शब्द

वाल्मीक फड,नाशिक. 
मी शब्द दिलाय काही काळजी करु नको तु बिनधास्त त्याला जाऊन भेट तुझं काम नक्कीच होणार,असं आपण कित्येकदा व्यवहारात बोलत असतो.माझ्या शब्दाला किंमत आहे म्हणूनच आज सगळं व्यवस्थित चाललय असेही आपण बर्याच वेळेस बोलतो ऐकत असतो.
शब्द काय आहे?तर माझ्या मते शब्द जादू आहे,शब्दांची जुळणी केली तर काव्य तयार होतं,शब्दाला शब्द जुळला की लेख तयार होतो आणी शब्दाला अगदी मोठ्या समूहात जर जोडले तर एखादी कादंबरी,पुस्तक,आणी मोठमोठे ग्रंथ तयार होतात.
किती वेळेस आपण बोलताना अनेक वेळेला समोरून जर कोणी काही उद्धट बोलत असेल तर आपण म्हणा की कोणीही असो त्याला सांगतो शब्द निट वापर.
शब्देची आम्हा धन हे फार पूर्वी संतवाङमयात लिहून ठेवलेलं आहे.शब्द चांगला वापरला तर माणूस आपली प्रतिमा अधिक ऊजाळू शकतो आणी वाईट शब्दाचा वापर केला तर शब्द आपल्याला माणसात बसून देत नाही.शब्दांच्या जोरावर सिकंदरासारखा राजा पुरु राजासमोर नतमस्तक झाला तो कशामुळे तर पुरु राजाच्या शब्दकौशल्यामुळे.
म्हणून माणसाच्या जीवनात शब्दाला खूप किंमत आहे मग शब्द आपण बोलताना लिहीताना कसे वापरायला हवेत हे आपणा सारख्यांना सांगण्याची गरज नाही.

मयुर डुमणे,उस्मानाबाद. 
एखाद्या भाषेतून व्यक्त होण्यासाठी आवश्यक असणारा महत्वाचा घटक म्हणजे शब्द. शब्द हे भाषेचे सामर्थ्य आहे. कोणतीही भाषा शिकायची म्हंटल की भाषेच्या व्याकरणाआधी त्या भाषेचे शब्द समजून घेणं महत्वाच आहे. आपली मातृभाषा मराठी. त्यामुळे मराठी भाषा शिकण्यासाठी मराठी शब्द समजून घेण्याची विशेष गरज पडत नाही मात्र इंग्रजी सारखी एखादी परकीय भाषा शिकायची असल्यास त्या भाषेचे शब्द शिकून घ्यावे लागतात. 5 वी ते 10 पर्यंत इंग्रजी भाषा शिकण्यासाठी इंग्रजी शब्द पाठ करावे लागायचे. त्यासाठी शब्दकोषही होता. हे तुम्हाला आठवत असेलच. आपली भाषा जसजशी विकसित होत जाईल तसतसे शब्द पाठ करण्याची अजिबात गरज भासत नाही. भाषेचे आकलन होऊ लागलं की आपोआप शब्द लक्षात रहायला लागतात. 

आपण लहान होतो तेव्हा शब्दांना भाषा शिकण्यापूरत महत्व होतं. पण आपण जसजसे मोठे होत गेलो तसतसं या शब्दाच सामर्थ्य आपल्याला कळायला लागलं. बंदुकीतील गोळी पेक्षाही हे शब्द नावाच हत्यार डेंजर असतं. वर्गातील छडी केवळ शारीरिक इजा पोहचवते मात्र शिक्षकांनी दिलेला शाब्दिक मार थेट मनाला लागतो. तो आपण कधीच विसरत नाही. 

वाचन वाढत जाईल तसं आपोआप आपल्या तोंडी भाषेतील वेगवेगळे शब्द येऊ लागतात. या शब्दांमुळे आपण भाषेवर प्रेम करू लागतो. मराठी भाषेत तर काय दर्जा शब्द आहेत. लिहिताना बोलताना आपण या दर्जेदार शब्दांचा आपण नेहमीच वापर करत असतो. मृगजळ, प्रतिभा, सौंदर्य, गुणवत्ता, मधुर, गेला बाजार, तृणधान्य, साहसी, खट्याळ, विलोभनीय काय एकापेक्षा एक भारी शब्द मराठी भाषेमध्ये आढळून येतात. अशा शब्दांमुळे भाषेला वजन प्राप्त होत. हे शब्दच तुमचं व्यक्तिमत्त्व घडवायला मदत करतात. तुमच्या तोंडी कोणते शब्द येतात यावरून तुमचं व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होतं राहतं. हे झाले मराठी प्रमाण भाषेतील शब्द. बोली भाषेतील नादमय शब्द तर अस्सल मराठी भाषेचे सौंदर्यच जणू. खूप मोठा ही प्रमाण भाषा बोली भाषेत याला लई मोठा म्हणतात. तो नाद खूपच सुंदर असतो. पाऊलापाऊलावर भाषा बोलण्याची पद्धत वेगवेगळी आढळून येते. सोलापुरी, पुणेरी, नागरपुरची भाषा, कोकणी, अहिराणी,  मराठवाड्यातील भाषा अशा बोली भाषांतील शब्द भाषेची विविधता सांगतात. 

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने
शब्दांचीच शस्त्रे यत्न करू

तुमच्याकडे पैसा, धनसंपदा असेल तर ती चोरीला जाऊ शकते. तिचा केवळ भौतिक वापर होऊ शकतो. मात्र शब्दांची कमावलेली संपत्ती कधीच चोरीला जाऊ शकत नाही. ती तुमच्याजवळ राहणारी, तुम्ही कमावलेली संपत्ती मरेपर्यंत तुमच्याजवळ असणार आहे. भाषा आपण वाचत जातो आणि नवनवीन शब्द सापडत जातात. नवनवीन शब्द आपल्या ओठी येत राहतात. 

जागतिकीकरणामुळे भाषेची सरमिसळ झाल्याचे आपल्याला पहायला मिळतेय. इंग्रजी भाषेतील शब्द मराठी भाषेत घुसडले आहेत. इंग्रजी शिकण्याच्या नादात मराठी भाषेतील शब्दांचा विसर पडत चालला आहे. बोलताना मराठी शब्दच लवकर आठवत नाही ही समस्या बऱ्याच लोकांना सतावतेय. मराठी भाषेत चार ओळी लिहिताना किंवा बोलताना इंग्रजी शब्द आपोआप तोंडात येतात. हे अस का होतंय. याच उत्तर एक,च आपण स्पर्धेसाठी धावत असल्यामुळे रोजचे वर्तमानपत्र वाचायलाही आपल्याकडे वेळ नसतो. आपल्याला इंग्रजी भाषेबरोबरच मराठी भाषा देखील अवगत करायची आहे. त्याला वाचनाशिवाय दुसरा पर्याय नाही.

अनिल गोडबोले,सोलापूर.
"शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी" अस एक गाणं आहे.. ते ऐकलं नाही विचार केला.. आपण सहज व्यक्त व्हायला शब्द वापरतो.. पण हे शब्दच नसतील तर किंवा कधी कधी असा प्रश्न पडतो की हे शब्द मी बोललो नसतो तर... 

शब्दच जगवतात आणि मारतात 
शब्दच वाढवतात आणि थांबवतात

शब्दच पेटवतात आणि विझवतात 
शब्दच हळुवार फुंकर घालतात शब्दच वादळ बनून फेकून देतात

शब्द फुटत नाहीत निशब्द झाल्यावर
भावना देखील परत नाहीत शब्दात

शब्द प्रेम करतात.. शब्द तिरस्कार करतात

शब्दच जवळ घेतात आणि सांत्वन ही.

शब्दांचीच प्रेरणा देतात शब्दच बनवतात हतबल कधी कधी

शब्द दिला की पाळला जातोच अस नाही
शब्द सुद्धा बोलला नाही म्हणून मन खट्टू होत कधी कधी

पाहिजे ते शब्द योग्य वेळी मिळावेत सर्वाना
नको ते शब्द सहन करायची शक्ती मिळो सर्वाना..

तर.. अस काही वाटत गेलं ते शब्दात मांडत गेलो..

(संबंधित छायाचित्रे गुगलवरून घेतलेली आहेत)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************