द ग्रेट इंडियन किचन


किरण पवार,औरंगाबाद

            नुकताच सर्वांच्या भेटीला ओटीटी प्लॅटफॉर्मवरून आलेला "द ग्रेट इंडियन किचन" हा सिनेमा एका अर्थाने चुकीच्या रूढीपरंपरा, चुकीचे समज या सर्वांवर चांगलीच चपराक मारून जातो असं म्हणता येईल. या सिनेमातील बारकावे अगदी मनाला विचार करायला भाग पाडून जातात. लेखक आणि दिग्दर्शक असलेल्या बेबी याने हा सिनेमा एका साध्या माध्यमात बांधून तो इतका परिपूर्ण पद्धतीने पडद्यावर उतरवला आहे, की सिनेमा पाहताना अक्षरश: दैनंदिन जगण्यातली अडगळ समोर दिसत आहे असा भास होतोच. या सिनेमाची सुरूवात ज्या गाण्याने होते, ते गाणचं मनात लगेच घर करून जातं. सुरूवातीच्या काही क्षणापर्यंत सिनेमाच्या विषयाची खास ओळख होत नाही किंबहुना आपण लावलेला अंदाज चुकतो. पण जे घडतं ते अगदीच मनाला स्पर्शून जातं. आज तमाम स्त्रीची कुटुंबातील भुमिका आणि तिचं वास्तविक जगणं काय आहे? याची घालमेल या सिनेमाने समोर मांडली. मी बऱ्याच दिवसांपासून हा सिनेमा पहायची वाट पाहत होतो आणि काल एकदाचा पाहिला. या सिनेमाने हळूवाररित्या अनेक पैलू उलगडले. मी सिनेमाची मजा किरकिरी व्हावी असा काहीच क्लू देत नाही परंतु काही ठराविक छोटेछोटे मुद्दे आहेत ज्यावर भर दिला गेला पाहिजे. जसं की, या सिनेमातील नायक - नायिका अर्थात नवरा- बायको संभोग होताना एक मुद्दा फोरप्ले या गोष्टीवरून जो साधा संवाद घडतो, तो बऱ्याच अनुषंगाने विचार करायला भाग पाडतो. दुसरा मुद्दा म्हणालं तर, बायकोला सॅनिटरी पॅड हवे असतात ती तसं नवऱ्याला सांगते तेव्हा त्याचे ते शब्द ऐकल्यावर एकदम पहिले चेहर्‍यावरील हावभाव. तिसरा मुद्दा म्हणालं तर शिवताशिवत ज्याला म्हटलं जातं. स्त्री तिच्या पिरियड आलेल्या काळात घरात कुठल्या महत्वाच्या गोष्टींना शिवायला तिला नकार दिला जातो, तिच्याशी त्या चार एक दिवसात वागणूक पूर्णत: बदलली जाते. बारकाईने लक्ष द्यायला हवा असा आणखी एक विशेष मुद्दा म्हणजे, मुलगा घरात आल्यावर आईला पाणी मागतो. आज बऱ्याच घरात असं पाहिल्या जातं, मुलगा असेल तर त्याची प्रत्येक गोष्ट घरचे ऐकतात किंबहुना सवय अशी लावल्या जाते की, तो मुलगा आहे त्याने जेवताना स्वत: पाणी नाही घेतलं तर बहिणीने द्यावं, तो मुलगा त्याला घरात हवी ती गोष्ट त्याने मागितली तर जाग्यावर मिळाली पाहिजे. हे आज प्रत्येक घरात घडतं फरक इतकाचं हे इतक्या सुक्ष्म आणि कळतं नकळतं घडतं की आपलं त्यावर फारसं लक्ष लागत नाही आणि आपण त्यावर विचारही करत नाही. खरतरं मला या सिनेमातले अनेक बारकावे आवडले आहेत, काही निवडक मी इथे मांडले. तुम्ही आवर्जून हा सिनेमा पहायला हवा आहे.


स्वयंपाकघरातील कोंडलेल्या व्यवस्थेचा अंधार…


प्राजक्ता हरदास.

सोशल मीडियावर या मल्याळम चित्रपटाबाबत प्रत्येकजण त्याच्या अनुभवानुसार व्यक्त होतोय...अनेकांकडून हा चित्रपट आवर्जून पाहा असा सल्ला दिला जातोय...हे सगळं ऐकून, पाहून काल हा चित्रपट पाहिलाच...


चित्रपट पाहिल्यानंतर काही काळ ' स्त्री जन्मा ही तुझी कहाणी' या उक्तीचीच आठवण झाली...कारण 'कोणतीही स्त्री जन्माला येत नाही, तर ती घडवली जाते'. हे फ्रेंच विचारवंत सिमॉन द बोव्होआर यांनी आपल्या 'सेकंड सेक्स' या पुस्तकात लिहून ठेवलंलं वाक्य डोळ्यासमोरून तरळू लागलं. हेच वाक्य पुरुषाबाबतही आपण म्हणू शकू की कोणताही मुलगा पुरुष म्हणून जन्माला येत नाही तर पुरुष असा असायला हवा, असं त्यावर बिंबवलं जातं. हे संदर्भ इथे लिहिण्याचं कारण की संपूर्ण चित्रपटात समाजात अजूनही रुतून बसलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीचा चेहरा प्रत्येक दृश्यात सतत डोकावताना दिसतो. चित्रपटाची पार्श्वभूमी ही केरळातील आहे. केरळमध्ये साक्षरतेचं प्रमाण अधिक असताना जर तेथील स्त्रीची हि व्यथा असेल तर उत्तर भारतात आणि उर्वरित ठिकाणी या चित्रपटाचा संदर्भ किती चपखल आहे हे ध्यानात येतं.


(खाली मी जे लिहिणार आहे ते सगळ्याच पुरुषांना लागू होत नाही...कारण असे अनेक पुरुष, नातेवाईक, मित्र माझ्या आजूबाजूला आहेत जे आज या मानसिकतेच्या, या सामाजिक दबावाच्या पलीकडे जाऊन विचार करतात. त्यांच्या आयुष्यातील स्त्रियांचं महत्त्व जाणतात. एकमेकांच्या साथीने उभे राहतात. त्यामुळे यात पुरुषप्रधान असा उल्लेख असला तरी तुम्हाला दुखावण्याचा प्रश्नच नाही!)


र ही गोष्ट एका केरळमधील कुटुंबातील आहे. केरळमधीलच नाही तर भारतातल्या बहुतांश घरातली आहे. प्रत्येक भारतीय कुटुंबातील स्वयंपाक घरातली स्त्रीच्या आयुष्यातील रोज न चुकता घडणारी कथा. ही कथा दिग्दर्शक जिओ बेबी यांनी अत्यंत साध्या शैलीत मात्र तितक्याच चपखलपणे मांडलेली आहे. या चित्रपटात पात्रांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतकी आहे. महत्त्वाचं म्हणजे या पात्रांना नावच नाहीत. पण त्यांची चाकोरीबद्ध कामं मात्र आहेत. यावरून त्यातील सार्वत्रिकपणा दिसून येतो. यामध्ये अभिनेत्री निमिषा सज्जयन आणि अभिनेता सुरज वासुदेवन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. संपूर्ण चित्रपट स्त्रीच्या आयुष्यातील सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हात धुवून मागे लागलेल्या (काही घरातील दबावामुळे) स्वयंपाकघरावर आधारलेला आहे.


चित्रपटाच्या सुरवातीला नायिका अगदी एकाग्रपणे नृत्याचे धडे गिरवताना दिसते. आणि त्याला समांतर अशा पद्धतीने विविध चविष्ट पदार्थ तयार करून टेबलावर मांडले जात आहेत, अशी दृश्यं समोर येतात. लगेचच मुलगा-मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आणि पुढे त्यांचं लग्न अशा घटना घडत जातात. तिचं लग्न होतं आणि समोर उभं राहतं 'द ग्रेट इंडियन किचन.'  घड्याळाच्या काट्यावर, घरच्यांच्या मर्जीवर चालणारं...! मग उठल्यापासून सुरू होतं तिचं रोजचं चक्र. भिजवणे, चिरणे, वाटणे, आंबवणे, निवडणे, फोडणीला घालणे, पदार्थ टेबलावर मांडणे, टेबल स्वच्छ करणे, भांडी घासणे, केर काढणे, खरकटे साफ करणे, इत्यादी इत्यादी. ही कामाची यादी आजच्या दिवशी संपली तर पुढच्या दिवशी पुन्हा आ वासून समोर उभीच असते. मात्र तरीही ती हे सगळं तिची जबाबदारी - कर्तव्य म्हणून निभावत असते.


ती हे सगळं घरच्यांसाठी करत असताना तेव्हा तो मात्र स्वतःचं आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी छान व्यायामाने दिवसाची सुरुवात करतो. तर त्याच्याच दुसऱ्या बाजूला घरातील ज्येष्ठ म्हणवणारे तिचे सासरे पेपर वाचत, मोबाईल पाहत निवांत बसलेले असतात. त्या सासरेबुवांना त्यांच्या पत्नीने इतकं सगळं हातात आणून द्यायची सवय लावलेली असते की सकाळी टूथपेस्ट लावलेला आयता ब्रश बायकोने आपल्या हाती द्यावा अशी त्यांची अपेक्षा असते. बायको ते न चुकता करतेही, हे विशेष! या दोघा पुरुषांचे हे वैयक्तिक कार्यक्रम आटोपले की ते टेबलावर येऊन बसणार आणि मग त्या दोघांना सासू - सुनेने गरमागरम बनवलेलं अन्न वाढत जायचं. आणि त्यांचं खाऊन झाल्यावर, ते दोघेही आपापल्या कामाला गेल्यानंतर सगळ्या टेबलभर अधाश्यासारखा खाऊन खरकटं पसरवलेल्या त्या जागी बसून मग दोघी सासू - सुनेने जळलेलं - उरलेलं अन्न आपल्या पोटात टाकायचं. त्यानंतर ते तुंबलेलं सिंक हात घालून साफ करायचं, खरकटी भांडी साफ करून सगळं स्वयंपाकघर झाडूनपुसून चकाचक करायचं. असं दिवसभराचं चक्र. ते चक्र संपत नाही तोवर रात्री नवऱ्यासाठी हजर राहायचं. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या उत्साहाने याच रहाटगाड्यात दिवस काढायचा.  


एकंदरीत रोज घडणारं हे त्या कुटुंबातील चित्र. ही दृश्य चित्रपटात इतक्या वेळा दाखवलीयत की पाहणाऱ्याला एका क्षणानंतर कंटाळा येऊ लागतो. आणि तिथेच दिग्दर्शकाचा चित्रपटामागचा हेतू साध्य होतो असं मला वाटतं. कारण जर प्रेक्षकांना ही दृश्ये पाहताना कंटाळा येत असेल, चीड येत असेल तर दिवसरात्र त्या स्वयंपाक घरात राबणाऱ्या तिची काय अवस्था होत असेल याचा विचार प्रत्येक सद्सदविवेक बुद्धी असणाऱ्याने करायला हवा.


सासूची भूमिका यात खूप सपोर्टिव्ह आहे. मात्र सासू जेव्हा मुलीच्या बाळतंपणासाठी जाते तेव्हा संपूर्ण घराची जबाबदारी एकट्या नायिकवेवर येऊन पडते. तरीही ती त्या सगळ्या जबाबदाऱ्या चोख निभावताना दिसते. पण तरीदेखील तिच्या त्या कष्टाचं मोल ठरत नाही. सासू मुलीकडे गेल्यावर सासऱ्यांना पायात घालण्यासाठी हातात आणून द्यावी लागणारी चप्पल हे दृष्य तर झेपेना. मात्र आजही काही घरात अशी स्थिती आहे हे नाकारून चालत नाही.


एका सुशिक्षित घरातून आलेली ती या घरात आधुनिक साधनांचा वापर करते तेव्हा परंपरा - रूढी मानणाऱ्या सासऱ्यांचा जो काही चेहरा असतो तो न पाहवणारा आहे. तिच्या बदलाच्या कृतींना नाकारलंच जातं. त्यांचं म्हणणं असतं अन्न वाटायचं ते पाटा - वरवंट्यावर, कपडे धुवायचे ते हातानेच, भात हवा तो चुलीवरचा, अन्न हवं ते ताजं शेगडीवरून ताटात पडलेलं गरमागरम स्वादिष्ट. मग अशा ठिकाणी तिच्या मिक्सर, कुकर, फ्रीज, वॉशिंग मशीन या घरात उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करणंही मूर्खपणाचं ठरतं.


जेव्हा दोघं नवरा - बायको हॉटेलात जातात तेव्हा नवरा अगदी शिस्तीत व्यवस्थित एका प्लेटमध्ये खरकटं टाकतो, तेव्हा नायिका मॅनर्सबद्दल (शिष्टाचार) बोलल्यावर नायकाचा दुखावलेला पुरुषी अहंकार आपल्याला विचार करायला भाग पाडतो. मग जरी तिचं म्हणणं बरोबर असलं, तरी मग त्यावरून बसता - उठता ऐकवले जाणारे टोमणे दुखावलेल्या त्या पुरुषी मानसिकतेचं दर्शन घडवतात. मग पुन्हा त्याने चांगलं बोलावं - वागावं यासाठी मग तिलाच करावी लागणारी विनवणी, मग लाडानं सॉरी म्हणवून घेणं या सगळ्यात त्या दुखावलेल्या अहंकारी मानसिकतेचं दर्शन स्पष्टपणे दिसतं.


मासिक पाळी या स्त्री संबंधित महत्त्वाच्या असणाऱ्या विषयावरही चित्रपटात जे काही समाजाच्या मानसिकतेत असलेलं मागासलेपण दाखवलंय ते वेदनादायी आहे. सात दिवस वेगळं बसणं, कोणत्याही गोष्टीला हात न लावणं, दूर कोणाच्याही नजरेला पडणार नाही अशा ठिकाणी आपले कपडे वाळत घालणं, तुळशीला हात न लावणं हे सगळे संदर्भ तिथे पाहताना त्रासदायक वाटत असले तरी आजही २१ व्या शतकात ते दिसून येतात हेही सत्य आहे. मासिक पाळी म्हणजे अपवित्र मानणारा वर्गही आहे, हे नाकारणं मग चुकीचं ठरत नाही. अशी असंख्य घरं आजही दृष्टीस पडतात.


आणखीन एक यात प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे पावित्र्य - अपावित्र्याच्या चक्रात एका स्त्रीच्या गैरहजेरीत दुसऱ्या स्त्रीलाच ही सगळी जबाबदारी अंगावर घ्यावी लागते. पुरुष त्याच्याकडे वेळ असूनही ती जबाबदारी अंगावर घेत नाही. त्याला ही कामे त्याचीदेखील आहेत असं कधी वाटतंच नाही, हे मात्र दुःखद आहे.


या प्रसंगांमध्ये मोलकरणीचं पात्र विशेष ठरतं. तिचं स्वातंत्र्य नायिकेच्या तुलनेत अधिक असलेलंच पाहायला मिळतं. मोलकरणीची वाक्यं त्या दोघींच्या संवादात चपखल बसतात. "मला मुलांचा सांभाळ करण्यासाठी माझी कामं करावीच लागतात. मी मासिक पाळीत असतानाही इतरांच्या घरी जाऊन सगळी कामं करतेच." असं म्हणून ती भूक भागवण्यासाठी गरजेचं असलेलं परिस्थितीचं गांभीर्य रूढींच्या पलीकडे जाऊन आपल्या समोर मांडते. 


तसंच यात समाजशास्त्राचा शिक्षक म्हणवणारा, कुटुंब - घर यांसारखे विषय शिकवणारा तिचा नवरा जर स्वतःच इतका मासिक पाळी या विषयाबाबत विचारांनी मागास असेल तर त्या मुलांना कुटुंब आणि समाज याचे धडे तो काय देत असेल यावरच प्रश्नचिन्ह माझ्या मनात निर्माण होतो. तसंच या साऱ्याबाबत स्वतःच्या आईला जेव्हा ती हे सगळं सांगते. तेव्हा "सासरच्यांच्या आज्ञेचं पालन कर. ते म्हणतायत तसंच वागत जा." हे शब्द सामाजिक दबावाला बळी पडलेल्या आपल्या समाजाचं दर्शन घडवतात. 


मुलीला लहानपणापासूनच पालक आपली मुलगी म्हणून नाही तर परक्याच्या घरची सून म्हणूनच घडविण्याचा प्रघात निर्माण करत असतात. असंच बसायचं, असंच करायचं, जेवण करता नाही आलं तर नवऱ्याला काय जेवू घालणार, अशीच वागत राहिलीस तर सासरचे काय म्हणतील? हे बोल प्रत्येक मुलीला आजही ऐकावेच लागतात. तिचं शिक्षण हे सासरी मुलांना शिकवण्यासाठी कामी येणं गरजेचं वाटत असतं, बाकी अजून विशेष काही नाही. यात तिने स्वतःसाठी सक्षम व्हावं हा हेतू नसतो तर सासरच्यांकडे गेल्यावर काय? हीच मानसिकता आजही अधिक दडलेली दिसते.


सबरीमालाचा आलेला संदर्भही इथे महत्त्वाचा आहे. नवरा आणि सासरे सबरीमालाचं व्रत करतात. या काळात स्त्रीचं दर्शन आणि स्पर्श चालत नाही म्हणणारे पुरुष तिने बनवलेलं अन्न मात्र मिटक्या मारत खातात. इथे आलेला सबरीमाला मंदिर प्रवेशाचा संदर्भ, ज्या महिलेने व्हिडीओतून आवाज उठवला तेव्हा तिला सहन कराव्या लागणाऱ्या यातना पाहिल्या की सावित्रीबाईंना मुलींच्या शिक्षणासाठी प्रत्यक्षात झेलाव्या लागणाऱ्या दगड - शेणाच्या माऱ्याचा संदर्भ डोळ्यासमोर येतो.


घरातील या सगळ्या जुलमी प्रवृत्तीतून ती नायिका मुक्त होण्याचा प्रयत्न करते, मुक्तपणे विचार करण्याचा प्रयत्न करते तेव्हा पुरुषी अहंकार दुखावला जातो. "तुला घरात राहायचं असेल तर व्हिडिओ डिलीट कर" असा धमकीवजा आदेश नवरा जेव्हा तिच्यावर सोडतो, तेव्हा आजच्या काळातील स्त्री अत्याचाराची - तिचा आवाज सतत दाबून ठेवणाऱ्या सामाजिक मानसिकतेची दाहकता दिसून येते. 


ती जेव्हा काम करण्याचं म्हणते, तिला नृत्य शिक्षिका होण्याची संधी मिळते तेव्हा हे आपल्या घराला साजेसं नाही, स्त्री म्हणजे घरातली लक्ष्मी असते. तिने मुलांचा सांभाळ करावा असा सल्ला तिचे सासरोबा तिला देतात. "माझी बायकोही पोस्ट ग्रॅज्युएट होती पण तिनेही काम नाही केलं. मुलांचा सांभाळ केला म्हणून बघ आज सगळी आमची मुलं चांगल्या मार्गाला आहेत." असं सगळं बोलून तिला दाबण्यात येतं. गोड बोलून वेळ पुढे ढकलली जाते. तिच्या स्वप्नांना - पखांना वेळोवेळी छाटलं जातं. 


जेव्हा या सगळ्या घटना - हे सगळं रोजचं जगणं तिला असह्य होतं, तेव्हा तिचा संताप त्या ड्रेनेजमधल्या संपूर्ण चित्रपटात थेंब - थेंब करत साठून राहिलेल्या बादलीतल्या दोन्ही पुरुषांच्या तोंडावर फेकून मारलेल्या पाण्यातून व्यक्त होताना दिसतो. फँड्रीतल्या व्यवस्थेवर मारलेल्या दगडाप्रमाणे !


या सगळ्या बंधनातून मुक्त होऊन जेव्हा ती रागारागाने घराबाहेर पडते तेव्हा स्वच्छ निर्मळ वातावरणात चालताना डावीकडे 'डेमॉक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया' या संस्थेचा एक बॅनर दिसतो. थोडी पुढे चालत नाही तर काळया कपड्यात धार्मिक कार्यक्रमांसाठी देणग्या मागणारे लोक जप करत बसलेले दिसतात...ही दोन्ही चित्रं विरोधाभासी दाखवली असली तरी आजचं वास्तव मांडणारी ठरतात. या दोन्ही गोष्टींत विचारांची तफावत असली तरी समाज हा याच टोकांनी सर्वस्वी बनलेला आहे हे आपल्या ध्यानात येतं. या सगळ्यातून मात्र ती तिच्या स्वप्नांच्या - आकांशांच्याच दिशेने मार्गक्रमण करते.


शेवटी जेव्हा नायकाचा स्वयंपाक घरातला शॉट आणि एक स्त्री असतानाचं दृश्य दाखवलंय तेव्हा सकारात्मक बदल घडलाय असं मनात क्षणात वाटत असताना एक नवा ट्विस्ट इथे दिसून येतो. जेव्हा एक सोन्याने मडलेली वेगळीच स्त्री त्या कोंडलेल्या स्वयंपाकघरातील पेला विसळताना दिसते तेव्हा आपल्या व्यवस्थेचा चेहरा खऱ्या अर्थाने तिथे प्रतिबिंबित होतो. म्हणजेच काय पुरुषप्रधान संस्कृती मान्य असलेली स्त्री त्याला इथे सहज भेटते. मात्र ही संस्कृती अन्यायकारक असून त्यात स्वतःत बदल घडविणारा नवरा मात्र तिला पुन्हा भेटत नाही. याचाच अर्थ बदलाचे वारे सहजासहजी वाहत नसतात, हे त्या शेवटच्या क्षणांतून प्रकर्षाने जाणवतं. 


आणि जिथून लग्नापूर्वी नायिकेच्या नृत्याच्या आवडीने चित्रपटाची सुरुवात दिग्दर्शकाने केलेली असते त्याच नृत्यापाशी येऊन शेवट होतो. मात्र वेगळ्या ढंगात - वेगळ्या आवेशात. इथे शूज आणि गाडी चालवत तिने नृत्याच्या तिच्या क्लासमध्ये केलेली एंट्री प्रभावी ठरते. त्या नृत्यातील तिच्या दिग्दर्शनात जी साखळ्यांच्या बंधनात असलेली मुलगी आधी तिने दाखवलीय, ती जेव्हा खुर्चीत मोकळेपणाने पायावर पाय रोवून बसताना दाखविण्यात येते, तेव्हा ते चित्र प्रचंड सकारात्मक आणि आशावादी स्वरूपाचं वाटतं! या चित्रपटात कोणीच खलनायक नाही. मात्र पुरुषप्रधान व्यवस्था या चित्रपटात खलनायकाची भूमिका बजावते. असे एक नाही तर असंख्य आपल्या सामाजिक व्यवस्थेतले संदर्भ जिओ बेबी यांनी आपल्या प्रभावी दिग्दर्शनाने प्रेक्षकांसमोर ' द ग्रेट इंडियन किचन ' च्या माध्यमातून मांडले आहेत. त्यामुळेच हा चित्रपट अनेकांना आपल्या रोजच्या जगण्यातील फ्रेम्सना साचेबद्ध रचनेत कैद करून मांडलेला चित्रपट वाटू लागतो. 


तर स्त्रियांनी हा चित्रपट जरूर पाहावाच मात्र प्रत्येक पुरुषाने हा चित्रपट पाहायला हवा. तेव्हाच खऱ्या अर्थाने चित्रपटामागचा हेतू सार्थकी लागेल. आणि मग आपण स्त्री - पुरुष यापलीकडे जाऊन माणूस म्हणून एकमेकांना पाहू लागलो की काय मग जग जिंकलंच. घरातील कामांच्या जबाबदाऱ्या एकमेकांचा आदर करत वाटून घेऊ लागलो, एकमेकांना साथ देत पुढे जाऊ लागलो तर हे सगळे प्रश्न निर्माण होण्याआधीच मग सुटतील की. मात्र या साऱ्या बदलाची अपेक्षित सुरुवात आपल्याला फक्त ती स्वतःपासून करावी लागणार आहे. स्त्री - पुरुष समानतेचे धडे केवळ शाळेतील पुस्तकात, कागदावर न नाचवता अशा चित्रपटांतून पुन्हा पुन्हा चर्चेत आणल्यास हळूहळू का होईना हा अपेक्षित बदल घडेल याची खात्री वाटते.

(चित्रपट अमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे.)


मयुर डुमणे,उस्मानाबाद

या चित्रपटातुन एक अत्यंत महत्वाचा विषय प्रभावीपणे मांडला आहे. त्यामुळे या विषयावर आपल्या ग्रुपमध्ये चर्चा व्हावी, ग्रुपच्या सदस्यांनी हा चित्रपट आवर्जून पहावा यासाठी हा विषय निवडला.  सोशलमीडियामुळं या महत्वाच्या चित्रपटाकडे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं. चित्रपटातील भाषा जरी समजत नसली तरी चित्रपटातील दृश्ये बरीच बोलकी आहेत. त्यामुळे भाषा समजत नसताना देखील चित्रपट सहज समजून जातो. वर्षानुवर्ष चालत आलेल्या पुरुषत्ताक व्यवस्थेचं चित्रण चित्रपटात मांडण्यात आलंय. या पुरुषसत्ताक व्यवस्थेने बाईला बंधनातून अडकवून ठेवलंय. तिने लग्न करावं, नवऱ्याला खुश ठेवावं, स्वयंपाक करावा, घर सांभाळावं. या पारंपरिक चौकटीत अडकून पडलेल्या तिला मुक्तपणे फुलताच येत नाही. तिच्या इच्छा, आकांक्षा या पुरुषसत्ताक व्यवस्थेने दाबून ठेवल्या आहेत. रात्री नवऱ्याचे धक्के सहन करायचे, सकाळी लवकर उठायचं, स्वयंपाकाची तयारी करायची, जेवण टेबलवर नेऊन वाढायचं, खरकट उचलायचं, त्यांचं जेवण झाल्यावर मग आपण जेवायचं, डब्बा भरून द्यायचा, भांडी घासायची, धुणी धुवायची. असा हा दिनक्रम. म्हणजे तिला एखाद्या नोकरासारखं राबवून घ्यायचं. तिचा स्वाभिमान वेळोवेळी ठेचायचा. तिची सासू हिला घरचे नियम समजावून सांगते. सासू देखील पुरुषसत्ताक व्यवस्थेची वाहक कशी आहे हेच चित्रपटातुन सांगितलंय. तिला नोकरीचं ऑफर लेटर आल्यावर सासरा म्हणतो नोकरी करायची नाही. माझी बायको पण ma शिकलीय. बघ कशी घर सांभाळतीय. नवऱ्याकडे गेल्यावर नवरा म्हणतो आपलं लग्नाआधीच ठरलं होतं.तू नोकरी करणार नाही. चित्रपटातील दृश्य फार बोलकी आहेत. एकीकडे ती किचनमध्ये सकाळी घाम येईस्तोवर राबतेय तर दुसरीकडे नवरा मस्त व्यायाम करतोय, सासरा खुर्चीवर बसून पेपर वाचतोय. हे आपल्या समाजातील सगळीकडेच कॉमन दृश्य. पण कहर म्हणजे इतकं सगळं करूनही हे पुरुष वरून बायांना आदेश सोडतात. या चित्रपटातील सासऱ्याला चुलीवरचा भात पाहिजे असतो. गॅसवर शिजवलेला भात आवडत नाही. मासिक पाळी, सेक्स या गोष्टींवर खुलेपणाने आपण व्यक्त होत नाही. हा विषय देखील चित्रपटात हाताळलाय. गाडीवरून खाली पडलेल्या नवऱ्याला ती धावतपळत जाऊन उचलायचा प्रयत्न करते तर नवरा तिला झिडकारतो, बाजूला हो म्हणतो का तर तिला मासिक पाळी सुरू आहे. कहर म्हणजे मासिक पाळी सुरू असणारी बायको आपल्याला शिवली म्हणून हा पवित्र होण्यासाठी नदीत अंघोळ करतो. हा नवरा शाळेत शिक्षक आहे. विद्यार्थ्यांना समाजशास्त्राचे धडे देतो.  ती फक्त फोरप्लेची मागणी करते तर ते देखील त्या नवऱ्याला सहन होत नाही. घरी जेवण करताना कसलेही नियम न पाळता खरकट टेबलावर सांडणारा नवरा बाहेर हॉटेलमध्ये गेल्यावर मात्र खूप शिस्तीत जेवण करतो. टेबलावर सांडत नाही. असंच तुम्ही घरी का जेवत नाही असं विचारल्यावर हा गडी म्हणतो ते माझं घर आहे मी कस पण जेवेल तू मला नको शिकवू. थोडक्यात चित्रपटात दांभिक पुरुषी मानसिकतेला वारंवार उघड पाडलंय. भांडी धुवायचं बेसिन ब्लॉक झालंय त्यामुळे तिला वारंवार त्रास होतो. ती सतत नवऱ्याकडे प्लम्बर बोलावण्याची मागणी करते. पण हा नवरा याकडे दुर्लक्ष करत राहतो. याला किरकोळ बाब समजतो.  तो फक्त स्वतःच्या भावनांचा गरजेचा विचार करतोय. आपल्या बायकोला सॅनिटरी पॅड सुद्धा आणून देणं त्याला मुळावर येतं. शेवटी बेसिनमधलं साठलेलं घाण पाणी ती नवरा आणि सासऱ्याच्या तोंडावर मारते आणि तट घराचा निरोप घेते. ती स्वतःच्या घरी जाते मात्र तिथेही तिला सांगण्यात येतं. माफी माग त्यांची. आणि परत तिकडेच जा. एकूणच पुरुषत्ताक व्यवस्थेत महिलांची  घुसमट कशी होतेय हे प्रभावीपणे चित्रपटात मांडलंय. शेवटी ती या सगळ्या पुरुषसत्ताक व्यवस्थेला धुडकावून लावत डान्स क्लास घेते. स्वतःच्या पायावर उभा राहते.हा शेवट भावतो. हा चित्रपट असा आहे की यातील प्रत्येक प्रसंगावर जितकं लिहिलं तितकं कमीच आहे. म्हणूनच प्रत्येकाने हा चित्रपट पाहिला पाहिजे.




कोरोना: वाढती बेरोजगारी व नैराश्य. (भाग-3/3)


अनिल गोडबोले,सोलापूर

लॉक डाउन, नवीन स्ट्रेन, वाढत जाणारे संसर्गाचे आकडे, लोकांचे होणारे मृत्यू आणि लसीचे राजकारण या गोष्टी एका बाजूला आहेत तर दुसऱ्या बाजूला व्यापार, काम, पैसा करिअर, संधी  सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आशा.. या बाबतीत उदासीनता येत आहे.


लोक जगले तर व्यापार होईल असं सरकार म्हणत आहे व्यापारी म्हणतात की "कोरोना येईल जाईल पण जी मंदी येईल त्यात कोणीही राहणार नाहीत"


खर काय आणि खोट काय..! काहीच कळत नाही


यामुळे येत आहे प्रचंड निराशा त्याच्या पाठोपाठ येत आहे उदासीनता..  वाढत जाणारे आत्महत्येचे आकडे..


तरुणांच्या देशात तरुण मानसिक दुर्बल होणे ही अत्यंत वाईट गोष्ट आहे..


पण सर्व मित्रांनो आणि मैत्रिणींनो .. आज आपल्याकडे लढण्याशिवाय पर्याय नाही. सरकारला किंवा कोणालाही दोष देत बसलात तर नुकसान जास्त होईल..


काळ कठीण आहे खरा... पण संघर्ष करणे आपल्या हातात आहे.. अजिबात निराश न होता.. मानवी मेंदूने विचार करा.. मानवतेच्या भावनेने विचार करा.. 


आपण नक्की जिंकू .. हा आत्मविश्वास बाळगण्याची गरज जास्त आहे..


राजकारणी ,मीडिया, व्यवस्था यांचे पूर्णपणे धिंडवडे निघाले आहेत.. न्यायव्यवस्था तोकडी आहे.. 


आपण आपला मार्ग शोधावा, 'मला असच जगायचं आहे..!'हा हट्ट सोडून नवीन कौशल्य, नवीन ज्ञान, नवीन काम शोधावे..


जीवन अमूल्य आहे.. ते जाणून घेऊन आपण आपला बचाव करणं आणि पुढे जाण आपल्या हातात आहे.. 


स्वतःला संसर्ग होऊ देणार नाही.. माझ्यामुळे संसर्ग वाढू देणार नाही.. एवढी काळजी घेऊन आजचा काळ आपण काढला तरी येणाऱ्या काळात आपण नक्कीच पुढील जीवन जगू शकतो...


हारा वही जो लढा नहीं.. एवढंच लक्षात ठेवा आणि निराशेतून बाहेर या... दुसर्यानाही मदत करा.. मानवतेचाच विजय होईल याची खात्री मला आहे.


सौरव दुर्गेकार,अमरावती

गात जेव्हा जेव्हा मोठी संकटे आली होती तेव्हा तेव्हा जुन्या गोष्टी लयास जावून नव्या गोष्टी उदयास आल्या. निसर्गाचा नियमच आहे, “फक्त मजबूत असणारच जगेल (survival of thefittest)”. ज्यांनी काळाशी जुळवून घेतल ते टिकणार ज्यांनी बदल स्वीकारला नाही त्यांना निसर्गाने स्वीकारलं नाही. जर डायनासोर सारखे महाकाय प्राण्यांवर जर वाईट दिवस आलेच नसते तर लहान प्राणी आणि आपण तयार होऊन पृथ्वीवर नसतोच दिसलो.


माझ्या घराजवळील उदाहरण सांगतो,"अनंता दादा जो गेली 5 वर्षे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होता त्याने कोरोना आल्यावर आपल्याला नोकरी मिळणार नाही हे समजताच गुरांच्या पौष्टिक खाद्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला, त्यात यश मिळवून आज त्याने स्वतःच पक्क घर पण बांधलं. जर कोरोना आलाच नसता तर त्याला समजलच नष्ट की रोजगाराचे अन्य मार्ग पण आहेत. त्याने आमच्या गावाची गरज ओळखली की गावात हे हे उपलब्ध नाही हे उपलब्ध करून देवू...”

 

नैराश्य, त्याच्यासाठी ज्याने आलेल्या संकटाला आपला शेवट समजला, पुनर्जन्म, ज्याच्यासाठी ज्याने संकटाला सामोरे जाण्याची तयारी दाखवून नवीन संधी निर्माण करून संधीच सोनं केलं त्यांच्यासाठी.


बेरोजगारी नक्कीच वाढली. माझा मामा, ज्याच एक उपहारगृह आहे, पूर्वी त्याच्याकडे कामाला 13 माणसे होती, तेच कोरोणा नंतर 5, माणसांना द्यावा लागणारा पगार कमी झाल्याने कमाई खूप वाढली. जी पाच उरली आहे त्यांना चांगला पगार आहेच पण ज्यांना काम सोडावं लागलं त्यांच्या पोटावर पाय. मामा आणि असेच अनेक उद्योजक, दुकानदार तरी काय करणार, आता जास्त लोकांची गरज नाही म्हणून त्यांना काढावच लागेल. 


जे काही होत ते चांगल्यासाठीच होत, या दृष्टीने बघितलं तर सगळ्यांना अशक्य वाटणारं ऑनलाइन शिक्षण या कोरोनाने आणून दाखवील, या क्षेत्रात जुन्या नोकऱ्या गायब करून नवीन नोकऱ्या आल्या. शाळेचं उदाहरण बघितल तर, घंटा वाजविणाऱ्या मामाच्या जागी आता एसएमएस वर remainder पाठवणे हे एक काम आलं, साफसफाई करणे याच्या जागी फाईल्स आणि व्हिडिओ जंक काढून व्यवस्थित बॅकअप तयार करणे, म्हणजे आताचं सफाईच काम बनलं. असच सगळ्या कामा कडे बघता येईल. 


तरुण नेहमी शोक व्यक्त करायचे की जुने लोक नोकरीवरून. निघणार नाही तर आम्ही नोकरी करणार कोठे? घ्या तुमचं काही काम कोरोना ने करून टाकलं. नवीन जगाला लागणारे नवीन कौशल्य शिका, नाहीतर काही खर नाही ब्वा….


संगीता देशमुख,वसमत

कोरोना हा आजार किती वास्तव आहे,हे माहीत नाही,परंतु त्याच्या आधारावर देशात जे राजकारण सुरू झालंय ते मात्र अत्यंत जीवघेणे आहे. आज आजूबाजूला परिस्थिती एवढी भयावह झाली की,आता जिवंत राहण्यासाठी माणूस धडपडतोय.कोरोना हा आजार किती वास्तव आहे,हे माहीत नाही,परंतु त्याच्या आधारावर देशात जे राजकारण सुरू झालंय ते मात्र अत्यंत जीवघेणे आहे. आज आजूबाजूला परिस्थिती एवढी भयावह झाली की,आता जिवंत राहण्यासाठी माणूस धडपडतोय.

       वास्तव हे आहे की,मागील काही वर्षांपासून देशात नोकरभरतीच नाही.वाढती लोकसंख्या आणि शासनाची उदासीनता पहाता आजचे शिक्षण हे वांझोटे झाले आहे. त्यातून तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल,याची शाश्वती आजचे शिक्षण देऊ शकत नाही. समाज माध्यमातून तरुणांना अनेक सल्ले देण्यात येवू लागले की,नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय शोधा. मग तरुणाई काहीतरी व्यवसाय शोधात फिरू लागले. तरुणाई इतकी गोंधळलेली की,कोणता व्यवसाय सुरू करायचे म्हटले तर पुरेसे भांडवल नाही, भांडवल जमा केले तर त्याची शाश्वती नाही.सरकार उठसुठ हे विक,ते विक सुरू आहे. त्यातूनही अनेकांच्या नोकऱ्या गेल्या,ज्यांच्या टिकल्या ते अर्ध्यावर आले. यात कहर म्हणजे, कोरोनाचे जागतिक संकट!  तरुणांची होती नव्हती आशा या कोरोनाने हिरावून घेतली. तरुणांचे स्वप्न पहाता पहाता कोसळलीत. तरुण नैराश्याच्या खाईत इतके कोसळले की,तरुणांच्या आत्महत्या वेगाने वाढल्या. ते मानसिक रुग्ण होण्याचीही प्रमाण प्रचंड वाढले. तरुणांचीच बेरोजगारी हा प्रश्न नाही तर,अनेक कमावते हात याकाळात घरात लॉकडावून झाले. घरातील पोटे लॉकडावून झालीत. देशात अशी अवस्था असताना आजही सरकार लक्ष न देता निवडणुका,राजकारण यालाच प्राधान्य देत आहे. देशातील वाढती बेरोजगारी,जनतेची हतबलता,नैराश्य,हे सगळे जाणीवपूर्वक जनतेपासून लपवून जनतेची दिशाभूल केली जात आहे.

कोरोनाच्या काळात शाळा, महाविद्यालये बंद!ऑनलाइन शिक्षण हा फक्त दिखावा ठरला. सामान्य पर्यंत एकही दिवसाचे शिक्षण पोहोचलेच नाही. कारण अजूनही अशा अनेक लोकांकडे स्मार्ट फोन नाहीत आणि काहीजणांकडे आहेत त्यांच्याकडे तेवढा डेटा नाही.अनंत अडचणीतून देश जात आहे. देशात उत्तम शिक्षण(स्वावलंबी बनवेल असे) आणि प्रत्येकाच्या हाताला काम कसे मिळेल, याचे नियोजन शासनाने करायला हवे,अन्यथा देशात तरुणांचे नैराश्य व त्यातून होणाऱ्या आत्महत्या हा कोरोनापेक्षाही भयानक समस्येला देशाला सामोरे जावे लागेल. कोणत्याही सरकारचे आजची तरुणाई हे प्राधान्य असायला हवे. आज  कोरोनापेक्षाही सवंग राजकारणामुळे देशाची अवस्था आतून पोखरलेली आहे.

कोरोना: वाढती बेरोजगारी व नैराश्य. (भाग-2/3)

प्रविण दळवी,नाशिक

कोविड-१९ महामारीमुळे जगासमोर अभूतपूर्व संकट निर्माण केले आहे हे संकट अनेक पातळ्यांवर आहे. वैद्यकीय, आर्थिक, सामाजिक, मानसिक अशा विविध पातळ्यांवर मानवजातीसमोर संकट उभे राहिले आहे. कोविड-१९ महामारीचा प्रसार रोखण्यासाठी बहुतांश देशांनी लॉकडाऊनची उपाययोजना केली आहे. कोविड-१९चा प्रसार रोखणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे मात्र लॉकडाऊनमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. आर्थिक व्यवहारच थांबल्यामुळे किंवा फारच कमी प्रमाणात सुरू असल्यामुळे त्याचा विपरित परिणाम मनुष्यबळावर झाला आहे. कोविड-१९च्या संकटामुळे जगभरात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामुळे आणखी एक नवे संकट उभे राहिले आहे. काही रोजगार आतापर्यतच्या कालावधीत गेले आहेत, तर काही रोजगार आगामी काळात जाणार आहेत. कोविड-१९ महामारीला रोखण्यावर सध्या सर्वच सरकारांचे लक्ष केंद्रित झाले आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेचे चक्र मंदावण्यात झाले आहे. अलीकडच्या काळात भारतात आणि जगभरातदेखील हळूहळू लॉकडाऊनमधून बाहेर येत अर्थचक्राला चालना देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र अजूनही कोविड-१९चे गांभीर्य मोठे आहे त्यामुळे ही दीर्घकालीन लढाई आहे. दुर्दैवाने नकळत या सर्व घटकांचा दीर्घकालीन मोठा परिणाम समाजातील कमजोर घटकांवर झाला आहे त्यांच्यासमोर आगामी काळात मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्व परिस्थितीत मानसोपचार सेवा योग्यरितीने उपलब्ध होणे आणि त्यांचा सर्वसामान्यांना योग्य तो प्रतिसाद मिळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.


मीकवी,मंगळवेढा,सोलापूर

ह्या रोगराईला सामोरे जात असताना कित्येकांना आपला जीव गमवावा लागला तर कित्येकांना आपला रोजगार गमवावा लागला.मी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या उमेदवारांपैकी एक आहे.खरं तर या स्पर्धेत जागा असतात 250 आणि उमेदवार असतात 4 लाख 50 हजार.उरलेल्या  4 लाख 49 हजार 750 उमेदवारांचं काय होईल...? आता ह्या सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांना रोजगार कुठून उपलब्ध व्हायचा....


दुसरा मुद्दा :- प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत मुलांना प्रशिक्षण दिलं गेलं पण ते खरंच योग्य आणि दिशादर्शक होत का...? हा प्रश्न मुळात मला सतावतो.


कोरोनाच्या काळात ना परीक्षा झाल्या ना कोणता रोजगार भेटला... मग आपलं जीवन जगायचं कस हा प्रश्न वारंवार आजच्या युवकाला पडतो....खरं तर याच प्रभाव उभरत्या भारतातील युवकावर पडत आहे.ना रोजगार उपलब्ध ना रोजगारक्षम मार्गदर्शन वा शिबिर. 


वाढतं नैराश्य :- जर रोजगार नसेल तर प्रत्येकजण तणावाखाली येणार हे साहजिकच आहे.आजचे युवक म्हणजे वय 18 ते 35 च्या आतील सर्व जण नैराश्याने जगत आहेत....एकीकडे कोरोना तर दुसरीकडे कोरोनाच्या प्रभावाने कमी होत असलेल्या नोकऱ्या.नैराश्याची अनेक कारणे येतात परंतु बेरोजगारी हे प्रमुख कारण आजकाल दिसत आहे.यावर उपाय सापडेल अस मला वाटत नाही...२०२७ पर्यंत भारत लोकसंख्या बाबतीत जगात एक नंबर होईल तेव्हा बेरोजगारी अजून कोणत्या थरापर्यंत जाईल हे अंदाजही लावू शकत नाही.


शुभम देशमुख,नांदेड़.

कोविड-१९ महामारीमुळे जगासमोर अभुतपुर्व संकट निर्माण झाले आहे. या महामारीमुळे आनेक क्षेत्र माघे पडले आहेत. आनेक बाबींवर याचा गंभीर असा परिणाम दिसून येत आहे, ज्यामध्ये आर्थिक, मानसिक, वैधकीय, सामाजिक आशा आनेक बाबी आहेत. मानवजातीसमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे.हे संकट रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशानी वेगवेगळी उपाययोजना केली आहे पण बहुतांश देशांनी लॉकडाउनची उपाययोजना केलेली आहे. लॉकडाउन मुळे कोविड-१९ चा प्रसार रोखण्यास मदत तर होत आहे परंतु आर्थिक द्रश्ट्या आनेक देश मागे पडले आहेत. याच लॉकडाउनमुळे जागतिक आर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आनेक उद्योग-धंदे थांबले आहेत काही तर बंद पण पडले आहेत. उद्योग-धंदे बंद पडल्यामुळे किंवा जे सुरु आहेत ते खुप कमी प्रमाणात सुरु आहेत त्यामुळे बेरोजगारी पण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 


बेरोजगारी वाढल्यामुळे खुप जणांना नैराश्य आले आहे. त्याचा परिणाम आत्महत्येच्या प्रमाणावरदेखिल झालेला आहे. त्यामुळे आनखी एक मोठे संकट आपल्या पुढे उभे टाकले आहे. आता सर्वसामान्य माणूस जीव वाचवणार की आपली उपाजिविका वाचवणार काही कळत नाहिये. या संकटा मुळे पुर्ण मानवजाती खचली आहे. आपण सर्वानी मिळुन या संकटाला सामोरे जा लागेल. नियम पाळुनच आपल्याला या कोरोनाला टाळता येईल.



कोरोना: वाढती बेरोजगारी व नैराश्य. (भाग-1/3)


शिरीष उमरे,नवी मुंबई.

जानेवारी २०२० ला अंतर्देशिय विमान प्रवासी कोरोना भारतात घेवून आले. तेंव्हापासुन आज १६ महिने झालेत, कोरोना थैमान मांडतोय सगळीकडे... ह्या पाचशे दिवसात सगळी उलथापालथ झाली आहे देशात...


२०१४ च्या मध्यापासुन धार्मिक उन्मादाचा उगम मागिल सात वर्षात त्सुनामीचे रुप धारण करुन थयाथया नाचतोय संविधानाच्या छातीवर... भस्मासुरासारखी गत झाली आहे मतदारराजाची !! वणवा पेटतो तसे सगळीकडे आग पसरत चालली आहे. त्यात चुकीचे राजकिय निर्णय पेट्रोल सारखे काम करत आहेत... हा भडका आता सगळ्यांना भाजत चालला आहे. 


नोटबंदी व जीएसटी ह्यासारखे अवकाळी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणजे माकडाच्या हातात कोलित दिल्यासारखे झाल होतेे. कित्येक करोडो छोटे व्यवसायी, उद्योजक व सेवा पुरवठादार ह्यांची अर्थव्यवस्था कोलमोडुन पडली होती. नविन नोकरभरती तर सोडाच, जुन्या स्टाफची छाटणी सुरु झाली होती.


 ह्यातच एनपीए माफीच्या माध्यमातुन काही ठराविक कार्पोरेट घराण्यांना फायदा पोहचवुन बँका मोडकळीस आणल्या गेल्या. सामान्य लोकांना कर्ज मिळणे तर दुरच, त्यांच्या कष्टाच्या बचतीच्या ठेवी धोक्यात आणुन टाकल्या.  लघुउद्योग संपुष्टात येत गेलेत. सरकारी नियंत्रणातल्या कंपन्या विकण्याचा सपाटा लावलाय त्यातुन खाजगी क्षेत्राला फायदा पोहचवणे व आरक्षण संपवणे अशी दुहेरी कुटनिती अंमलात येत आहे.

शेतकरी, आदिवासी व मजुर वर्गाला जगणे मुष्कील करणाऱ्या पॉलिसी संसदेत पाशवी व अनैतिक मतदानाने मंजुर करवुन अर्थव्यवस्थेच्या कबरीवर शेवटचा दगड ठेवण्यात आलाय. 

ह्या सगळ्या अराजकतेत कोरोना ही आंतराष्ट्रीय आपदा आली. केंद्र सरकार व राज्य सरकारने ह्याचा योग्य फायदा उचलुन लॉकडाउन च्या शस्त्राचा वापर करुन बेरोजगारीचा पहाड तात्पुरता झाकण्यात यश मिळवले. 


लॉकडाउनच्या काळात झालेल्या मानवी हक्काची ऐशीतैशी व करोडो मजुरवर्गाची पायपीट हृदय पिळवटुन टाकणारी होती. एक वर्ष आख्खी भारतीय जनता घरी बसवुन ठेवली होती. -२३ ही जीडीपी ची निगेटिव ग्रोथ ह्याचेच ध्योतक आहे... 

कोरोनाचा मृत्युदर १% सुध्दा नाही आहे. ह्यापेक्षा दहापटीने जास्त मृत्युदर असणारे रोग भारतात आहेत त्यावर मुलभुत आरोग्य सुविधा कुठलेच सरकार पुरवत नाही. आर्थिक अंदाजपत्रकात आरोग्य व शिक्षणावर असलेली तुटपुंजी व्यवस्था व त्यात सरकारी यंत्रणेचा प्रचंड भ्रष्टाचार ह्यामुळे जागतिक पातळीवर १९६ देशाच्या यादीत १६४ वा नंबर आहे आपल्या देशाचा. हे सगळे दारिद्र्य लपवण्यासाठी जनतेला वेठीस धरणे सुरु आहे. 


कोरोना वर आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सरकार जवळ ना पुरेसा मेडीकल स्टाफ आहे ना हॉस्पीटल बेड...ना आवश्यक औषधी ना वेंटिलेटर्स ... त्यातच महागाई चे जनतेला रोजचे झटके !!


आरोग्य व शिक्षणातील खाजगी क्षेत्रे तर जबरीची वसुली करुन राहिली आहे जनतेकडुन. मिडीयाद्वारे कोरोनाची प्रचंड भिती निर्माण करुन बेरोजगारी ह्या महत्वाच्या मुद्द्या वरील लक्ष वळवण्यात सरकारी यंत्रणेला यश मिळाले आहे. पण ही तात्पुरती थोपवणूक भयंकर रुप धारण करणार ह्यात शंकाच नाही. 


सध्याचे बेरोजगार तरुणवर्गाचे नैराश्य त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त आहे. प्रचंड प्रमाणात लोक डीप्रेशनचे बळी पडत आहेत. ह्यातुन त्यांना सावरणे गरजेचे आहे.  आज मुठभर सधन लोक सोडले तर ९०% भारतिय आर्थिक चणचणीला सामोरे जात आहेत. 


ह्यात वेळेवर योग्य उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर भविष्यात  जनक्षोभातुन गृह युध्द व गुन्हेगारीत नियंत्रणाबाहरील वाढ आणि नंतर  हुकुमशाही सारख्या अरिष्टके नाकारता येणार नाहीत. 


लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी व कोरोना संपवण्यासाठी आणि देशाला पुर्वपदावर नेण्यासाठी एकजुट महत्वाची... पुढील ३ वर्षे देशासाठी खुप महत्वाची !!! जागते रहो ....


किरण पवार,औरंगाबाद.

          ध्या कोरोनामुळे एक गोष्ट फार विचित्र झालेली पहायला मिळते आहे, ती म्हणजे नैराश्य येणं. नैराश्य येणं आणि त्याविरोधात मानसिक लढा देणं हे एका मर्यादेपर्यंत आधी बऱ्यापैकी सहज वाटतं होतं. परंतु कोरोनामुळे गोष्टी अशा काही बद्दलच्या की, पुढे दिसू लागणारी प्रत्येक शाश्वत गोष्ट अंधारात दिसू लागली किंबहुना नाहीशीच झाली. थोडक्यात यात करियरचा एखादा महत्वाचा टप्पा असेल, एखाद्या व्यवसायाचा जम बसवणं असेल, काहींच्या ठराविक स्पर्धा परिक्षा असतील, वा इतर विविध गोष्टींचा यात समावेश येतो. काही गोष्टी अशाही घडत आहेत की, अनेकांना दोन वर्षांच शिक्षण थेट ऑनलाईन मिळून नंतर त्यांच कॅम्पस इंटरव्हू, नंतर सिलेक्शन आणि थेट काम भेटलं तर वर्क फ्रॉम होम. कुठेतरी आपण आधीपासूनच अशा अचानक आलेल्या बदलाला सामोरे जाण्यासारखे नव्हतोच, आत्ताही अनेकांची ती मनस्थिती तयारच नाही होतं. नैराश्य यायला कारणीभूत ठरलेल्या ठराविक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे, अनेकजण आज सर्वांसोबत, सर्वांमधे असूनही एकटे पडले आहेत. त्यांना त्यांच्या एकटेपणाची चाहूल आहे पण ती उलगडून दाखवता येत नाहीये. आपण माणूस म्हणून अनेकदा दिखाव्यांना अधिक महत्व देतो, ज्याने गोष्टी आपल्याच आंगलट येतात; आणि हे कोरोनाकाळात अनेकांचं झालं आहे. आज बेरोजगारी वाढलेली आहे तरीदेखील आम्हाला यासारख्या महत्त्वाच्या विषयावर पाठ फिरवायला अधिक आवडतं. कारण इन्स्टाग्राम रिल्स आनंद द्यायला सोबत आहेतचं की! मुळात आपण कोरोनामुळे व्यवस्थापन, नियोजन, आयुष्यात तयारीत रहाव्या लागणाऱ्या करियरसाठी इतर प्लॅन्सची अशी कुठली तसदीच घेतलेली नाही. बेरोजगारी कुणा एकाच्या अमुकतमुक निर्णयाने तयार झाली असं नाहीये, बेरोजगारी वाढीस लागायला अनेक घटक जबाबदार आहेत असं मला वाटतं. आणि राहिला प्रश्न नैराश्यातून बाहेर पडायचा तर ते आपण साध्य करू शकतो फक्त थोडासा खंबीरपणा मनाला जाणवून देण्याची गरज आहे. तुर्तास इथेच थांबतो, धन्यवाद!


सौदागर काळे,पंढरपूर.

वळपास दीड वर्ष झाले कोरोना हा आजार आपल्यात आहे.सध्या तो जास्तच वेगाने आपले साम्राज्य तयार करतो आहे. त्याच्या या शक्तीपुढे जगातील अणवस्त्रधारी देश सुद्धा नांगी टाकत आहेत.त्याने सर्वांची अर्थव्यवस्था खिळखिळी केली.तहान लागली की विहीर खोदण्याचा प्रकार करावा तशाप्रकारे सर्व देशांतील सरकारांनी आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देण्याचा चंग बांधला.पण तो किती तकलादू आहे याचा आपण रोज  मीडियाद्वारे तमाशा पाहतो आहे.आता कोरोना वर लस आली.लसीकरण चालू झाले.या पार्श्वभूमीवर आपल्या राज्याचा विचार केला तर केंद्र-राज्य , सत्ताधारी-विरोधक यांच्या भांडणात केव्हाही राज्याची परिस्थिती हाताबाहेर जाईल की काय! असे चित्र उभे राहत आहे.


उद्या कोरोना जेव्हा जाईल तेव्हा त्याने किती हानी केली याच्यापेक्षा त्याने आपल्या या व्यवस्थेप्रती आपले कितपत डोळे उघडले,हे अनुभवणे खरं महत्त्वाचे ठरणार आहे. 

मानवाच्या मूलभूत गरजांपैकी अन्न ही जगण्या-मरण्याच्या अस्तित्वाची गरज आहे. वस्त्र,निवारा,आरोग्य व शिक्षण या गरजा पोट भरल्यानंतर येतात.तरीपण या साऱ्या गरजांची पूर्तता होण्यासाठी या व्यवस्थेत आपण धडपडत असतो. अशावेळी योग्य वयात काम मिळणे खूप गरजेचे आहे.ते मिळत नसल्याने खुपजण नैराश्यात जीवन जगत आहेत.कोरोना येण्यापूर्वी आपल्या देशात बेरोजगारी व त्याच्या मुळे लोक नैराश्यामध्ये जाण्याचे प्रमाण होतेच.हे नाकारून चालणार नाही.फरक एवढाच होता तेव्हापर्यंत ते पद्यावर अंधूकपणे दिसण्याची व्यवस्था सरकारने केली होती ती आता कोरोनाने हातामध्ये सूत्रे  घेताच  पडद्यावर स्पष्टपणे दिसू लागले. कोरोनापूर्वी नवा रोजगार मिळावा म्हणून काम करण्यासाठी तरुण वर्ग प्रतीक्षेत आहे.


आता कोरोना काळात अर्थव्यवस्था बेजार झाल्याने जे रोजगार होते ते सुद्धा जात आहेत.ज्यांचा रोजगार जात आहे, तो वर्ग कौटुंबिक जबाबदारीचे ओझे वाहणारा आहे.ज्याच्यावर अख्खे कुटुंब अवलंबून आहे. जॉब नसल्यामुळे लग्न न होणाऱ्या तरुणाईपेक्षाही हा वर्ग सर्वात जास्त नैराश्यात असणार यात शंका नाही.या कोरोनाच्या काळात जे असंघटित क्षेत्रात काम करत होते.त्यांचे रोजगार गेले. सुरुवातीच्या लॉकडाउनच्या काळात रस्त्यावरून घरी चालत जाणारे लोक पाहिले की अजूनही ते विचलित करून जातं. त्यांनी ते अनुभवलं.आजही ते पोटाला चिमटा काढत येणाऱ्या दिवसाला सामोरे जात आहेत.


हे कधीपर्यंत चालेल.माहीत नाही.उद्या कोरोना या जगातून जाईल सुद्धा.पण बेरोजगारीवर राज्यकर्ते लस तयार करतील का! याचे सध्यातरी उत्तर नाहीच. त्यामुळे आपण नैराश्याला सोशल डिस्टिंग प्रमाणे सध्यातरी दूर ठेऊनच जगूया.यातच भले आहे.


वसुंधरा सुंदर राहिली नाही

गजानन घुंबरे,परभणी

कधीकाळी नैसर्गीक साधनसंपत्तीने  संपन्न ,तिला पुरक जैवविविधता यांना आश्रय असणारी व आतापर्यंत तरी एकमेव असणारी सजीवसृष्टी म्हणजे ' पृथ्वी ' अर्थात वसुंधरा.या पृथ्वीवर आतापर्यंत बरेच युग झाले, उलथापालथ झाली. पण यादरम्यान तीची जी हानी झाली नाही , ती मात्र ( मानवी उत्क्रांतीचा सिंद्धात थोडा वेळ सोडला तर कुठून तरी एलीयन रुपी आलेल्या ) मानव नावाच्या स्वार्थी प्राण्याने हळू हळू भक्कास केली. एलियन यासाठी म्हणतो कि, मानव सोडून इतर सर्व जीव निसर्गाचे मित्र आहेत. त्यामुळे पृथ्वीवरिल नैसर्गीक समतोल राखल्या जायचा व जातो.या भुतलावर फक्त मानवालाच  फक्त  घ्यायचे कळते.ओरबाडणे, हिसकावणे, निचरा करणे एवढचं त्याला जमतं. मग मानव समुहातील त्याच्या सारख्या हाडामासाच्या व्यक्तीसोबत त्याचा हा व्यवहार तुम्हाला पहायला मिळेलं.

   आता हेच पहा पृथ्वीला सुंदर ठेवण्यात खरा वाटा असणारे, तीला सजीव ठेवणारे पाणी ज्याच्यावर सर्वांचा हक्क आहे. मानवाने केलेल्या बेसुमार , अमाप वापराने निसर्गहानी करण्यास कारणीभूत ठरलायं. जमीनीवर उपलब्ध साठे कमी पडले म्हणून पाचशे फुट खोलीवरून उपसा केला.मानवाच्या या कृत्यांने जमीनीच्या वरच्या भूस्थरात पाणी न राहील्याने झाडे नष्ठ झाली व होत आहेत. यामुळे हिरवळ कमी झालीयं, वाळवंट वाढलेत. जमिनिच्या आत ५० फुटांपर्यंत पाणी निचरा होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लोटतो. त्याखाली दोनशे फुटांपर्यंत जाण्यासाठी ५०ते १०० वर्ष जातात. कधी कधी आपण एखाद्या नवीन घेतलेल्या ५०० फुट बोअरवेलला लागलेले पाणी तीनशे वर्ष जुने असु शकते. पण त्याचे ते आपल्याला काय? तहान भागली ना बस्स ! आपल्या या वागण्याने निसर्ग समतोल मात्र बिघडला. जमीन कोरडी पाडली, झाडे वाळली, पाऊस कमी झाला आणि पाणीचं कमी झाल्याने जैवविविधतेचा पृथ्वीचा दागिना लुप्त होण्याच्या मार्गावर आलायं.

  आपल्याला फक्त घेता येत देणं जमतंच नाही.आपल्या अन् दुसऱ्याच्या हिश्याचेही घ्यायचे. घेतानाही बेमाप घ्यायचं मग त्याची किंमतही कळत नाही. मानवाने तयार केलेल्या पाणी मोजण्याच्या पर्जन्यमापकात जेंव्हा १०० मिमी पाऊस पडतो ना त्यावेळी १० लाख लिटर पाणी १०० गुंठ्यात पडलेलं असत. असे एक दोन पाऊस पडल्यावर ते पाणी वाहत  त्यातील फक्त १०% पाणी जमिनीत मुरल्या जातं.३०% वाफ होते तर उर्वरीत नदी व शेवटी समुद्रास मिळतं.

यातील मुरलेलं पाणी उपसा करताना आपण हे भान विसरतो  कि किमान आपल्या गरजे इतके तरि पाणी भूगर्भाला आपण परत दिलयं का? आपण किंमत असणाऱ्या वस्तुंच मोजमाप करतो . त्याचप्रमाणे सृष्टीला सजीव ठेवणाऱ्या पाण्याचे मोजमाप करण्यास शिकलो तर निसर्गाची अनमोल देण असणाऱ्या पाण्याची किंमत कळेल .

 आपल्या गरज इतके निसर्गा कडून हवं असेल तर परत देण्यास शिकावं लागेल ,उपशा इतके पाणी जमिनीत मुरवावे लागेल , एक झाड तोडण्यापूर्वी दोन आधी जोपासावी लागतील .तरचं समतोल साधला जाईल अन्यथा या वसुंधरेला कुरुप करत दुसऱ्या सजीव सृष्टीचा शोध घेत स्वार्थी ( सुरुवातीस एलियन यासाठी म्हणालो) मानव एके दिवशी निघून जाईल आणखी एखाद्या वसुंधरेला बेचिराख करण्यासाठी .

बलात्कार आणि त्यावरील घाणेरडे राजकारण..



करिश्मा डोंगरे,पंढरपूर

           जाती कशाला उकरून काढता.गुन्हा हा गुन्हाच असतो.आणि गुन्हेगार कोणत्याही जातीचा असला तरी तो गुन्हेगारच असतो.असले भंपक युक्तीवाद करणार्या,वरून सात्वीकतेचे भजन आणि आतुन जातीच्या वर्चस्वाचा तमाशा करतात.उच्चवर्णिय पुरूषी मानसिकतेमुळे दलित स्रीचा शरीराचे लचके तोडण्याची वृत्ती कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.जातीच्या विखारातून कोवळया कळ्यांना चुरगळनारा कुसंस्कृतीच्या कणाकणात भरला आहे.पीडितेचा जबाब नेहमी दाबला जातो.परंपरेने चालत आलेले आरोपींना जातिनिहाय संरक्षण.अत्याचार झालाच नाही,असे सांगण्यासाठी प्रशासनाचा वापर केला जातो.धडक पोलिस पुरावेच नष्ट करतात,हे कसले मोठे राजकारण म्हणावे लागेल.माध्यमानांही त्यांच्यापर्यंत पोहचू देत नाहीत,याला काय म्हनायचं?यामुळेच त्यांची नियत सिद्ध होतेय.

         आईसोबत गवत काढण्यासाठी गेलेल्या मुलीची कसली कपडे असतील ओ?आणि त्यांना धड जेवनाचा रोज प्रश्न पडत असेल,तिच्याजवळ कसला आलाय मोबाईल?उगीच मनाच बडबडून मुलींना दोषी नका ठरवू.ती साधी सरळ मुलगी तिने कोणाच काय वाईट केले.एवढी कसली जातीयता आणि राजकारण?

             कधीही असले करण्याअगोदर किंवा वाईट नजरेने बघान्याचं धाडस नाही झाले पाहीजे,असे प्रशासन हवं आहे की,डायरेक्ट निकालचं लागला पाहीजे.खाकी वर्दितल्यांनी पकडायचं नाही किवा तारखेवर तारीख मिळन्याची वाट न बघता,त्यांच वरचं तिकीट काढले पाहीजे.आपल्या घरातील स्रीयांना हेच शिकवा की, एखाद्याच तोंड कसे फोडायचे आणि हात पाय कसे मोडायचे.गरिबाची मुलगी असो किवा मुख्यमंत्र्याची मुलगी ही मुलगीच असते.स्वत:च्या घरातली मुलगी रडताना कसे लगेच वाईट वाटते,तसेच दुसर्यांच्या मुली काय रस्तावर पडलेत काय?रडत बसायला.जात बघून मानसाचं जनावरं बनू नका.माणुसकी हाच आपला धर्म आहे.आमच्या हातात कोणी मेणबत्या दिल्या तेव्हाच तलवार दिली असती तर,आज तोंड वर करून कोणी बघितले पण नसते.


वृषाली वाघ,मुंबई 

आपल्या भारतात बलात्कार हे काय नवीन कृत्य नाहीये.... अनेक वर्ष हे असले क्रूर कृत्य होत आहेत....रोज बातम्यात एक न एक तरी असली बातमी असते परंतु आपणच त्याला दुर्लक्ष करतो.... जो पर्यन्त पीडित व्यक्ति (मुलगी किंवा मुलगा) सोबत  काही राक्षसा ने केल्या प्रमाणे कृत्य होत नाही किंवा राजकिय नेत्यांना, पक्षांना त्याचा काही लाभ नाही भेटत तो पर्यन्त ना न्यूज मीडिया ना सोशल मीडिया मध्ये त्याचा विषय येत.... 

आपल्या सारख्या सर्व सामान्य लोकांचा कानावर आपल्या ओळखी मधील अशी एखादी बातमी सहजासहजी ऐकला नाही भेटत कारण मिडल क्लास वर्ग  कधी ही कोर्ट किवा पोलिस ठाण्यात जाऊ इच्छित नाही.... ह्याला देखील कारण आहे आपल्या देशात ला राजकारण आहे... कारण कधी एखादी घटना गंभीरतेने लक्ष ओढून घेत असल तर... राजकीय लोक पीड़ित व्यक्ति चा घरी जाऊन फोटो काढून मोकळे होतात...... त्या घटनेचा 4 - 5 वर्षात निर्णय (कोर्टात) लाऊन विसरून जातात...... परत अशी गंभीर घटना होऊ पर्यन्त ....

एखाद्या घटनेचा बोध घेऊन सरकारने, राजकिय पक्षाने, मीडियाने पुढाकार घेऊन लक्ष देऊन जर काम केल आणि  एखादा गंभीर कायदा (न्यायालयात) बनवला तर अशे कृत्य करणार्‍याना, करायचा आधी हजारो वेळा विचार करावा लागेल.....

आणि आपन आपल्या जाग्या वर राहून आपल्या पुढचा पीढ़ी ला,  समोरचा व्यक्ति ची मदत आणि इज्जत करायची शिकवण दिली तरी देशात असल्या घटना कमी होतील.... 


अनघा नंदाने

दिवस पहिला: अरे बातम्या पाहिल्या का? खूप वाईट झालं बिचाऱ्या त्या मुलीसोबत. 

दिवस दुसरा: काय चाललय काय आपल्या देशांत? तिची बाँडी परस्परच जाळली पोलिसांनी. हे पोलिस गुंड झालेत. आता कुठे गेली मिडिया, कुठे गेले विरोधी पक्ष? 

दिवस तिसरा: काय नौटंकी चाललीये देशांत.... ती ABP वाली आणि तो पप्पू.... नुसता पब्लिसिटी साठी चाललाय हा खेळ...

दिवस चौथा: काय राव चार दिवस झाले तेच तेच, मस्त पिक्चर लाव एखादा... बोअर झालंय, तेच तेच 


असंच होतं ना? 

तिसऱ्या दिवशी राख थंड झाली कि आपणही थंड होतो. आपापल्या कामाला लागतो. 


पण तुम्हाला एक लक्षात येतय का? या संपूर्ण चार दिवसांच्या संभाषणांत बहुतेक लोकांनी, पोलीस, मिडिया, काँग्रेस, यांच्यावरच चर्चा जास्त केली. जणूकाही सत्ता "काँग्रेसची" आहे. यांत खूप कमी लोकांनी "मुख्यमंत्री योगी" कुठे आहेत हा प्रश्न विचारला आणि मोदींना तर लोक विसरलेच. लोकांच्या लक्षातच आलं नाही, येत नाही, किंवा आणून दिल्या जात नाही कि आता गेली 6 वर्षे सत्तापक्ष बदलला आहे. वर्तमान पंतप्रधानांनी संपूर्ण घटनेवर एक वाक्य उच्चारलेलं नसताना, आपण पूर्व प्रधानमंत्री कसे मुके होते याच्या अजूनही चवीने चर्चा करतो आहे. 


आपण सरकार चं उत्तरदायित्वच विसरलो आहोत. ज्याप्रमाणे वर्तमान सरकार अजूनही "विरोधी पक्षाच्या" भूमिकेतून बाहेर आलं नाही, तसंच आपणही आपल्या डोळ्यातला "सत्ताधारी" पक्ष बदललेला नाही. 


प्रजासत्तेतला "राजाच" स्वतःची भूमिका, हक्क, जबाबदाऱ्या विसरला असतांना, त्याने निवडून दिलेल्या "नौकरांकडंनं" काय अपेक्षा ठेवणार? 130 कोटी राजांच्या राज्यांत, 1 एका राजकुमारीवर "बलात्कार" होतो, तेव्हा राजे आपापसांत लढत बसतात, शाब्दिक चकमकी रंगतात, कुणी निवडून दिलेला नोकर चांगला आहे हे सिद्ध करायला! मग नोकर मनमानी करणार नाही, घाणेरडं राजकारण करणार नाही तर काय करतील? 

राजांना कळायला हवं, कुणाचेही असले तरी ते नोकर आहेत, आणि ते नीट काम करत नसतील तर त्यांना जाब विचारणं, प्रत्येक राजाचं काम आहे आणि हक्क आहे. 


राजकारण घाणेरडं झालं आहे. वादचं नाही. झालंच आहे. पण पुढे काय? उपाय का? हे शोधायला हवं. आपल्याला माहिती असतं, सरकारचं चुकलं आहे पण आपण नेहमी मुख्यतः दोन भूमिका घेतो, एक, जाऊदे, आपल्याला काय करायचं आहे? आणि दुसरी, सगळे तसेच असतात... 

या दोन मतांमुळे आपण "नागरिक" होऊन सरकारला कधी प्रश्नच विचारत नाही. प्रजासत्तेत राहून राजसत्तेचं गुणगान गांत राहतो आणि कुणी "हिरो" आपल्याला वाचवायला येण्याची वाप बघत बसतो. चांगल्या राजंच्या राज्यात, प्रजा आपले हक्क आणि कर्तव्य कधीच विसरायची नाही आणि विसरली तर चांगले राजे प्रजेला त्याची जाणीव करून द्यायचे. "खबरदार जर टाच मारूनी याल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या" किंवा "राजा, माझा 1 रुपया अजूनही परत का नाही मिळाला?" असे प्रश्न शिवाजी महाराजांना सुद्धा रयतेनं विचारलेच. मग आता आपलीच सत्ता असताना आपण आपल्या सेवकांना प्रश्न विचारायला का घाबरतो? का गरज नसताना त्यांचं गुणगान करतो? या प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधली पाहिजेत. 


आपल्या पुर्वजांनी चांगले मावळे बनून दाखवलं, आपण चांगले "नागरिक" बनू शकू का हे आपण आपलं बघायला हवं.



प्रतिक्षा बुध्दे,गडचिरोली 

कुण्यातरी गावात कुण्यातरी मुलीवर अत्याचार झाला, 

लगेच लावली गेली जाती-धर्माची, राजकिय पक्षांची फिल्टरं त्याला!

'ती' असते कधी दोन दिवसांची तर कधी ऐंशी वर्षांची,

जी नाहक शिकार होते समाजातील राक्षसी सत्तेची 


पुर्वी बलात्कार झाले की छत्रपति छाटुन टाकायचे हात पाय त्या नराधमांचे भर चौकात... 

मग नराधमांचंच राज्य आलं ज्यात पिडितेच्या लुटलेल्या आब्रूचेच धिंडवडे काढतंय समाज.


कधी तिच्या कपड्यांची तर कधी उच्चशिक्षणाची चुक पटवुन देण्याची थेरं आरोपींच पक्ष करतंय

आम्हीच इथले तथाकथित राजे म्हणत आरोपींनाच संरक्षण देतंय


बाहेरचे लोक काय म्हणतील म्हणुन आधी

घरचेच तोंड दाबुन मुक्का मार द्यायचे

आज त्याहीपेक्षा वाईट झालीय परिस्थिती, कोर्टाची पायरी चढण्यासाठी ही वेळ आलीय लढण्याची.


तिथं न्यायासाठी ऊभं रहायला सुद्धा पूर्व पडताडणी केली जातेय, 

पिडिता अन् आरोपी दोघांच्याही जाती-धर्माची टेहाळणी होतेय.


विरोधी पक्ष लागतो लगेच कामाला, ओतुन टाकतो सगळी जिव्हाळी

आणि मग भडकली आग सामान्य माणसांत की भाजुन घेतो आपली राजकिय पोळी


कुणाचा राजिनामा मागितल्या जातं तर कुणावर फेकली जाते शाई

मात्र आरोंपीना लवकरच शिक्षा नक्की होईल अशी हमी कुणीच देत नाही


वर्षानुवर्षे ताटकळत बसावं लागतं मग झालेला अन्याय सिद्ध करायला

तेव्हा येतं लक्षात की वास्तवात कोणताच पक्ष नाही आहे आपल्या मदतीला


पिडीतेच्या घरच्यांनाही बेआब्रू व्हावचं लागतं, पोरगी गेली ती गेली पण पैसे कमावुन गेली असंही ऐकावं लागतं. 

कधी संपेल कुणास ठाऊक आपल्या समाजाचे अधःपतन बघवत नाही मला आता हे बलात्कार आणि त्यावरील घाणेरडे राजकारण…


चैतन्यकुमार देवकर,माळशिरस

खरंतर बलात्काराची घटना घडली.. असं ऐकलं तरी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला प्रचंड राग येतो. अशा नराधमांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी आपली तीव्र इच्छा असते. कधीकधी तर आपल्याला वाटतं की प्रियांका रेडी प्रकरणात जसं एन्काऊंटर करून आरोपींना ठार मारण्यात आलं ते योग्य होतं बऱ्याच वेळा अनेक अमानवीय शिक्षांकडेही आपण एक पर्याय म्हणून पाहतो.हेच बरोबर आहे असं मानायला लागतो तर दुसरीकडे बऱ्याच वेळा आरोपीं हेच गुन्हेगार आहेत असं सिद्ध होईपर्यंत तरी थांबायला हवं असा सूर निघतो. या दोन्ही चा  सुवर्णमध्य म्हणजे  फास्टट्रॅक अर्थात जलदगती न्यायालयांची व्यवस्था असणे ठरु शकते.आणि विशेषता बलात्कारासारख्या गंभीर होण्यासाठी तर असायलाच हवी. आता अगोदर मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला या घटनांचा प्रचंड राग येतो यातून आपल्यामध्ये संवेदनशीलता असल्याचं दिसून येत. ते आपसूकच असतं. परंतु ती संवेदनशीलता ,ती तीव्र इच्छा  गुन्हेगारांप्रती राज्यकर्ते, अधिकारी यांच्यात कशी नसू शकेल?? केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तर ' इथिक्स' चा स्वतंत्र पेपर असतो. तरीदेखील हाथरस मध्ये घडलेल्या घटनेमध्ये जबाबदारीची पदे भूषवणारे अधिकारी असं बेजबाबदार आणि असंवेदनशील कसं काय वागू शकतात?? भलेही राज्यकर्त्यांनी त्यांना वेगळे निर्देश दिले असतील परंतु एक अधिकारी म्हणून त्यांनी त्यांचं कर्तव्य करणं भाग होतं. आणि राज्यकर्ते त्यांनी तर... लोकांचं प्रतिनिधित्व करायचं असतं.. परंतु ते तर अगदीच बेजबाबदार वागले उलटपक्षी गुन्हेगारांना पाठीशी घालू लागले ...  आपला  विषय आहे , बलात्कार आणि त्यावरील घाणेरडे राजकारण. मला वाटतं की, कोणतीही गोष्ट राजकारणापासून अलिप्त राहणं तसं अवघडच .. पण त्याच्या माध्यमातून संवेदनशीलतेचं दर्शन घडणं , आणि न्यायासाठी , सत्यासाठी पराकाष्ठा करणारे नेते , राजकारणी असणं , तयार होणं...हे फार आशादायी चित्र असतं…


क्षितीज गिरी,सातारा

     काही जण म्हणतात बलात्कार हा बलात्कार असतो त्यामध्ये तुम्ही जातीचा धर्माचा विषय का  आणता आरोपी कोणीही असू दे त्याला शिक्षा झाली पाहिजे.पण  निर्भया प्रकरणामध्ये झालेला बलात्कार आणि  खैरलांजी , हातसर  मध्ये झालेला बलात्कार यामध्ये तसा खूप फरक आहे.तुम्ही म्हणाल तसे कसे. बलात्कार तर शेवटी बलात्कार असतो.पण माझ्या मते कोणताही बलात्कार करणाऱ्या आरोपीचा उद्धेश हा खूप महत्त्वाचा असतो.निर्भयाच्या प्रकरणात तो फक्त सेक्स हाच होता.पण सगळी कडे तो सारखाच असेल असे नाही.आणि तसा तो नसतो पण ...

             हातसर च्या घटनेकडे पाहू. ठाकूर आणि वाल्मिकी समुदायाच्या वादातून हा बलात्कार झाला आहे.तो पण खुले आम धमकी देऊन.संदीप ठाकूर यातला मुख्य आरोपी.6 महिने आदोगर ठाकुरानी  धमकी दिली होती.तेव्हा पासून मनीषा वाल्मिकी कोठे घरा बाहेर पडली नव्हती.पण त्या  दिवशी म्हणजे 14 सप्टेंबरला ती तिची आई गवत आणण्यासाठी रानात गेले.गवत कापणे चालू होतो.मनीषा बाजूला बसली होती तिची आई गवात कापता कापता थोडी  लांब निघून गेली.अश्या वेळी  सरेआम तिची आई तिच्या बरोबर असताना. मुली ला उचलून संदीप आणि त्याच्या मित्रांनी  तिच्यावर बलात्कार केला.आई ला ऐकू कमी येत होते .त्यामुळे मनीषचा आवाज ती ऐकू शकली नाही. बलात्कार करून झाल्यावर ती कुठे बोलू नये म्हणून तिची जीभ कापली. मानेची हाडे मोडली.शेवटी 29 सप्टेंबरला सकाळी 5 वाजता तडफडून तिला मरण आले.14 ते 29 तारखे पर्यंत तिच्यावर दवाखान्यात उपचार पण नीट झाले नाहीत.याच्या आगोदर पण तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला होता.

त्याच्यानंतर  आसपासच्या 12  गावातल्यांनी  त्यामध्ये ठाकूर आणि ब्राम्हण यांनी गुपचूप पंचायत लाऊन आरोपीचा साथ देणे आणि गावामधे कुणाला घुसून न देणे असा निर्णय घेतला.डॉक्टरांनी पोलिसांनी  मुख्यमंत्र्यांनी आरोपीच्या बाजून  साथ दिली.कारण आरोपी ठाकूर होता.योगी आदित्यनाथ बोलले आरोपीची आणि मनिष्याच्या घरातल्यांची  नार्को  टेस्ट करा.कारण सगळे अधिकारी यांचेच.डॉक्टररांचा रिपोर्ट पण चुकीचा दिला गेला.आपल्या मुलीला शेवटी जाळण्याचा अधिकार पण दिला जात नाही.लावारिस लाश जाळावी तसे जाळले जाते तिला.आणि नंतर बोलले जाते बलात्कार झालाय नाही.आमच्यावर खोटं आरोप केला जातोय.

आज पूर्ण कुटुंब दहशतीखाली राहत , वावरत आहे.त्यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मनीषा वाल्मिकी सारख्या भरपूर घटना  भारतामध्ये घडतात.त्यातल्या काहीच घटना प्रकशाझोतात आणल्या जातात.पण दुर्दुव त्यांना पण लोकशाही मार्गाने संघर्ष करून नीट न्याय भेटीत नाही.म्हणून बाबासाहेब नेहमी सामाजिक न्यायासाठी संघर्ष करायला सांगत.

 माझ्या मते या घटनांकडे पाहताना फक्त बलात्कार म्हणून पाहणे चुकीचे आहे.जसे निर्भया कडे पाहतो तसे.हा तर जातीय द्वेष भावनेतून केलेला बलात्कार आहे.जसा खैरलांजी मध्ये घडला.न्याय मागता मागता भोतमांगे परिवार संपला पण न्याय???

या आरोपींना फाशी मिळाली पाहिजे पण ते वाटते इवढे सोपे नाही.सगळी न्याय  व्यावस्था आरोपीच्या  बाजूने खंभिरपणे उभी आहे. पण शेवटी दिली तरी फाशी देऊन फक्त न्याय भेटेल पण सामाजिक न्याय ? 

आज एक संदीप गेला तरी उद्या हजारो लाखो संदीप तयार होतील.कदाचित झालेही असतील.

जोपर्यंत लोकांची या जतिव्यवस्थेकडे  बघण्याची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हे असले जातीय द्वेषातून बलात्कार होतच राहतील.उत्तर प्रदेश सारख्या राज्यात अजुन पण अस्पृश्यता पाळली जाते.

यावर उपाय म्हणजे  समानतेच्या विचार करणाऱ्या प्रत्येकाने आता एकत्र येऊन या ना त्या मार्गाने या व्यवस्थे विरुद्ध लढले पाहिजे.कारण उद्या यामध्ये कदाचित तुमची पण मुलगी असू शकते.

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************