महात्मा गांधी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महात्मा गांधी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गांधीविचारांचा मी केलेला उपयोग



शिरीष उमरे, नवी मुंबई
         मी सामाजिक क्षेत्रात काम करत असुनही ज्यांच्या विचाराचे व आचाराचे अनुकरण करणे महाकठीण वाटले ते म्हणजे गाडगेबाबा आणि गांधी !! 
     आईवडीलांच्या व शिक्षकांच्या संस्कारामुळे सर्वधर्म समभाव, जातपात न मानणे, अस्पृश्यता न पाळणे, स्वदेशी ची आवड, निर्भयता, सत्याग्रह, मितव्यय, स्वावलंबन ह्याची बीजे लहाणपणापासुन रुजली होती.पुढे जाऊन हे गांधींचे विचार व आचारसरणी होती हे उमजले. 
      हा हाडामासाचा माणुस उच्चशिक्षीत होता. प्रयोगशील वृत्तीमुळे भरपुर चुका केल्या. वाईट म्हणता येईल ते सगळे करुनही ह्याला इतके जनसमर्थन कसे ह्याचे सुरुवातीला मला आश्चर्य वाटायचे... नंतर ह्यांचे चरीत्र लेखण वाचत गेलो तेंव्हा कळाले की हे अवघड प्रकरण आहे. 
        स्वत:च्या चुका मान्य करणे व आयुष्यभर ती चुक न करणे आणि पश्चाताप करुन त्यावर कायम समाधान शोधणे हे हीमालय चढण्यापेक्षा महाकठीण काम आहे. हे लिलया करणारे गांधी मला जास्त झेपले नाहीत. 
      सोपे सोपे पेलेल एवढे विचार पचवुन अंमलात आणण्याचा प्रयत्न आजही सुरु आहेत. 
    नेहमी खरे बोलण्याचा प्रण अजुनही यशस्वी झाला नाही. निरुपद्रवी खोटे बोलण्याने काही होत नाही अशी स्वताचीच समजुत घालतो. 
खादी कपडे आवडतात पण हीवाळ्यात स्वेटर घालतो. रंगीबेरंगी कपडे वापरतो. 
    मित्र कंजुस म्हणतात पण रीयुज, रीसायकल करायचे सोडत नाही. भ्रष्टाचार करत नाही. दुसर्याने केलेला आवडत नाही. बरेचवेळा मुर्खात काढतात लोक पण खरच छान गाढ झोप येते. 
स्वताचे ताट धुणे, घर झाडणे, टॉयलेट स्वच्छ करणे, कपडे धुणे ह्यात कधीच कमीपणा वाटला नाही. 
सगळ्या जातीधर्माचे जिवलग मित्र आहेत. कर्मकांडात कधी पडलो नाही त्यामुळे सगळे नास्तिक समजतात. मित्रांसोबत कधीमधी बसतो पण माझे पैसे कधीच खर्च करत नाही. 😜
गांधीबद्दल इतके चांगले वाईट ऐकले व वाचले आहे की मी गोंधळुन जातो...मग एकच केले की जे चांगले वाटले ते अनुकरण करुन बघितले आणि जे वाईट वाटले ते केले नाही... 
आज दीडशे वर्षापुर्वी जन्मलेला व पन्नास वर्षापुर्वी मृत्यु पावलेला व्यक्ती पुर्ण जगात आपल्या विचार व आचाराचे गारुड करुन आहे त्या व्यक्तिमत्वाबद्दल अजुन काय लिहावे ?? 🙏🏼😇


〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

पी.प्रशांतकुमार,सावेडी,अहमदनगर..
        गांधी हा encyclopedia आहे.. आपली जितकी कुवत तितकी ओंजळ भरून घ्याची..
.. शिवाशीव- भेदाभेद हे मी माझ्या पातळीवर कधीच पाळले नाही.. फक्त जातीतलेच नाही तर आर्थिक सामाजिक पातळीवरही..
... तुम्ही प्रत्येक वेळी खूप मोठा उद्देश ठेवूनच कार्य करावं असं नाही तर तुमच्या छोट्या-मोठ्या वागण्याचा बोलण्याचा आपोआप तुमच्या मुलांवर परिणाम होत असतो..
.... आज आपल्याला गरज आहे ती ..स्वच्छ भारत-सशक्त भारतची...प्रत्येकवेळी कॅमेरासमोर चमकोगिरी करून आपण आपल्यालाही फसवतच असतो..
...मी कचरा करत नाही,तो व्यवस्थित कचराकुंडीत टाकतो.. अगदी ट्रिपला गेलो तरी चॉकलेट वगैरेचे रॅपर रस्त्यावर टाकत नाही..आणि आता घरातलेही सगळे तसंच करतात..
.....मला धर्म-भाषा-जात याच्या शृंखला आवडत नाही.. भारत एकसंघ आहे आणि तसाच राहावं हे मत.. आताही आपल्या कृतीतून जोडो भारत साठी काय करता येईल हे पहातो..
.... तुमच्या साध्या-साध्या कृतीने भले मोठा परिणाम होत नाही पण छोट्या प्रमाणात नक्कीच कुठेना कुठे त्याची दखल घेतलीच जाते..
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰


गणेश भंडारी, अहमदनगर
      आज गांधी जयंती! आज आपण सर्वत्र गांधीजींचा जयजयकार करतो, त्यांनी केलेल्या कार्याचे गोडवे गातो. त्यांचे कार्य व त्यांनी सांगितले विचार जयजयकार करण्यासारखेच आहे. पण असा जयजयकार करीत असताना आपण या महात्म्याने सांगितलेले विचार, मूल्ये, तत्वे आपल्या स्वतःच्या आचरणात आणतो का, आणत असल्यास कितपत आणतो, त्यात काही अजून सुधारणा करू शकतो का, जर आणत नसू तर ती कशी आचरणात आणता येतील याचाही विचार केला पाहिजे. नाहीतर त्यांचे विचार कागदावरच राहायचे व आपण केवळ विभूतीपूजेतच मग्न राहू! त्यांच्या विचारांवर आचरण करणे हेच त्यांना खरे अभिवादन असेल. याच अनुषंगाने मी सध्या गांधीविचारांचा आचरणाचा बाबतीत नेमका कोठे उभा आहे, याचे अवलोकन करायचे ठरवले. त्या अवलोकणातून जे काही हाती लागले, ते आपणासमोर मांडीत आहे.
सर्वप्रथम आपण गांधीविचार म्हणजे नेमके काय, ते पाहूया. गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात वेळोवेळी अनेक महान तत्वांचे प्रतिपादन केले. त्यांनी सांगितलेली सर्व प्रमुख तत्वे 'एकादश व्रते' यात समाविष्ट आहेत. या एकादश व्रतांचे विवेचन गांधीजींनी 'मंगल प्रभात' या पुस्तकात खूप छान पद्धतीने केले आहे. जिज्ञासूंनी हे पुस्तक अवश्य वाचावे. एकादश व्रतांत सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शरीरश्रम, अस्वाद, निर्भयता, स्पर्शभावना, सर्वधर्म समभाव व स्वदेशी यांचा समावेश होतो. याशिवायही त्यांनी व्रतांचे पालन करण्यासाठीचा निग्रह, दृढनिश्चय, स्वावलंबन, सेवावृत्ती, स्वयंपूर्णता, अन्यायाला विरोध इ अनेक तत्वे सांगितली आहेत. खरे तर ही तत्वे भारतीय संस्कृतीत खूप प्राचीन काळापासून अस्तित्वात होती, पण गांधीजींनी त्यांना एक सुसंगत रूप दिले व त्यांचे विविध बारकावे सांगितले. म्हणून या सर्वांना आपण सोयीसाठी गांधीविचार असे म्हणूया.
आता या गांधीविचारांचा मी माझ्या प्रत्यक्ष जीवनात उपयोग करण्याचा कसा प्रयत्न करतो, हे थोडक्यात स्पष्ट करतो. येथे एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो, की हे लेखन मी माझी बढाई मारण्यासाठी किंवा मोठेपण मिरवण्याची करीत नसून मी नेमका कोठे उभा आहे, मला कोणत्या सुधारणांची आवश्यकता आहे हे माझ्या लक्षात येण्यासाठी करीत आहे. त्यातून इतरांना काही मिळाले, काही फायदा झाला, तर मला आनंदच होईल.
सत्य आणि अहिंसा ही गांधीजींची सर्वात महत्वाची व तितकीच प्रसिद्धी पावलेली तत्वे. अहिंसा म्हणजे केवळ दुसऱ्याची हिंसा करणे नव्हे, तर तिला यापेक्षाही अनेक विविधार्थी पदर आहेत. मी स्वतः शाकाहारी आहे. तसेच इतर प्राण्यांना कोणत्याही कारणाने मारण्याआधी किंवा इजा पोचवण्याआधी अनेकदा विचार करतो. पण ही अहिंसेची ढोबळ व्याख्या झाली. सुक्ष्मार्थाने अहिंसेचे पालन करण्याचा मी प्रयत्न करतो. म्हणजे दुसऱ्यांना केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक पीडा होणार नाही याची काळजी घेतो. अर्थात ते मला अजून पूर्णपणे साधत नाही. माझ्या बोलण्यातून किंवा कृतींतून इतरांना काही त्रास होत असेल तर त्याची जाणीव मात्र होते आणि मनाला वेदनाही होतात. हे मी योग्य मार्गावर असल्याचे लक्षण आहे असे मी मानतो. मी शक्यतो दुसऱ्यांविषयी काही निर्णय घेताना किंवा दुसर्याशी बोलताना-वागताना त्यांच्या जागेवर मला स्वतःला ठेऊन पाहतो. त्यामुळे आपल्या हातून दुसऱ्यांना दुखावण्याची शक्यता कमी होते. सत्य म्हणजे खरे बोलणे व वागणे. आता रोजच्या व्यवहारात पूर्णपणे सत्य वर्तन मला साधत नाही. अनेकदा परिस्थितीवश किंवा प्रसंगवश खोटे बोलण्यात येते. तरीही जेवढे जास्त शक्य होईल, तेवढे सत्य वागण्याचा मी प्रयत्न करतो. विनाकारण आपल्याकडून खोटे बोलले जाणार नाही, याची काळजी घेतो. खोटे बोलण्याचे नैतिक दुष्परिणाम तर आहेतच, पण व्यवहारातही त्याचे अनेक तोटे आहेत. खोटे बोलून कधीकधी आपला तात्कालिक फायदा होत असेलही, पण एक खोटे शंभर खोट्यांना जन्म देते याची मला जाणीव आहे. रोजच्या वागण्यातही काही बारीकसारीक गोष्टींची मी काळजी घेतो. जसे की, समजा आपण एखाद्याला म्हटले, की थांब मी दहा मिनिटांत आलोच, तर ती दहा मिनिटांनी मर्यादा पाळण्याचा प्रयत्न करणे, एखाद्याला काही करण्याविषयीचे दिलेले आश्वासन कसे पूर्ण करता येतील हे पाहणे इ. या गोष्टी दिसताना छोट्या दिसतात, पण त्या आपल्या स्वभावाला एक वळण देतात.
अस्तेय म्हणजे चोरी न करणे. यात प्रत्यक्ष चोरी करण्याचे मी टाळतोच, पण दुसऱ्याच्या हक्काची एखादी गोष्ट बळकावणे, व्यवसायात खोटी वजनेमापे वापरणे, एखाद्यकडून अनावधानाने जास्त पैसे मिळाले, तर ते ठेऊन घेणे हेही टाळतो. तरुण वयाचा परिणाम म्हणून काही भावना या स्वाभाविक असल्या तरी त्यामुळे माझे मन मालिन होणार नाही याची मी काळजी घेतो. अपरिग्रहाच्या बाबतीत खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मला खूप संपत्ती मिळवायची आहे, श्रीमंत व्हायचे आहे, पैशांच्या जोरावर लोकांवर सत्ता गाजवायची आहे, या भावनांवर मी नियंत्रण मिळवू शकलो नाही. तरीही त्यातल्या त्यात माझ्या गरजा कमीत कमी कशा ठेवता येतील, राहणीमान साधे कसे राखता येईल, किमान साधनांचा उपयोग करणे या गोष्टींचा मी प्रयत्न करतो.
बँकेतल्या नोकरीमुळे शरीरश्रमास वाव मिळत नाही. तसेच मला अल्पदृष्टीचा त्रास असल्याने शरीरश्रम करण्यावर अनेक मर्यादा येतात. तरीही जेव्हा शरीरश्रम करण्याची संधी मिळेल, तेव्हा तिचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो.
गांधीजींच्या सर्व तत्वांत मला सर्वात जास्त आवडलेले तत्व म्हणजे अस्वाद. अस्वाद म्हणजे कोणत्याही गोष्टीचा-अन्न, कपडे व इतर गोष्टी- केवळ इंद्रियसुखांसाठी रसास्वाद न घेणे, तर त्या केवळ शरीराचे भरणपोषण व संरक्षण करण्याच्या दृष्टीने वापरणे. मी शक्यतो जेवण करताना चव थोडी कमीजास्त झाली तरी तक्रार करण्याचे टाळतो. ताटात जे काही येईल, ते गोड मानून खातो. पण अजूनही काही थोडे पदार्थ मी खाऊ शकत नाही. कपड्यांच्या बाबतीतही तसेच. अस्वाद हे तत्व प्रभावीपणे अमलात आणता आले, की इतर तत्वांचे पालन करणे सोपे होते, असे गांधीजी एके ठिकाणी म्हटले आहेत. निर्भयतेची बाबतीतही मी थोडीफार प्रगती केली आहे. निरर्थक गोष्टींची, उदा. भूत, अंधार, विविध प्राणी यांची भीती मनातून काढून टाकण्यात मी मोठ्या प्रमाणात यशस्वी झालो आहे असे मला वाटते. अन्यायाच्या विरोधात कोणाविरुद्ध निर्भयपणे उभे राहण्यास मात्र मॅन अजूनही कचरते.
स्वावलंबन व स्वयंपूर्णता साध्य करण्यास पुन्हा माझे अपंगत्व आड येते, पण त्यावर मात करून जास्तीत जास्त स्वावलंबी होण्याचा, स्वतःच्या गोष्टी स्वतःच करण्यास शिकण्याचा, दुसऱ्यावरील अवलंबित्व कमी करण्याचा माझा प्रयत्न असतोच. निश्चयाचा बाबतीतही एखादी गोष्ट विचारांती ठरवली, तर ती कशी पूर्ण करता येईल यासाठी माझे प्रयत्न असतात. पण अनेक गोष्टींत मी निश्चय पार पाडू शकलो नाही, जसे की सकाळी लवकर उठणे, चालायला जाणे, व्यायाम इ. कदाचित माझ्यातील आळस यात आडवा येत असावा! गांधीजींचा एक गुण म्हणजे वक्तशीरपणा व वेळेचे नियोजन. उपलब्ध वेळेचा जास्तीत जास्त प्रभावी व उत्पादक वापर कसा करता येईल यासाठी नियोजनाची कला व त्याच्या जोडीला आत्मनियंत्रण पाहिजे. हे साध्य करण्याचाही माझा प्रयत्न आहे.
स्पर्शभावना म्हणजे अस्पृश्यता न मानणे. मी अलीकडे कुणालाही त्याची जात विचारत नाही. जरी एखाद्याची माहीत पडली तरी त्याच्याशी माझ्या व्यवहारात फरक पडत नाही. पूर्णपणे जातमुक्त होण्यासाठी मात्र खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. सर्वधर्म समभावाच्या बाबतीतही तसेच. कोणत्याही धर्माच्या लोकांबद्दल व त्यांच्या धर्माबद्दल माझ्या मनात द्वेष नाही हे मी माझे भाग्य समजतो. स्वदेशीचे पालन आज कसे करता येईल, याबाबत मला विचार करायचा आहे. महात्मा गांधींची वृत्ती अतिशय सेवाभावी होती. त्यांच्या मार्गावर चालताना मी शक्य होईल तेवढी इतरांची विशेषतः दुर्बलांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. गांधीजी असे म्हणत असत, की एखादी गोष्ट मी म्हणतो म्हणून स्वीकारू नका, तर ती तुमच्या बुद्धीला पातळी, तरच स्वीकारा. येथे ते चिकित्सक वृत्तीचा पुरस्कार करतात. मी माझ्या विचारसरणीला चिकित्सेची सवय लावण्याचा प्रयत्न करत आहे.
   या विवेचनावरून गांधीविचारांचा माझट जीवनात उपयोग करण्याचा मी कसा प्रयत्न करतो, याची कल्पना आली असेल. माझी आपणास विनंती आहे, की हे वाचल्यानंतर मला कृपया कोणी थोर व्यक्ती किंवा साधक समजण्याची चूक करू नका. मी अगदी सामान्यातील सामान्य व्यक्ती असून अनेक चुकांचा व दोषांचा मूर्तिमंत पुतळा आहे. गांधीविचारांचे पालन करण्याच्या बाबतीत मी अगदी प्राथमिक अवस्थेत वा पहिल्या पायरीवर आहे. खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी आणि गांधीजींचा केवळ जयजयकार न करता त्यांचा एक सच्चा अनुयायी बनण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न असतील हे मात्र नक्की!
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

किशोर शेळके.लोणंद.
     आजच्या या कलयुगात सरळ मार्गाने वागणारा माणूस सापडणे खूप कठीण आहे. किंबहूना सरळ मार्गाने वागणे म्हणजे खूपच अशक्य अशी गोष्ट आहे. साध्या साध्या गोष्टीतही उंगली तेढी करावी लागते. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की गांधीजींच्या विचाराने पुर्णपणे वागणारा माणूस सापडणे खूप कठीण आहे. तरीही आपण प्रामाणिकपणे एखादी गोष्ट अवलंबायचे ठरवलेच तर आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. 
मी माझ्या आयुष्यात तसाच वागण्याचा प्रयत्न केला. सत्य हे कटू असतं हे खरंच आहे . पण ते अजरामर ही आहे हेही तितकंच खरं आहे. सत्याचा पराजय कधीच नाही होऊ शकत. कोणत्याही व्यक्तीचा खोटेपणाचा आधार घेऊन झालेला विजय जास्त वेळ टिकणारच नाही. एक खोटं लपवण्यासाठी परत हजार वेळा खोटं बोलावं लागतं.
असाच एक प्रसंग सांगतो, म्हणजे त्याचवेळी मला जाणिव झाली की सत्य बोलणं हे किती महत्त्वाचे आहे. साल २००५ मी आठवीत शिकत होतो. ग्रंथालयाकडून पाठ्यपुस्तकांचा संच घ्यायचा होता. मला आधीच ऊशीर झालेला त्यामुळे मी त्यादिवशी घाई करत होतो. ग्रंथालयाच्या फाॅर्मवरती वर्गशिक्षिकेची सही लागणार होती. आणि त्यादिवशी त्या आल्या नव्हत्या. मग मीच माझ्या हातानेच त्या फाॅर्मवर सही केली. विषय इथेच संपत नाही. जेव्हा ग्रंथपालाने मला विचारले की ही सही मॅडमची नाहीच आहे. तू दुसरा फाॅर्म भर , तर मी बोललो की ही सही मॅडमचीच आहे. तेव्हा मला खोटं बोलण्याची शिक्षा म्हणून त्या वर्षी पुस्तकेच दिली नाहीत. आणि तेव्हापासून ठरवलं की इथून पुढे कधीच खोटे बोलणार नाही. आणि मग तसा प्रयत्न ही केलाय.
अहिंसेचा मार्ग ही तितकाच खडतर आहे. पण या मार्गाने जात असलेल्या व्यक्तीला आपले लक्ष्य नक्कीच सापडणार. माझ्या जीवनातील असाच एक प्रसंग आठवतोय मला.
मला सहा चुलते व दहा चुलत भाऊ पण काॅलेजची पायरी चढणारा मी एकटाच. म्हणून मी सगळ्यांचा लाडका. काॅलेज मधे असताना मला एका मुलाने विनाकारण च त्रास दिला . मी त्याकडे कानाडोळा केला. त्याने दुसर्या दिवशी ही तोच त्रास दिला. मीही पुन्हा दुर्लक्ष केले. खरंतर त्याला घरची पार्श्वभूमी माहीत नव्हती. कोणत्याही एका भावाला ही गोष्ट समजली असती तरी त्याचे बारा वाजले असते. पण मी ती गोष्ट कोणाला कळू दिली नाहीच पण मीही काही बोललो नाही. शेवटी त्याच्याच लक्षात आल्यावर त्याने माफी मागितली. आणि तो प्रसंग आठवला तर अजूनही खुप बर वाटतं. तेव्हा मला जाणवलं की त्याच्या तश्या वागण्याने मला जो त्रास झाला नाही तो त्रास माझ्या हिंसक कृत्याने नक्कीच मला झाला असता. तेव्हा अहिंसेचा मार्ग जोपासणे गरजेची बाब आहे.
एकुणच गांधीजींच्या तत्वांचा वापर केला तर जगणं खूप सोयीस्कर होऊन जाईल...
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰


अक्षय पतंगे,आ बाळापुर,हिंगोली.
       माझ्यामते गांधी हा जगण्याच्या विषय आहे. मी दोन वर्षांपूर्वी M.A. सोडून गांधी विचारांवर अभ्यास करण्यासाठी गांधी रिसर्च फौंडेशन जळगाव ला प्रवेश घेतला. पहिल्या सहा महिन्यानंतर बाकीचे सहा महिने गावात राहून गावचा सामाजिक आर्थिक अभ्यास करावा लागतो, तो मी पूर्ण केला. ग्रामसभा, बचतगट चळवळ यात हिरारीनं सहभाग घेतला (जळगाव तालुक्यात). मला शहरांपेक्षा गावात जायला लोकांमध्ये राहायला रमायला आवडते. त्यानंतर मी टाटा धान अकादमी मदुराई च्या परीक्षेत उत्तीर्ण झालो. माझ्या साध्या राहणीमानाबद्दल माझे दोन-चार मित्र बऱ्याचदा बोलले. मी पाच वर्षांपासून जीन्स घालणे सोडले, कारण हजारो रुपयांच्या पैशांची उधळपट्टी करून दोन अंकी ड्रेस विकत घेणे हे मला अजिबात पटत नाही. मला इथं धान चे संस्थापक श्री. एम. पी. वासीमलाई यांचे उदाहरण देणे महत्वाचं वाटतं, 17 राज्यात धान काम करते. IIM अहमदाबाद मधून उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी लक्षावधी रुपयांची नोकरी सोडून एका सामाजिक संस्थेत(PRADHAN) कार्यकर्ता म्हणून काम केले. ते केवळ 2 ड्रेस वापरतात. कारण मागणी कमी झाली तर गरिबांनाही कमी दरात कपडे मिळतील असं त्यांना वाटतं. गांधीजींनी सांगितलं होतं, समाजातील सर्वांत दुःखी चेहरा तुमच्या कामाचा आदर्श असला पाहिजे, मी ही तोचं चेहरा आदर्श माणून काम करीत राहीन.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰



सौदागर काळे,पंढरपूर.
       महात्मा गांधीजी अगोदर कृती करायचे ,त्यानंतर विचार जन्मास यायचा.विचार रोज आपल्याला आत्मसात होत राहतात.कधी पुस्तकांतून,कधी माणसांतून,कधी निसर्गातून.पण कृतीचं काय ?असा प्रश्न खूप वेळा पडतो मला.मी माझ्या परीने जिथे जाईल तिथे रस्त्यावर न थुंकणे,कचरा न टाकणे ,उगीच कुणालाही त्रास न देणे,अशा सध्या गोष्टींची काळजी घेतो.8 वर्षांपासून चहा,कॉफी असे पेय पीत नाही.यात गांधीजींचा विचार किती माहीत नाही पण दुसऱ्यांना चहा पिणे शरीरास कसे चांगले नाही ,हे सांगताना माझ्याकडे कृतीचा आधार असतो.याचे समाधान वाटते.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

गांधीजींच्या चष्म्यातून सत्तरी मधला भारत


गांधीजींच्या चष्म्यातून सत्तरी मधला भारत

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

गांधीजींच्या चष्म्यातून सत्तरी मधला भारत


Source:INTERNET

-पी प्रशांतकुमार
 अहमदनगर

 वय 70 वर्ष .. अस म्हणतात गीता ऐकली तेव्हा अर्जुन 70-75वर्षांचा होता.. माहीत नाही पण तसा विचार करता 70 वर्षांचा देश तरुणच म्हणावा लागेल..
....गांधीजींच्या चष्म्यातून पाहायचं ठरवलं तर किती बदल झाले काय बदल झाले सगळं दिसेल..
... स्मार्ट सिटीच्या घोषणात खेडी तेव्हा होती तशीच आजही मागास दिसतील..वीज, पाणी आणि इतर काही सुविधा पोहचल्याही असतील पण गांधींच्या विचारातली स्वयंपूर्ण खेडी..आर्थिक दृष्टया विकसित खेडी फारशी दिसत नाही. स्वयंपूर्ण खेडी यादी करायची ठरवली तर आमच्या नगरच्या हिवरे बाजार आणि राळेगण सिद्धी आणि यादी संपली..
....होय शिक्षण/आरोग्य या बाबतीत प्रगती आहे पण शहरांकडे वाहणारा ओघ कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसतो.. आणि 70 वर्षांनंतर ही तो थांबत नाही ही वस्तुस्थिती कष्टदायक आहे..आताच सरकार काही ब्रिटिशांसारखं शत्रूच नाही तरीही महानगर-नगर आणि खेडी यात दरी वाढताना का दिसते?
...स्वच्छता हा गांधीजींचा आवडता विषय..चला स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने गांधींचा चष्मा आणि स्वच्छतेची निकड या गोष्टी तरी प्रकाशात आल्या ...
...आणखी महत्वाच ते म्हणजे ऐक्य ..
*ईश्वर अल्ला तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान*
गांधीजींचं आवडत भजन ..आणि आजही त्याची तेव्हडीच गरज आहे ..नौखालीत जातीय दंगली थांबवण्यासाठी जे कष्ट घेतले..आज कुणी तरी घ्यावेत..दरी मोठी होताना दिसते..
...हिंदू-मुस्लिम, सवर्ण-दलित , असले धर्मातले, जातीतले समाजातले तेढ दिसले तर त्या चष्म्यामागचे डोळे नक्कीच भरून येतील.. ते हेच म्हणतील,
*हम लाए हैं तूफ़ान से कश्ती निकाल के*
*इस देश को रखना मेरे बच्चों सम्भाल के*
*तुम ही भविष्य हो मेरे भारत विशाल के*
*इस देश को रखना मेरे बच्चों सम्भाल के*



Source: INTERNET

-अक्षय पतंगे
 हिंगोली

संशोधक आईनस्टाइन म.गांधीजींबद्दल म्हणतो, "हा हाडामांसाचा माणूस या भूतलावर होऊन गेला यावर येणाऱ्या पिढयांचा विश्वास बसणार नाही." खरंच ते काल जेवढे कालसुसंगत होते त्यापेक्षा जास्त आज कालसुसंगत आहेत. हा माणूस कोणत्याही साच्यात बंदीस्त करता येणार नाही. सर्वधर्म प्रार्थनेला त्यांनी प्राधान्यक्रम दिला. मानवसेवा हीचं ईश्वराची उपासना आहे हे सांगितले. पद-प्रतिष्ठेपेक्षा आयुष्यभर 'कॉमन मॅन' राहीले.. पण बुद्ध, महावीरांच्या सत्य अन् अहिंसेच्या तत्वज्ञानावर संघटन उभं करणारा हा माणूस uncommon man होता. ते म्हणतात, 'तुम्हाला निरपेक्ष सेवा करायची तर तुमच्या आयुष्यात तुम्ही पाहिलेला सर्वांत दुःखी माणसाचा चेहरा डोळ्यासमोर आठवून काम करा' ना कुणाला लाभार्थी बनवलं ना कधी स्वतः लाभाचं पद घेतलं. शिक्षणात त्यांनी नई तालीमची म्हणजे hand, head, heart या जीवनमुल्यांची मांडणी केली. आर्थिक समानतेचा पुरस्कार करत सर्वोदय संकल्पनेची पायाभरणी करणाऱ्या गांधीजींच्या देशाचा सध्या जागतिक आर्थिक विषमतेच्या क्रमवारीत ६२ वा नंबर लागतो. सामान्य लोकांच्या वेदनेला न्याय देत असतांना शोषणमुक्त समाजाची निर्मिती हे गांधीजींचे स्वप्न सत्तरीनंतरही पुर्ण झाले नाही.  ते पट्टीचे वक्तेही नव्हते, पण लोक कार्यक्रमांस गर्दी करत कारण फरक एवढाच की, तो माणुस जो बोलत होता ते जगतं होता, ते जगणं पुढे तत्वज्ञान झालं, पण हे शाळेत जरी शिकवलं असतं तरी या विषयावर लिहायची गरज पडली नसती.


            

Source: INTERNET

-किरण पवार,
 औरंगाबाद

गांधीजींना भारत हवा होता तो माणसातल माणूसपण शोधणारा पण भारतात ही सध्या परिस्थिती कितपत पहायला मिळते?आज याऊलट कितीतरी भयानक परिस्थिती आपण पाहतो. *डॉ. दाभोळकर, गौरी लंकेश वा गोविंद पानसरे यांच्या हत्या यावरून आपण कुठे जातोय? याच भान आम्हाला जराही राहीलेल नाही.* जिथे गांधीजींना अहिंसा हवी होती तिथे आम्हीच हिंसा करून वाईट कृत्ये केली. गावाकडे चला या नाऱ्याचा तितका प्रभाव आजही तरूणांवर नाही. *कारण आजच्या तरूणांना  चैनी जिवनाशिवाय जमत नाही. गावात संधी भरपूर आहेत पण आपण त्या शोधायचा कंटाळा करतो एवढं नक्की.*
            गांधीजींना वाटत होतं की, माणसाच्या हाताने चूक झाल्यास त्याने समोरच्याची प्रामाणिकपणे क्षमा मागावी. *पण आपण तरूण क्षमा मागण म्हणजे लाजिरवाणी किंवा अपमानास्पद गोष्ट समजतो.* या सर्व गोष्टी बदलायला हव्या आहेत. कारण छोट्या छोट्या चांगल्या गोष्टीच माणसाला मोठ बनवतात. जो पर्यंत भारतातल्या प्रत्येक गरीबाला आणि भिकाऱ्यांना अंगावर घालायला चांगले कपडे मिळणार नाहीत तोपर्यंत मी अंगावर चांगले वस्त्र परिधान करनार नाही. असा गांधीजींसारखा विचार किमान आजच्या एका तरी तरूणात येतो का? ही शोकांतिका आमच्याच गांधीजींच्या सत्तरीतल्या भारताची आहे.




Source: INTERNET

-सौदागर काळे
 पंढरपूर

या विषयावर मोजकेच लिहिताना एक प्रसंग अगोदर सांगावासा वाटतो.
      ते साल 1910 होते . महात्मा गांधींजीची मुलाखत घेताना परदेशी पत्रकाराने
विचारलं होतं," *केवळ ब्रिटिश हेच भारताच्या* *दारिद्र्याला व अनर्थाला कारणीभूत आहेत काय?"*

त्यावर भारताच्या जनमाणसाच्या नाडीचं अचूक निदान असणाऱ्या महात्मा
गांधीजीचं उत्तर होतं," *श्रम आणि बुद्धी यांच्यात घटस्फोट झाल्यामुळे ग्रामीण* *भारत व शेती विकलांग झाली आहे.* "

हे विधान करून आज 100 वर्षे ओलांडून गेली.तरीपण या सत्तर वर्षात हे आहे तसे अबाधित ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्या त्या वेळेच्या सरकारांनी केला.

पण एक मात्र वास्तव आहे,आजही आम्हांला गांधी हवेत.तुम्हा-आम्हाला घडवण्यासाठी.
मार्ग दाखवण्यासाठी.

गांधी मला बाराखडी कळण्याचाही अगोदर " *व्होट द्या नोट घ्या "* याद्वारे कळू लागला.
तिथेच माझ्या लोकशाहीला खिंडार लागले.अन पुस्तकांत मात्र नकली गांधी शोधत राहिलो. आता  रस्त्यावर गांधी कसा दिसतो हे सत्तरीनंतरही चित्रात पाहू लागलो.

पण एक नक्की. 70 वर्षांपूर्वी गांधी स्वातंत्र्यसाठी रस्त्यावर दिसत होते. अन 70 वर्षानंतरही  या व्यवस्थेने ते तसंच राहू दिलं दुसरा गांधी शोधण्यासाठी.

आता व्यक्तिगत तरी ठरवलं आहे, आपल्या डोळ्यावरचा बनावट चष्मा काढून गांधींनी पाहिलेला "स्वप्नातला भारत" हा चष्मा परिधान करण्यासाठी बाहेर पडावं.

तेव्हाच त्यांच्या आजच्या स्मृतीदिनी त्यांना आपण "बापू"म्हणायच्या लायकीचे असु.



Source: INTERNET

-ज्ञानेश्वर तात्या टिंगरे
उस्मानाबाद

गांधी आणि भारत या दोन नावाचा खूपच जवळचा संबंध आहे..
भारत स्वतंत्र होण्यासाठी ज्या लोकांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली व प्रसंगी बलिदान दिले त्या मध्ये महात्मा गांधी यांचे देखील नाव तेवढ्याच आदराने घ्यावे लागते.
त्यांनी केलेला संघर्ष हा जेवढा महत्वाचा आहे त्याचबरोबर त्यांनी समाजाला सांगितलेलं तत्वज्ञान सुद्धा. कारण त्यांच्या संघर्षाला जे यश येत गेले त्याच्या मुळाशी होते ते त्यांनी स्वीकारलेलं तत्व सत्य, अहिंसा.
आज स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली, हो सत्तर वर्ष झाली पण गांधींना अपेक्षित होतं ते राज्य ( देश ) निर्माण झाले का नाही, जर उत्तर नाही असेल तर का नाही याच्या शोधात आपल्याला जावं लागेल.
" समाजात एक अनुभव येतो कि काही लोकांचं नुसतं वय वाढतं पण सर्वांगीण विकास होताना दिसत नाही अगदी अशीच काहीशी अवस्था आपल्या देशाची झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. याला जबाबदार आपण सगळेच आहोत उगाच दुसऱ्यांवर दोषारोप करून आपण सुटका करून घेऊ शकत नाही.
आज महात्मा गांधींच्या तत्वाचा सर्वाना विसर पडला आहे, राजकीय लोक, समाजातील प्रतिष्ठित म्हणवून घेणारे , साहित्यिक, प्रशासनातील काही ठराविक प्रवृत्ती इ. हे गांधीजींचा वापर फक्त फोटो पूजन, भाषण, व लेखन प्रसिद्धी साठी करतांना दिसतात.
सरकार गांधीजींच्या नावे योजना राबवत असते, त्यांच्या प्रतीकांचा खुबीने वापर करते मात्र प्रत्यक्षात त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून न जाता सरळ सरळ तत्वाला तिलांजली दिली जाते व ठराविक वेळी त्यांच्या समाधी स्थळी जाऊन नुसता बनाव केला जातो ( क्षमस्व ).
त्यांच्या चष्म्यातून पाहायचं झालं तर आजचा सत्तरीतला भारत हा नुसता वय वाढलेल्या मुलासारखा आहे, ना अजून तो शहाणा झालाय ना त्याला अजून देश समजला आहे, ना त्याला स्वातंत्र्य समजलं आहे ना त्यासाठी दिलेल्या बलिदानाची किंमत,
अजून खूप वेळ लागणार आहे त्याला त्याला अहिंसा समजायला अन सत्य समजायला.
त्याला आता कुठं स्वतःच अस्तित्व जाणवू लागलंय पण त्याला ते समजण्यासाठी ज्याने स्वतः बंदुकीच्या गोळ्या झेलल्या तो माणूस अजूनही माहिती नाही, हो खरंच माहिती नाही, असेल माहिती तर तो फक्त जोक करण्यासाठी, खिल्ली उडवण्यासाठी, देशाचं अपयश त्याच्या डोक्यावर टाकण्यापूरता.. होय ना.
" एक रुपया चांदीचा, भारत देश गांधींचा " अशा घोषणा दिल्या लहानपणी शाळेत असताना पण आज तो देश गांधींचा तर वाटत नाहीच उलट आपला पण वाटत नाही कारण आपला वाटत असता तर आज देशात एवढया योजना राबविण्यात येत असताना त्यात परिणामकारकता दिसली असती ना, का म्हणून अपयश येतं ? का म्हणून आज एखादा वृद्ध सरकार दरबारी आत्महत्या करतो..
याचा अर्थ आपण गांधीना बोलण्यात घेतलं, त्यांचं राम भजन लोकांना गुंगवून ठेवण्यासाठी घेतलं, त्यांचा चरखा फोटोपुरता घेतला अन महत्वाचे म्हणजे त्यांचे सत्याचे प्रयोग स्वतःचे असत्य व मानवी हिंसा लपवण्यासाठी घेतले..




Source: INTERNET

-महेश देशपांडे
जि. उस्मानाबाद

थोड़ा आर्थिक पैलु मंडण्याचा प्रयत्न करतोय.

_खेडयाकडे चला_ अस गांधीजीनी संगीतलेल होत. हे आजही, तितकच महत्वाच आहे. शहरी भाग आणि ग्रामीण भाग याचा विचार केला तर खुप कंगोरे निघतात. पण आर्थिक बाजु लक्षात घेणं का गरजेचे आहे तर आपाण त्याला खेड़ का म्हणतो तर तिथे सामान्य सुविधा नाहीत म्हणून, का तिथे राहणारी मानस कमी शिकलेली किंवा अशीशिक्षित, का तिथे अजुन बऱ्याच गोष्टी (अर्थकारनाशी निगडित) नाहीत म्हणून. सर्वसाधारण  बघायच झाल तर, बाजारपेठ आणि शिक्षण या शहराच्या मुख्य जमेच्या बाजू आहेत, त्यामुळेच शहराकडे लोक आकर्षित झाले. अकडेवरी संगायची तर आज देशातील सुमारे ४५-४६ % लोक शहरात  राहतात मला वाटत त्याहीपेक्षा जास्त असतील. हे प्रमाण आधिच्या काळी (म्हणजे आर्थिक सुधारना ह्या शहराना डोक्यात ठेऊन झाल्या त्या आधी) ख़ुप कमी होत. तुम्हला खोट वाटेल, पण इंग्रज भारतात त्यांच्या मर्जिचा कारभार करण्याच्या आधी जीडीपी २२-२५ % होता. हे सर्वांच्या लक्षात आले नाही. अशी काय परिस्थिति होती त्यावेळी ? तर त्यावेळी गावातील बाजारपेठ ही खुप समृद्ध होती. शिक्षण सुधा योग्य पद्धतीने दिले जात होते आणि मुलांना मोठ्यांचे मार्गदर्शन ख़ुप होते.
आता या गोष्टी भौगोलिक परिस्थिति नुसार थोड्याफार प्रमाणात बदलत असतील, पण एकूणच _खेड़ी समृद्ध होती_.
स्वातंत्रोत्तर काळात या मध्ये चांगले बदल होण्याच्या ऐवजी, परिस्थिति आणखी बिकट होत गेली. याची राजकीय कारण, सामाजिक कारण, आर्थिक कारण भरपूर आहेत.

यात बदल नक्कीच झाला पाहिजे. आजची परिस्थिति बघितली तर, शहरात राहायला मिळत असेल तर भरपूर जन तयार होतात, जे पहिल्यापसुन गावात राहतात.
आता त्यांनीच विचार करून जर या गोष्टी कमी केल्यातर गांधीजीनी जे सांगितले होत _खेडयाकडे चला_. ते नेमक कशासाठी ? याचे उत्तर मिळेल.

_खेड समृद्ध करण्यासाठी खेडयाकडे चला_ अस मला म्हणावस वाटत.

एक युवक म्हणून आपण खुप काही करू शकतो. उदाहरन ख़ुप आहेत की ज्यानी, गावात राहून, स्वतःचा, पर्यायाने कुटुंबाचा आणि समाजाचा विकास केला आहे. शोधा म्हणजे सापडेल.

एक विनंती सर्वाना की, स्मार्ट सिटीचा बोलबाला असताना, स्मार्ट खेड़ी कशी असली पाहिजेत याचा विचार करा बर...

खरच अवघड आहे का हा बदल ? होय खुप अवघड आहे कारण खुप काम कराव लागणार आहे, पण *अशक्य नक्कीच नाही*. मी तर ठरवल आहे, काहीही झाल तरी, गावातील घर सोडायच नाही. नोकरी बाहेर, शहराच्या ठिकाणी करावी लागली तरी चालेल.
मग तुम्हीपण ठरवा काहीतरी की ज्यामुळे गाव सुधारण्यात हातभार लागेल.


गांधीजीनच्या चष्म्याला अनेक दृष्टिकोन होते, त्यातील हा दृष्टिकोन आहे आणि त्याबद्दल हे माझे विचार.




Source: INTERNET

-जयंत जाधव
लातूर
  भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली आहे.गांधीजींनी ज्या भारताची अपेक्षा केली होती तो प्रत्यक्षात आज निर्माण झाला की नाही हा संशोधनाचा भाग ठरेल आणी ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधण्यासाठी गांधीजींच्या दृष्टीने पाहावे लागेल.
१.गरीबांच्या स्वराज्याची अजूनही  स्वप्नामधेच:- गांधीच्या स्वप्नातील स्वराज्य हे गरिबांचे स्वराज्य असेल ही अपेक्षा फोल ठरली आहे .जीवनाच्या ज्या गरजांचा उपभोग  श्रीमंत लोक ज्या सुलभतेने  घेतात, त्या गरिबांसाठी मिळणे खूप कष्टदायक ठरले आहे.कितीतरी लहान मुलांना एक वेळचे जेवण मिळत नाही व उपाशी पोटी मरण पावतात.जोपर्यंत याची परिपूर्ण सोय होत नाही, तोपर्यंत त्याला खऱ्या अर्थाने स्वराज्य निर्माण होणार  नाही'
२.सामाजिक व आर्थिक विषमता वाढली:- स्वातंत्र्य मिळालेल्यावर आज ७० वर्षांनी देखील सामाजिक व आर्थिक विषमता दूर होईल अशी अपेक्षा होती. वास्तविक असे घडले नाही. उदाहरणार्थ नुकतेच एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की जगाप्रमाणे भारतात देखील ७३% संपत्ती १% लोकांच्या हाती एकवटलेली आहे.११ हजार कोटींच्या  अँटेलिया बंगल्यात राहणारे  अंबानी ह्याच देशात आणि फुटपाथवर गाडी मागे घेताना झोपेतच चेंगरले मेलेले ह्याच देशात आहे. ज्या देशात अंदाजपत्रकात शेतीला नगण्य महत्त्व दिले जाते .अशा परिस्थितीत सामाजिक व आर्थिक समानताची काय अपेक्षा ठेवाल? ह्या प्रश्नांची उकल कोण करणार,आहे कोणी?
३. गांधीजींनी 'खेड्यांकडे चला'अशी हाक दिली होती.प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्याला त्याच्या कष्टाचे योग्य  मोबदला मिळाला पाहिजे,कोणाची ही आर्थिक पिळवणूक होऊ नये,गाव हे स्वावलंबी व स्वंयपूर्ण असावे असे  त्यांचे मत होते. पण आज सरकारी धोरणे खेड्यांसाठी मारक ठरली आहे.लाखो शेतकर्यांनी आत्महत्त्या केल्या . तरुण रोज उदासीनतेतून आत्महत्त्या करतात ..शहरे बकाल अवाढव्य वाढत आहे व खेडी ओस पडले आहेत.
सारांश,माझ्या मते आज गांधीच्या चष्म्यातून सत्तरी मधला भारताकडे पाहिले तर एक म्हणावे लागेल,आपल्या  संधिसाधू राजकारण्यांनी गांधीजींच्या विचारांना  फक्त  नोट व व्होटवर बंदिस्त करुन आम्हीच गांधीचे खरे  वारसदार आहोत, असा दावा करणाऱ्यांना गांधीजींचे विचार अमलात आणणे कधीच  जमले नाही.त्या विचारापासून ते परावृत्त होऊन  खूप दूर गेले.म्हणूनच  सामाजिक-आर्थिक विषमता भयानक  वाढली आहे.




Source: INTERNET

 -जगदीश लोंढे
   मुंबई

             "सत्तरीचा माझा देश आपल खरं  आयुष्य जगू लागलाय"असेही आज आपल्याला म्हणता येतं नाही.विकास , सर्वसमावेशक विकास , आर्थिक महासत्ता च्या नावाखाली आपण स्मार्ट सीटी,  स्मार्ट टेक्नॉलॉजी वापरतोय.पण समाजातील आजही 65% समाज या स्मार्ट शब्दांत बसंतचं नाही ही खरी शोकांतिका आहे.....
             ‎'खेड्याकडे चला' गांधींना स्वप्नवत भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जावा अशी त्यांची महत्वाकांक्षा असावी.गांधीनी आणि आंबेडकरांनी दोन मुद्यावर  वारंवार आपली भूमिका मांडली खेड्या कड़े चला..ग्रामीण भागात चला.आपण स्मार्ट शहर , स्मार्ट शहर च्या नावाखाली नुसतं शहरांचाच विकास करत सुटलोय.शहरांचा कसला आला विकास तो तरी आपण नीट करतोय का हा खरा यक्षप्रश्न आहे.मुळात एलफिन्स्टन दुर्घटना , कमला मिल मधील दुर्घटना किंवा जोगेश्वरीतील फर्साण शॉप वरील दुर्घटना यावरून तरी असंच लक्षात येतं की आपली स्मार्ट शहराविषयीची संकल्पना ही किती पुसट आहे.
        गांधीच्या स्वप्नांतील भारत आणि आंबेडकराच्या स्वप्नांतील भारत आपल्या विचारांच्या कितीतरी पुढे असेल.ज्यांची आपण कल्पनाच करू शकत नाही.गांधीच्या स्वप्नांतील भारतात भीमा कोरेगांव व खैरलंजि सारख्या हत्या, गौहत्या , शेतकरी आत्महत्या , सनातनी विचारसरणी   ची प्रवुत्ति नक्कीच होत नसणार.त्यांना समतापूर्ण भारत , सर्वसमावेशक भारत अपेक्षित होता. फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी व समतावादी भूमिकेला अनेक सवर्ण नेत्यांनी पाठबळ दिल्याचा इतिहास आहे. आंबेडकर व गांधी यांचे काही मुद्यांवर मतभेद होते, पण धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव, संसदीय लोकशाही, मानवतावाद, समता, बंधुता, सामाजिक न्याय, तसंच सुसंवाद, अहिंसक मार्ग इत्यादी अनेक मुद्यांवर एकमत होतं. पण त्यांचे 'मनभेद' कधीच नव्हते. त्यांचं कार्य एकमेकांना पूरक होतं.
                                   मला अस वाटतं की आपण गांधीच्या स्वप्नांतील भारत साकार करण्यासाठी तरुणांनी धर्मनिरपेक्षता , स्वातंत्र्य , समता , बंधुता या मूल्यांचा आणि तत्त्वांचा वापर केला पहिजे.गांधी , फुले , शाहू , आंबेडकरी विचारसरणी हीच आपली अंतिम विचारसरणी असली पहिजे.यापुढे कोणताही पक्ष नाही..‎

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************