नवरात्रातले नवरंग श्रद्धा की फॅशन?


विषय क्रमांक 4
नवरात्रातले नवरंग श्रद्धा की फॅशन?


1)तेजस महापुरे, कराड.
2)प्रा. रोहन वर्तक, लोणावळा, पुणे. 
3)शिरीष उमरे, नवी मुंबई 
4)प्रविण, मुंबई
5)निखिल खोडे, ठाणे.
6)महेश कामडी, नागपुर.
7)शीतल शिंदे  - दहिवडी.
8)अनिल गोडबोले, सोलापूर.
9)संगीता देशमुख,वसमत.
10)किरण पवार,औरंगाबाद.
11)डॉ. विजयसिंह पाटील. MBBS. DA. कराड..
12)महेश देशपांडे, ढोकी,धाराशिव.
13)किशोर शेळके,लोणंद.
__________________________________________________________________________________________________________________________________________________
तेजस महापुरे,
कराड. 



       आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपला देश हा विविधतेने नटलेला आहे, कारण वर्षभर आपल्या देशात विविध धर्माचे लोक हे त्यांचे त्यांचे सण साजरे करत असतात, जसा जसा काळ बदलू लागला तस तस सणांचे स्वरूप बदलू लागले, आणि सणांच्या साजरे होण्यामध्ये अनेक गोष्टी अंतर्भूत होऊ लागल्या, नावरात्रीबद्दल बोलायचं झाल तर हा स्त्रीशक्तीचा उत्सव होय. या दिवसात महिला या रोज वेगळ्या रंगाच्या साड्या नेसतात अस दिसून येत, साहजिक आहे ज्यांचा विशिष्ट रंग परिधान केल्याने काही आपल्याला लाभ होईल अशी श्रद्धा असेल त्यासाठी असे केले जात असावे, आणि सध्या विविध फॅशन करण्याचा जमाना आहे, तर हे फॅशन म्हणून सुद्धा केल जातय अस माझ मत आहे कारण प्रत्येक सण साजरा करत असताना त्याला आधुनिकीकरण हे व्यापून टाकत हे आपण वेळोवेळी पाहत आलेलो आहोत, प्रत्येक रंगाचे असे गुणधर्म असतात जे आपल्या मनावर परिणाम करतात, म्हणजे काही रंग पाहिल्यावर आपला मूड फ्रेश होतो तर काही नावडते असतात, नवरात्राचे नऊ रंग दरवर्षी बदलतात अस मी ऐकलय त्यामुळे ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी श्रद्धा म्हणून व ज्यांना ते फॅशन म्हणून वाटेल त्यांनी फॅशन म्हणून ते करावं.
__________________________________________________________________________________________________________________________________________________
प्रा. रोहन वर्तक,
लोणावळा, पुणे. 

              संस्कृती ही नेहमी निसर्गावर अवलंबून असते, एखाद्या प्रदेशाचे भौगिलीक विशेषीकरण हा त्या त्या प्रदेशातील सण आणि संस्कृतीत उतरलेला दिसतो. सगळ्या सणामागे अशीच मानसिकता, शारीरिक आणि पर्यावरण समृद्ध करणारी कारणे आहेत, परंतु समाजातील शैक्षणिक आणि राजकीय बदलामुळे ह्या सणांमध्ये अनेक निरर्थक वालयांचे वेष्टण सध्या चढविले गेले आहे.
नवरात्री.... खरंतर हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात पावसानंतरच्या विषाणूयुक्त वातावरणातुन मुक्त होण्याकरिता घर व परिसराची स्वच्छता करून प्रसन्न वातावरणाची निर्मिती करणे ह्या हेतूने साजरा केला जात होता. ह्या सणात कधीही नाच गाणे ह्याचा इतिहास आपल्या महाराष्ट्रात बघावयास भेटत नाही. रास दांडिया किंवा गरबा हा प्रकार गुजरात राजस्थान ह्या राज्याच्या कडून महाराष्ट्राने स्वीकारला आणि आपलासा करून टाकला, आणि स्वतःचा भोंडला मात्र महाराष्ट्र विसरून गेला.
🙏🙏__________________________________________________________________________________________________________________________________________________नवरंग... स्वयंघोषित हिंदुधर्म संरक्षित जयवंत साळगावकर यांच्या आणि आर्थिक महाराष्ट्र काबीज करणारे मारवाडी आणि गुजराती समाजाचे व्यापारी यांच्या संगनमताने साधारणतः 2002 मध्ये पहिल्यांदा कालनिर्णय मध्ये नवरांगांचा उल्लेख दिसतो. हे नवरंग कालनिर्णय मार्फत समाजात पसरविले गेले आणि सध्या आपण त्या रंगाचा कसा व्यापार होतो हे बघताच आहोत. ह्या रंगांमुळे महाराष्ट्रात जवळपास 1000 करोड रुपयांची उलाढाल दरवर्षी होते. खरंतर सध्या अत्यंत सोयीस्कर पणे सर्वच सणाचा व्यापार दृष्टीकोनातून विचार होत आहे. कारण भारतातले हिंदू सण म्हणजे व्यापाराच्या दृष्टीने 100 कोटी ग्राहकांची जत्राच आहे. त्यामुळे यापुढील काळात प्रत्येक सणांमध्ये असेच समाजमान्य काहीतरी घुसवून व्यापार वृद्धांगत करणे हेच होत राहील यात शंका नसावी, म्हणून नवरंग ही श्रद्धा किंवा फॅशन नसून निव्वळ व्यापारच आहे.
__________________________________________________________________________________________________________________________________________________
शिरीष उमरे, नवी मुंबई 


आपला भारत देश हा उत्सवप्रिय... आपल्या संस्कृती प्रमाणे वार्षिक उत्सव मालिका निरखुन बघितली तर ग्रामीण भागातील शेती नुसार सण सुरु होतात ... 

दोन महीने अथक मेहनत केल्यावर कृतज्ञता म्हणुन शेतकर्यांचा मित्र नाग ( जो उंदरे खाउन पिक वाचवतो) व नविन पीढीला  ज्ञान पास ऑन करण्यासाठी नागपंचमी.. त्यानंतर बहीणीला आवतन व कुटुंब सदृढ करण्यासाठी रक्षाबंधन... त्यानंतर बैलपोळा... मग  गजमुखी बुध्दिदेवता पुजन... सोबत च गौरीपुजा.. गव्हाची खीर व ज्वारीच्या आंबिल ची मेजवानी ...परतीच्या पावसानंतर दुर्गाष्टमी म्हणजे नवरात्री ... स्रीच्या विवीधांगी रुपाचे कौतुक व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा सोहळा...
त्यानंतरचा हीवाळ्याची चाहुल दाखवणारा कोजागिरी आणि दीपावली ते थेट मकरसंक्रांत व उन्हाळ्याच्या सुरुवातिची रंगपंचमी....  

सांगण्याचे तात्पर्य हे च की आपल्या पुर्वजांनी जाणीवपुर्वक अश्या रुढी परंपरा पाडल्या जेणेकरुन कामाच्या थकव्यातुन विरंगुळा, करमणुक, ज्ञान वाटप, निसर्ग रक्षण, माणुसकी जपणुक वैगेरे उदिष्टे साध्य व्हावी...

 यामागिल व्यवसाय वृध्दीकलाकरांना वाव आणि अर्थ चक्र फीरवत ठेवण्याची पुर्वजांची कीमया  बघुन खरच थक्क होतो आपण आश्चर्याने !! 

आपल्या वैभवशाली संस्कृतीत स्रियांना खुप मान आहे. पणजी, आजी, आई, मावशी, आत्या, काकुबहीण, सखी, प्रियसी, पत्नी, मुलगी, नात अशी मधुर नात्यांचा उत्सव व स्त्रीशक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा... 

ह्यात कुटुंब व मित्रपरिवारासोबत चा गुजराती गरबा असो कींवा कलकत्ता मधील विशाल दुर्गामाता चा मंडप असो वा उग्र कालीमातेचे भयावह रुप असो... 

ह्या नवरंगामध्ये सगळे आनंदात चिंब भिजुन काही काळापुरते आपल्या समस्या विसरतात... 
मग श्रध्दा म्हणा कींवा अंधश्रध्दा !
फॅशन म्हणा कींवा व्यापार... खुष सगळेच असतात. हसत रमतगमत कसे दिवस निघुन जातात हे कळत नाही... हो ना
🏼🏻

__________________________________________________________________________________________________________________________________________________
प्रविण, मुंबई
         नवरात्री म्हणजे स्त्रीत्वाची पूजा, सबला नारीच प्रतीक आणि तरुणाईचा जल्लोष. पण भक्तीला इंकॅश केलं नाही तर "मार्केट" " मीडिया" आणि " अर्थकारण" जगेल तरी कसे?
जगात प्रत्येक मोठ्या गोष्टीमागे अर्थकारण आहे आणि त्या गोष्टीचा "इव्हेंट" झाला तर नफा अधिक. प्रत्येक मोठा सण हा आता इव्हेंट झाला आहे. त्याला नवरात्री सुद्धा अपवाद नाही. जे लोक उपवास करून नऊ वेगवेगळ्या रंगाचे कपडे नऊ दिवस परिधान करून देवी चरणी नतमस्तक (?) होतात त्यांना हा गैरसमज असतो की यात श्रद्धा असते.  हे सर्व "मार्केट" आणि "मीडिया" ने लादलेल्या श्रद्धेचे "अर्थकारण आहे.
यातून एक प्रतीत होत की श्रद्धेचे व्यापारी श्रद्धेच्या नावाने आपला फायदा साधतात आणि आपण एका अनामिक नशेत मानसिक गुलाम बनून जातो.
__________________________________________________________________________________________________________________________________________________

निखिल खोडे, ठाणे.

                   भारतीय संस्कृती विविध सण उत्सवा नी नटून आहे. प्रत्येक सण उत्सवाला कोणते ना कोणते वैज्ञानिक कारण असते. उदारणार्थ थंडीच्या दिवसात मकर सक्रांतीला तीळगुळ खायला देतात त्यामुळे आपल्या शरीराततील उष्ण व स्निग्ध आहाराची उणीव भरुन निघते.  
               
                    नवरात्र हा उत्सव भारतामधे मोठ्या थाटामाटाने साजरा केला जातो, २००४ मध्ये "महाराष्ट्र टाईम्स" ने मुंबईतील महालक्ष्मी मंदिरातील देवीला नऊ दिवस नेसविलेल्या साड्यांचे रंग प्रसिद्ध केले तेव्हा पासूनच महिलांमध्ये नवरात्रातील नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या घालायचा ट्रेंड सुरू झाला. मुंबई मध्ये लोकल ट्रेन, ऑफिस, इतकंच काय तर हॉस्पिटल मध्ये सुद्धा महिला नवरात्रामध्ये त्या दिवसाच्या रंगानुसार साड्या परिधान करून दिसतात. यामागे खरच श्रध्दा आहे की अंधश्रध्दा की फॅशन आहे हा प्रश्न पडतो !!
     
                     नवरात्रामध्ये बरेचदा बघितले आहे की लोक चप्पल, चामडाचे पट्टे घालत नाही. यामध्ये खरच त्यांची अंधश्रध्दा आहे की दिखाऊपणा आहे हे समजायला मार्ग नाही. गोरगरीब जनतेसाठी नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, यासोबत लागणाऱ्या वस्तु खरच परवडणाऱ्या आहेत का? गरबा खेळण्यासाठी इव्हेंट मॅनजमेंट करणाऱ्या कंपन्या, व्यापारी लोक लोकांची श्रद्धा बघुन स्वतःचा फायदा करून घेतात.

                     नवरात्रा मधुन काही चांगले शिकण्याची गरज आहे. स्त्रियांनी स्वावलंबी होण्याची, राजमाता जिजाऊसाहेब यांचे सारखा पराक्रम करण्याची, छेडछाड करणाऱ्या बदमाशांना चार फटके देण्याचे सामर्थ्य ठेवण्याची. शेवटी वायफळ खर्च न करता प्रत्येकाने आपापल्या श्रद्धा नुसार नवरात्र उत्सव साजरा करावा.

__________________________________________________________________________________________________________________________________________________

महेश कामडी,
नागपुर.


आज बघतो म्हणायचं तर नक्कीच फॅशन म्हणावं लागेल

नवरात्रीच्या 9 दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेळ्या फुलांची माळा घालण्याची प्रथा आहे.


_पहिली माळ_
शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ

_दुसरी माळ_
अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढर्‍या फुलांची माळ.

_तिसरी माळ_
निळी फुले. गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या. फुलांच्या माळा.

_चौथी माळ_
केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले.

_पाचवी माळ_
बेल किंवा कुंकवाची वाहतात..

_सहावी माळ_
कर्दळीच्या फुलांची माळ.

_सातवी माळ_
झेंडू किंवा नारिंगीची फुले.

_आठवी माळ_
तांबडी फुले. कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ.

_नववी माळ_
कुंकुमार्चन करतात.


पण आज बघितल तर 9 रंग देवीचे नाही तर आपल्यावर 9 दिवस फॅशन म्हणून लाऊन घेतात
आतचेच उदाहरण :- माझ्या मैत्रिणीने नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी निळा रंगाची साडी नेसून फोटोज् व्हॉट्सअँप स्टेटस् ला ठेवले. नवरात्रीचा पहिला दिवस निळा - निळा 
म्हणालो अरे वा मग बाकी 8 दिवसाचं काय?
लगेच उत्तर सर्व तयाची 15 दिवसा पुर्वी करून घेतली, 9 दिवसाकरिता 9 रंगाच्या 9 साड्या, कॉकटेल ब्लाऊज, बांगड्या, नेकलेस, पैंजण, बाजूबंद,कंबरपट्टा, मेहंदी   इत्यादी.....
🏻हे काय फॅशन की श्रद्धा?

आज सकाळी एक पोस्ट वाचली परफेक्ट वरच्या गोष्टीला लागू होणारी

9 दिवस , 9 रंगाची नवनवीन वस्त्र, म्हणजेच......._*

नवरा त्रस्त

यालाच म्हणतात नवरात्र
आणि यात महिलाच नाही तर पुरुष मंडळींना पण फॅशन करणे आवडतं. नवीन कपडे वापरून इतरांवर इंप्रेशन मारण्याचा प्रयत्न करत असतात. सोबतच दांडिया नृत्याबरोबर फॅशन शो ही भरतो. 
आता तर आधिसरखे दृष दिसेनासे झाले वेगवेगळे संस्कृतिक कार्यक्रम पार पडली जात असे पण आज मात्र फॅशन वर जास्त जोर वाढला नवरात्रीच्या कायात खेयल्या जणाऱ्या रास, गरभा आणि दांडिया हे सुध्दा डिस्को दांडिया या फ्युजन मध्ये रूपांतर झाले आहे.
हल्ली नऊ दिवसांसाठी निरनिराळ्या रंगाचे पेहेराव तरुणाई करते. व त्यासाठी बरेच पैसेही खर्च केले जाते. ' पण हौसेला मोल नाही म्हणतात ' तेच खर.

गरब्याचे मैदान म्हणजे भलामोठा रॅम्पच. मदानात दाखल होताना सर्वाचे लक्ष आपल्याकडे जावं, आपण सर्वामध्ये उठून दिसावं ही समस्त तरुण वर्गाची इच्छा असते. त्यामुळे या रॅम्पवर ट्रेडिशनल, वेस्टर्न, फ्यूजन अशा सगळ्या प्रकारची फॅशन पाहायला मिळते.
मुलांसाठी केडीयू ड्रेसेस असे भरपूर प्रकार उपलब्ध झाले असतात.
उत्तम शरीरसौष्ठव असलेले तरुण स्लिव्हलेस जॅकेट्स आणि जिन्स असा पेहराव घालणे पंसत करतात. त्याप्रमाणे मुलीही गडद रंगाचा प्लेन टी-शर्ट आणि त्यावर उलट रंगाचा गमठी जॅकेट आणि जीन्स अशा पेहरावाला प्राधान्य देतात.
मित्रा पण असे सांगतात ' आजचा  रंग पिवळा आहे. पिवळा कुर्ता घालूनच जा पंडालमध्ये. नऊ दिवसांचे रंग पाळतोस हे कळल्यावर सॉलिड एम्प्रेशन पडेल तिच्यावर😉
नवरात्री चे 9 दिवस म्हणजे मित्र मैत्रणी सोबत  सकाळपासून रात्रीपर्यंत धुडगूस घालण्याची  परवानगी असते.
सकाळी घरी देवीची यथासांग  पूजा केली की झालं, मग, रात्री उशिरा किंवा भल्या पहाटे घरी आल तरी चलण्यासारख असत. मुलांना या दिवसात मुलांसमोर इंप्रेशन मारण्यसाठी हे 9 दिवसांसाठी  उत्तम संधी नसतेच😁😉💞
प्रिंटिंग केडिया आणि धोती धितीसोबत शॉर्ट कुर्ता👌🏼👌🏼 दुपट्टा रंगीत यावर उठून दिसते
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शीतल शिंदे  - दहिवडी .
 भारतीय संस्कृती आता फँसी  संस्क्रुती होत चालली आहे .
आपण सर्व सन , उस्तव , व्रत वैकल्ले , पूजा अर्च्या , साधनाआणी सार्वजनिक ऊस्तव  मोठ्या श्रद्धेने साजरे करतो पण त्यामागचा खरा भाव जाणून घेण्याचा प्रयत्न करतच नाही .तेवढ्यापुरतेच एकत्र आलेलो दिसतो ऊस्तव समाप्त झाला की पुन्हा आपापल्या पद्धती .
  ऊस्तवाच्या नावाखाली उघड उघड कर्मकांड साकडे , नवस एवढेच नाही तर नवऊ  दिवस अनवाणी पायांनी चालतो  , उपाशी पोटी राहतो .आणी त्याच पायांनी स्त्री ला तुडवतो तिच्यावर अन्याय करतो अत्याचार करतो ऐथे मात्र कोठे जाती संस्क्रुती कोणास ठावूक . 
मग तेव्हा कुठे जाते दुर्गा माता , गणेशगौरी .ह्यांचे विसर्जन करताना छोटी छोटी मुले आपले प्राण  गमावतात .ही सर्व फँसी अंधश्रद्धा आहे .
  कोणाच्या भावना दुखवत नाही तर त्या जागृत करायच्या प्रयत्न करतेय .
ह्या ऊस्तवाचा मी असा अर्थ घेईन की प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसव न्यामागे प्रत्येक स्त्रीने असा अर्थ घ्यावा की वेगवेगळ्या प्रसंगी , जसे वातावरण असेल तसे जशी परिस्थिती असेल तसे स्वतः मधे आपली भूमिका बदलण्याची तयारी ठेवा .जसे की माता , बहीण , पत्नी , शेजारीण , व्यवसायिक , ग्रुहीणी , आणी वेळ आल्यास अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी दुर्गा मातेचे  रूप घेणे आवश्यक आहे .हा बदल फार गरजेचा आहे .
__________________________________________________________________________________________________________________________________________________

अनिल गोडबोले,
सोलापूर.

नवरात्र उत्सव मधील नवरंग आणि त्या रंगी बेरंगी साड्या या मध्ये श्रद्धा काहीच नाही. 

एखाद्या स्त्रीला ज्या रंगाचा ड्रेस आणि साड्या घालायच्या आहेत ना त्यांनी त्या घालाव्यात, हा त्यांच्या आवडीचा प्रश्न आहे.

हा नक्कीच फॅशन चा मुद्धा आहे पण त्या पेक्षा हा व्यापाराचा मुद्धा आहे. त्या निमित्ताने नविन नवीन संकल्पना राबवल्या जात आहेत.. ज्यांना परवडत त्यांनी घालावं.. नेसावं.. 

एकाच रंगाच्या एका दिवशी घालव्याशा वाटल्या तर काही प्रॉब्लेम नाही, उलट स्त्रियांच्या मानसशास्त्राचा वापर उत्तम केला आहे. पण सक्ती नसावी

आज ऑफिस मध्ये स्वच्छता करणाऱ्या मावशी एका विशिष्ट रंगाची साडी घालून आल्या होत्या आणि इतर सर्व महिला वर्ग त्याच रंगामध्ये आले होते..

अधिकाराने मोठ्या असलेल्या सर्वांनी एकत्र येऊन सर्वानी सेल्फी काढले मावशी सोबत.. त्या ही खुश होत्या बाकीचे खुश.. बघणारे खुश..

तर मुद्धा असा आहे की यात काही श्रद्धा नाही एका रंगामुळे नवीन पद्धतीने जीवनाकडे बघता येत.. फक्त हा दृष्टकोन सर्व बाबतीत महिला आणि पुरुष वर्गाला मिळो, हीच अंबाबाई चरणी प्रार्थना..!
__________________________________________________________________________________________________________________________________________________

संगीता देशमुख,
वसमत.
मी मागील वर्षी नवरात्रीत सहजच विचार केला की,माझ्या बालपणापासूनच मी हा महोत्सव रंगलेला पहाते. पण अगदी काही वर्षापूर्वीपर्यंत असं श्रीमंत असो गरीब,शहरी असो वा ग्रामीण कोणत्याही महिला अशा विशिष्ट रंगाच्या साड्या घातलेल्या मी पाहिले किंवा ऐकले नव्हते.  त्यावरही विचार केला की,मग हे  सुरू कधी झालं आणि इतकं झपाट्याने हे रुजलं कसं? पण याचे समाधानकारक उत्तर मागील वर्षी मिळाले. ते असे की,मागील वर्षी एक बातमी वाचण्यात आली होती,२००३ साली एका वृत्तपत्राचा खप अत्यंत ढासळला होता. आणि मग त्या वृत्तपत्राच्या संपादकाने एक शक्कल लढविली. नवरात्र महोत्सवातील नवरंगाचा फायदा घ्यायचे ठरवले. नवदुर्गा म्हणजे नऊ रंग सांगून संपादकाने रंग ठरवून दिले आणि  रोज एका कार्यालयातील महिलांनी ठरवून दिलेले रंगाच्या साड्या परिधान केल्या की,तो फोटो काढून संपादकाला पाठवायचा. आणि त्या संपादकाच्या अपेक्षेप्रमाणे ते यशस्वीही झाले. रोज त्यांच्याकडे अशा एकाच रंगाच्या परिधान केलेल्या साड्यातील महिलांचे इतके फोटो यायला लागले की,त्या वृत्तपत्रातील बातम्या शोधून वाचाव्या लागत असत.
          नऊ दिवसाच्या नऊ रंगाच्या साड्या परिधान करण्यामागे संपादकाची ही कल्पना आहे,हे कळल्यावर हसावं की रडावं हेच कळाले नाही. आपल्या देशात कुठलीही बाब अशीच झपाट्याने पसरते आणि ती लोकांत रुजतेही. त्याचा इतिहास ,त्याची सत्यासत्यता पडताळून न पहाता ती रुढीपरंपरा बनून जाते,याचाच खेद वाटतो.
        घरची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल किंवा त्या रंगाच्या साड्या घरात उपलब्ध असतील तर  वावगे होणार नाही. फॅशन म्हणून नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या  घालणे हेही  वावगे होणार नाही. परंतु सगळ्याजणी करतात म्हणून आपण अंधानुकरण करणे मात्र घातक होईल.  या प्रथेची सुरुवात शहरी स्त्रियांपासून झाली असली तरी सोशल मिडियाच्या माध्यमातून हे फॅड ग्रामीण भागात पोहोचण्यास वेळ लागणार नाही.  मग शहरातल्या स्त्रिया त्यातही नोकरदार,उच्चशिक्षित स्त्रिया करतात म्हटल्यावर ही प्रथा व्हायला वेळ लागणार नाही. आणि प्रथेचा मार्ग अंधश्रध्देत पोहोचतो. यावेळी स्वतःला उच्चशिक्षित किंवा पुढारलेली स्त्री म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांवर ही फार मोठी सामाजिक जबाबदारी आहे की,त्यांच्या वर्तनाचे प्रतिबिंब समाजात विपरीत परिणाम करणार नाहीत,याची काळजी घेणे. कोणी जर म्हणत असेल आम्ही कोणते कपडे घालावेत हेही समाजानेच ठरवावे का? याचे उत्तर निश्चितच नाही. आपल्याला पुरोगामी महाराष्ट्र घडवायचा असेल तर आपण समाजात कोणते विचार पेरतो,हे महत्वाचे ठरते. याऐवजी आपण नऊ दिवस समाजाभिमुख नवीन  नऊ विचार समाजाला देण्याचे काम आपण करू शकतो,की ज्यातून स्त्रियांना त्यांच्या कर्तृत्वाचे रंग दाखविण्याची संधी निर्माण व्हायला हव्यात.
               थोडक्यात सांगायचे झाले तर,नवरात्र महोत्सवात नऊ रंगाच्या साड्या परिधान करणे,याचा तर तिळमात्रही संबंध श्रध्देशी नाही. राहिला प्रश्न फॅशनचा तर,फॅशन ही धार्मिक बाबीत शिरू नये. बाकी क्षेत्रात फॅशन करणे वेगळे आणि धार्मिक कार्यात फॅशन करणे वेगळे! धार्मिक कार्य करताना लोकांची मानसिकतेपेक्षा श्रध्दाच महत्वाची ठरते. श्रध्दा म्हटले की, व्यक्ती त्यातील सत्यासत्यता पडताळून न पहाता तिची अमलबजावणी करते आणि मग या श्रध्देचं रूपांतर अंधश्रद्धेत होते. त्यामुळे आज नऊ रंगाच्या साड्या परिधान करण्याच्या खुळाची वाटचाल ही सध्यातरी अंधश्रद्धेकडेच होत आहे,हे दिसून येते.
__________________________________________________________________________________________________________________________________________________

किरण पवार,
औरंगाबाद.
                 
           मुळात नवरात्र ही गोष्ट एक आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग आहे. आपण त्याकडे कुठल्या उद्देशाने पाहतो, ही गोष्ट यात महत्वाची ठरते. ज्याचा त्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो; सारखाच असावा ही जबरदस्ती नाही. पण एक गोष्ट आर्वजून सांगायची आहे. ती म्हणजे, आपल्या संविधानात म्हटल्याप्रमाणे *प्रत्येक नागरीकाने विज्ञानवादी विचार बाळगले पाहिजेत.* मुळात आपण गफलत इथेच करतो की, आपल्याला विज्ञानवादचं समजलेला नसतो. आपल्या बुद्धीला ते तारतम्य खऱ्याच्या आधारे पटतं असेलं तर तो विज्ञानवादी दृष्टिकोन ठरतो. नवरात्रात चप्पल पाळली जाते, हे ठाऊक सर्वांनाच आहे. पण आपल्यापैकी कितपत लोक याचं वैज्ञानिक कारण जाणतात? हे पाहणंही तितकचं महत्वाचं आहे. बाकी सर्व गोष्टी सांगायच्या म्हटलं तर *नवरात्रीच्या नवरंगांमधून समाजाला एक उपदेश दरदिवशी द्यायचा असतो. आणि ही बाब माझ्या मते अगदी योग्य आहे. त्यामुळे मी या गोष्टीला श्रद्धा ही समजत नाही अन् फॅशनही.*
__________________________________________________________________________________________________________________________________________________


डॉ. विजयसिंह पाटील. MBBS. DA. कराड..

व्यायामावरून मी आणि घोलप साहेब हॉटेलमध्ये शिरलो. पुढं नेहमीप्रमाणे कावळे सर, हातवारे करत काही तरी बोलत होते. शेजारी घारे आणि गोडबोले बसलेले. (गोडबोले नावाप्रमाणेच नेहमी मृदू भाषेत बोलतात, कमीच बोलतात पण जे बोलतात ते मुद्द्याचं . )
आम्ही खुर्चीला पाठ टेकवताचं , आम्हाला पाहून कावळे सर मोठया💐 जोशाने म्हणाले 'नॉन सेन्स , हे कसलं नवीन फ्याडं आलंयआय जस्ट डोन्ट अंडरस्टँड ,, साडीच्या, कपड्याच्या रंगाचा आणि देवी प्रसन्न होण्याचा काय संबंध ? अहो बायकांना भरपूर खरेदी करायचा हा मोठा चान्स.. पंधरा वीस वर्षांपूर्वी एका पेपरने आपल्या फायद्यासाठी हा फंडा सुरू केलाय,आणि ह्या बायका येड्यासारख्या त्याच्या मागे लागल्यात. सब झूट आहे..' जरा थांबून
कारण नसताना उगाच खर्च ? काय गरज आहे ? फॅशन नुसती , छे छे, बिलकुल पटत नाही आपल्याला '
" हल्ली जिकडे पाहावं तिकडं फॅशन चं फ्याडं माजलेलं दिसत.. काय गरज आहे स्वतः ला रुढीने जखडून घ्यायची ? परंतु समाजाच्या हिताच्या दृष्टीने पाहता, हे सर्व टाळलं किंवा बंद केले  पाहिजे" ..
आपल्या विचारांचा समाजावर काय परिणाम झालाय हे पाहू लागले. (समाज म्हणजे आम्ही चार पाच जण , कारण कावळे सरांचं बोलणं कम भाषण सुरू झालं की ईतर कस्टमर बाहेरचा मार्ग धरतात. ) तेव्हड्यात घारेनी दिलेली तंबाखू गालात ठेवण्यात ते गुंग झाले . घारेनी जोरदार मान हलवुन होकार दिला. ' अगदी माझ्या मनातलं बोललात सर , एक नंबर,, झकास , वायफळ खर्च नुसता '..

तेव्हड्यात आबा पिवळ्या रंगाचा फेटा आणि पिवळा सदरा या वेशात घालून आले . कायम पांढऱ्या कपड्यात असलेले आबा आज पिवळ्या वेशात पाहून सगळेच बुचकळ्यात पडले.
" काय आबा आज पिवळ्या रंगांनं सजलायं " , इति अर्थातच कावळे सर..आबा म्हणाले ' नवरातीचा दुसरा दिसबायकूनं बजावलं आज पिवळ्या रंगाची कापडं घालायची, अगुदरच बायकू काय जादा मागत नाय, आनी त्यात आज देवीचा पिवळा रंग, धोतर नाय मिळालं, पण झ्याक वाटतंय बगा"...

कावळे, घारे वगळता आम्ही त्यांचं कौतुक केलं. आबांचं आज मूड पान खाण्याचा होता, त्यांनी बंडीतुन चंची काढून पान जमवायला सुरुवात केली.
' हेच हेच म्हणतोय मी,रंगाचा काय संबंध ? ' रागानं कावळे सर म्हणाले.त्यांच्या तोंडातून शब्द फुटेना.

तेव्हड्यात गोडबोले म्हणाले
नवरात्र म्हणजे "नऊ रात्र".या नऊ दिवसात, देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. या नऊ दिवसात नऊ वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र देवीला परिधान केले जातात. याचा संबंध सांगतो
" आपलं आयुष्य हे सर्व प्रकारच्या रंगांनं सजलेले आहे.
निळा रंग- आकाश आणि समुद्र नदी निळ्या रंगाचे. शांत, शीतल स्निग्ध ही या रंगाची वैशिष्ट्ये..
पिवळा रंग,, सुर्यकिरणांचा रंग पिवळा, मन प्रसन्न करणारा हा रंग. प्रत्येक शुभकार्यात , हळद, पिवळी फुले, देवाची वस्त्रे, पितांबर, हे सर्व पिवळेच.
पिवळी कपडे घातलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसतं..
हिरवा रंग,, निसर्गाचा रंग हिरवा.सौभाग्याचे प्रतीक हिरवा रंग आहे. या रंगातून आपलं निसर्गाशी असलेले नातं दिसून येते.
राखाडी रंग,, सर्वसमावेशक आहे हा रंग, कारण या रंगासोबत कोणताही रंग शोभून दिसतो.
भगवा रंग,, त्याग पराक्रम,हे या रंगाचे प्रतीक. अग्निज्वाला, उगवत्या सूर्याचा रंग.
पांढरा रंग ,, शुद्ध , पवित्र आणि शांततेचा प्रतीक. 
लाल रंग,,प्रेम, राग, संघर्ष, धोका, सावधपणा दाखवतो.
आकाशी रंग। आकाश आणि पाणी यांचा रंग, अतिशय सात्विक.
गुलाबी , सौन्दर्याच प्रतीक, प्रेम जिव्हाळा, आपुलकी दाखवणारा रंग."
आम्ही माना डोलावून त्यांना सहमती दर्शवली.

घोलप साहेब म्हणाले , 'तुमचं म्हणणं मला अजिबात पटलं नाही सरया नवरात्रीत स्त्री , मग ती खेड्यातील असो की शहरातील, गृहिणी असो की नोकरदार, पहाटे उठून सर्व आवरून सकाळच्या काकड आरतीला हजर असते, घरात घट स्थापना करते, अखंड दिवा लावते, झेंडूच्या फुलांची माळ बांधते. सकाळी देवीला जायला जमलं नाही तर, वेळ मिळेल तसं जाते, आणि हे सर्व करून नेहमीचं घरकाम, स्वयंपाक, नोकरीवाली कामावर हजर असते, शेतकरी बाई शेतकामात खंड पडू देत नाही. नेवैद्य बनवणार , आरती प्रार्थना करणारआणि हे सर्व कुणासाठी ? तर नवऱ्यासाठी, मुलांसाठी, सासू सासऱ्यांसाठी... आणि तुम्हाला त्यांचे रोजचे वेगवेगळया रंगाचे कपडे, गजरे, नटणे , हेच डोळ्यावर येतं ? श्रध्दा असुदे किंवा फॅशन असुदे, फरक काय पडतो ? आणि बिनकामाचा खर्च हो कसला साड्यांचा ? त्या नऊ रंगाच्या साड्या एरव्हीही वापरतातच की त्या ?, उगाच विरोध करायचा म्हणून काहीही बोलायचं का ? दारू पिण्याची फॅशन चालतीय , आणि हेच तेव्हढ डोळ्यावर येतं?' घोलप साहेब चिडून बोलत होते..सात्विक संतापाने त्यांचा चेहरा लालेलाल झाला होता. 

एव्हाना आबांचं पान खाऊन झालेलं, ते म्हणाले " म्या काय म्हणतु , नवरातीच्या दिसात देवीचा कायम चालनारा उत्सव , आपल्या मनाला परसनता देतो, त्या निमीतानं बायका अगदी मनापासनं तयार व्हत्यात , देवीचं सगळं करत्यात , मोट्या श्रध्येने आपल्या रूढी परंपरा पाळत्यात , याचं मला लै भारी कौतुक वाटतं, आनी हो,यात गरीब शिरिमंत ह्यो भेदवाव अजाबात नसतो
एव्हडं बोलून आबांनी जरा उसंत घेतली. शेवटी आबा बोलले " आय लेकाला जनम, संस्कार देते,,  बायकु प्रेम देते, लेक /मुलगी सुख देते.
त्याला जरा काही खरचटलं तरी त्येच्या तोंडातून  पहिलं आईचं नाव  तोंडात येतं , बायकुच्या डोळ्यात पाणी येते,आनी लेक त्यावर फुंकर घालते.
आईचा तो 'जन्मभर लेकरू' असतो, बायकुचा 'नवरा' असतो, लेकीचा तो 'बाप' असतो.
या तिगीना देवीचाही आशीर्वाद हवा, म्हणून आपण 'नवरातसाजरी करायलाच पायजे.काय म्हणणं हाय तुमचं ?...
हॉटेल टाळायचा गजरात दुमदुमून गेलं ..
तेव्हड्यात बाहेरून एकसारख्या रंगाच्या साड्या घालून  बायका जाताना दिसल्या, त्यात कावळे , घारे वहिनी पण होत्या.
 ते पाहून, आबा म्हणाले ,' अवो सर ह्ये अमासनी बोलताय , बायकुला बोलला न्हाय व्हय ?, का बायकू ऐकत नाय तुमचं ??
सगळे हसू लागले, नाईलाजाने कावळे, घारे सर  केविलवाणे हसू लागले..'

__________________________________________________________________________________________________________________________________________________

महेश देशपांडे
ढोकी
जिल्हा धाराशिव
          मला वाटत या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन पाहिले पाहिजे...

उदा. शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकच गणवेश का असतो ?
या मागची मूलभूत भावना अशी की कोणी कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे गरीब आहे का श्रीमंत याचा कोणालाही कसलाही फरक पडू नये,
सर्वजण समान आहेत कारण ते शाळेमध्ये ज्ञान ग्रहण करण्यासाठी आलेले असतात..


वरील विषयामध्ये जरी याची सुरवात फक्त व्यवसाय वाढवणे या भूमिकेतून झाली असली तरी,
मला सांगा सगळ्या महिला जर पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये असतील तर तुम्हाला ओळखता येईल का, की कोण कोणत्या जातीची आहे कोणत्या धर्माची आहे की गरीब वा श्रीमंत आहे..

दुसरा मुद्दा हा की, कोणी काय परिधान करावे हा निव्वळ ज्याचा त्याचा प्रश्न आहे मग तो स्त्री असो व पुरूष..

मला तर वाटत सगळ्या पुरुषांनी पण करा ही सुरुवात... काय हरकत आहे
देवीवर श्रद्धा आहे म्हणून मी हे करतो किंवा करते अस असण्यापेक्षा..

मला जर ते व्यवस्थित किंवा चांगलं वाटत असेल तर मी करेन हा आग्रह जास्त चांगला..

राहता राहिला प्रश्न हे करायलाच पाहिजे का ? नाही केलं तर काय होईल...

काहीही होणार नाही, जरूर तुम्हाला वाटत ते करा..

पण मला अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, लगेच सगळ्या स्त्रियांनी आपल्या नवऱ्याकडे मला आज अमुक रंगाची साडी आणाच हा आग्रह आपली परिस्थिती पाहून करावा..
जस की तुम्ही कोणाकडून उसने पैसे घ्या किंवा कर्ज काढा पण मला ती साडी आणच हा आग्रह मात्र नक्कीच नसावा..

शेवटी हा माणसाच्या श्रद्धेचा प्रश्न आहे ज्याने त्याने सोडवावा..

🙏🏻🙏🏻🙏🏻
__________________________________________________________________________________________________________________________________________________

किशोर शेळके.
लोणंद
       नवरात्रीतले नऊ रंग. मुळातच ही कल्पना धार्मिकतेला धरून नाही. कारण घट स्थापना आणि दुर्गापुजन ही परंपरा चालू झाल्यानंतर कितीतरी वर्षानंतर ही रंगांची परंपरा चालू झाली. माझ्या मते, हा सरळ सरळ मार्केटिंग फंडा आहे. कारण मला सांगा की नेमकं कोणत्या तत्वाला धरून ठरवलं जातं की, अमूक दिवशी अमूक रंग घालायचा, अन तमूक दिवशी तमूक. या गोष्टीचा सगळ्या बाजूंनी प्रश्न विचारले तर एक उत्तर मिळतं. ते उत्तर असं...

         माझ्या वाचनाप्रमाणे साधारण २००३च्या सुमारास आपल्या महाराष्ट्र टाईम्सने श्रावणक्वीन आणि नवरात्रीचे नऊ रंग हा प्रकार चालू केला. पहिले दोन-तीन दिवस मटा पुरवणीमध्ये त्या दिवसाच्या रंगाच्या सुंदरशा साडीमधल्या मॉडेलचे फोटो हे आकर्षण होतं. मग आलं तुमचेही असे ऑफिसमध्ये सगळ्यांनी एकाच रंगाचे कपडे घातल्याचे फोटो पाठवा म्हणून आवाहन. मग काय, बॅंका, शाळा , ऑफिसेस मधल्या व्यक्तिंचे ग्रुप फोटो. आणि तेही एकाच रंगात.
          नंतरच्या काळात मटा ने असं ठरवलं की, प्रत्येक दिवस एका देवीचा असे नऊ देव्यांमध्ये नऊ दिवस वाटून टाकले. आणि मग प्रत्येक देवीला एक रंग दिला. म्हणजे असं पाहा, दुर्गेची दुर्गाष्टमी, म्हणून तिचा एक रंग. असा रंगोत्सवाला मस्त धार्मिकतेचा रंग चढत गेला. खरं असो वा नसो, उत्सवप्रिय भगिनींनी आणि काही बंधुरायांनीही हा सण नवरंगात साजरा करायला सुरूवात केली. हळूहळू दरवर्षी हे लोक काटेकोरपणे पाळत गेले. आणि हे ईतकं की यामागे नेमके कारण कोण विचारात घेतच नाही. 
पण जेव्हा ही गोष्ट फॅशन म्हणून वापरात येते तेव्हा मार्केट मध्ये बरीच उलाढाल होते. गरीबातला गरीब पण हे सोंग आणण्याची धडपड करतो. 
          स्त्रियांना एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की, हे रंग पाळण्यापेक्षा आपल्या नैतिकतेचे रंग पाळले तर बरीचशी अंधश्रद्धा नष्ट होईल. आणि पुरूषांच्या बाबतीतही तेच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************