कविता निर्मिती ...एक कौशल्य!

कविता निर्मिती ...एक कौशल्य!

सिमाली भाटकर,रत्नागिरी.
काव्यात्मक कौशल्य ज्यांचे ठायी
त्यांनी साकारली जगाची नवलाई

   " भावनेचा हृदयस्पर्शी अविष्कार म्हणजे कविता"
काव्य ही अशी कलाकृती आहे ज्यातून आसमंत नव्हे तर संपूर्ण विश्वातील सजीव निर्जीव सर्व प्रकारच्या वस्तू त्यांच्या मन आणि भावना कवी आपल्या शब्दांत मांडत असतो म्हणून अस म्हणतात "जे न देखे रवी ते देखे कवी"
       उस्फुर्त प्रेम असो अथवा मुक्यांची भावना असो नाहीतर नदी समुद्राचे निखळ नाते असो कवी ते शब्दांच्या संगतीत असे काही जोडतात की सप्तरंगी इंद्रधनू विविधांगी रूपाने रेखाटले आहेत. कविता करणे हे कौशल्य म्हणण्या पेक्षा ती एक भावना आहे, ज्या मानवी मनाने टिपल्या आणि कागदावर रेखाटल्या. कलात्मक तेचे भाव प्रत्येकाच्या हृदयात असतात. कुणी रंग संगतीत रेखाटतो कुणी शब्दरुपी साकारतो. मनातले भाव, वेदना, प्रेम, सर्वांन पर्यंत पोहचवते ती कला मग ते कौशल्य कवितेचं असो किंवा चित्रांचं किंवा लेखाचं.
       मग या कविता प्रेमाच्या असतात काहो तर नाही जगातल्या असंख्य मूक जाती प्रजाती यांच्यावरही त्या साकारतात फक्त त्यांच्या भावना कळणे महत्वाचे मग ते वृक्ष, समुद्र किनारा, नदी, चंद्र सूर्य तारे, काहीही अगदी ऋतूंच्या बहरात देखील कविता स्फुरते बरं.
       जणू पाहताच क्षणी शब्द संपदा बहारावी आणि पाहता पाहता पानोपानी साकारावी हीच खरी कला आहे. ज्याला ती भावली तो फारच नशीबवान कारण हे कौशल्य उपजतच नसत ते हळूहळू फुलत बहरत आणि वटवृक्षापरी विस्फारत त्यातूनच जगाला कळतो एक कवी मग ते विंदा, नारायण सुर्वे किंवा माडगूळकर असो ज्यांनी काव्याचे भांडार खुले केले आणि कवितेचे कौशल्य जगाला दाखवले.  
          अंकुर
निसर्गाच्या सानिध्यात, पावसाच्या थेंबात
वाऱ्याच्या संगीतात, अन कोकिलेंच्या गाण्यात,
समुद्राच्या लाटांत, शिंपल्यात ल्या मोत्यात, वाळूच्या ढिगाऱ्यात,
अन सुरुच्या बनात,
गुरफटत मन, त्या हिरवळीच्या कोण्यात
भावनांचे त्या टपोरे शब्द बनतात कवीच्या मनात,
टपोऱ्या शब्दांचा पाऊस बरसतो कोऱ्या पानात,
शब्द शब्दांना अंकुर फुटतो पणातल्या पानात,
जशी पानफुटी ला पान फुटतात पणातल्या पानांत,
पाना पानांचा पाचोळा, जसा अंगणात पडला प्राजक्ताचा सडा,
शब्द शब्दांची गुंफण जसे बागेला तारांचे कुंपण,
शब्द शब्दांत गुंतले, भाव मनीचे ही त्यांच्या जुळले,
चार पदांची चारोळी झाली,
ओळी ओळींचे कवन ही जुळले,
भावनेच्या भरात, हळव्या कवीच्या मनात शब्द पंक्तीचे कवन प्रसवले.
   
सैनपाल पाटील,आजरा,कोल्हापूर.
मनातल्या भावभावनांचा कल्लोळ नेमकेपणाने शब्दांत पकडण्याची कला म्हणजे कविता आहे. मनातल्या उतू जाऊ पाहणाऱ्या भावनांना मोकळी करून दिलेली वाट म्हणजे कविता आहे. कवीला स्वत:शीच हितगुज करायला लावणारी एक सुंदर मैत्रीण म्हणजे कविता आहे.जगण्याची अभिव्यक्ती चिमटीत पकडणारी ती कविता. मनाला उल्हासणारी, मनाला रडवणारी आणि दुसऱ्याला रडायला लावणारी ती कविता. कविता भावनांची मुक्ती आहे. कविता जगण्याची आसक्ती आहे, आस आणि कास आहे. जाणिवांच्या अस्तित्वाचे हुंकार टणात्कारात रूपांतर करणारी ही कला आहे. अनेकांच्या जीवनाचा अर्थ कविता आहे. मनाला जिवंत संवेदनशील आणि जागृत ठेवणारी कविता आहे. तिच्या स्फुरणात निर्मितीचा आनंद आहे. तिने अबोल आणि सुप्त भावनांना बोलायला शिकवले आहे, विचारांच्या अंगानी येणार्‍या साधनांना, अभिव्यक्तीला उजळले आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते...

"जाणिवांना आता धार आहे
कविता जिणं परजणार आहे."

कवीच्या भावनिक विश्वाला तेजवणारं पाणी देऊन त्याला उद्धारणारी शक्ती फक्त कविताच आहे.मन आणि तयातला भाव या दोघांचा हिंदोळणारा झोका म्हणजे कविता.

कोणतीही भावना जोपर्यंत प्रखर अनुभवाने तप्त होत नाही काव्य निर्मिती वास्तवदर्शी होत नाही. कवीने जाणलेल्या, भोगलेल्या जखमा आणि वेदना, त्याने झेललेल्या पाहिलेल्या विटंबना ताडलेली विसंगती, अनुभवलेले भावविश्व, वावरलेले समजलेले जग, आकाशाशी साधलेला संवाद, पशुपक्ष्यांशी केलेले हितगुज, समाजाकडुन भोगलेल्या अवहेलना आणि उपहास, मनाची अनुभवलेली आसक्ती, स्थैर्य, धैर्य,सौख्य, मायाममता प्रेम, विरह, उल्हास, मनाची गूढता, त्याची गाज, त्याची भावबंधने, त्यांची परस्परातील विण, त्यातील मनोरे, नात्यातील तडे, अनुभवलेला हिरवा निसर्ग,  उजाड निसर्ग, इंद्रधनुचा लालिमा, मोहित करणारा सूर्योदय, सकाळचं कोवळे ऊन...या सारख्या अनुभूतीने उचंबळणार भाव,भान हरपवणारी सौंदर्य, हसू रडू विचार आचार दुर्बलता हिंसाचारी पशुता, भावनांची न्यूनता... इत्यादीचा अस्तित्वांचा मनावर नोंदणाऱ्या प्रखर *वेणा* उराशी बाळगून कवी कविता निर्मिती करतो.
रामेश्वर क्षीरसागर,पुणे.
  मी एका कवी मित्रा ला विचारले की तू तुझ्या आयुष्यातील पहिली कविता कधी लिहिलीस, तर तो फार वेगळे उत्तर देतो की, *जेंव्हा माझा जन्म झाला, आणि जन्माला आल्यानंतर जेंव्हा मी पहिल्यांदा धाय मोकलून रडलो, ती माझ्या आयुष्यातील पहिली कविता होती* . आता असे उत्तर ऐकून मला वाटते की ठराविक ओळीत लिहिणे म्हणजे कविता नसते, ठराविक विषयांवर लिहिणे कविता नसते, तर मंनसाची प्रत्येक कृती ही जागतिक एक सुंदर कविता असते. म्हणजे वासराचे गाईच्या स्तनाला दूध पिणे यालाही आपण कविता म्हणू शकतो, किंवा आईचे मुलाला रागावणे ही ही कविता असू शकते. मी सध्या जे काही लिहितो आहे, ती ही एक कविताच आहे. म्हणजे कवींच्या म्हणण्यानुसर जगातील प्रत्येक कृती आणि साहित्यकृती ही अगोदर कविता असते आणि नंतर तो दुसरा सहित्य प्रकार असतो. हे लक्षात घेऊन मुळात कवितेला कुठली कौशल्ये लागू शकतात किंवा गरजेची असतात हे मला न पटण्यासारखे  आहे ,हा संदर्भ लक्षात घेऊन *कविता* लिहितो आहे.
     विषयाला सुरूवात करताना मला माझ्याच कवी मित्र *नितीन जाधव* च्या काही कवितेच्या ओळींचा उल्लेख करावा वाटतो. तो म्हणतो की,
  एक एक अश्रू माझ्या  पेनातून पाझरतात, लोक त्यालाच कविता म्हणून गोंजारतात
    ज्यावेळेस तो कवितेला अशा प्रकारे व्यक्त करायला लागतो तेंव्हा मला वाटते की कविता हा साहित्यप्रकार लिहिण्यासाठी फारच महत्वाचे कुठले काही कौशल्य असावे लागते तर ते संवेदनशीलता आहे. कारण, कविता म्हणजे फार काही विशेष असे प्रतिभासंपन्न माणसाने च लिहावा, त्याला फार काही येत असावे लागते वगैरे नाही, तर त्यासाठी मला वाटते की संवेदनशीलता हा महत्वाचा घटक आहे , जो की कुठल्याही प्रकारच्या व्यक्ततेसाठी आवश्यक आहे. मग ती कविता असो किंवा मी जे लिहितो आहे तो लेख असो. मग, हे पाहायला गेले तर ज्यावेळेस *नारायण सुर्वे* म्हणायला लागतात की,
 *भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी गेली* ते फार काही वेगळे नसते तर, आपल्या जीवनातला संघर्ष त्यांना सांगावा वाटतो, आणि त्यासाठी ते कवितेचा आधार घेतात. म्हणजे आपल्याकडे नाही का प्रेमवीर म्हणायला लागतात की , *सूर तुझे , गाणे माझे जीवनगाणे गावू का...* ही कुठल्या तरी कवीची प्रेयसी साठीची भावना आहे...ती फक्त शब्दात एक संवेदनशीलतेने व्यक्त झाली आहे. मला वाटते की, जगातील प्रत्येक व्यक्ती हा कवी आहे. फरक इतकाच की काही बोलके कवी असतात तर काही अबोल कवी असतात. नारायण पुरी नावाचा कवी म्हणतो की, *मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे, जगास पाहण्या डोळे देतो आहे* मला वाटते की कविता लिहिण्यासाठी हे एक महत्वाचे कौशल्य आहे. निर्भयता नसती तर नामदेव ढसाळ सारख्या कवीने ज्या काही कविता लिहिल्या त्या लिहिल्या नसत्या.
  नागराज मंजुळे लिहितात की,
 आम्ही दोघे मित्र, एकच ध्येय, एकच विचार, एकच उद्दिष्ट,                            पुढे जाऊन त्याने आत्महत्या केली , आणि मी कविता लिहिली*
ज्यावेळी ते आत्महत्येला पर्याय कविता सांगायला लागतात, तेंव्हा मला वाटते की संवेदनशीलता किंवा व्यक्त होऊ  वाटणे हा महत्वाचा गुण किंवा कौशल्य कविता लिहिण्यासाठी आवश्यक असते. एक कवी म्हणतो,
काटा रूतावा कळीला तसा फाटत जातो कवी, आपलेच दुःख वाटत जातो कवी* याच्याही पुढे जाऊन *नारायण पुरी* च पुढे म्हणतात,
कविता म्हणजे आस्तीत्वाचे गाणे, स्वतःच आपली  राख उधळीत जाणे.
   मला वाटते कविता ही कुठल्याही कौशल्यावर आधारित नसून ती माणसाच्या जिवंत असण्याच्या कौशल्यावर अवलंबून आहे. धन्यवाद!

(यातील संबंधित छायाचित्रे इंटरनेटवरून घेतलेली आहेत)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************