पहाट होत असताना

🌱वि४🌿 व्हाट्सअप ग्रुप

पहाट होत असताना
Source:- INTERNET
-शुभम आशा कैलास
जिल्हा सातारा

 पहाटेची झोपेला गुलाबी झोप अस म्हंटल जाते. अत्यंत गाढ झोप असते ती. पण माझ्या बाबतीत ही झोप कधी भेटलीच नाही. लहानपणी इयत्ता 7 वी मध्ये असताना आई कडून रडून रडून सायकल विकत घेतली होती. पण सायकल विकत घेतल्यानंतर खूप पश्चाताप झाला. आईने घरखर्चासाठी ते पैसे पपांपासून लपवून ठेवले होते.  करण 'पपा ते पैसे ही दारू पिण्यात वाया घालवतील म्हणून. आईला काही तरी मदत घरखर्चामध्ये म्हणून त्यावर्षापासून मी वृत्तपेपर वाटण्याचे काम करवे असा सल्ला माझा मित्र अनिकेत याने दिला. मग काय मी सकाळी पहाटे रोज 5 ला उठू लागलो. सुरुवातीला सकाळी लवकर उठणार म्हणजे खूप आनंदाने उठायचो. दिवसाची सुरुवात कशी छान स्वच्छ हवेने व्हायची. माझं पदवीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत मी पेपर टाकण्याचे काम केले. त्यामुळे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा अश्या तिन्ही ऋतूंची पहाट माझ्यासाठी खूप च जवळची आहे. मला नेहमी माझ्या मित्रांचा हेवा वाटायचा ते सकाळी 8 वाजेपर्यंत जगोपायचे अन मी मात्र सकाळी लवकर पहाटे उठून पेपर टाकायला जायचो. पण असा कोणताच दिवस नसे की मला कोणत्या पेपर ची हेडलाईन माहीत नसे. तो एक मला खूप मोठा फायदा झाला. जो व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठतो त्याचे आयुष्य जास्त असते असाच एक लेख वर्तमानपत्रामध्ये मी वाचला होता, जेव्हा जेव्हा मला सकळी लवकर उठू वाटत नसे त्यावेळी मी स्वतःला त्या लेखाची आठवण करून देत असे. माझ्या पदवीनंतर मी तामिळनाडू च्या धान अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला आणि माझं आणि पहाटेचे नाते तुटले, आणि रात्रीशी नाते जुळले.  कारण पुढच्या दिवशीचा अभ्यास करणे प्रत्येक विद्यार्थ्याला अनिवार्य होते. त्यानंतर माझे फील्ड वर्क सेगमेंट पाहिले सुरू झाले आणि मी तेलंगणा राज्यातील आदीलाबाद जिल्ह्यातील एक छोट्या आदीवासी पड्यामध्ये आलो. आणि पुन्हा माझे आणि पहाटेचे नाते सुरू झाले. इथे गोंड आदीवासी लोक सकाळी 4 ला उठतात त्यामुळे मी पण लाजेपोटी साडे 5 किंवा 6 ला उठायला लागलो. इथे महिला 4 ला पहाटे तर पुरुष 6 ला उठतात. दिवसाची सुरुवात ते त्यांचे अंगण साफ करून करतात. दिवसाची सुरुवात कोंबड्याच्या अरवण्याने होते. मी इंटरनेटद्वारा येथील तापमान पाहिले तर ते सकळी 8 डिग्री सेल्सिअस असते. इतक्या थंडीमध्ये येथील लोक उठताना पाहून मी आश्चर्यचकित झालो. काही लोक सकाळी पहाटेच बैल, गाई, आणि शेळ्यांना चरायला घेऊन जातात. मी देखील त्यांचे जीवन अनुभवण्यासाठी तसेच ओळख वाढविण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासोबत गेलो होतो. असे हे माझे अन माझ्या जीवनातल्या पहाटेचे नात...
‬~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Source:- INTERNET
- वाल्मीक फड
महाजनपूर नाशिक

दिवसातील सगळ्यात सुंदर क्षण म्हणजे पहाट.पहाटेचे वातावरण हे फार सुखद अनुभव देणारे असते.पहाटेच्या वेळेत कोणतेही काम केले तर ते काम अगदी योग्यच असते.म्हणून तर फार पुर्वीपासून अगदी साधुसंत सुद्धा पहाटेच ऊठून आपल्या दिनचर्येला सुरूवात करत असायचे.
का नाही?कारण पहाटे केलेली पुजा अर्चना हि अगदीच पवित्र मनाने केली  जाते.मला तर पहाटे जेव्हा मि काकडा भजन गाण्यासाठी जातो तेव्हा साक्षात परमेश्वर आपल्या समोर ऊभा असल्याचा भास होतो.इतर वेळेस अनेक भजन आम्ही गात असतो परंतु पहाटेसारखा आनंद त्या भजनांत नसतो.
पहाटेची ती हवा हि एखाद्या औषधापेक्षा कमी नाही.जेव्हा आम्ही काही कामे पहाटे ऊठून करतो(शेतीतिल)त्यावेळेस आम्हाला इतर वेळेच्या तुलनेत कधिही थकल्यासारखे जाणवत  नाही.म्हणून पहाट होत असताना व्यायाम करणे,सायकल चालविणे,पिकांना पाणी देणे,पुजा अर्चना करणे,तसेच पुस्तके वाचणे हे तर एक नंबरचे काम कारण पहाटे केलेले वाचन कधिही स्मरणातून जात नाही.अश्या अनेक गोष्टि  आहेत की,त्या पहाटे खुप सुख देत असतात.
पहाटेचा तो गारवा,आकाशातील तारे,वर आभाळाकडे पाहिले की,ते काजव्याप्रमाणे इकडून तिकडे तिकडून इकडे स्वछंद ऊडणारी विमाने ते दृश्य अगदीच मनमोहक असते.
असो संत नामदेव महाराज आपल्या एका अभंगात सांगतात "ऊठोनी पहाटे/विठ्ठल पहा ऊभा विटे/चरण तयाचे गोमटे /अमृतदृष्टि अवलोका."तसेच पुर्वीपासून आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे तशी संतवाणिच म्हणावि लागेल.
पहले प्रहर सब जागे
दुसरे प्रहर भोगी
तिसरे प्रहर तस्कर जागे
चौथे प्रहर योगी.चौथा प्रहर म्हणजेच पहाट म्हणूनच ती होत असताना शुभ असते,पवित्र असते,मायाळू असते म्हणूनच पहाट हविहवीसी वाटते.चुकले तर माफी असावी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Source:- INTERNET
-सौदागर काळे,
पंढरपूर.

पहाटेचं आणि लिंबानानाचं खूप वर्षांपासूनचं नातं.बरोबर चारच्या ठोक्याला हा म्हातारा उठतो.बाहेर जाऊन येणार. मग गुराखालील घाण काढणार.गोठ्यातील शेळ्या व्हरांड्यात बांधणार.गोवऱ्याच्या राखेने दात घासणार. खाकरण्याचा आवाज त्यात वेगळाच.दोन-चार दगडे मांडून केलेल्या अंघोळीच्या जागेत एकाच बादलीत गार पाण्याने अंघोळ करणार.(लय गारठा पडला की थोडं सोमट पाणी करतो.)गार पाण्याचा तांब्या अंगावर पडताच आपल्या कुलदेवताच्या नावाचा गजर करणार.हा आवाज साऱ्या गल्लीत घुमत राहतो.काहीजणांच्या साखरझोपेतल्या सपनात सुद्धा हा आवाज मिसळत असणार.तोपर्यंत पाच वाजल्याला असतात.गल्लीतल्या लोकांना लिंबानाना म्हणजे घड्याळ .त्याच्या आवाजाने लोक उठतात.आता काही वेळातच तांबडं फुटेल असं समजून गल्लीतल्या बाया आपल्या दिवसाची सुरुवात करायला सुरू करतात.लिंबानाना उठल्यापासून काम करतो.घरची उठो अथवा न उठो तो आपलं बिगिबिगी काम करत राहणार.अंघोळ झाल्या झाल्या चहा करण्यासाठी चुलीवर भांडं ठेवतो.रात्रीचा विस्तव चुलीत तवा झाकून तसाच ठेवल्यामुळे पहाटे चगाळ,कागद टाकलं की फुकारीने फुकताच चूल ढणाढणा पेट घेते. सूर्याला नमस्कार करण्याच्या अगोदर आपलं अंघोळ झालेले त्वांड असलं पाहिजे.असं मला लिंबानाना नेहमी सांगतो.लिंबानाना मध्ये प्रत्येक ऋतूची पहाट भरभरून भरली आहे.कधी हिवाळ्याची,कधी पावसाळ्याची तर कधी उन्हाळ्याची पहाट.कोंबंडं आता कधीही ओरडतं म्हणून त्याच्यावर भरवसा नसल्यामुळे चंद्र,चांदण्या, आभाळाचा रंग पाहून अजून तांबडं फुटायला किती अवकास असेल.यावरून लिंबानाना पहाटे उठण्याचा अंदाज बांधतो. लिंबानानाला लिहिता-वाचता येत असते तर! तर काय?त्यांनी दुर्गा भागवत यांच्यासारखं निसर्गाने ओतप्रेत भरलेलं "ऋतुचक्र " पुस्तकासारखं एखादा पहाटेवर लेख लिहिला असता का!असं उगच मनात येतं.प्रत्येक माणसात काहीतरी दडलेलं असतं तसं लिंबानाना मध्ये पहाट दडलेली होती.

हिवाळ्यात बरोबर आमच्याकडे ऊसतोडणी सुरू होते.तेव्हा पहाटे पहाटे ऊसबैलगाड्या एका मागून एक रस्त्याने जात असतात.तेव्हा त्या बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज पहाटेच्या शांततेला संगीत देत असतो. पहाट होत असताना कुठंतरी ऊसाच्या फडात कोयत्याचे पाते कपकपा ऊस कापत असते. त्याचाही आवाज वातावरणात घुमत असतो.हा आवाज वेदनेचा,कष्टाचा असतो.एकपारगी कामाला जाणाऱ्या बाया पहाटे उठून भाकरी धपा धपा थापत असलेला आवाजही कानी पडतो.दुसऱ्या बाजूला गावातील दत्ताच्या देवळात पुजाऱ्याने सुरू केलेली काकडा आरती त्या वातावरणास प्रसन्न करते.आरती सुरू होताच गावातील मोकाट कुत्री मंदिराजवळ जाऊन एका स्वरात ओरडू लागतात. लिंबानानाच्या मते,ही दत्ताचीच कुत्री आहेत.काही महिन्यांपूर्वी देवळात इलेक्ट्रॉनिक घंटीची मशीन बसवलीे.त्याचा आवाज खूप मोठा येतो.म्हणून कुत्री त्या आवाजाला प्रतिसाद देत नाहीत.हे पाहून लिंबानाना गाववाल्यांना मशीन बसवल्यावरून नेहमी शिव्या देत असतो.लिंबानाना नेहमी आम्हांला एक सांगतो,'पयल्या बाया तांबडं फुटायच्या अगोदर जात्यावर दळण दळयाच्या तेव्हा त्या ओव्या गायच्या.त्यांचा आवाज दूरवर पोहोचायचा.आज पिठाच्या गिरण्या आल्या.बायाचं कष्ट हलकं झालं बरं झालं पण पहाटेच्या ओव्या जात्याबरोबर कायमच्या गेल्या.'

थंडीचे दिवस आले की,आम्ही गल्लीतल्या पोरांनी खूप वेळा व्यायाम करण्याचे नियोजन केलेले असायचे.मग पहाटे पहाटे साऱ्यांच्या घराजवळ दाराची कडी हालवणे,हाका मारणं,त्याला जागं करणं हा वेगळाच व्यायाम अर्धाभर तास चालायचा.कधी कधी एखाद्या घरापसलं कुत्रं भुकायचं.त्याला दगड मारण्यापेक्षा आमचा ओळकीचा आवाज पटला की मग ते शेपूट घोळून शांत पडायचे.शेतात पाखरं राखणं हा वेगळाच कार्यक्रम ठरलेला असतो.अगोदर ज्वारीच्या पिकांसाठी आणि आता आमच्या भागात द्राक्षेच्या बागांसाठी पाखरं राखतात.त्याचाही आवाज पहाटे साऱ्या गावांत पसरतो.

पहाट होत असताना मांजराची भांडणं,उंदीर-घुस यांच्या हालचाली,पक्ष्यांचा आवाज,झाडांची-पिकांची हालचाल तसेच विविध ठिकाणी आतापर्यंत गेलो तेथील पहाट. ते वर्णन करायला खरंच मजा येईल.अजूनही आपले शब्द त्या पहाटेला योग्य न्याय देणार नाहीत. म्हणून त्या अनुभवल्याला पहाट तशाच डोळ्यासमोर आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात पहाट असते.आपण ती अनुभवत नाही.पहाट होत असताना...ती मावळतेकडे झुकतच असते.आपलंही आयुष्य तसंच...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Source:- INTERNET
-संगीता देशमुख,
वसमत

रात्रीच्या प्रदीर्घ आरामानंतर निसर्गाच्या कुशीत जेव्हा पहाट जन्माला येते तेव्हा सृष्टीच्या रोमारोमात चैतन्य भरलेले दिसते. हळूहळू अंधाराचे साम्राज्य संपत आलेले असते आणि इकडे विजयाचा गुलाल  प्राचीवर उधळीत रविराजांचे आनंदाने आगमन होते. जणू सत्तेवरून एकजण पायउतार होतो तर दुसरा सत्तेवर विराजमान होतो. हा रविराज सर्व सजीवांच्या जीवनातील अंध:कार नष्ट करून प्रत्येकाच्या जीवनात हर्षोल्हासाची किरणे पेरीत येतो. यात त्याच्या स्वागताला जी कष्टाळू,निरलस लोकं सज्ज असतात,त्यांच्या जीवनात तो चैतन्य भरतो,आरोग्य देतो तर निशाचर, आळशी लोक या आनंदाला आणि आरोग्यदायी वातावरणाला  मुकतात. ही पहाटच अशी आहे की,माणसाला,सृष्टीला प्रत्येक दिवसाची सुरुवात नव्या जोमाने,नव्या उमेदीने साजरी करायला शिकवते. म्हणूनच वृक्षवल्लीवर जुन्या फुलांची गळती होऊन नव्या फुलांचा बहर आलेला पहाटेच दिसतो,सगळी वृक्षवल्ली टवटवीत आणि गुबगुबीत हसऱ्या बाळासारखे. माणसेही अंतर्बाह्य स्वच्छ होतात. स्नानादी विधी करून बाह्यांगाने तर ध्यानधरणेने अंतरांगाने स्वच्छ होतात. ही दिवसाची सुरुवात दिवसभराच्या कामासाठी,कर्तव्यासाठी पुरत असते.
             प्रत्येक ऋततली पहाट ही वेगळी भाfसते. पावसाळ्यातली पहाट कधी  झिमझिमणारा पाऊस कधी रपरपणाऱ्या पावसाला घेऊन येते. हा पाऊस सर्व सृष्टीला अभ्यंगस्नान घालत असतो. आणि हे अभ्यंगस्नान आपण चहाचा घोट घेत घेत  खिडकीतून पहात असतो. बाहेर गोठ्यात जनावरे दडून बसतात तर पक्षी कुठेतरी झाडाच्या खोपीत दबा धरून बसलेले असतात. हिवाळ्यातली पहाट अतिशय मनोहर असते. बाहेर कोंबड्याची आरव ऐकू आली की कळते,पहाट झाली  हिवाळ्यातली रात्र एवढी मोठी असूनही थंडीचा गारवा पहाता ही रात्र अजून थोडी मोठीच असायला हवी होती,असं वाटतं. आजीच्या,आईच्या कुशीची ऊब संपूच नये वाटते. बाहेर निसर्गाने धुक्याची चादर पांघरून घेऊन तोही पहाटेच्या कुशीतच निपचित पडलेला असतो. पानांफुलांवर दवबिंदूनी आपला साज चढवलेला असतो. पक्षी झाडाच्या कुशीतून आपल्या पंखांना हळूच फडकवून अन्नसंशोधनाच्या मार्गी लागलेले असतात. पाखरांची ही किलबिल पहाटेच्या पायात जणू पैंजण घालून सगळ्यांच्या स्वागताला तयार करत असते. हिवाळ्यातली श्रीमंत लोकांची पहाट ही गरम कपड्यात लपेटलेली तर गरीबांच्या उघड्यानागड्या अंगावरून काढता पाय घेणारी असते. श्रीमंताच्या अंगावर पौष्टिक पदार्थ मूठभर मांस चढविणारी तर गरीबाच्या अंगावर  उललेल्या हातापायावर झोपडीचे आणि नशिबाच्या गुंतागुंत झालेली रेखाचित्र रेखाटलेली असते. तर उन्हाळ्यातली पहाट ही आरामात येणारी,रात्रभर घामाच्या धारा अंगात मुरवून सकाळी गार वाऱ्याच्या झुळकेने पुन्हा साखरझोप देणारी,माणसात आळशीपणा भरणारी आणि लवकरच दशदिशांत सोनेरी किरणांची उधळण करणारी पहाट!
          शहरातली आणि गावाकडची पहाट यातही तोच फरक! गावातली पहाट कुठे जात्यावरचे संगीत,गाईगुरांच्या हंबरण्याचे संगीत,त्यांच्या गळ्यातील घुंगराच्या किणकिणीचे संगीत,दुधाच्या धारेचे संगीत,अंगणं झाडून पडलेल्या  सड्याचे संगीत,झाडावेलीवर पाखरांचा गुंजरव,विहिरीतून पाणी शेंदण्याचे संगीत, तर पहाटेच शेतात पोहोचलेल्या बळीराजाच्या ललकारीचे संगीत! आणि त्यासोबतच घराघरातून दरवळणारा चहाचा घमघमाट!माणसाला एका वेगळ्याच जगात घेऊन जातो. शहरातील पहाट म्हणाल तर रात्री उशिरापर्यंत जागे असलेल्या लोकांना पहाटेच दर्शन होत नाही. पण आरोग्याबद्दल जागरूक असणाऱ्या शहरातील लोकांची पहाट ही रस्त्यावर "मॉर्निंग वॉक" घेऊन सुरू होते. ती पहाट यांना आरोग्यदायी ऑक्सिजन पुरवते.
अशी ही पहाट सगळ्यांसाठीच वेगवेगळ्या रूपाने,ढंगाने प्रकट होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Source:- INTERNET
-श्रीनाथ कासे
सोलापूर

काळ्याकुट्ट रात्री कोणीही नव्हता माझ्यासोबत
जो, तो, सगळेच आले, पहाट होत असताना...

बुडत्याला नाही कोणी वाली, उगवत्याला स्वागत,
सर्व विसरतात अंधार्‍या रात्री, पहाट होत असताना...

ज्याने - त्याने करावे होईल तेवढे भुंग्याला मदत
फुलालाही फुलावे लागते, पहाट होत असताना...

अनेक गोष्टी घडत बिघडत असतात या आयुष्यात
गरिबालाही जगावे लागते, पहाट होत असताना...

सृष्टीचाच नियम, शितल चंद्र सकाळी नाही चालत,
सूर्यालाही जळावे लागते, पहाट होत असताना...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************