तेव्हा मिळालेल्या पैश्याचा योग्य असा वापर करताच आला नसता. ती म्हणत असे पैसे तर खूप मिळवता येतील पण अशी पाठीवर हात ठेवून तुम्ही फक्त लढा म्हणणारी आपुलकीची माणसे मिळाली तर आयुष्यातील सर्व संकटांचा सामना करण्याची हिंमत ,आत्मविश्वास आपल्याला मिळेल जो आज खूप गरजेचा आहे म्हणून आयुष्यात अशी माणुसकी राखून ठेवणारी आपलुकीची माणसे जोडायला शिक हा सल्ला द्यायला ती विसरली नाही...आज आजी हयात नाही पण तिने दिलेल्या तिच्या अनुभवांची शिदोरी मात्र सोबत आहे.

महेश कामडी,नागपूर.
' कणा ' कुसुमाग्रज यांच्या कवितेतील शेवटची ओळ "पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा" या ओळीचा माझ्या जीवनावरही प्रभाव पडला आहे. पण सध्याच्या परिस्थितीला अनुसरून काहीतरी लिहावं वाटलं.
          कुसुमाग्रज यांनी कवितेत एका गरीबाची परिस्थिती मांडलेली आहे आणि माझा हा लेख पण अशाच एक गरीब कुटुंबावर आधारित आहे.
           एका खेडेगावातील कुटुंब आधीपासूनच गरिबीमध्ये असलेले त्यांच्याकडे फक्त राहण्याकरिता घर होते. तेही काही वर्षांपूर्वी घरकुल लागून आले म्हणून. पण छोटसं घर चारी बाजूंनी विटींच्या भिंती बाहेरून आतुन प्लास्टर न केलेल्या घराच्या वरती लाकडी फाटे टाकून घराच्या मागील भाग कवलाने झाकलेला आणि समोरील भागवरती टीना  टाकलेल्या.
त्यांच्या मुलींचे लग्न होऊन आता बरीच वर्षं झालीत मुलींच्या लग्नाच्या काही वर्षांनंतरच त्यांची आई वारली. नंतर घरात फक्त दोन मुलं आणि त्यांची वडील आई वारल्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या वडिलांवर आली. पण पत्नी वरल्यामुळे ते ही काही महिन्यातच बिमार झाले. अचानक कमाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे घरातील मोठा मुलगा हा कामाला घरा बाहेर निघाला, आपले शिक्षण करत तो काम करू लागला घर सांभाळू लागला. लहान भावाचे शिक्षण सुरू होते. मात्र ' कमाई त्यात मूठभर दोन वेळचे खायला मिळायचे  पोटभर ' पण प्रश्न होता आता त्यांच्या वडिलांची तब्येत ती मात्र बरी होत नव्हती. पैशांच्या अभावी ते आपल्या वडिलांना चांगल्या डॉक्टरला पण दाखवू शकले नाही. त्यांचे शरीर खराब होत गेले पाय, हात व सर्व शरीरावर न बसणाऱ्या बऱ्या न होणाऱ्या अशा जखमा होऊ लागल्या. कालांतराने म्हणजे दीड - दोन वर्ष मध्ये त्या न बऱ्या होणाऱ्या जखमांमुळे त्यांची दोन्ही हातांची बोटे गळू लागली. नंतर त्यांची प्रकृती अचानक सुधारत गेली मात्र ते आपले हातांची बोटे गमावून बसले.एका हाताची चार बोटेगेली अंगठा फक्त राहिला, तर दुसऱ्या हाताची दोन बोटे गेली अशा अवस्थेमध्ये त्यांना कामाला जाणे आता शक्य नव्हते.
 मोठ्या मुलाने बारावीपर्यंत कसेबसे आपले शिक्षण पूर्ण केले. आणि गावातच मिळते काम करायला लागला. लहान भावाला बारावीपर्यंत शिक्षण झाले नंतर दोघेही आता कामाला जात. काही दिवसांनी मोठा मुलगा कामाला गावाबाहेर  गेला आणि नंतर लहान मुलगा व वडील दोघाच. सर्व कामे लहान मुलाला करावी लागत. पण मोठ्या मुलाचे बाहेर तेवढे काहीच जमले नाही. म्हणून तो पुण्याला गेला व कंपनीमध्ये काम करू लागला. तिथे त्याला बऱ्यापैकी म्हणजे अकरा - बारा हजार पगार मिळत. पण आता तो पुणे वरून काही दिवसांकरिता गावी आला आणि सुरु झाले लॉकडाऊन आता होते ते पैसे खर्च होऊ लागले. आणि गावामध्ये पण काम मिळणे अशक्य झाले.पण गावाकडे छोटी मोठी शेतीची कामे असतेच म्हणून आले ते काम करू लागला. पण त्यांना सर्व विकत घ्यावे लागत.कारण त्याच्या कडे शेती नाही. परंतु राशन मिळत म्हणून फारस धान्य विकत घ्यावं लागतं नाही. तरी सुध्धा बाकी आवश्यक गोष्टी लागल्याचं आहे! आता दोन दिवसा आधी गावातील बचत गटाच्या महिलांनी गावातील गरीब कुटुंबांना छोटीसी मदत या कोरोनाच्या महामारी मध्ये करायची ठरविले.
त्यात मीठ, तिखट, हळद, तुरदाळ, तेल इत्यादी वस्तू पाव अर्धा किलो या प्रमाणे सर्वांनी द्यायचे ठरवले. मात्र जेव्हा बचत गटातील महिला त्यांच्या घरी ही सामग्री घेऊन गेले तर त्या घरातील मुलाने स्पष्ट नाही म्हटले. आणि म्हणाला तुम्ही दुसऱ्या कोणत्या गरीब कुटुंबाला ही सामग्री द्या. पण तुमच्याकडे शेतीतील किंवा दुसरे कोणतेही काम असेल तर सांगा. तुम्ही फक्त मला काम द्या, गरीबी जगायचं कसं ते मला येत. लोकांना तर आज या कोरोना ने हे दिवस दाखवले. पण मी तर या दिवसांमध्ये लहानाचा मोठा झालो. गरिबाला काम देऊन पुढे चल म्हणा.

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************