लोक काय म्हणतील ? म्हणू देत ...

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप

〰〰〰〰〰〰〰〰〰〰

लोक काय म्हणतील ? म्हणू देत ...



 संगीता देशमुख,वसमत

माणूस हा सामाजिक प्राणी आहे. माणूस हा एकटा राहूच शकत नाही. त्यामुळे तो समाजात वावरताना आधी प्रत्येक बाब समाजाशी पडताळून पहातो. परिणामी कशाचीही सुरुवात असो,किंवा काहीही करायचे असो तो प्रत्येकवेळी सर्वात आधी तो कशाचा विचार करत असेल तर ते म्हणजे "लोक काय म्हणतील!" आणि यावरूनच हिंदीत  एक नवीन म्हण रुजत आहे, "सबसे बडा रोग,क्या कहेंगे लोग?" मी जर असा वागलो तर लोक काय  म्हणतील? मी टाकलेल्या धंद्यात यशस्वी नाही झालो तर लोक काय म्हणतील? मी इतका हुशार,माझ्याकडे एवढा प्रचंड पैसा... त्यात माझा मुलग शिकला नाही तर,मुलगा व्यसनी निघाला तर,माझ्या मुलीने प्रेमविवाह केला तर ... ????असे एक नाही,अनेक प्रश्नामागे एक ब्रम्हराक्षस उभा आहे,तो म्हणजे,"काय म्हणतील लोक?" या तीनच शब्दानी अनेकांचे मन:स्वास्थ्य बिघडून बसले आहे. जे मनाने खंबीर असतात,ते लोक या तीन शब्दांना आपल्या जीवनाकडे फिरकूही देत नाहीत. पण जे मनाने खंबीर नसतात,निर्णयक्षम नसतात,ज्यांच्यात आत्मविश्वास नसतो, त्यांना मात्र हे तीन शब्द आतून पुरतं पोखरून टाकतात. आणि अशावेळी या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या मनात जर थोडेही नकारात्मक  आले तर ही लोक जीवनात  कोलमडून पडतात. एवढी ताकद या  तीन शब्दात आहे. या तीन शब्दांचा विचार आपण करू लागलो तर आपण आपल्या जीवनातील निर्णयक्षमता गमावून बसूत.
             "काय म्हणतील लोक?" या तीन शब्दांचा जेव्हा जेव्हा आपल्या मनात विचार येतो तेव्हा आपण त्यावर एकच उपाय करावा,तो म्हणजे आपण आपल्या आजीकडून बालपणात ऐकलेली "गाढवाची कथा" आठवावी. त्या कथेचा सारांशच असा आहे की,एक मुलगा आणि त्याचे गाढव सोबत घेऊन बाजाराला निघतात. त्यावेळी त्यांना भेटणारी माणसे ही कशाप्रकारची असतात,याचा प्रत्यय येईल. ते दोघे गाढवासोबत पायी जातात तेव्हा लोक त्यांना गाढव सोबत असूनही पायी चालले म्हणून दोष देतात. जेव्हा मुलगा गाढवावर बसतो तेव्हा म्हाताऱ्या बाप्पाला पायी चालवतो म्हणून मुलाला दोष देतात. मुलगा पायी चालायला लागल्यावर लहान लेकराला पायी चालवत आहे म्हणून वडिलाला दोष देतात. दोघेही जेव्हा गाढवावर बसतात तेव्हा लोक गाढवाच्या बाबतीत हे लोक निर्दयपणे वागताहेत म्हणून दोष देतात. म्हणजे आपण कसेही वागलो तरी लोकांचे दोष देणे सुरूच रहाणार आहे. या कथेतून तरी आपण बोध घेऊन आपल्या मनाला जे पटतं तेच करण्याचं धाडस करायला हवं.तुम्ही कसेही वागा,लोक तुमच्यासाठी विशेषणे घेऊन तयारच असतात. तुम्ही मोकळेपणाने खर्च करा,लोक उधळ्या म्हणतील,हात राखून खर्च करा,लोक कंजूष म्हणतील,मोकळेपणाने बोला,बडबड्या म्हणतील,कमी बोला,घमंडी म्हणतील,बाहेर लोकांत मिसळा,लोक  भटकफकीर म्हणतील,बाहेर जास्त पडू नका,लोक घरकोंबडा म्हणतील..... तुम्ही कसेही वागा ही यादी लांबणारीच असेल. "लोक काय म्हणतील?" हे वैश्विक शब्द तुमचा पाठलाग करतच रहाणार आहेत. अनेकदा या तीन शब्दांमुळे लोक आयुष्यात खचून नामोहरम झालेली आहेत. त्यामुळे याचा दुष्परिणाम आपल्यावर होऊ द्यायचा नसेल तर आपण आपल्या मनाला साक्षी ठेवून प्रामाणिकपणे वागावं,आपल्या वागण्यामुळे कोणाला त्रास होणार आणि झालाच तर दुसऱ्याला त्याचा फायदा होईल,असा निर्भेळ हेतू ठेवून वागलो तरी बरंच काही साध्य होऊ शकते आणि आपल्या मनालाही शांती,समाधान लाभू शकेल. अन्यथा आपण आपल्या मनाची शांती राखण्यात अयशस्वीच  होणार! शेवटी ज्यांना आपण घाबरतो ते  'लोक' तरी कोण असतात? आपलेच सगेसोयरे,आप्तेष्ट,मित्रमंडळ, शेजारीच न?
          माणूस अपयशाला भीत नाही पण अपयश आल्यानंतर त्यावर लोकांची प्रतिक्रिया काय असेल? याच विचाराने तो गोंधळून जातो. पण असा जर सगळ्यांनीच विचार केला असता तर आपण अनेक चांगल्या गोष्टीपासून वंचित राहिलो असतो. जगात संशोधन झालेच नसते,नावीन्याचा ध्यास आणि  भविष्याची आस कुणाला लागलीच नसती. म्हणून लोक बोलतच रहाणार आहेत आणि आपण करतच रहाणार आहोत,एवढे जरी आपण आपल्या मनावर बिंबवले तरी आपण जिंकलोत,असं समजू या आणि " काय म्हणतील लोक" याच्याकडे थोडा कानाडोळा करू या.
=========================


मयुर डुमणे , उस्मानाबाद


लोक काय म्हणतील हा प्रश्न व्यक्तीला आणि समाजाला प्रगतीपासून रोखणारा धोकादायक प्रश्न आहे . लोक काय म्हणतील या प्रश्नात लोक म्हणजे आपला समाज आहे . त्या समाजाने काही अघोषित नियम तयार केले आहेत ते नियम तुम्ही तोडले तर समाज तुम्हाला वेड्यात काढतो ,नावं ठेवतो प्रसंगी बहिष्कार देखील टाकतो .असाच एक महात्मा फुले नावाचा वेडा माणूस इतिहासात होऊन गेला . स्त्रियांनी चार भिंतीच्या बाहेर पडू नये. नवरा ,चूल ,मूल आणि संसार एवढंच काय ते स्त्री च विश्व अशी मानसिकता असणाऱ्या समाजात महात्मा फुले या वेड्या माणसाने मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केली . ज्यांची सावली पडली तरी विटाळ समजला जायचा अशा अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली . दलितांना पाणी देण्यासाठी घरचा हौद खुला केला. त्यावेळेस पण हा प्रश्न होता , लोक काय म्हणतील ?  हा समाजाच्या प्रगती आड येणारा प्रश्न त्यांनी धुडकावून दिला आणि शिक्षण क्षेत्रात क्रांती झाली . लोक काय म्हणतील या विचारात जर महात्मा फुले अडकून राहिले असते तर स्त्रियांना , अस्पृश्यांना शिक्षण घेता आले असते का ? जातीव्यवस्था हा आपल्या समाजाला जडलेला भयंकर रोग आहे . स्वजातीबाहेर च्या मुलीशी किंवा मुलांशी लग्न करण्याचा विचार जरी तुमच्या डोक्यात आला तरी लगेच प्रश्न उभा राहतो लोक काय म्हणतील ? .  समाजाने निर्माण केलेल्या व्यवस्थेविरुद्ध तुम्ही ज्यावेळेस बोलता त्या वेळेस "लोक काय म्हणतील ? हा प्रश्न उभा राहतो . लग्नानंतर एखादा पुरुष धुणी भांडी करायला लागला , स्वयंपाक करायला लागला , त्या वेळेस त्या पुरुषाला वेड्यात काढण्यात येईल त्याला विचारलं जाईल " " लोक काय म्हणतील ? "  लग्नानंतर मुलीने पुरुषप्रधान व्यवस्थेचं आणि गुलामीच चिन्ह असलेलं मंगळसुत्र घालण्यास नकार दिला .तर लगेच तिला विचारलं जाईल " लोक काय म्हणतील ? " लग्नानंतर देखील ती जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून फिरायला लागली की लगेच संस्कृती धोक्यात येईल आणि ही संस्कृती वाचवण्यासाठी तिला विचारल जाईल " लोक काय म्हणतील ?"
 सेक्स हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक पण त्यावर तुम्ही काही बोलायचं नाही , या विषयावर तुम्ही बोलाल तर तुम्हाला हा समाज बिघडलेला व्यक्ती ठरवतो हा विषय तुझ्याजवळच ठेव लई ज्ञान पाजळू नको अशी हेटाळणी केली जाईल पुन्हा प्रश्न विचारला जाईल " लोक काय म्हणतील ? "काही लोकांच म्हणणं असं येईल आमचं ठीक आहे रे पण लोकांच काय ? असं बोलणारे लोक त्या व्यक्तीच्या खंबीरपणे पाठीशी उभा रहायला घाबरतात . लोक काय म्हणतील ? हा प्रश्न वास्तवापासून पळ काढणारा आणि व्यक्तीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबणारा प्रश्न आहे . समाजासाठी व्यक्ती आहे की व्यक्तीसाठी समाज आहे . समाज जर चुकीच्या परंपरांच अनुसरण करत असेल तर त्या परंपरांना विरोध करण हे आपलं कर्तव्य आहे . उदा . हुंड्यासारखी अन्यायकारक प्रथा आजही समाजात रूढ आहे कित्येक जणींची आयुष्य या अनिष्ट प्रथेमुळे उध्वस्त झाले आहेत अशा प्रथांना आपण तिलांजली देणं गरजेचं आहे . समाज आणि संस्कृती हे दोन्ही घटक डबक्यात साचलेल्या पाण्यासारखी नसतात ती दोन्ही घटक प्रवाही आहेत काळानुसार त्यात बदल होतात त्या बदलांचा आपण स्वीकार केला पाहीजे . या बदलांना स्वातंत्र्य, समता ,बंधुता आणि न्याय या लोकशाही मूल्यांचा पाया आहे या लोकशाही मूल्यांच्या पायावर उभा असलेला लोकशाही समाज वृद्धिंगत होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत .
==============================

पी.प्रशांतकुमार,अहमदनगर


...कुठलीही गोष्ट करताना ज्यात तुम्ही एकटे नसतात तेव्हा (एकांतवास सोडून) तुमच्या मनात पहिला प्रश्न हाच येतो.. नवे कपडे,हेअर स्टाईल,हॉटेल मधे काटे -चमचे वापरणं असो वा वागणं-बोलणं किंवा काहीही हाच प्रश्न येतो..
..  खेड्यातून किंवा नगर ,लातूर, धुळे असल्या लांबच्या जिल्ह्यातून पुण्या-मुंबईत आलेल्या कितीतरी मुलांच्या भाषेवर झालेल्या शेऱ्यांमुळे त्यांचा आत्मविश्वास गामावताना पाहिलय.. खरं पाहिलं तर वऱ्हाडी..अहिराणी या गोड भाषा पण .. मग हुशार असली तरी ही मुलं एकलकोंडी होत जातात... अशावेळी त्यांनी 'म्हणू देत' म्हणावं पण ते सोपं नसत..
..... मुलींना.. पूर्ण स्त्री जातीला ह्या प्रश्नानं जीनं नकोसं केलंय.. हा ड्रेस घातला तर.. केस असे ठेवले तर.. ह्या कॉलेज ला ऍडमिशन घेतली तर.. ही नोकरी केली तर.. ह्याच्या सोबत लग्न केलं तर.. छळ/मारहाण होतेय तरी पण घटस्फोट घेतला तर..  नवरा मेला एकटीनं जगणं असह्य होतंय,सोबत आधार म्हणून दुसरं लग्न केलं तर... तर,तर आणि तर ?
आणि वाईट याच की त्यांच्या 'लोकं' या संज्ञा मधे 90% स्त्रियाच असतात..
...
हे 'लोकं' कोण असतात?कुठून येतात? ... तुम्ही आम्हीच असतो यात..पण आपली घरात एकट्याने विचार करण्याची मानसिकता आणि जमावाची मानसिकता वेगळी असते.. जमावाचा IQ खूप कमी असतो.. ज्या गोष्टी खाजगीत हसण्यावारी घेतल्या जातात त्याच गोष्टींवरून जमाव हिंसक होतो..
...त्यामुळे लोकं काय म्हणतील हा प्रश्न मरेपर्यंत पिच्छा सोडत नाही .. आणि मेल्यावरही बरेच क्रियाकर्म मुलं आणि नातेवाईक निव्वळ ह्या प्रश्नाच्या भीतीने करतात..
  .. यावर उपाय काय? बंड करणे..पण हे सांगणं भलत सोपं आहे करण्यापेक्षा.. पण तुम्ही तुमच्या भावना समजेल अशा पद्धतीने मांडत चला. छोट्या छोट्या न पटणाऱ्या गोष्टींना नाही म्हणायला शिका.. हळूहळू सगळेच तुम्हाला गृहीत धरण बंद करतील..
.... एकच माझं उदा.प्रचंड दुःखातही मी माझ्या वडिलांचे न पटणारे विधी केले नाहीत..मला त्यांचे त्या बाबतचे विचार माहित होते..
.... समजवा..संघर्ष करा.. आणि नन्तर बंड करा..
==============================

          

शीतल शिंदे,दहिवडी

        खरेतर  हे वाक्य आपल्या जन्मापासूनच आपल्याशी  जोडलेले असते . जसे की देवाचे अस्तित्व मान्य करायला लावणे .मगस्व कर्तुत्व मागे पडते .त्याच पद्धतीने , लोक काय म्हणतील याचा विचार करत बसलो तर आपली अधोगती होते हे मात्र 100 टक्के खरे आहे .
        मात्र  म्हणू देत या वाक्याने  जीवन जगण्याची कला अवगत होते .
" म्हणू देत "हे वाक्य एखादया चे जीवन बदलून टाकते .पालकांनी सुद्धा मुलांना मार्ग दर्शन करताना ह्या वाक्याचा उपयोग कारणे गरजेचे आहे .मात्र ह्या बरोबर आपण जे करणार आहोत त्यामुळे कोणाला काही ईजा तर होणार नाही ना,  ह्याचीही खबरदारी घेणे , कोणाचे नुकसान तर होणार नाही ना आणी सामजिक बांधिलकी जोपासली जातेय ना हे पाहणे गरजेचे आहे .मग झाले तर आपण नक्की यशस्वी होवू .
    खरेतर हे वाक्यएवढे परिणाम करणारे आहे की एखादयाचे आयुष्यच बदलून टाकेल .मा झ्याकडे येणारे xyz आजाराचे क्लाइंट येतात  तेव्हा त्यांना मोठा प्रश्न पडलेला असतो  की आता समाजामध्ये माझे स्टेटस समजले तर काय होईल ? 🤔
      त्यावेळी त्यांना सुखाने जगण्यासाठी हे वाक्य मला फार उपयोगी पडत "की लोक काय तुम्हांला आणून देणार आहेत काय "? की तुमचे घर चालवणार आहेत .तुम्ही त्यांचा विचार केला तर तुमचे आयुष्य कमी होईल हे मात्र नक्की .मग कोण सावरणार तुमचे घर .तुमच्या जाण्याने तुमच्या कुटुंबाला कोण पुरवणार , आहे का उत्तर याचे तुमच्याकडे ?              काय जादू आहे या वाक्यात ! खरच खूप उपयोगी पडते हे वाक्य मला .आणी आज योग आला आज ह्या वाक्यावर लिहिण्याचा .बाकी मग पुन्हा रिपीट होईल म्हणून ईथेच थांबते .
==============================

सानप बालाजी,बीड

   दोन तीन दिवसापासून आजारी असल्यामुळे नांदेडवरून परवा बीड ला आलो, डॉक्टरांनी पूर्णपणे एक आठवडा सक्तीची बेड रेस्ट सांगितल्यामुळे आता 7 8 दिवस घरी काय करू या विचारात असतानाच, दारामध्ये कोणीतरी आवाज दिला, "है क्या कोई घरमे....!" घरामध्ये कोणीही नव्हते मग मी बोललो "कोण पाहिजे" तर उत्तर आलं, "बाबा फकीर आहे, काही तरी दान करा."
       मग मी जरा बाहेर आलो आणि आमचा संवाद चालू झाला,
मी : काय घेणार काका.
काका : गहू, तांदूळ, बाजरी, पैसे जे असेल ते द्या.
मी : गहू देता देता सहज विचारलं, काका जेवण कधी केलं...?
काका : आणखी नाही केलं बाळा आता करेल कोठे तरी.
 मी : मग या आतमध्ये आपण दोघे करू जेवण.
 काका : बाळा मला एकतर आज उपवास आहे आणि तुझ्या घरी पण कोणी नाही तर मला अचानक घरामध्ये तुझ्यासोबत जेवताना पाहून तुझ्या घरचे काय बोलतील...
  मी : काका माझ्या घरचे तुम्हाला जेवू घातल्यामुळे खूप खुश होतील, त्याची चिंता तुम्ही करू नका.(अस बोलून मला स्वतः थोडा अहंकार वाटू लागला की मी जातीभेद/धर्मभेदाच्या पलीकडे गेलो आहे.)
  काका : बाळा मला आज एकादशी आहे आज नको नंतर कधीतरी भेटू तेव्हा नक्की जेवण करू.
 मी : (अशर्यकारकरित्या) तुम्हाला आणि एकादशी हे कस शक्य आहे. आता तर तुम्ही फराळ केलीच पाहिजे.
 मग काकांना बाहेर मस्त हवेत फराळाला  बसवून आमची चर्चा चालू झाली
        नंतर जे काकांनी उत्तर दिले ते ऐकून माझा मी पणा तर गेलाच पण आजही समाजात अशी माणसं आहेत या गोष्टीचा खूप म्हणजे खूप अभिमान वाटला आणि त्या वेळी मला समजले की काही नावाजलेले तथाकथित समाजसुधारक फक्त नावपूरतेच काम करतात, समाजासाठी काम करणारेही लोक खूप आहेत पण त्यांना प्रसिद्धीची गरज नाही .
      काकांचे शब्द अशे होते,
        "बाळा ज्या त्या कालखंडातील लोकांच्या राहणीमानाप्रमाणे किंवा रितिरिवाजप्रमाणे वेगवेगळ्या धर्माची स्थापना झाली, पण सर्वात शेवटी माणुसकी हाच धर्म कामाला येणार,
        हाच संदेश लोकांमध्ये रुजवण्यासाठी मी सर्व धर्माचं पालन करण्याचा प्रयन्त करून त्यांना देशभक्ती समजावण्याचा मार्ग स्वीकारला ,मला अगोदर माझ्याच घरच्यांनी विरोध केला पण मी त्यांचा विचार न करताना, आमचा समाज काय बोलेल याचा विचार न करता, पूर्ण भारत मातेचा विचार केला, थोडा त्रास झाला पण, आता सवय झाली की काही नाही होत...
        आता ते काका हरिनाम सप्ताहामध्ये समाजप्रबोधन करतात, बुद्धविहारामध्येही जाऊन शिकवण देतात, तर मजिद्दीमधेही देशहिताच्या गोष्टी सांगतात...!
        शेवटी काकांना निरोप देताना माझ्या डोळ्यात अश्रू आले, आणि पुन्हा लवकर भेटण्याच्या अटीवर मी त्यांना जाऊ दिले...!
        शेवटी एक गोष्ट कळली 22 वर्षांमध्ये ज्या काही गोष्टी लोक काय बोलतील या विचाराने करायच्या राहिल्या होत्या त्या सर्व गोष्टी काका 10-15 मिनिटात समजावून गेले...!
        सारे भारतीय माझे बांधव आहेत ही भावना आज माझ्या मनात कायमची कोरली गेली ती कधीच न पुसण्यासाठी...!
==============================


अर्चना खंदारे, हिंगोली

आज लेख  लिहिण्याचा आठवड्यातील   शेवटचा  दिवस,सर्वांनी  किती छान लेख  या आठवड्य  मध्ये लिहिले  आहेत,सर्वांचे आभार ....मग मी विचार करत होते कि,मी माझा  विचार कश्या  प्रकारे  मांडू  काही कळत नव्हते ,सहज  हाता मध्ये सकाळी मोबाईल घेतला,यूट्यूब  चालू केले तर एक जाहिरात  पहिली,त्या  मध्ये एक मुलगी  आपल्या आई  कडे  कार घेऊन  देण्याची  मागणी  करत होती ,त्यावर  तिची  आई तिला  म्हणाली ,तुला  जर  मी कार घेऊन दिली  तर आपले  नातेवाईक व लोक   मला  काय म्हणतील ,यावर  मुलगी आई ला म्हणाली तुला   माझ्या   पेक्षा लोकांची काळजी वाटते कि, ते तुला काय म्हणतील..सकाळी उठून  मुलगी  ऑटो  ने जॉबवर निघून  जाते,ती गेल्या  वर आई च्या लक्षात  येते  कि ,मुलीला ऑटो ने  जॉब वर जाण्यास  त्रास  होत  आहे, मग आई तिला न  सांगता दुसऱ्या  दिवशी   कार गिफ्ट  करते.मुलगी फार  खुश  होते ,कार मध्ये बसून  आई आणि मुलगी मार्केट  मध्ये जातात  घरी  परत  येत  असताना  त्यान्ना  रस्त्यामध्ये  अपघात  झालेला  दिसतो  व त्या अपघात झालेल्या मुलाला  दवाखान्या मध्ये नेण्यासाठी  कोणी  हि लिफ्ट  द्यायला  तयार  होत नव्हते  मग त्या दोघीनी  त्या मुलाला लिफ्ट दिली व त्यास  दवाखान्या  मध्ये घेऊन गेल्या .वेळे वर नेल्या  मुळे त्या मुलाचा  जीव  वाचला,मग या सर्व घटने  मुळे त्या आई ला तिच्या  मुली  बद्दल  अभिमान  तर वाटूच  लागला  आणि मुलीला कार घेऊन देण्या चा तिचा निर्णय    योग्य  होता .
या वरून  असा  बोध  होतो  कि "ऐकावे  जणांचे  पण करावे मनाचे"  या म्हणी  प्रमाणे  आपण कोणतेही  काम  करत असताना लोक आपल्याला  सारखे  नावे ठेवत  असतात  परंतु  लोकांच्या  विचारांचा  विचार न करता आपण आपल्या  विचाराचा  विचार करावा ,पण तो विचार हि आपल्या व इतरांच्या  हितावह  असला  पाहिजे .
या वरून  असा  बोध  होतो  कि "ऐकावे  जणांचे  पण करावे मनाचे"  या म्हणी  प्रमाणे  आपण कोणतेही  काम  करत असताना लोक आपल्याला  सारखे  नावे ठेवत  असतात  परंतु  लोकांच्या  विचारांचा  विचार न करता आपण आपल्या  विचाराचा  विचार करावा ,पण तो विचार हि आपल्या व इतरांच्या  हितावह  असला  पाहिजे .
पण कधी कधी सर्व च  निर्णय बरोबर असतील  असेही  नाही .पण झालेल्या चुकीच्या  निर्णयावर  दुरुस्त्या  करणे हि फार महत्वाचे  असते...
===============================

पवन खरात, अंबाजोगाई

ना जिने देंगे ये तुझे,
ना ये मरने देंगे तुझे ।
अपनी ही बस सुनाएंगे
कब सुनेंगे ये तुझे ?

हौसलों को ना अपने बिखरने दे तू,
चलते कदमों को ना अपने रुकने दे तु ।
साया बनके चलेंगे सपने तेरे,
अपने वजूद को मिटने ना दे तु ।

काले घने बादल बनके,
मंडरायेंगे तेरी उमीदोंपे,
जी ले जिंदगी ये मस्त मगन
मत सोच, क्या कहेंगे ये लोग ?
==============================


डॉ. विजयसिंह पाटील. MBBS.DA. कराड


तसा मी टापटीपीत राहतो. राहतो म्हणण्यापेक्षा राहावं लागतं. रविवार सुट्टीचा दिवस. अगदीच सहकुटुंब कुठं खरेदी, कार्यक्रम इत्यादी जायचं असेल आणि माझं जाणं गरजेचं असेल तरच मी बऱ्यापैकी अवतारात असतो. (तेही बायकोच्या धाकानं हे वेगळं सांगावयास नको.)

एरव्ही रविवारी मी दाढी वगेरे गोष्टींना फाटा देतो. सकाळी टीव्ही वर एखादा पिक्चर( शक्यतो साऊथ इंडियन, अजिबात डोक्याला ताप देत नाहीत हो ही मंडळी.)  दुपारी गळ्याला येईपर्यंत गिळायचं, आणि जे ताणून द्यायचं ते संध्याकाळीच उठायचं. चहा पीत परत मुक्काम टीव्ही समोर. परत टीव्ही वर जे असेल ते बघायचं, रात्री उशिरा जेवून झोपायचं. असा माझा रविवार मस्त आनंदात जातो.

पण आज मात्र माझ्या या सुखाला कुणाची तरी नजर लागली. तसा दुपारी झोपून उठेपर्यंत दिवस मस्त गेला. उठलो तर बायकोनं 'अहो साखर संपलीय, तेव्हडी आणता का ' अशी धमकीवजा विचारणा केली. मी होकार दिला हे चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच. दुकान अर्ध्या किलोमीटरवर. मी बर्म्युडा, टी शर्ट, पायात स्लीपर, थोडे वाढलेलं दाढीचं खुंट, अशा अवतारात स्कुटरवरून दुकानाकडे निघालो. आणि घात झाला. दुकान जवळ आलं होतं, तेव्हड्यात पायी चालत असलेले कावळे सर दिसले. (तसा मी फार हुशार आहे पण रविवारी माझी बुद्दी पण विश्रांती घेत असावी, अशी मला शंका आहे.) मी स्कुटर थांबवून ' चला सर, सोडतो कोपऱ्यावर'..अर्थात सर बसले. लगेच आमचा सकाळचा अड्डा कम हॉटेल आलं. त्यांना तिथं सोडून पटदिशी निघावं हा माझा विचार ओळखून सरांनी माझ्या दंडाला धरूनच हॉटेलमध्ये नेले.सकाळी चालून आलं की अर्धा तास चहा पीत तिथं बसायचं हा नित्य नेम.. प्रथमच मी सायंकाळी तिथं. आत सगळी गॅंग बसली होती.
कारखानदार घोलप, इंजिनिअर शेडगे, धान्य व्यापारी शहा, घारे गुरुजी आणि अर्थातच आबा. कोरम फुल होता.(वयानं मी सगळ्यात लहान, बाकीच्यांचा परिचय मी मागील लेखात केला आहेच , हे वाचकांना लक्षात असेलचं!)..

सगळेजणं व्यवस्थित कपड्यात, बूटबिट घालून सेंट मारून असलेले. ( आणि माझा अवतार वर उल्लेख केला आहेच ).
मला पाहून घोलपांचे डोळे विस्फारले , ' अहो काय हे ' असं थोडं रागानं ,  थोडं तुच्छतेने विचारलं. सगळेच जणू विदूषक बघत असल्यासारखे माझ्या कडं पाहू लागले. मी ' काय झालं सर ?असं विचारताच घोलपांचा चेहराअजून रागीट झाला असे मला वाटलं,
' व्हॉट इज धिस, ' काय बोलावे हे मराठी भाषेत त्यांना सुचेना आणि तेव्हढ इंग्लिश येत नव्हतं.
शेडगे बोलले ' अहो, अशा कपड्यात तुम्ही हिकडं कसं काय ?'.
 मी 'का ?'असं विचारताचं घोलप कडाडले ' काय झालं म्हणता ? घरातल्या कपड्यावर तुम्ही खुशाल बाहेर फिरताय ? लोकं काय म्हणतील ? नॉनसेन्स .'

घारे तंबाखूची गोळी दाढेत ठेवून बोलले ' आपण प्रतिशिष्ठ सभ्य माणसंआहोत , समाजात वावरताना कसं राहावं हे समजून घेणे आवश्यक आहे, असं नाही का तुम्हाला वाटत ?'. मी हो म्हणावं की नाही , या विचारात असताना, कावळे नी आपली चोच सॉरी तोंड उघडली.
'' कसं आहे, आपण समाजात वावरताना कसं राहावं याबद्दल बरेच मतप्रवाह आहेत, 'फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन,, आपण नेहमी टाप टिपित राहिलं पाहिजे, आत्ता माझ्याकडेचं पहा' कावळे सरांचं भाषण म्हणजे किमान अर्ध्या तासाची बेगमी हे जाणून घोलप साहेबानी त्यांना मध्येच थांबवलं . आणि स्वतः म्हणाले ' उई शुड कंसिडर द सोसायटी, , त्यामुळे तुम्ही व्यवस्थित कपड्यात राहिलं पाहिजे'. तेव्हड्यात त्यांचं लक्ष माझ्या स्लीपर वर गेलं. ' व्हाट्स धिस,, नो नो, जस्ट इंटलारेबाल , काय म्हणतील लोकं ?' अतिशय निराश भावनेनं ते आपली मान हलवत राहिले..

आतापर्यंत शांत बसलेले आबा ' बराबर हाय साहेब तुमचं, पण माझी एक शंका आहे, ईचारु का ?' ..
आबा आपल्या बाजूने बोलल्याने साहेब खुश झाले होते, त्याभरात त्यांनी होकार दिला.

आबा ' समाज समाज म्हणजे कोन वो ? उत्तराची अपेक्षा न करता पुढं ' समाजाला एवढा वेळ हाय का तुमची परतेक गोष्ट बघायला ? ' नीती नियमानंच्या मर्यादेत राहिलं तर समाज काय बी म्हणत नाय , कसं ? . माझ्या कडे निर्देश करून ' हे काय उघडे फिरतात का ? .  त्याना तेनंचा पोशाक आवडला तर त्यानी तो घालावा, हरकत काय हाय ? आं ..
आता घारेंच्याकडे नजर टाकून ' समाजाला दारू चालतीय, मग हे तर काय ?.
घारे गुर्जी बराबर हाय न्हवं ? . घारे
 मान खाली घालून बसले.( घारेंची रोजची संध्याकाळची सवय सगळ्याना माहीत होती .)सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आलं.

' अवो घोलप सायेब, तुमी तर शून्यातनं विश्व निर्माण केलंय, ठिगळं लावलेली कापडं घालून तुमी शाळा केली, तवा लोकं काय म्हणत होती ? , तुमी चांगलं काम करा, जो वंगाळच बोलनार हाय, त्यो तुमी कितीबी चांगलं काम करा, त्यो वंगाळच बोलनार, '. म्या म्हनतो त्ये चूक हाय का ?.. अवो गांधीबाबा नुसत्या पंचावर गोऱ्यांच्या देशात गेलते की नाय ? तेवा लोकं काय म्हनली ?..'

'लोकं बोलनारच, त्येचं तोंड धरता येत न्हाय, पन कानाआड तरी करता येतं की,'.. ' तुमी दिसरात्र ढोर मेहनत घेऊन पैसा अडका मिळवला, गाडी घोडं, बंगला बांधला, तरी हे म्हणणारचं , सायेबानं दोन नंबरनं कमावलं'...

' आनी कावळे गुर्जी, तुमी कायम पांढऱ्या स्वछ कपड्यात असता, पन, आज दोन पायात वेगवेगळ्या रंगाचं मोजे घातलेत !'..
इथं सगळ्यांचा नजरा कावळे सरांच्या पायाकडे गेलं, आणि दोन रंगाचे सॉक्स बघून हसायला लागले.. सरांचा चेहरा बघण्या सारखा झाला..वातावरण हलकं झालं.

त्यामुळं, नीतीच्या चौकटीत राउन आपुन आपल्या मार्गानं जावं, लोकं काय म्हनत नाहीत, आणि म्हनली तर म्हनली,, त्यात काय एव्हडं,,.त्यामुळं अंगाला भोकं तर पडत न्हाईत, '.
'बगा बुवा ये माज्या आडान्याचं मत हाय '...
सगळे निरुत्तर झालेले,, माझा हात हातात घेऊन, सगळ्यांनी न बोलता माफी मागितली...एक तास होऊन गेला होता.
घराची आठवण आली, आणि लोकं काय म्हणतील यापेक्षा बायको काय म्हणणार या चिंतेत मी घराकडं निघालो...
==============================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************