मानसिक आजाराकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन

 मानसिक आजाराकडे  पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन

- क्षितीज गिरी,  (सातारा)

खूप लोकांना आपल्याला मानसिक आजार आहे याची कल्पना पण नसते.कारण खूप प्रकारचे मानसिक आजार असे आहेत ते लवकर कळून येत नाहीत. मानसिक पण आजार असतात हे मुळात खूप जणांना माहितीच नसते.त्यामुळे त्याची लक्षणे दिसू लागली की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.जसे की बायकांच्या अंगात येणे हे पण एक मानसिक आजाराचे लक्षण आहे.आणि असे भरपूर मानसिक आजार आहेत त्याला आपण देव धर्म चमत्कार या प्रकारे बघतो आणि अंधश्रद्धेला बळी पडतो.काही सुशिक्षित लोक पण याला बळी पडतात.
अचुत गोडबोले यांनी आपल्या मनात या पुस्तकात याबद्दल खूप खोल वर जाऊन माहिती दिली आहे.
गावात काही लोक हे वेडे असतात.म्हणजे गावातील लोक त्यांना वेडे म्हणतात,पण खर तर त्यांना योग्य प्रकारच्या उपचाराची गरज असते आणि त्यांस बरोबर आपल्या व समाजाच्या मानसिक आधाराची.ती त्यांना भेटते का.हा खरा प्रश्न आहे.मध्यंतरीच्या काळात काही सामाजिक संस्था या कामात पुढाकार घेऊन त्यांनी पुण्यातील रस्त्यावर फिरणारे  मानसिक रुग्ण बरे करण्यासाठी त्यांच्या परीने प्रयत्न केले.पण मुख्य प्रश्न समाजाची मानसिकता बदलण्याचा आहे.काही ठिकाणी तर लोकांना संमोहित करून खून सुद्धा करवून घेतले आहेत.नंतर पोलीस रिपोर्ट मध्ये त्याचा खुलासा लागला.
प्रत्येक ठिकाणी जेव्हा काही चमत्कार घडतो तेव्हा तिथे देव नाहीतर भूत असेल आसा विचार करण्यापेक्षा आपण त्या चमत्काराच्या खोलात जाऊन असे कसे घडू शकते काय असेल याच्या पाठीमा गचे  कारण असा  विचार केला पाहिजे.पण जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा बाकी लोकांची  उत्तरे खूप सोपी असतात जशी की 'अरे त्याच्या अंगात भूत शिरले आहे म्हणून तो वेड्या सारखा करत आहे' असे म्हणून ते आपले मोकळे होतात.हा समाजाचा दृष्टीकोन बदलला पाहिजे.आणि त्याची सुरुवात आपण आपल्या पासून केली पाहिजे.
____________

 किरण पवार, औरंगाबाद.

             सहसा समाजाचा मानसिक आजाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्रात तरी खेड्यात नी शहरात थोड्या शिकलेल्या लोकांचा वेगवेगळा असलेला जाणवतो. सहसा ग्रामीण भागात मुळात असा आजार असतो; याची तितकी जाणीवच नसते. आणि एखाद्याला मानसिक त्रास होतोयं तर त्यालाही ते लवकर उमजत नाही. अशात बऱ्याचदा काहींना नंतर थेट वेड घोषित केल्या जात. गावात याचे पडसाद चित्रविचित्र उमटलेले पहायला मिळतात. मी आमच्याच गावात असे दोन मानसिक रूग्ण पाहिलेत ज्यांच्यावर जर वेळीच काही उपचार झाला असता तर आज परिस्थिती काही वेगळी असती. आणि मुळातच आपल्याकडे ग्रामीण भागात एखाद्या जिल्ह्यात फार फार तर एखादा डाॅक्टर मानसिक आजारासाठी असलेला पहायला मिळतो. त्यातही त्याची ख्याती त्या एकाच शहरापुरती मर्यादित असते. खरतरं या गोष्टीबाबत जागरूकता मोठ्या प्रमाणात होणं आज गरजेचं आहे. एवढे अंधश्रद्धेचे मेसेजेस फिरतात व्हाॅट्स-अॅपवर एखादा मानसिक आजारावर लेख का असू नये? ग्रामीण भागात तालुक्यातील सरकारी रूग्णालयांमधे प्रत्येक तालुक्यात किमान एक डाॅक्टर सरकारने मानसिक आजारावरील नेमायला हवा. आता या गोष्टींची एखाद्या सरकारला जाण कधी येईल, आपल्याला नाही माहित.
           शहरांच म्हणाल तर, त्या त्याबाबतीत शहरे थोडी नशीबवान. पण इथेही विचारांची मोठी आडकाठी आडवी येतेच बऱ्याचदा. त्यामुळे मला प्रामाणिकपणे वाटतं की, यावर चांगला उपाय जनजागृती ठरू शकतो. मानसिक आजारातून जो जात असतो त्याची खरी कसोटी पणाला लागलेली असते नी जनता मात्र त्याची टिंगल करत राहते, किती हे विदारक म्हणायचं? तूर्तास एवढ्यरच थांबतो. धन्यवाद!
________________


अंजली प्रविण, नागपूर.

मी कारागृहात काम करते.  समाजात ज्यांनी अगदी क्रूरतेने निर्घुण हत्या करणाऱ्या कैद्यांशी माझा संबंध असतो.  मी त्यांच्या सोबत त्यांना मिळायला हवे असणारे समान मुलभूत  हक्क आणि अधिकारासाठी काम करते. यामध्ये बहुतेक स्वतःच्या आई, वडील, पत्नी, मुल यांचा खून करणारे कैदी असतात.  यांच्या मानसिकतेचा अभ्यास करताना लक्षात आले कि, यात बहुतेक मानसिक आजाराचे बळी आहेत. त्यांच्या बालपणापासूनच्या जीवन घडणीचा हा परिणामाने त्यांच्या हातून गुन्हा घडलेला असतो.  एका उदाहरणातून सांगायचं तर एक २८ वर्षाच्या मुलाच्या मानसिकतेचा अभ्यास करत असताना लक्षात आले. लहानपणापासून त्याने  सतत आई वडिलांचे भांडण बघितले, त्यांचा तुटलेला विस्कळीत संसार बघत मोठा झाला,  वडील रोज दारू पिऊन आईला पूर्ण गावात रस्त्यावरून मारत फिरायचे हे तो रोज रोज बघत होता. वयाच्या नवव्या वर्षी वडिलाने दुसरे लग्न केले. ते घर सोडून निघून गेले.  त्याच्या मोठ्या भावाला पण वडील तिकडून घेऊन गेले. पण मध्येच आठवण आली कि पुन्हा येऊन आईला दारू पिऊन तशीच मारहाण सुरु होते. त्या आईला सतत डोक्यावर मारून मारून वेड्यासारखे वागायला भाग पाडले.  त्याचे वडील व त्या भावाने कधीच कोणत्याही प्रकारे मदत केली नाही. या सर्व जीवन घडणीत न त्याचे कधी शिक्षण झाले न कोणी मित्र झाले न कोणी नातेवाईक त्यांच्याकडे यायचे.  मजुरी काम करत असताना हि ३ ते ४ वेळा उंच झाडावरून डोक्यावर पडल्याचे अपघात झाले पण या साठी  गावातील छोट्या सरकारी रुग्णालयात त्या बाहेरील जखमेवर उपचार झाले. पण मेंदू वरील आघाता वर उपचार झाले नाही.  अखेरीस तो हि सतत चिडचिड –शिवीगाळ करू लागला  – व्यसनाच्या  अति आहारी गेला – अगदी जसे वडील त्या आईला रस्त्यावरून मारत असे तसेच तो हि करू लागला. छोट्या छोट्या रागामुळे कुत्र्यांना कुऱ्हाडीने मारू लागला. आणि अखेरीस आईलाही कुऱ्हाडीने मारून टाकले.  आज तो स्वतः ची दैनंदिन सर्व कामे स्वतः करतो म्हणून तो मानसिक रुग्ण नाही असे समाज, शासनयंत्रणा आणि न्यायव्यवस्थेने घोषित केले. 

 आपल्याकडे एखाद्या व्यक्तीचा मानसिक आजाराचा रुग्ण आहे हे सिद्ध करायला त्याने वेड्या सारखे म्हणजे अंघोळ न करणे, कपडे नीट न घालणे, स्वतः ची दैनंदिन काम स्वतः न करणे अश्या काही  सवयीनुसारच मानसिकतेचे निदान होते. अश्या सवयी असणारी व्यक्ती म्हणजे मानसिक रुग्ण आणि यावर उपचार म्हणजे मनोरुग्णालय आणि तेथील गोळ्या व इलेक्ट्रिक शॉक पद्धती.   आपल्याकडे अत्यंत कमी  प्रमाणात सायकेट्रिक आणि सायकोलॉंजीस्ट आहेत देखील पण त्यांच्याकडे कधी व का जावे ? हे देखील साधे अजून समाजात कोणाला माहिती नाही. एकीकडे  ती उपचार पद्धती हि परवडणारी नसते.   तसेच दुसरीकडे त्याच्या उपचाराच्या वेळी त्याला साथ न देता कुटुंब समाजापासून  वेगळे केले जाते.

 खूप अवघड आहे समाज आणि न्यायव्यवस्था या दोघांचा हि मानसिक आजाराकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणे.  पण आज मला इतकं कळले कि बघण्याचे दृष्टीकोन बदलण्याचे प्रयत्न सुरु ठेवले पाहिजेत.
_______________________

संगीता देशमुख, वसमत.

       मानसिक आजार म्हणजे आजार आहे,तो एक रोग आहे हे मानायलाच तो रोगी आणि समाजही तयार नसतो. आपल्या देशात तर ९०% मानसिक आजार हे  अंधश्रध्देचेच बळी ठरलेले आहेत. अशिक्षित,मध्यमवर्गीय कुटुंबात  करणी,भूतबाधा,भानामती या  सर्व मानसिक आजाराना आजार न मानता,यावर  कुठलेही शास्त्रीय वैद्यकीय उपचाराविना
भोंदूबाबा,धूप अंगारे याचे बळी ठरतात. सुशिक्षित कुटुंबात  अनेकजण मानसिक आजार आढल्यास ते बाहेर सांगणे म्हणजे प्रतिष्ठेचा प्रश्न समजून त्याचे दमनच करतात. एकदा असा आजार झाला की तो जीवनभर बरा होणारच नाही,असाच भ्रम समाजाने करून घेतलेला आहे.  या सर्व प्रकारामुळे मानसिक रुग्णाला जे समजून घेऊन उपचार भेटायला पाहिजे ते उपचार भेटतच नाही. त्यामुळे मानसिक आजार ही  आपल्या देशातील सध्याची  ज्वलंत समस्या आहे. मानसिक रुग्णाकडे पाहण्याचा सर्वप्रथम त्याच्या कुटूंबातील लोकांना,मित्रमैत्रिणीना आणि  समाजाला निकोप दृष्टीकोण स्वीकारावा लागेल. मानसिक रुग्णाचे जेवढे समुपदेशन महत्वाचे आहे तेवढेच त्या रुग्णाच्या सहवासात येणाऱ्या लोकांचेही समुपदेशन आवश्यक आहे. मानसिक रुग्णाला वैद्यकीय उपचारासोबतच सहानुभूती,प्रेम,सामंजस्य याची जास्त गरज असते,जी आज आपल्या समाजात नाही.
माणसामाणसातील दुरावा,संवादाचा अभाव,भौतिक सुखाचा अतिरेक,चंगळवाद,राक्षसी महत्वाकांक्षा, त्यासाठीची स्पर्धा,आहार विहाराच्या चुकीच्या पध्दती, ही सगळी कारणे मानसिक आजाराची प्रमुख कारणे आहेत. समाज निकोप बनवायचा असेल तर या सगळ्या कारणाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.
_______________________________
-करण बायस, हिंगोली.

प्रत्येकाच्या आयुष्यात बऱ्याच अनपेक्षित गोष्टी घडतात आणि नैराश्याला सामोरे जावे लागते.अशा गोष्टींचा जीवनावर खूप परिणाम होतो. अशा परिस्थितीतुन सवरताना सतत एक विचार येतो की माझ्यावर पुन्हा ही परिस्थिती येऊ नये.कारण अशा परिस्थितीना सामोरे जाण्याची प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते.तणाव हाताळण्याची क्षमता वेगळी असते.
जास्त तणावामुळे शरीरावर दुष्परिणाम होतातच.आजच्या या धावपळीच्या जीवनात मानसिक आजरांचे प्रमाण वाढत आहेत. माणूस आता डिजिटल होत आहे,म्हणजेच माणूस बाहेरील जगाच्या, निसर्गाच्या, मित्रांच्या, कुटुंबाच्या दूर जात आहे आणि एका आभासी जगात हरवत चालला आहे. ज्यामुळे मानसिक आजार वाढत आहे.
एखादा मनोरुग्ण मनोरुग्णालयात भरती होतो त्यावेळेस तो घरच्यांपासून, आपल्या माणसांपासून, एकटे न पडू देणाऱ्या मित्रांपासून दुरावतो,कारण हे सगळे लोक त्याच्याकडे पाठ फिरवतात, आणि मनोग्णालयाच्या चार भिंतीत तो कैद होतो.
मनोरुग्णाला खरंतर गरज असते ती आपल्या माणसांची ज्यांच्या सोबत तो मोकळेपणाने राहू शकतो.जर हा आपलेपणा ह्या मनोरुग्णाना मिळाला तर त्यांचा आजार कमी होण्यास मदत होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************