माझ्या डॉक्टरांकडून असलेल्या अपेक्षा.

माझ्या डॉक्टरांकडून असलेल्या अपेक्षा.

🌱वि४🌿 या व्हाट्सअप ग्रुपवरून

माझ्या डॉक्टरांकडून असलेल्या अपेक्षा.


Source: INTERNET
सौदागर काळे,पंढरपूर.

1.डॉक्टरांनी रुग्णाला त्याच्या मातृभाषेतून औषधांची चिट्टी लिहून द्यावी.
2.डॉक्टरांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी मेडिकल बरोबर टक्केवारीची भ्रष्ट पद्धत वापरू नये.
3.वृद्ध व गरीब रुग्णांना फी मध्ये सवलत द्यावी

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Source: INTERNET
-मनोज वडे ,पंढरपूर.

       आज दवाखाना म्हटलं की, अंगावर काटा उभा राहतो.बऱ्याच योजना आहेत का ,नाहीत .ह्याचा ,जसा एखादा नेता येणार असेल, तसा प्रचार होत नाही. तो पर्यंत गोरगरिबांच्या पदरी निराशा येेत राहणार हे नक्की आणि त्यात एखादा जीव ही गमवावा लागतो.जसा, राजकारणी प्रचार करतात. तसा योजनाचा प्रचार झाला तर, डॉक्टर ची भीती जाईल. आणि एक सकारात्मक चित्र समोर येईल.बगा ना ,माझ्या नाते वाईकला जवळजवळ मी तीन महिने झाले .5 दिवसाला डॉक्टर बोलवतात गोळ्या बदलून देतात . ह्या चित्रात पण फरक मात्र दोन दिवस. नाही तर परत चालू वेदना .मला तर वाटत हे डॉक्टर पैशाच्या मस्तीने खूप गाफील झालेत.कारण आम्ही 2 ते 3 मिनिट डॉक्टराशी बोलण्या साठी अखा दिवस जातो .बर गेला तर पदरी काय ...आत मध्ये डॉक्टर बरोबर बसतो 2 ते 3 मिनिट द्या 100 आणि मनाचं समाधान ही नाही आणि पेशन्ट ही नीट नाही .मग अश्या परस्थिती कोठे जायचं त्या पेशन्ट ने बर जायचं म्हटलं तर परत पहिले पाढे 55 आणि पैसे जातात आणि ते घर पूर्ण बसण्याच्या मार्गी लागत .हात कोणाला दोष द्यायचा. आता चे डॉक्टर इतके गाफील झाले आहेत . की,त्यांचे Assistant सर्व पाहतात .म्हणजे एकाद्या जीवाची पर्वा न करता त्या जीवाशी दोन्ही पद्धतीने खेळतात एक आर्थिक ,मानसिक आणि ह्यातून त्या पेशन्ट कडून किती काढता येतील.हेच बगतात . मला तर वाटत ह्याच्या भावनाच मेल्या आहेत .लुटमारीचा धंदा उघड चालू आहे.ह्यांचे दरफलक कोठे नसतात.पेशन्ट बगून लुबाडचे काम करतात नुसते.
       ‎पण मला वाटतं आज डॉक्टर त्याने व्यक्तीग लक्ष घातले पाहिजे .थोडे कमी मिळेल तर काय हरकत.2 मिनिटाला 500 Charg घेतात .तसा वेळ पण देत नाहीत .त्यांनीतसा वेळ देऊन पेशन्ट  चे समाधान केलं पाहिजे.फी मात्र योग्य असल्या पाहिजे.दरफलक आसावे.दवाखान्यात वेगवेगळ्या आजराची कशी काळजी घ्यावी याचे पोस्टर असावे .दर आठवड्यात एखाद सेमिनार असावं स्थानिक पातळीवर ,कशी काळजी घ्यावी आरोग्याची . ह्याबद्दल त्यांनी मंच उबा करून, ग्रुप करून ,अवर्णन्स पसरवला पाहिजे.औषधा बद्दल पूर्ण माहिती द्यायला पाहिजे .बरेच आहेत डॉक्टर कडून अपेक्षा... आठवले  तेवढ्या लिहिल्या ...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Source: INTERNET
-नितिन लेंडवे पंढरपुर.

      डॅाक्टरांकडुन अपेक्षा एक रुग्ण म्हणुन खुप आहेत. त्यांनी माफक फी मध्ये यथायोग्य उपचार करावेत. रोगाच अचुक निदान करुन उपचार करावेत. रोग रेड्याला व इंजेक्शन पखाल्याला असे नको. रुग्णाची आस्थेवाईक पणे काळजी घ्यावी.

     रुग्णालय स्वच्छ असावे. वातावरण चांगले असावे. सर्व अत्यावश्यक सोई असाव्यात. पुरेसा व प्रशिक्षित नर्स असाव्यात. रुग्णाच्या परिस्थितिचा विचार करावा. योग्य उपचाराच्या जोडीला मानसिक धीर द्यावा. घाबरे सोडु नये. रुग्ण हा आमच्यासाठी ची सर्वोच्च प्राथमिकता आहे असे संबंधित रुग्णास जाणवले पाहिजे.

               गरज नसताना त्याला रुग्णालयात डांबुन ठेवु नये. कारण कुणी हौसेने तिथे येत नसतो. वेळीच डिस्चार्ज द्यावा वा दुस-या दवाखान्यात दाखल करावे. "कमिशन" साठी तह्रेतर्हेच्या चाचण्या टाळाव्यात. अत्यावश्यक असतील त्याच कराव्यात. तो सदैव देखरेखेखाली राहील हे पाहावे. मेडीकल मध्ये कमिशन कमी खावे किंवा खाऊ नये. काही झाले तर आम्ही जबाबदार नाही असे सांगुन वा खोटे खोटेच भीती दाखवुन आयसीयुत टाकु नये. दुर्देवाने रुग्ण मरण पावल्यास त्याच्या नातेवाईंकांकडे बील भरण्यास पैसे नसतील तर प्रेत थांबवुन ठेवु नये. मढ्याच्या टाळुवरचे लोणी खाल्ल्यासारखा प्रकार असतो तो असे मला वाटते.

          रुग्णास गरज नसताना हेलपाटे घालावयास लावु नयेत. त्याने तो घाइला येतो. तत्काळ सेवेच्या नावाखाली लयलुट करु नये. रात्रि अपरात्री रुग्णास दाखल करुन घ्यावे. ब-याच वेळा कंपाऊंडर दरवाजा पण उघडत नाही. हे कंपाऊंडर स्वत:ला तज्ञ डॅाक्टर समजत असतात.    ब-याचवेळेला.
   
                   प्रसूति संदर्भात आवश्यक/ जीवितास धोका असेल तरच सीजर करावे. माझ्या माहिती डॅाक्टर असे आहेत की, सर्दी वा खोकला असो, किमान दोन इंजेक्शन व शे-दोनशेचे मेडिसिन दिल्याशिवाय "सोडत" नाही.


           काही डॅाक्टर हे खरोखर उत्तम सेवा देतात. माझ्या ओळखीतले एक डॅाक्टर तर आजही २० रु मध्ये कंन्सल्टींग करतात. ( इंजेक्शन समावेश नाही ).

            कदाचित वरील बाबी नकारात्मक वाटतील ख-या. पण या एक रुग्ण म्हणुन अपेक्षा आहेत. डॅाक्टरांकडे आपण मोठ्या विश्वासाने जात असतो. त्या विश्वासाला जागुन मनोभावे त्यांनी सेवा केल्यास नक्कीच त्यांना दुवा लागुन त्यांची ख्याती व्हायला वेळ लागणार नाही.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Source: INTERNET
 -राजश्री ठाकूर , मुंबई .

आदरणीय तसेच तिरस्करणीय डॉक्टर ,
  खुप वर्षांपासून मनात आहे तुमच्यासोबत बोलावं , मनमोकळा संवाद साधावा . डॉक्टर पेशंट सुसांवादाची सुरवात डॉक्टरांनीच करावी असे थोडेच आहे म्हणून माझ्यातर्फे उचलले हे पाहिले पाऊल . भूक लागली म्हणून रडल्याशिवाय आई सुद्धा बाळाला जवळ घेत नाही म्हणतात मग पेशंट न बोलताच डॉक्टरांना सगळं कळेल हे तरी कसं मानावं ?

  तर डॉक्टर , माझ्या आठवणीनुसार आपली पहिली भेट झाली ती मला ताप आला असताना , " डॉक्टरांकडे घेऊन जाऊ तुला " हे वाक्य " देवबाप्पा शिक्षा करेल तुला " च्या तालावर उच्चारल गेलं आणि स्वारी बिथरली पण ऐकतील ते घरचे कसले आमचं गाठोड उचलून ठेवलं तुमच्याकडे , पण तुम्ही भीतीदायक वगैरे नाही वाटलात , तपासत असताना शाळा , खेळ वगैरे बद्दल बोललात आणि वरून एक चॉकलेट पण दिलं बर वाटल्यावर खा म्हटलात .. काही गोळ्या दिल्या .. त्या घेतल्यावर ठणठणीत होऊन पुन्हा हुंदडायला पसार . डॉक्टर आपल्याला तपासतात , औषध देतात , ते सांगतील ते सगळं ऐकायचं आणि तसच वागायचं मग आपण पटकन बरे होतो . कित्ती सोप्प ना ? पण सध्या तस होत नाही म्हणे ..
  खूप पूर्वी देव माणसांना बर करायचा पण ते काही नीटस जमलं नाही मग वैद्य आलेत ते कधीकधी चुकायचे मग डॉक्टर आले आणि आम्हाला अस वाटत डॉक्टर तर सतत चुकतातच . चांगले डॉक्टर अगदी औषधालाही उरले नाहीत . एवढं शिकता तुम्ही मग कळत कस नाही की पेशंटला नक्की काय हवंय ? थांबा आज नीट सांगून बघुया ..
  तर आम्हाला काय वाटतं माहितीये , तुम्ही आपल्या कामात निष्णात असायलाच हवं . डॉक्टर म्हणजे हुशार असलच पाहिजे नाही का ?
  आम्ही समोर आलो की लगेच कळायला हवं की आम्हाला काय होतंय , कशामुळे होतंय आणि शक्य तर घरगुती औषधे सांगायची , गोळ्या फार महाग द्यायच्या नाहीत , तपासण्यांच नाव काढायचं नाही आणि ऑपरेशन अब्रम्हण्यम् .. आमच्या  वागण्यावर सल्ले द्यायचे नाहीत . आजार हे चुकिच्या आहार विहाराने होत नाहित , आम्ही आजारी पडलो हि निसर्ग , वातावरणातील बदल आणि झालच तर अचूक निदान न करता येणारे तुम्ही यांची चूक आहे .. आम्ही कधी कधी देव म्हणतो  ना तुम्हाला ? मग आरोग्य द्यायचं आम्हाला . फी मागायची नाही . आम्ही दिली तरी अहो कशाला इतके जरा कमी चालतील अस म्हणायचं . नातेवाईक , मित्र मैत्रिणी , नातेवाईकांचे मित्र मैत्रिणी , मित्र मैत्रिणींची नातेवाईक , गरजू , वृद्ध , अबला अशा सगळ्यांना माफक दरात शक्यतो मोफत तपासायचे . आणि त्याबद्दल खुश राहायचं .. आम्ही तुमच्याकडून तपासून घेतो तुमचा अनुभव वाढवतो म्हणून तुम्ही पेशंटला पैसे द्या असं तर नाही ना म्हणत आम्ही ? आणि हो तुमचं कौशल्य आंतरराष्ट्रीय दर्जाचं असल तरी लीन असायचं , कुठल्याच सुविधा नसणाऱ्या घाणेरड्या सरकारी इस्पितळात अपुऱ्या साधनांनी पुरेपूर सेवा द्यायची . सरकारला जाब विचारण्याची धमक आमच्यात नाही , आम्ही त्यासाठी तुम्हालाच जबाबदार ठेवू . औषधांच्या किमती , शस्त्रक्रियेचे वाढते दर सगळ्यासाठी तुम्हीच जबाबदार .
 तुम्ही दिलेल्या एकाच गोळीने आम्हाला बर वाटलं पाहिजे , कोर्स पूर्ण करायची भुणभुण करायची नाही , अँटिबायोटिक रेसिस्टॅन्स वगैरे कटकट आम्हाला सांगायची नाही तो आमचा प्रांत नाही .
 दवाखान्याच्या बाहेर , नाटक सिनेमा यांना दिसायचं नाही आम्हाला कधीही सर्दी पडसे होऊ शकते , दिवसाचे २४ तास तुम्ही कार्यरत हवेत . समाजकार्य करणे हे डॉक्टरच्या अनेक कर्तव्यांपैकी एक आहे . म्हणून दवाखान्याच्या वेळे शिवाय मोफत कॅम्प वगैरे चालवायचे ,तुम्हीच पुढाकार घेऊन आरोग्यविषयक जागृती करायची कारण सामाजिक आरोग्य हि पूर्णतः तुमची जबाबदारी .  तुम्ही फक्त दवाखाना एके दवाखाना केलेत तर तुम्ही पैशाच्या मागे आहात हि आमची खात्री आहे . समाज कितीही नालायक असला तरी त्याचं समाजातून येणारा डॉक्टर मात्र आम्हाला नितीसंपन्न हवा . तुमचा दर्जा आम्ही तुमच्या हॉस्पिटलच्या चकचकीत भिंती , शुभ्र तावदाने , धवल मदतनीस , लीन मिठ्ठास बोलणारे तुम्ही आणि कमी फी यावरूनच ठरवणार . कौशल्य , ज्ञान , निष्ठा विश्वास सब झूठ है डॉक्टर . कधी कधी वाटतं आमच्या याच मापन पद्धतीमुळे तुमच्यातील काही जण आम्हाला लुबाडू शकतात कारण वरलिया रंगासी भुलायला लागलो आहोत आम्ही . काय करणार , आमच्या घरात डॉक्टर नाहीयेत ना , डॉक्टर होण्यासाठी मिसरूड फुटायच्या वयात घराबाहेर पडणारी पोर , दिवसरात्र पुस्तकात झोकून अभ्यास करणारी , सणवार उत्सव सगळ्याकडे पाठ करणारी मुल आणि दर संध्याकाळी घरी येणारी पोर आम्ही बघतो पण आपलं पोर डॉक्टर आहे आपल्याला वर्ष वर्ष भेटला नाही म्हणून काय झालं चांगलं काम करतोय यातच समाधान मानणारे तपस्वी आईबाप आम्ही नाही बघत . भारतीय डॉक्टरांना जगभरात मान आणि मागणी आहे पण तुम्ही जिथे सन्मान मिळतोय तिथे नाही जायचं इथेच राहून वाट्टेल तसे वागणाऱ्यांची सेवा करायची . नाहीतर तुम्ही देशद्रोही .  
आमचे शेजारी अमेरिकेत जाऊन आजारी पडले तेव्हा तिकडच्या डॉक्टरांच्या गोष्टी ऐकून धसकाच घेतला .. पेशंट ने जर डॉक्टर च्या सल्ल्याविरुद्ध साधी क्रोसिन घेतली तरी डॉक्टर पेशंटला जाब विचारू शकतो अगदी खटला सुरू होऊ शकतो .. खर सांगतो  , अस आपल्याकडे झालं ना तर तुरुंग कमी पडणार आपल्याला .. हे ऐकुन तुम्ही खूप खूप आवडलात डॉक्टर . आधार वाटला .
 खूप अपेक्षा झाल्यात का डॉक्टर ? पण बघा विचार करा एकदा .. मी पण ठरवलंय पुढल्या वेळी तुम्ही भेटलात ना की मी सुद्धा तुम्हाला विचारणार , " डॉक्टर जेवलात का ? फार दगदग होते का ? काळजी घ्या आणि काही लागलं तर २४ तास आम्हीही आहोत हे लक्षात असू द्या . "  फक्त डॉक्टरांनीच पेशंटला विचारावं अस थोडेच आहे ? किती जणांनी हे विचारलं असेल बरं आपल्या डॉक्टरांना ?

शूभास्ते पंथानः

              तुमचा ,
               ऋग्णमित्र .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Source: INTERNET
-संगीता देशमुख,वसमत

"तुला काय व्हायचं" हा प्रश्न विद्यार्थ्याना  विचारला की,हुशार विद्यार्थांचे ठरावीक उत्तर असते "डॉक्टर" आणि त्यापेक्षा थोडा कमी असणाऱ्याचे उत्तर असते "इंजिनिअर"! इंजिनिअरिंगची विद्यार्थी संख्या अफाट झाल्याने आता त्या क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थी संख्येला ओहोटी लागली. म्हणून आजकाल आईवडिलांची आणि त्या पाल्याची वृत्ती ही डॉक्टर होण्याकडे जास्त आहे. यासाठी अपवादात्मक काही विद्यार्थी त्याला अतिशय पात्र असतात पण ज्यांच्याकडे पात्रता नसताना देखील अनेक विद्यार्थ्यांचे लोंढे त्या क्षेत्राकडे वळताना दिसतात. त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यामध्ये असणारी प्रचंड कमाई! त्यासाठी मग ज्या पाल्याची पात्रता नसताना किंवा थोडाफार काठावरची पात्रता असताना, भरमसाठ डोनेशन,फीस देऊन या क्षेत्रात पाल्याला टाकले जाते. अर्थातच जिथे शिक्षणाला प्रचंड पैसा लागला तो भविष्यात वसूल करण्याचीही वृत्ती रहाणार,हे निश्चित आहे. माझ्या डॉक्टरांकडून काय अपेक्षा आहेत? हे सांगण्यापूर्वी ही पार्श्वभूमी समजून घेणे महत्वाचे आहे. कारण याच पार्श्वभूमीवर उद्याचा "भव्यदिव्य हॉस्पिटल"चा डोलारा उभा  रहातो. ज्या क्षेत्राकडे लोक सेवावृत्ती म्हणून पहातात तो मात्र शुध्द नफ्याचा व्यवसाय झालेला आहे. म्हणून आपण डॉक्टरकडून करत असलेल्या अपेक्षा फोल ठरत आहेत.
              काही दिवसापूर्वी चांगला हुशार डॉक्टर हा कितीही छोट्या बोळीत,छोट्याशा खोलीत दवाखाना सुरू करायचे. त्याचे नाव त्याच्या हुशारीवरून,त्याच्या हातून येणाऱ्या गुणावरून होत असे. तो डॉक्टरही एखाद्या पेशंटने फी दिली तर घ्यायचे  किंवा एखादा पेशंट खरच केविलवाणा,गरजू वाटत असेल तर त्याला फी माफ सुध्दा करायचे. अनेक रुग्णांच्या घरी जाऊन उपचार करत असत. "डॉक्टर हा देव आहे" अशीच लोकांची धारणा असायची. पण आज ही स्थिती अतिशय उलट झाली आहे.आजचा पेशंट देखील डॉक्टरची हुशारी पाहून नाही तर त्याचे हॉस्पिटल किती मोठे आहे,हे पाहून डॉक्टरची निवड करतात. एखाद्या श्रीमंत डॉक्टरने प्रचंड मोठी इमारत उभी करायची,त्यात आर्थिक साधारण परिस्थितीचे अनेक डॉक्टर्स सोबतीला घ्यायचे. मग त्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटला गरज असो अथवा नसो त्याच्या त्याच हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या तीनचार तपासण्या करायच्या आणि तपासण्या करण्यासाठी पाठविण्यापूर्वी या डॉक्टरला फक्त भेटल्याचे तपासणी फीस म्हणून तीनशे ते  पाचशे रुपये आधी भरायचे. या तपासणी फी मध्ये ते डॉक्टर पेशंटला हात ही लावत नाहीत. वेगवेगळ्या तपासण्या झाल्यावरही त्याचे योग्य निदान होईलच,याची खात्री नाही. याच डॉक्टरांचा मेडिकल दुकानाशी कॉंट्रॅक्ट झालेला असतो. त्यामुळे त्या पेशंटला औषधीही भरमसाठ लिहून दिल्या जाते.
आजच्या या भौतिकवादाच्या जगात सर्वचजण पैशाच्या पाठीमागे धावत असताना फार सेवाभावी वृत्ती किंवा पूर्ण त्यागभावनेनेच डॉक्टरांनी काम करावे,ही अपेक्षा आपण करणारच नाही,किंबहुना ती आजच्या जगात  रास्तही ठरणार नाही. पण एक माणूस म्हणून डॉक्टरांनी विचार करून स्वतःला खरच थोडेफार तरी बदल घडवून आणण्याची गरज आहे. त्यामुळे एक पेशंट म्हणून फक्त माझ्यासाठी नाही तर सर्वसामान्य पेशंटसाठी डॉक्टरांकडून माझ्या काही अपेक्षा आहेत.  खरच तपासणी फी म्हणून आज पेशंटकडून उकळण्यात येणारी रक्कम ३००-५०० जास्त वाटते. ती माफक असावी. डॉक्टर बदलला की,त्यांनी तपासलेले पॅथॉलोजी,सोनोग्राफी,रक्तलघवी तपासणी हे निरर्थक ठरतात. डॉक्टर बदलला की,त्याचदिवशीचे रिपोर्टस असले तरी दुसरे ह्या सगळ्या तपासण्या पूर्ण करायला सांगतात.साधा पोटदुखीचा पेशंट जरी आला तर त्याला रक्तलघवी तपासणी,सोनोग्राफी गरजेचीच असते का? मी स्वतः ऑपरेशनसाठी एका डॉक्टरकडे सेकंड ओपिनियन म्हणून घ्यायला गेले तर आधी वरील सर्व चाचण्या करून घेतल्या नंतरच डॉक्टरच्या कॅबिनमध्ये प्रवेश मिळाला. ज्या की माझ्या ऑपरेशनशी काहीही संबंधित नव्हत्या. अशावेळी डॉक्टर्सनी थोडा विवेक दाखवला तर सामान्य रुग्णावरचा आर्थिक ताण वाढणार नाही. दुसरी महत्वाची बाब म्हणजे पेशंट डॉक्टरला भेटतो तेव्हा शक्यतोवर डॉक्टर्स स्वतःहून बोलतच नाहीत. पेशंट स्वतःच लक्षणे सांगतात आणि पेशंटने काही विचारले तर बाहेर कंपाउंडर सांगेल म्हणतात. त्यामुळे कंपाउंडर स्वतःला डॉक्टरच्या पुढचे समजून ते पेशंटशी उर्मट वागतात.  आधीच पेशंट,त्याचे नातेवाईक त्रस्त होऊनच हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. त्यांची थोडी आस्तेवाईकपणे विचारपूस केली तर त्यांना मानसिक आधार वाटेल. एखादा पेशंट गरीब वाटत असेल तर त्याची फीस माफ करायला काय हरकत आहे? अनेक डॉक्टर्स तर पेशंट मेल्यानंतरही त्यांच्या आयसीयूच्या किरायासाठी त्या पेशंटला अधिक एखादा दिवस ठेवून घेतात. काही डॉक्टर्स एखाद्या पेशंटकडे डिस्चार्ज देताना पैसे नसतील तर त्यांना डिस्चार्जही देत नाहीत. हे माणुसकीला शोभनीय आहे का? पेशंट डॉक्टरला देव समजतात. तेवढा विश्वास त्यांनी जपायला हवा. पेशंटनी सुध्दा डॉक्टरवर विश्वास ठेवायला हवा. एखादेवेळेस दुर्दैवी घटना हॉस्पिटलमध्ये घडली तर त्याचा दोष डॉक्टरला देऊ नये. कारण जगातला कोणताही डॉक्टर त्या पेशंटला पुर्णपणे वाचवण्याचाच प्रयत्न करत असतो.
           समाजात आता शहरातील  डॉक्टर्सकडे लुटारू डॉक्टर म्हणून स्थान निर्माण होत आहे. परंतु अशा डॉक्टर्समध्येही काही अपवाद डॉक्टर्स आहेत,जे की समाजात माणुसकी टिकवून आहेत,पैशापेक्षा माणसे जपताना दिसतात. अजूनही आपल्या या व्यवसायातून जमेल तेवढे समाजकार्य करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या या व्यवसायातूनही  सेवाभावीवृत्ती जपतात. अशी उदाहरणे कमी असतील परंतु या व्यवसायाबद्दल थोड्याफार प्रमाणात का होईना सकारात्मक दृष्टी समाजाला देतात. या क्षेत्रात येणाऱ्या भावी पिढीने अशा डॉक्टर्सचा आदर्श मानायला हवा.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Source: INTERNET
-अनिल गोडबोले.

डक्टरांनी इंजेक्शन देऊ नये. मला फार भीती वाटते.

डॉक्टरांच्या क्लीनिक मध्ये बी कॉम्पेलक्स चा वास येतो.. त्या ऐवजी छान गुलाब किंवा मोगरा सुगंध दरवळला पाहिजे.

अगदीच "लेट जा मामु 'तेरी वाट लगने वाली है" अस म्हटलं नाही तरी चालेल पण "3d इमेजिंग करावं लागेल किंवा स्कॅन करून बघू"असं म्हटलं की मला तर पेशंटला कॉम्प्युटर मध्ये घातल्या सारख वाटत.

डॉक्टरांनी बोलताना आपुलकी ने बोलावं वगैरे (निदान सोलापुरात) तरी अपेक्षा नाहीत.. पण "काल काय खाल्ला बे कडू... एकट एकट पार्टी करतो काय?" असं म्हणू नये.

असो.. बाकी ऑपरेशन करणे, टेस्ट करणे,  मृत घोषित करणे, पेशंट ला ऐन ट्रीटमेंट मधून बाहेर काढणे, पैसे उकळणे, योग्य निदान न करता प्रयोग करणे, जबाबदारी न उचलणे ...  या बद्दल मत व्यक्त करून काही उपयोग होईल असे वाटत नाही.

शेवटी, दाताच्या डॉक्टरांनी टेथोस्कोप वापरू नये.. एवढी मोठी अपेक्षा आहे..

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~|~~~

Source: INTERNET
-शिरीष उमरे ,यवतमाळ

आपल्या देशात ज्यांना सर्वोत्तम आदराचा दर्जा मिळायला हवा असे दोनच व्यक्ती !! नाही... मी जय जवान जय कीसान बद्दल बोलत नाहीय !! अभिमानाने सांगावेसे वाटते की मास्तर आणि डॉक्टर !!
दुर्दैवाने सध्या दोन्ही व्यवसायाला ग्रहण लागले आहे. ज्या कुचंबणा त्यांना सहन कराव्या लागतात ते बघुन लाज ही वाटते, निराशा पण येते आणि राग पण येतो.....

डॉक्टरकीचे शिक्षण ही मामुली गोष्ट नाही आहे. आपल्या देशात बारावीनंतर कठोर असे सहा वर्षाचे प्रात्याक्षिकासहीत प्रशिक्षणाचा डोंगर पार करावा लागतो तेंव्हा कुठे डॉक्टर जन्म घेतो. आवड व ध्यास असल्याशिवाय कोणी ह्या धाडसाकडे फीरकत नाही.

लहानपणी पेपरमींटची गोळी देऊन बोलण्यात गुंतवुन सुई टोचल्याची जाणीव होऊ न देणारे डॉक्टर, आपल्या सुमधुर हास्याने कीडलेला दात दुरुस्त करतांना वेदना जाणवु न देणारा डॉक्टर, नंतर गुडघ्यावरच्या जखमांना हसतहसत शिवणारा डॉक्टर आणि आताआता माझ्यापेक्षा वयाने लहान असलेला पण त्याच सफाईने आराम देणारा डॉक्टर... ही रुपे मला तर देवदुताची वाटतात... रोजचे १५०-२०० पेशंटला तपासुन १२-१२ तास राबणारे डॉक्टर कायम प्रफुल्लीत कसे राहु शकतात ? त्यांचे डोळे, त्यांचे हास्य, त्यांचा स्पर्श असा जादुई कसा असु शकतो ? हे कुतुहल अजुन उलगडले नाही.
मी माझ्या काकांना रात्री बेरात्री बॅग उचलुन खेडेगावांमध्ये रुग्णसेवेसाठी धावुन जातांना पाहीले आहे...  हे डॉक्टर्स म्हणजे अजब रसायन असतात.

त्यांच्याकडुन आपण काय अपेक्षा करायच्या ? त्यांच्या आपल्याकडुन असलेल्या माफक अपेक्षा आपण पुर्ण केल्या पाहीजेत. त्यांची पेशंट न वाचवण्यात आलेली हतबलता दिसत असुनही त्यांना मारहाण करणारे महाभाग आपल्यापैकी च असतात. जसे तांदळात खडे असतात तसे काही डॉक्टर या पदाला काळीमा फासणारे व्यावसायिक असतात.. पण अपवादात्मक...

डॉक्टरांच्या समस्या सोडवण्यात आलेले अपयश हे सरकारचे आहे असे मी मानतो. ह्या राजकारण्यांनी व सरकारी नोकरशाहीने सार्वजनिक आरोग्य सेवेची वाट लावुन टाकली आहे. सरकारी कराचा एवढा प्रचंड दुरुपयोग होतोय पण आपण डॉक्टरांना जबाबदार पकडतो... मुळ कारण अक्षम सरकार व भ्रष्टाचारी राजकारणी व नोकरशाही !! येणाऱ्या निवडणुकीत हा प्रश्न जरुर विचारा मत मागायला आलेल्या उमेदवारांना ! योग्य उमेदवार निवडा !!
🙏🏼

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Source: INTERNET
-संकेत मुनोत, पुणे

डॉक्टरांनी प्रामाणिक सल्ला द्यावा उगाच घाबरवू नये व गरज नसताना शस्त्रक्रिया वगैरे करू नये म्हणजे असा गैरव्यवहार काहीच डॉक्टर करतात पण त्यांच्यामुळे इतर ही बदनाम होतात.

आम्ही काही दिवसांपूर्वी आरोग्यक्षेत्रातील गैरव्यवहार हे व्याख्यान घेतले होते आणि अनुभवावरून असे वाटते कि वैद्यकीय शस्त्रक्रिया करताना कधी कधी तुम्हाला गंडवले जाऊ शकते.
कोणतीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी second opinion(दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला) ही घ्या कि खरच गरज आहे का?

काही दिवसाापूर्वी चांगले विचार युवा व्याख्यानमालेत आम्ही डॉ Arun Gadre यांचे आरोग्य क्षेत्रातील गैरव्यवहार या वर संवाद घेतला होता शिवाय डॉ Amit Shinde सारख्या अनेक तज्ज्ञांशी ही चर्चा केली होती त्यात बऱ्याच गोष्टी समजल्या ज्याचा काल प्रत्यक्ष अनुभव आला

Mediclaim आणि Insurance Advisor असल्यामुळे काही वेळा हॉस्पिटल शी संपर्क ही येतो
काल एका मित्राच्या पत्नीच्या ऑपरेशन झाले.11हजार रु घेतले शिवाय त्यापूर्वी त्याने अनेक गरज नसणाऱ्या तपासण्याही केल्या त्याचा खर्च वेगळा खरतर माणसापुढे पैशाचे मोल नाही कितीही पैसे गेले तरी चालतील पण माझी पत्नी बरी झाली पाहिजे ही त्याची भावना होती
त्याने केलेल्या तपासण्या मी माझ्या ओळखीच्या तज्ञ डॉक्टरला ही second opinion म्हणून पाठवल्या तर त्यांनी शस्त्रक्रियेची काही गरज नसून गोळ्यांनी 8 दिवसात उपचार होऊ शकतो असे सांगितले पण घरच्यांच्या आग्रहामुळे त्याला हे करावे लागले त्याच्या घरच्या लोकांचे ही बरोबरच होते डॉक्टरांनी एवढे घाबरून ठेवले होते कि ते म्हणाले करून टाकू लगे.

शस्रक्रियेची गरज नाही, अवघ्या 1500 रुपयांमध्ये गोळ्या देऊन बरे होईल,  पण शस्त्रक्रिया करायचीच असेल तर फक्त 4500 रु मध्ये होऊ शकते इथे असे संगमनेरच्या तज्ञ डॉक्टरनी सांगितले.पण पुण्याहून संगमनेरला जायाला घरचे तयार नसते झाले म्हणून तो ते करू शकला नाही.

पहिल्या डॉक्टरकडे जेव्हा मित्र पैसे थोडे कमी करा 11 हजार एवढी रक्कम खूप जास्त वाटते म्हणून सांगायला गेला तर या डॉक्टरांनी हो करू म्हणून मग बिल 12 हजार चे करून त्यातून 1 हजार कमी केल म्हणजे आहे तेवढेच घेतले,  शिवाय त्या डॉक्टरांनी भेटायला ही नकार दिला नंतर भेटायला ही नकार दिला
असो शक्य असल्यास पूर्ण कुटुंबाचाही mediclaim काढून ठेवावा (पूर्ण माहिती घेऊनच काढावा कारण तेथेही फसवणारे आहेतच) कारण हॉस्पिटलचा जास्त खर्च (3-4लाख)आला तर ऐन वेळी पैसे manage करणे खूप अवघड जाते काही काहींची सगळी saving तर संपतेच शिवाय जर पैसे नसतील तर याला त्याला फोन करण्यात भेटण्यात वेळ जातो , मानसिक ताण येतो तो वेगळाच तोही अश्या वेळी जेव्हा तुमची गरज त्या आजारी व्यक्तीला जास्त असते. Mediclaim साठी गेले तर तुमच्या ऐपतीनुसार plan घेऊन वार्षिक 8-15 हजार मध्ये तुम्ही तो ताण काही प्रमाणात कमी करू शकता.

पुढच्याला ठेच मागचा शहाणा या उक्तीमुळे हे पोस्ट केले
कारण वेळ सांगून येत नाही.
तुम्हाला जर कोणत्या डॉक्टरने शस्त्रक्रिया आदी करायला सांगितली तर second opinion घ्याच. पैसे तर जातात च शिवाय शस्त्रक्रियेमुळे शरीराला ही इजा होते.

मागे एका डॉक्टर मित्राने त्यांच्यासोबत घडलेली एक घटना सांगितली होती, ते एका मोठ्या हॉस्पिटल मध्ये कामाला होते  त्यांच्याकडे एक मुतखडा या आजाराचा त्रास होणार रुग्ण आला त्यांनी त्याच्या तपासण्या वगैरे केल्या तर त्यात त्यांना ते पॉसिटीव्ह आले त्यांनी काही औषधें देऊन त्याला पुढच्या आठवड्यात परत बोलावले परत  जेव्हा तपासण्या केल्या तर त्यात त्यांनी जास्त पाणी बारा होशील असे सांगून निरोप दिला व त्याला फरक पडला ही पण हे झाल्यानंतर त्या हॉस्पिटल मधील MBA झालेली एक व्यक्ती त्यांच्याकडे आली व तो रुग्ण आपल्यासाठी किती रुपयांचा होता  व हॉस्पिटलचे मासिक टार्गेट किती कोटींचे आहे वगैरे सांगितले व डॉक्टरची नीट सेवा देत नसल्याची मुख्य डॉक्टर कडे complaint केली त्या डॉक्टरांनी ती नोकरी सोडून नंतर प्रामाणिकपणे आपले क्लिनिक चालवले ही गोष्ट वेगळी

शिवाय अजून एक गोष्ट तुम्हाला जेव्हा एखादा डॉक्टर दुसऱ्या डॉक्टर कडे refer  करतो तेव्हा संदर्भ दिल्याचे २०-६०% त्या डॉक्टरचे ही ठरलेले असतात काल माझ्या मित्राला ही एका डॉक्टर ने रेफेर केले होते.

वैद्यकीय क्षेत्रातील गैरप्रकाराला कारणीभूत असलेले घटक, त्यांचे असलेले हितसंबंध, लोकांचा बदलता दृष्टीकोन, त्यामुळे होणारी पेशंटची मानसिक व आर्थिक पिळवणुक यावर  हे सगळे थांबवण्यासाठी व्यापक प्रमाणात जनचळवळीची गरज आहे , मध्यमवर्गीय लोकांचा तटस्थपणा, जागतिकीकरणामुळे आलेली सुबत्ता आणि त्यातून आपण कोणत्याही सेवा विकत घेऊ शकतो असा आलेला अहंभाव मग ती वैद्यकीय सेवा असो किंवा शिक्षण क्षेत्र हे बदलण्यासाठी 'डॉक्टर-नागरीक' फोरमची गरज आहे अश्याच अनेक प्रामाणिक डॉक्टरांशी बातचीत सुरु आहे आपण काही वर्षातच हे चित्र आपण बदलू शकु।
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Source: INTERNET
-करण बायस
जि. हिंगोली

आपला आजार बरा व्हावा, आपल्याला बरे वाटावे ही अपेक्षा प्रत्येक रुग्णाची आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून असते.आपल्याला डॉक्टरांनी आपल्या आजाराबद्दल माहिती द्यावी, त्यावर नेमका उपचार काय यावर चर्चा करावी.
रुग्णालयातील सहायक, कर्मचारी, औषध विक्रेते यांच्याकडून पण रुग्णांना मदतीची अपेक्षा असते.
डॉक्टर आणि देव हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत असे समजले जाते.डॉक्टरचे नाते हे रुग्णांशी जिव्हाळ्याचे, कौटुंबिक,संबंध चांगले निर्माण करणारे असावे.आजकाल बऱ्याच दवाखान्यात रुग्णांना एक गिऱ्हाईक म्हणून बघितले जाते आपला धंदा कसा वाढवता येईल याकडे बऱ्याच डॉक्टरांचं लक्ष असते.बऱ्याच वेळा आपण बातमी वाचतो अमुक अमुक दवाखान्यात मृत रुग्णावर उपचार केले म्हणून, कधी वाचतो ऑपरेशन करून एक किडनी काढून घेतली ,डॉक्टरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग रुग्णाच्या स्वस्थ आरोग्यासाठी करावे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Source: INTERNET
-वाल्मीक फड नाशिक

मि एका कार्यक्रमात व्यस्त असल्याने फक्त दोन तीन ओळी लिहीतोय माफी असावी .
डाॕक्टरांनी फक्त एवढा विचार करावा की,लोक आपल्याला देव मानतात म्हणून आपण त्यांना ऊलटसुलट काहीही सांगुन फसवू नये कारण आजारी पेशंटचे घरातील सर्व लोक हे अक्षरशः वेडे झालेले असतात .सगळेच डाॕक्टर सारखे नाहीत.तरी पण .....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************