स्वातंत्र्य

Less Force, More Freedom: Living Life in the Flow
जगताप रामकिशन शारदा 
बीड 

स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय?  आपण स्वातंत्र्य म्हणजे मुक्तता असा अर्थ घेणार की स्वातंत्र्य म्हणजे कसलेही बंधन नाही असा अर्थ घेणार.  जसे आपण मराठी स्वातंत्र्य म्हणजेच मुक्तता असे बोलतो त्याचप्रमाणे  इंग्रजीमध्ये याला  फ्रीडम इंडिपेंडेंस किंवा लिबर्टी असे  देखील बोलले जाते.  अगदी सुरुवातीपासूनच सामान्य माणूस हा स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता राहिलेला आहे. तरीही आपण पाहिलेला आहे की जागतिक    पातळीपासून की अगदी कुटुंब व्यवस्थेपर्यंत प्रत्येकाचा स्वातंत्र्याचा अर्थ हा वेगळा राहिलेला आहे आणि ते स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने कसोशीने प्रयत्न केलेले आहेत करत आहेत आणि चालू राहतील.   कोणाला आपल्या व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य हवे आहे,  कोणाला आपल्या निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हवे आहे  कोणाला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य हवे आहे कोणाला परंपरागत रूढी परंपरा च्या  साखळदंडातुन स्वातंत्र्य हवे आहे.म्हणूनच भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना  बहाल करण्यात आलेल्या स्वातंत्र्यांचा  उल्लेख आपणास संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये दिसून येतो.तो  असा  विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य  बहाल करत असल्याचे  नमूद केलेले आहे. यामध्ये कोणताही भारतीय नागरिक जर सनदशीर मार्गाने या स्वातंत्र्यांचा उपयोग करत असेल तर सरकार यामध्ये आडकाठी आणू शकत नाही. पण बऱ्याच वेळा  नागरिकांना स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांच्यातला फरक ठळकपणे करता येत नाही आणि मोठ्याप्रमाणावर  आपण किती  स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहोत  हे दाखवण्याच्या प्रयत्नात त्याचा स्वैराचार केला जातो तो संविधानााला अभिप्रेत नाहीये.
वर सांगितल्याप्रमाणे भारतीय संविधानाने भारतीयांना कोणती स्वातंत्र्य बहाल केलेली आहेत त्यामध्ये घटनाकार यांचा उद्देश काय होता ? हेही समजून घेणे गरजेचे आहे. पारतंत्र्यात जीवन जगत असताना कोण कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते?  पारतंत्र्य मध्ये होणारी मानवी प्रतिष्ठेची गळचेपी विनाकारण सोसावा लागणारा त्रास दडपशाही आणि जुलमी राजवट  यांचे समाजावर होणारे विपरीत परिणाम हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पुढाऱ्यांनी जाणवलेले होते . म्हणून कोणत्याही प्रकारे भारतीय नागरिक कसल्याही प्रकारच्या स्वातंत्र्यापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांनी विविध प्रकारच्या स्वातंत्र्यांचा समावेश भारतीय संविधानात करून मूल्य अधोरेखित केलेली आहेत. आपण इंग्रजांच्या शासन काळामध्ये इंग्रजांकडून कोणत्या प्रकारच्या स्वातंत्र्याची मागणी करत होतो तेच स्वातंत्र्य आता आपण राज्यकर्ते म्हणून सामान्य जनतेला बहाल करणे हे आपले कर्तव्य असल्याचे संविधान सभेने आणि संविधानकारांनी जाणले होते.    स्वातंत्र्य मध्ये कशाप्रकारे सुधारणांना वाव असतो स्वातंत्र्य मध्ये कशाप्रकारे एक सामान्य नागरिकही आपला आवाज बुलंद करू शकतो स्वातंत्र्य मध्ये कशाप्रकारे एक चित्रकार एक वृत्तसंपादक एक गायक किंवा एक कलाकार आपल्या विविध कलागुणांच्या  साह्याने स्वतःला समाजाला देशाला व्यक्त करू शकतो आणि व्यंग अथवा कडक शब्दांत या गोष्टी  मांडू शकतो. कारण स्वातंत्र्यांशिवाय लोकशाही  म्हणजे लोकशाहीची थट्टाच असा ग्रह होतो.   म्हणूनच तर आपण पाहतो की देशभरामध्ये  विविध विचारधारेचे लोक प्रत्येक गोष्टीवर आपले विचार व्यक्त करत असतात. जमलं तर त्या सुधारणांनावर कौतुकाचा वर्षाव करत असतात त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी अनेक उपायही सुचवत असतात किंवा ज्या व्यक्तींना  गोष्टी आवडत नाहीत ते या गोष्टी कशाप्रकारे चुकीच्या येथे विविध माध्यमातून विविध कलेच्या मार्फत लोकांसमोर मांडत असतात.सहाजिकच काहीवेळा सरकारने घेतलेले कठोर निर्णय हे जर जनतेला पचणारे नसतील तर त्या जनतेच्या असहाय्यतेचा फायदा उठवून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न अनेक गट करत असतात परंतु शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे खरोखरच मानवी स्वातंत्र्याची गळचेपी होते का त्याचं तटस्थ परीक्षण करण्यासाठी भारतीय संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केलेली आहेत. न्याय व्यवस्था ही फक्त सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी नाही तर नागरिक वापरत असलेल्या स्वातंत्र्यावर काही प्रमाणात आवश्यक  मर्यादा आणि त्याच्या सीमा टाकण्याचं काम करते.  अशा व्यवस्थेची भारतामध्ये गरज आहे कारण की स्वातंत्र्याचा प्रत्येकाला हवा तसा अर्थ ते घेऊ शकतात आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार फोफावू शकतो. स्वातंत्र्य कोणाला नकोय ते प्रत्येकाला हवं पण त्यात प्रत्येकाची स्वातंत्र्याची व्याख्या वेगवेगळ्या आहेत .काही जणांच्या दृष्टिकोनातून ती समाजासाठी उपयुक्त आहे तर काहीजणांच्या दृष्टिकोनातून समाजामध्ये फूट पाडणारे देखील असू शकते.  पण विषय जेव्हा न्यायव्यवस्था आणि मानवामध्ये असणारी त्याची सद्विवेक बुद्धी यावर येईल तेव्हा मात्र प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा हा आदर नक्कीच केला जाईल. पण त्याला  अट एवढीच आहे की आपल्यामध्ये इतरांच्याही स्वातंत्र्याचा सन्मान करण्याची  क्षमता असली पाहिजे. स्वातंत्र्य हे जरी आपण आपल्या अधिकाराचा भाग मानत असू तरी जोपर्यंत आपण तो आपले कर्तव्याचाही भाग आहे असे समजत नाही तोपर्यंत ते स्वातंत्र्य समाजामध्ये मिसळून एक  प्रगल्भ आणि आदर्श समाज निर्माण होऊ शकत नाही. मग समाजामध्ये आपण सगळे आलो.आपल्या कुटुंबाला कुटुंबातील सदस्य आले ज्यावेळी समाज  वैचारिक दृष्टीने प्रगल्भ होतो त्याला कारणीभूत ही त्या समाजात असणारी कुटुंब असतात. आपण जोपर्यंत आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करत नाहीत तोपर्यंत स्वातंत्र्य हे केवळ पुस्तकात वाचण्यासाठी आपल्याला अधिक चांगले वाटते प्रत्यक्ष जीवनामध्ये मात्र त्याचा आपण तिरस्कार करू लागतो.
---------------------------------------------------------------------------------


Freedom Life Church - Home | Facebook
-
मयुर डुमणे, उस्मानाबाद

मानवाच्या विकासासाठी आवश्यक असणारं अत्यन्त महत्वाचं मूल्य म्हणजे स्वातंत्र्य. ब्रिटिशांच्या तावडीतून भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी मुक्त झाला तो आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य या शब्दाचा संबंधच सर्वप्रथम या स्वातंत्र्य दिनामुळे येतो. हे झालं राजकीय स्वातंत्र्य. स्वातंत्र्य हा शब्द वाचायला किती सोप्पा वाटतो ना. पण या मूल्यांत फार मोठा व्यापक अर्थ दडलाय जो तुमच्या माझ्या जीवनाशी थेट संबंधित आहे. आज मी या 'स्वातंत्र्य'  विषयावर लिहू शकतो कारण ते लिहिण्याच स्वातंत्र्य मला सहज उपलब्ध आहे. माझ्याकडे मोबाईल आहे, विचार करण्यासाठी लागणारा वेळ आहे, दोन टायमाचं जेवण मला मिळू शकतं ही सगळी पार्श्वभूमी असल्याशिवाय मी लिहू शकत नाही. दोन वेळेच जेवण मिळणं ज्यांना मुश्किल आहे त्यांना आहे का हे अशाप्रकारचं लिहिण्याचं बोलण्याचं स्वातंत्र्य? येथे स्वातंत्र्याचा संबंध समतेशी येतो. महात्मा फुलेंच्या काळात मुलींना, दलितांना शिक्षणाचं स्वातंत्र्य नव्हतं. कारण त्या काळी असलेली टोकाची सामाजिक विषमता. असा हा स्वातंत्र्य आणि समतेचा जवळचा संबंध आहे.  स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही लोकशाही मूल्यच परस्पर पूरक आहेत. तुम्ही शिक्षण घेताय, शाळेत जाताय लिहिताय, बोलताय हे सारं काही करू शकता. यातून तुमचं व्यक्तिमत्व आकारास येतं. व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी स्वातंत्र्य महत्वाची भूमिका बजावतं.  

अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वातंत्र्याची गळचेपी आणि समाज

म्हणजे व्यक्त होण्याच स्वातंत्र्य. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. पण काही वेळा या स्वातंत्र्याची गळचेपी होते. तुमचं व्यक्त होणं बहुसंख्य समाजाच्या विचारधारेविरुद्ध असेल, राज्यसंस्थेला अडचणीत आणणारे असेल तर तुम्हाला सामाजिक राजकीय दबावाचा सामना करावा लागतो. व्यक्त झाल्यास येणारे धमक्यांचे कॉल ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहेच. डॉ. दाभोलकर अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम करत होते. काहींना वाटलं हे आपल्या धर्माविरुद्ध काम करताहेत. त्यांनी दाभोलकरांचा खून केला. गोंविद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या होणं ही स्वातंत्र्याची गळचेपीच आहे. तुकाराम महाराजांची गाथा पाण्यात बुडवणं, आगरकरांची जिवंतपणी अंत्ययात्रा काढणं, गांधीजींची हत्या ही सगळी स्वातंत्र्याच्या गळचेपीची उदाहरण आहेत. तुम्ही आमच्या विचारधारेविरुद्ध जाल तर आम्ही तुमचा खून करू असा हा मागास विचार. हा असहिष्णु विचार सध्या समाजात रुजतोय. आज अनेक परखड विचार मांडणाऱ्या साहित्यिकांना अंगरक्षक घेऊन फिरावं लागतंय. सरकार विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींना देशद्रोही ठरवणं हा त्यातलाच प्रकार. नास्तिकतेचा विचार तुम्ही बहुसंख्य आस्तिक समाजात खुलेपणाने मांडू शकत नाही. मांडल्यास धमक्या ट्रोलिंग ठरलेलं. र.धो कर्वे या माणसानं स्वातंत्र्यपूर्व काळात लैंगिकतेविषयी परखड विचार मांडले. समाजस्वास्थ्य मासिकाद्वारे जनजागृती केली. त्या माणसावर अश्लील मजकूर छापला म्हणून कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागल्या होत्या. आजही तुम्ही लैंगिक विषयावर समाजात उघडपणे बोलनं हे समाजाला न पचणारी गोष्ट आहे. लोकं काय म्हणतील या प्रश्नाने तर कित्येकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतलंय. परवाचीच गोष्ट आहे कॉमेडियन अग्रीमा जोशुआ हिने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून शिवभक्तांनी रान उठवले. एकाने जाऊन व्हिडिओ जिथे शूट करण्यात आला होता तो स्टुडिओ फोडला. काहींनी तिला बलात्काराच्या धमक्या दिल्या. ट्रोलिंग झालं अखेर तिला या प्रकरणी माफी मागावी लागली. व्हिडिओत स्पष्ट दिसतंय तिने शिवाजी महाराजांचा कसलाही अपमान केलेला नाही तरीही तिला या टोकदार अस्मितांना सामोरं जावं लागलं. ही झुंडशाही आहे. ही झुंडशाही देखील स्वातंत्र्याची गळचेपी करते. 


स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे

इतक्या महत्वाच्या मुल्यासोबत जबाबदारी ही असणारच. स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना इतरांच्या स्वातंत्र्याला बाधा पोहचणार नाही, कायदा आणि सुव्यवस्थेची अडचण होणार नाही याची काळजी घ्यायलाच हवी. 

एका कार्यक्रमात राममनोहर लोहिया यांच्याबद्दलचा किस्सा उल्हास दादांनी सांगितला. लोहिया एका बाईला म्हणाले, मी तुला पंडित जवाहरलाल नेहरू यांची ओळख करून देतो. तू फक्त त्यांची कॉलर पकडून एवढंच म्हणायच की 'आझादी के बाद क्या किया मेरे लिए' ठरल्याप्रमाणे ती बाई नेहरूंना भेटली. भेटल्यावर तिने नेहरूंची कॉलर पकडली आणि  म्हणाली , आझादी के बाद क्या किया मेरे लिए 

नेहरूंच उत्तर होतं, आप मेरी कॉलर पकड सकती है इतना तो जरूर किया है मैने. 

लोकांनी लोकांसाठी चालवलेली ही शासनपद्धती आहे. यांत राज्यकर्त्यांना प्रश्न करण्याचा, सरकारवर टीका करण्याचा अधिकार तुम्हाला आहे.अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा या लोकशाहीचा आत्मा आहे.
----------------------------------------------------------------------


80 Inspirational Quotes on Freedom | Sayings & Images

अनिल गोडबोले

लहानपणी स्वातंत्र्य हा शब्द फार भारी वाटायचा. लोकमान्य टिळक   पुण्यतिथी ला "स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" अस ठणकावून समोरच्या पोरांना सांगितल्यावर फार मजा यायची.
       जस जस आयुष्य जगायला लागलो. पुस्तक वाचली. इतिहास शिकत गेलो, समजत गेलो तस कळलं की स्वातंत्र्य फार गरजेचे असते, त्या साठी आपल्याकडे भरपूर लोक हुतात्मे झाले आहेत. 
       भारतीय संविधानानुसार आहार, विहार, विचार, भाषा, धर्म, प्रार्थना व मालमत्ता(सरकारच्या नियमात) या सर्व गोष्टी स्वातंत्र्याच्या अधिपत्याखाली येतात.
       'जेव्हा तुम्ही काठीच एक टोक उचलता तेव्हा दुसरे टोक आपोआप उचलले जाते." या न्यायाने स्वातंत्र्य बरोबर जबाबदारी येते त्याचा मात्र त्रास होतो.
      पर्यटक म्हणून कुठेही फिरण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे, पण स्वतःची काळजी, इतरांची काळजी, परिसर स्वछता, याची जबाबदारी आपल्याला नको असते..  त्यामुळे स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी नियम करावे लागतात, ते नाही पाळले की दंड, कडक अंमलबजावणी करावी लागते.. त्यामुळे कायद्याचे पालन करताना आपल्याला त्रास होतो किंवा समोरची व्यक्ती त्रास देऊ शकते.
      दुसऱ्याच्या जोखडाखाली, अधिपत्याखाली राहताना मानवी सन्मानाची हानी होते, गुलामगिरी या पेक्षा वेगळी नसते त्यामुळे भारतीय संविधान आपले(नागरिकांचे)स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी योजना, नियम करत आहे.
       स्वतंत्र विचार सरणी, स्वतंत्र वर्तन हे लोकशाही मूल्य आहे.. आपण ते झुंडशाही, फॅसिझम, मुजरे-हुजरेगिरी, स्वार्थी विचार यातून, रसातळाला जात आहोत.. हे थांबवण्यासाठी हे मूल्य गर्जवचे आहे.
----------------------------------------------------------




अमोल चाटे , पुणे

              स्वातंत्र्य म्हणजे परकीय नियंत्रणापासून मुक्त आपल्याला हवे तसे विचार करण्याचा, बोलण्याचा, आणि वागण्याचा हक्क. स्वातंत्र्य हा प्रत्येक माणसाचा नैसर्गिक अधिकार आहे. आचार, विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे माणसाचा व समाजाचा सर्वांगीण विकास होतो, प्रगल्भता वाढते,लोकशाही सदृढ होते व जिथे स्वातंत्र्याचा अभाव असतो तिथे गुलामगिरी, हुकूमशाही फोफावते व समाज अधोगती कडे अग्रेसर होतो.
    पण स्वातंत्र्य हे अनिर्बंध नसतात त्यांच्यावर नैतिक आणि कायदेशीर बंधने असतात, आपण आपले स्वातंत्र्य उपभोगत असताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही किंवा कमी करू शकत नाही. आपल्याला स्वातंत्र्य आहे म्हणून आपण वाट्टेल ते करू शकत नाही.त्यामुळे प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचे रक्षण व्हावे म्हणून व्यक्तीगत स्वातंत्र्य वर काही बंधने आहेत. 
       स्वातंत्र्य सोबत जबाबदारी सुद्धा येते ती म्हणजे स्वतः स्वातंत्र्य उपभोगत असताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्याला बाधा येऊ न देणे.
-------------------------------------------------------------------


I would give my life for freedom! — LivingNow Magazine Australia
 करण बायस

आपण स्वातंत्र्याबद्दल वाचतो , स्वातंत्र्याचे स्वप्न बघतो , आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढू पण शकतो, पण खरंच स्वातंत्र्य काय आहे हे समजून घेतले का ?
नुकतीच भगवद्गीता वाचून पूर्ण केली आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला.उदारमतवादी आणि पूर्वग्रह न ठेवता, भगवद्गीता ही भगवान कृष्णाने मानवजातीला दिलेली देणगी आहे, जी आपल्याला मानवी जीवनातील अशांततेने तर्कसंगत पद्धतीने व्यवहार करण्यास मदत करते.
त्यामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला अत्यंत गोपनीय आध्यात्मिक ज्ञानानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आता त्याने सर्व काही ऐकले आहे, जे उचित वाटले ते करण्यास तो मोकळे आहे. थोडक्यात, हे समजलं की गीता व्यक्तीचे स्वातंत्र्य ओळखते आणि साधकाच्या हाती अंतिम निवड सोडते .
विचार केला तर स्वातंत्र्य हा विषय खूप खोल आणि ही फार आकर्षक संकल्पना आहे. माणसाला वैचारिक, धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक इत्यादी अनेक प्रकारचे स्वातंत्र्य असू शकते, हवे असते. कुठेही राहण्याचे, हवा तो व्यवसाय करण्याचे, हवा तो जीवनसाथी निवडण्याचे, हवे ते वाचण्याचे, लिहिण्याचे, प्रकटीकरणाचे असेही स्वातंत्र्य हवे असते.आणि स्वातंत्र्य साठी तो त्याला हवे तो पर्याय निवडू शकत असेल तर तो स्वतःला स्वातंत्र्य समजतो आणि जर त्या व्यक्तीचे निर्णय दुसर कोणी घेत असेल तर तो स्वतःला स्वातंत्र्य समजणार नाही.
स्वातंत्र्याच्या वेगवेगळ्या व्याख्या असू शकतात कोणासाठी ते तुरुंगवास किंवा गुलाम अशी अवस्था नसणे म्हणजे स्वातंत्र्य असू शकते किंवा कार्य करण्याची, बोलण्याची किंवा विचार करण्याच्या अधिकारात बाधा किंवा संयम न ठेवता एखाद्याला हवे आहे. कोणत्याही नियंत्रणाशिवाय एखाद्याला पाहिजे म्हणून कार्य करणे, बोलणे आणि विचार करणे ,मोकळे असणे हे स्वातंत्र्य आहे. आणि कदाचित हे सुद्धा कोणासाठी स्वातंत्र्य असणे म्हणजे वर सांगितलं तस असणे आवश्यक नाही .
भारत १९४७ मध्ये स्वतंत्र्य झाला विचार अभिव्यक्ती अशा अनेक विषयांमध्ये स्वातंत्र्य प्राप्त झाले .म्हणजेच भारत हा पारतंत्र्यात होता आणि जेंव्हा भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची भावना निर्माण झाली तेंव्हा भारत देश स्वातंत्र्य झाला, तर स्वातंत्र्य हा फक्त एक शब्द नसून तर ती एक भावना आहे.पारतंत्र्य यासारखे कल्पनांचा जवळपास संपूर्ण जगातून पराभव झाला पण याचा अर्थ असा नाही की स्वातंत्र्य ही कल्पना सर्वत्र रूढ झाली.
माझा भारत देश आपला भारत देश अश्या अर्थपूर्ण स्वातंत्र्य देशात आजसुध्दा नागरिक आपल्या पेक्षा मोठ्या माणसाला मालक म्हणून गुलामगिरीत राहतात . देश स्वातंत्र्य होऊनसुद्धा या काही नागरिकांमध्ये स्वातंत्र्याची भावना नाही.स्वातंत्र्य ही कुणाकडून घेण्याची गोष्ट नाही.
देश परकीय ताब्यातून स्वातंत्र्य होऊन ७३ वर्षे होत आहेत तरीही भारतीय नागरिक जात , धर्म , द्वेष , चिंता ,निराशावादी विचार यांसारख्या अनेक विचारांच्या गुलामगिरीत आहेत.

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************