मुलं आणि पालक यांच्यातील चुकलेला संवाद.


🌱 वि४🌿 व्हॉट्सअप ग्रुप

📄 आठवडा 23वा📝

07 एप्रिल  ते 13 एप्रिल  2018

मुलं आणि पालक यांच्यातील चुकलेला संवाद.

यातील सर्व प्रातिनिधिक छायाचित्रे इंटरनेट वरून घेतलेली आहेत.

किरण पवार ,औरंगाबाद
कितीतरी आयुष्ये उद्ध्वस्त केली या न घडून आलेल्या संवादाने. काहींना जगावस वाटल नाही त्यांनी थेट आत्महत्या केल्या. आणि ज्यांना जगायची थोडीफार आस होती त्यांना या न घडलेल्या संवादाने घरापासून कायमच दूर केल. आपण आजही जेवढ्या सहजतेने हा विषय बोलतो किंवा व्यक्त करतो त्यापेक्षा कितीतरी पटींनी त्याची तीव्रता अधिक आहे.
              डीयर जिदंगी या चित्रपटातले वाक्य होत की, आपण बाह्यंगावर झालेल्या इजांवर उपाय त्वरीत करतो पण मेंदूला होत असलेल्या त्रासाकडे आपण दुर्लक्ष करतो. याच कारण म्हणजे आम्हाला मानसिक स्वास्थ्य म्हणजे लाजीरवाणी गोष्ट वाटते. हे उदाहरण इथे द्यायच कारण म्हणजे मुलं व पालक यांच्यातील चुकलेल्या संवादाचे बळी काही वेळा *मानसिकरित्या* जातात. मी अशा काही केसेस पाहिल्या आहेत. काहींची मानसिक अवस्था इतकी बिघडते की, मुल आत्महत्या करण्यापुर्वी चिठ्ठीही लिहू शकत नाहीत. ( सर्वच आत्महत्या अशा असतात अस नाही ).  जाऊद्या पण सध्याच्या पिढीला आणि पालकांना या गोष्टींवर विचार करायला वेळ कुठे आहे म्हणा...
            
   आम्ही दरवेळी काहीही झाल तरी एवढंच पाठ केलेल असतं की, *आम्ही मुलांसाठी जीवाच रान करतो तर मुलांनी आमच ऐकायला नको?* पण मला वाटत तुम्ही जे करता ते मुलांपर्यंत पोहोचवा की. आणि प्रश्न *मुलांच्या आयुष्याचा असतो तर त्यांच्या निर्णयावर त्यांना पुढे जाण्यास मदत करा.* कधीकधी एक सहानुभूतीचा हात खूप गरजेचा असतो. सध्या नवीन पिढी *चंगळवादाच्या आहरी* जाते आहे याला नकळत कारण पालक आणि मुल यांच्यातला तुटलेला संवाद आहे. मुंबई-पुणे यांसारख्या बड्या शहरातली मुल *ड्रग्जच्या* आहरी जातात, *गुन्हेगारी* क्षेत्राकडे वळतात या प्रत्येकाला कुठेतरी कारण तुटलेला संवाद आहे हे मान्य करावच लागेल.
                 मी ही गोष्ट मान्य करतो काही पालक हे मुलांचे मित्र होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. परंतु काही गोष्टीत त्रुटी राहून जातात. मला मुलांना हेही सांगायचंय की, *ठरावीक क्षणी तुम्हीही संवादासाठी पुढाकार घ्यायला हवा.* टाळी ज्याप्रमाणे एकहाती वाजत नाही त्याचप्रमाणे मला वाटत की, मुलं-पालक संवादासाठी ठराविक वयात आल्यावर पालकांबरोबरच मुलांनीही संवादासाठी पुढाकार घ्यायला हवाच.


जयंत जाधव,लातूर
"कळस उत्तम पाहिजे असेल तर पाया भक्कम व मजबूत असला पाहिजे "
- डॉ.अ.ल.देशमुख.
        वरील मताप्रमाणे,युवा अवस्थेत  भरकटत जाऊ नये म्हणून लहानपणीच परिणामकारक बाळकडू मुलांना पाजले पाहिजे.पालकांसाठी ही गोष्ट फारशी कठीण नाही.पण त्यासाठी मुले व पालकांमधील संवाद हा आपलेपणाचे असायला पाहिजे.जे कि सध्याच्या स्पर्धेच्या युगात हरवले आहेत किंवा कुठे तरी चुकल्यासारखे झालेत.
मुले व पालकांमधील चुकलेल्या संवादात पालकांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरते.पालक म्हणजे काय?त्यांचे कोणते आदर्श मुलांसाठी प्रेरणा देणारे असावे?
मुलांना मधील दोष,चुका घालवून त्याला गुणवान बनविण्यासाठी प्रयत्न करणे व त्याचे आयुष्य आनंदी करणे हे पालकांचे खरं महत्त्वाचे काम आहे.पण या उलट  आजचे पालक मुलांना महागडे कोचिंग क्लास,कपडे,पिझ्झा-बर्गर विकत घेऊन दिले कि आपली मुलांप्रतीची जबाबदारी संपली असे समजतात पण असे नसते,मुलांना पालकांकडून यापेक्षा वेगळे अपेक्षित असते.नेमके तेच पालक मुलांना देत नाही.मुलांचे सुख-आनंद हे पैशात मोजण्याची फार मोठी चुक  पालक करतात.ही गोष्ट  येथे मी दोन उदाहरणावरून स्पष्ट करतो.
          पहिल्या प्रसंगात एका घरातील आई वडिल दोघेही कामासाठी अॉफिसला जातात. घरात क्षितिज नावाचा शाळकरी मुलगा असतो. अचानक त्या घरात फिश टँकमधील दोन तीन मासे मृत्यू झालेले असतात.पालक ठरवतात  टँकमधले पाणी बदलायला वेळ मिळत नसल्याने फिश टँक काढून  काहीतरी कलात्मक पेंटीग लावू.हा विचार सांगताच क्षितिज रडायला लागला व म्हणू लागला कि काही झाले तरी मी हे होवू देणार नाही.फिश टँकमधील पाणी मी बदलेल.तुम्ही अॉफिसला जाता.मी दुपारी शाळेतून आल्यावर संध्याकाळी सात पर्यंत हेच मासे माझ्या सोबतीला असतात,त्यांचे पाण्यातील फिरणे पाहून हालचाल पाहून घरी कोणीतरी आहे असे सतत वाटते.त्यांना जर काढून टाकले तर मी कोणाकडे पाहून जगू? क्षितिजने पालकांना विचारलेला हा प्रश्न खरोखरच अंतःकरण हेलावणारा होता.
              दुसऱ्या प्रसंगात देखील आई वडिल दोन्ही नौकरीनिमित्ताने बराच काळ घराबाहेर असतात.या घरातील एकुलती एक मुलगी मेघनाला सांभाळण्यासाठी केअर टेकर असते पण ती दिवसभर तिच्या कामात असते.मेघनाला फक्त सोबत असते ती टेडी बेअरची.दिवस रात्री झोपताना ,उठता बसता,जेवताना तसेच स्नानगृहात अंघोळ करताना (बाथरुममध्ये )देखील टेडी बेअर सोबतीला.त्याला एक क्षणभर सोडत नव्हती. शेवटी मेघनाचे आईने चिडून तो टेडी फेकून दिला.तेव्हा मेघना रडत म्हणाली ,तुम्ही अॉफिसला जात.तुम्हाला मित्र आहेत.माझी केअर टेकर तिच्या कामात व्यस्त.माझ्याशी बोलणारे कुणी नाही.मला भीती वाटते.मग दिवसभर हा टेडी माझ्या सोबत असतो.त्याला फेकून दिल्यावर मी काय करु? मेघनाचा हा प्रश्न पालकांना गहन विचार करायला भाग पाडणारा आहे.ज्या कोमल वयात आपले भावविश्व किंवा मनाचे अंतरंग पालकांजवळ व्यक्त करायचे पण मुले त्या निर्जीव बाहुल्या कडे व्यक्त करतात.ही वेळ कुणी निर्माण केली असेल वा ह्याला जबाबदार कोण असेर तर पालक. हा सर्वात मोठा दुष्परिणाम आहे मुले व पालक यांच्यातील चुकलेल्या संवादाचा.

          आनंदी व तणावमुक्त पालक एक आनंदी पिढी घडवू शकतात-मुलांवर चांगले संस्कार घडविण्यासाठी पालक आणि मुले यांच्यात सुसंवाद असायला हवा. स्वतः तणावमुक्त असलेले पालकच आपल्या मुलांना तणावमुक्त जीवन जगायला मदत करु शकतात. आपल्या मुलाशी सुसंवाद साधू शकतात. मुलांना तणावग्रस्त पालकांजवळ आपल्या भावना बोलू  वाटत नाही. त्यांच्या डोक्यातील नवीन कल्पना, विचार,स्वतःच्या समस्या तणावग्रस्त असणार्‍या पालकाला सांगाव्याशा वाटत नाही; म्हणून प्रथम पालक स्वतः तणावमुक्त असले पाहिजे.त्यासाठी पुढील उपाय अंमलात आणता येईल.
१. मुलाशी सकारात्मक संवाद साधा- शरीरावरील घाव भरुन येतात पण मनावर झालेले घाव कधीच भरुन येत नाही.मुलांच्या भावना समजून त्यांना काय वाटते ,त्यांच्यातील क्रियाशीलतेला वाव द्या.आपली मते बळजबरी लादू नका.
२.मुलांना सोबत वर्तमानात जगा- सध्याची मुले ही वर्तमान काळात जगतात व आई वडिल ही भूतकाळात.हे संवादातील अंतर भरुन निघायला पाहिजे.सध्या काय सुरू आहे त्यावर लक्ष केंद्रित (focus )करा.
३. पालकांनी व्यवहारी व पालक ह्या दोन्ही भूमिका वेगवेगळ्या ठेवाव्यात- मुलांशी पालक म्हणून वागताना आपले प्राफेशन बाजूला ठेवून फक्त मी पालक आहे या भूमिकेतून मुलांशी संवाद साधावा.
४.मुलांमधील सतत दोष शोधण्याचा प्रयत्न करणेपेक्षा त्यांच्या गुणांचे कौतुक करा.पालकांनी स्वतःची चुक असल्यास मान्य करा कारण मुले ही पालकांचेच अनुकरण करत असते.
५.मुलांवर सतत अधिकार गाजवू नका.फुलांप्रमाणे ते देखील कोमेजतात.त्यांची आवड, कुवत, शारीरिक आणि मानसिक क्षमता या सर्वांचा विचार पालकांनी करायला हवा.
        प्रसिद्ध लेखिका माधवी घारपूरे यांच्या मते,मुलांची आकलन-विचार करण्याची जी शक्तीचा विचार  आपण मोठे माणसे किंवा पालक करुच शकत नाही.आपली मते त्यांच्यावर लादत असतो.त्यांचे अभिप्राय जाणून घेत नाही.त्यांच्या विचार शक्तीला संस्कार देत नाही.आपणही कधीतरी लहान होतो.लहानाचे मोठे झालो पण लहानांसाठी राहिलो नाही.त्यावर एकच उपाय ते म्हणजे मोठ्यांनी लहान होणे हाच मोठेपणा.नाही का?...
        तात्पर्य,(संदर्भ- डॉ.मिलिंद ठोंबरे) आपला मुलगा युनिक म्हणजेच एकमेवद्वितीय आहे, हे पालकांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे इतरांशी त्याची तुलना करणे टाळावे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्यासाठी तुम्ही त्याचे मित्र व मेंटॉर किंवा मार्गदर्शक बनणे अपेक्षित आहे. आपण मुलाचे पालक आहोत मालक नाही, याचे भान ठेवावे.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
जनहितार्थ:-

मी आत्ताच जलमित्र🙋‍ झालो .1 मे ला श्रमदान करणार आहे.* माझं गाव स्पर्धेत नसलं म्हणून काय झालं.माझ्या तालुक्यातील , जिल्ह्यातील,महाराष्ट्रातील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते माझ्या भारत देशातील  आहे.

प्रत्येकाला सीमेवर जाऊन देशभक्ती व्यक्त करता येत नाही म्हणून लाखोंच्या 😥डोळ्यातील पाणी घालवण्यासाठी चला गावात पाणी आणूया.

आणि एक  जलसैनिक बनूया....

तुम्ही सुद्धा व्हाल ना मग!!जलमित्र.....💧

त्यासाठी  पुढील लिंकवर क्लिक करा https://jalmitra.paanifoundation.in/

📢 :🌱 वि४ 🌿 *व्हॉट्सअप ग्रुप.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵

अंजली आमकर,रत्नागिरी
मुलं आणि पालक यांच्यातील संवादाचा विचार करताना प्रथम पालकांचा (कुटुंबीयांचा) एकमेकांशी सवांद कसा आहे....इकडून खरी सुरवात होते.
आज जर घरातील चित्र पाहिले तर सर्वसाधारण असे असते  कोणी तरी टीव्ही मध्ये बिझी.. तर कोणी मोबाईलवर बिझी..  तर कोणी लॅपटॉप -कॉम्प्युटर वर बिझी...कोणाचा अभ्यास तर कोणी घरातील इतर कामे आवरण्यात बिझी...एकूणच सर्वच आपल्या कामात मशगुल ... आजकाल एकत्र जेवणारे कुटुंबे देखील शोधून सापडावी असे असतात... एकत्र जेवायला बसले तरी टीव्ही सुरुच असेल...मग या सर्व बिझी शेड्युल मध्ये नेमका सवांद होणार कधी????
एकमेकांशी बोलले तरी बोलणं म्हणजे  "मला टिफिन दे... आज उशीर होईल... उद्या लवकर उठव..मला पैसे पाहिजे...याच बिल भर...येताना भाजी घेऊन ये. मला वेळ नाही." ....... या अश्या बोलण्याला सवांद म्हणता येणार नाही...ही सर्व त्या कामाविषयीची इंडिकेटर म्हणू शकतो....
जर पालकच असे वर्तन करत असतील, तर मुलं देखील हेच अनुकरण करणार.
मग बालक नेमका सवांद म्हणजे काय हे कसे व कुठें शिकणार???
शाळा कॉलेज मध्ये अभ्यास शिकवला जातो...पण मनातील भावना व्यक्त करणे ... मनसोक्त बोलणे...मनापासून ऐकणे...एकमेकांना समजून घेणे... विश्वास जपणे... मानसिक विकास करणे या सर्व गोष्टी संवादातून आपल्यात विकसित होतात.
पालक बालक सवांद असो किंवा पालकांचा एकमेकांशी सवांद... कुटुंबातील लहान लहान प्रश्न देखील सवांद नसल्यांर गंभीर बनत आहेत... बालके अगदी शुल्लक अपयश पचवणे ही सहन करू शकत नाही. कधी चुकीच्या वळणावर जाऊन पोहचतात हे त्यांना समजतही नाही.
बालक पालक सवांद गरजेचा आहे. पण याची मूळ सुरवात पालकांचा एकमेकांशी असलेल्या सवांदापासून झाली पाहिजे.
शेवटी इतकंच सांगेन की, जसं पेराल तसं उगवेल.


राज इनामदार,पंढरपूर
  आज़ मुलांशी बोला , त्यांच्याशी संवाद साधा , उद्या म्हातारपणी  मुल तुमच्याशी संवाद साधतील. आणी हे वास्तव आहे .मुल म्हणजे म्हणजे एक छोटासा कँमेरा आहे .ते प्रत्येक गोष्ट आपल्या आई वडीलांची आत्मसात करत असतात .आई वडील जसे वाघतात , लहान मुलही तस वाघन्याचा प्रयत्न करत असतात .

    आजकालच्या जीन्स पँट व टी शर्टच्या जमान्यातील मम्मीकडून मायेचा पदर केव्हाच मुलांच्या डोक्यावरुंन हरवला आहे .मोबाईल आणी इंटरनेटच्या जमान्यात , पप्पा सतत मोबाईलवर व्यस्त असल्याने , आता आशीर्वादरूपी पित्याचा हाथही मिळेना .सवांद तर गमावलाच या चिमुकल्या जीवांनी परंतु त्याच बरोबर बदलत्या काळात मायेच्या ओलाव्याला सुधा पोरकी झाली ही लहानगी मुल .

  एकत्रित कुटुंब नसल्याने आजी आजोबा इतिहासजमाच झालेत. आजची संस्कृती म्हणजे, *आम्हीं दोन आमचे दोन , आमचा होतो एक चौकोन , चौकोनातील जातात दोन मग उरलेल्याना आधार कोण* ? अशी परिस्थिथि आहे.
   आई वडील शहरी भागात दोघंही जॉब करतात , कारण खुप पैसा कमवायचा असतो. कमवने म्हणजे वाईट गोष्ट नाही , जरूर कमवा,  खूप कमवा,  पण ज्याच्यासाठी कमवत आहात ना ! त्याला पैशा पेक्षा लहानपणात आधाराची , पपाबरोबर खुप खुप गपा मारण्याची , मम्मीशी शाळेतील गमती -जमती सांगाव्यशा त्या लहान जिवाला वाटत असतात .
    आपण फक्त दोन तीनच गोष्टी मुलांना विचारतो , परीक्षा कधी आहे?  ...किती मार्क पडले .? ..अभ्यास झाला का ?    काय हे या लहान मुलाला जन्म देण्यामाघे  फक्त एवढाच उद्देश होता काय ?
    *लहानांनी मोठ व्हाव अस वाटेत असेल तर ..मोठ्यानी सुधा काही काळ लहान व्हाव लागत* नेमकं हे सूत्रच आम्हीं विसरत चाललोय .त्यामुळेच आजकाल मुल नैराश्याच्या अंधार्या खाइत  ढकलले चाललेत. .
मित्रांनो स्वामी विवेकानंद , एडिसन , राष्ट्रपती कलाम साहेब ,असे इतर महापुरुष ..कुटुंबातील संवादाने व आई वडिलांनच्या वैचारिक प्रेरणेनेच महान बनू शकली व महान कार्य करू शकली ....चला तर मग *आपणही आपल्या मुलांबरोबर सवांद साधुया*


मनोज वडे ,पंढरपूर
मुलं जशी मोठे होतात तसें वडिलांनी आपला स्वभाव बदलला पाहिजे कारण मोठया  मुलाचा अपमान  करणं हे महागात पडू शकतो,कारण त्या मुलाला नवे विचार ,नवं जग पाहिलेलं असत त्याला स्वतःचे विचार असतात त्यामुळे तो त्या वयात काही ही करू शकतो.. त्या मुळे वडिलांनी जस वय वाढेल तस आपल्या स्वभावात बद्दल केला पाहिजे तर त्याचा संवाद चांगले होतील आणि एक प्रकारचं त्याच्या नात्यात घट्टपण येईल. परंतु सध्या हा संवाद होत नसलेला दिसतो त्यामुळे भरकटलेली मुलाची संख्या प्रचंड वाढत आहे असं आपण निदर्शनात येत.
एकमेकांचा संवाद नसल्याने मूल PORN side कडे वळतात आणि आपल्या आयुष्याची राखरांगोळी करताना मूले दिसतात ,तर पालक आणि मुलानी मित्रत्वाचे नात जपले तर ह्या मुले एक तर प्रचंड विकास होइल कारण वडिलांनी आपले अनुभव share करून ते त्या मुलांना पटले तर कर नाही तर करू नको असे जर व्यक्ती स्वातंत्र्य दिले तर त्या नात्यात चांगला विकास होईल आणि हा चुकलेला संवाद कुठे तरी जुळेल अस मला वाटत....

नितिन लेंडवे,पंढरपुर
      हल्ली संवाद सोडला तर वाद, विवाद आणि वादावादी अस सगळ घडत. मग तो परस्पर पालकांतील, कुटुंबातील असो वा समाजातील. संवाद साधण्याच्या संदर्भात विचार केला तर खर हा सुवर्णकाळ म्हणावी अशी स्थिति. फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर इ. कितीतरी पर्याय नुसते ओसंडत आहेत. समाज माध्यमांवरती माणसे नुसती "पडीक" आहेत म्हटले तर अतिशयोक्ति आहे असे कोणी म्हणनार नाही.
     पालक व मुल संवाद चुकण्याची वा विसंवाद का घडतो असा विचार केल्यास अनेक कारणांची जंत्रीच तयार होऊ शकेल.

   मुलांशी संवाद साधायला पाहिजे हेच मुळात ब-याच पालकांच्या गावी नसते, मुलांना विचारात न घेता गृहीत धरणे, आपलेच विचार मुलांवर थोपवणे, विपरीत अपेक्षाकृत राहणे, चुकल्यास प्रबलना ऐवजी रागावणे, मुलांमध्ये भेदभाव करणे,  भावनिक, मानसिक आधाराचा अभाव, एकाच वेळी अनेक जबाबदा-या निभवाव्या लागत असल्याने पुरेसा वेळ नसणे.
        अशी एकनाअनेक कारणे आहेत. यामुळे मुलांमध्ये पालकांप्रती विश्वासाची भावना तयार होत नाही.  विश्वासाच्या भावनेअभावी समन्वय राहत नाही. समन्वय नसेल तर संवादाचा सेतुच तयार होणार नाही.
        आज पुर्वी सारखी संयुक्त कुटुंब पद्धति राहिलेली नाही. जिथे असेल ते कौतुकाचा विषय ठरावा. त्यामुळे विविध नात्यांच्या मायेच्या ओलाव्याचा दुष्काळच. आणि अशातच दोन्ही पालक चाकरमानी असतील तर मग विचारायलाच नको. अशावेळी पालकांची होणारी ओढाताण, कौटुंबिक जबाबदा-या यातुन निर्माण होणारा ताण-तणाव व परिणामी घरातील वातावरण हे तापलेलच राहणार. मग कशाला घरात आनंद निर्माण होईल व सुसंवाद घडेल. हा खर तर वरवरच विचार करत आहोत आपण. असो.
  या गोष्ठी खरतर टाळता येणा-या पण नाहीत. स्पर्धा वाढत आहे. प्रत्येकाला जीव तोडुन पळत राहाव लागणारच आहे. तारेवरचीच ही कसरत आहे. अशावेळी घरात काही बाबतीत समतोल राखावा लागेल. जाणीवपुर्वक संवाद घडवण्यासाठी काही गोष्ठी कराव्या लागतील.
१) मुलांना त्यांचे पालक या नात्याने वेळ द्यावा लागेलच.
२) आठवड्यातुन, दिवसातुन किती वेळ द्यायचा हे ठरवावे
३) आपण त्यांचे आई-वडील असलो तरी त्यांना स्वतः ची मते आहेत व ती मांडु द्यावीत.
४) त्यांच्या आवडी-निवडी विषयी बोलावे
५) चुक करत असेल तर वेळीच हे चुक आहे याची जाणीव करुन द्यावी
६) पालकांचा परस्पर संवाद उत्तम असावा
७) मुलांच्या मनात स्वतःबद्दल विश्वास निर्माण करावा
८) मुलांच्या चांगल्या गोष्ठीबद्दल त्यांचे कौतुक करावे. मुलांना ते आवडते.
९) मुल ही संवाद साधण्यासाठी, बोलण्यासाठी आतुर असतात. त्यांना जे वाटते ते सांगावे असे वाटत असते. ते ऐकुन घ्याव.
१०) आम्ही सर्व काही तुझ्याच साठी करत आहोत हे सांगणे जरा थांबवावे.😊.
     वरील नमुनादाखल काही गोष्ठी संवाद घडवण्यासाठी निश्चित पणाने करता येतील. संवाद साधणे ही खरे तर एक उत्तम कलाच आहे. प्रत्येकाला आपापल्या पातळीवर नियोजनपुर्वक संवाद साधता येतो.
  चांगल्या संवादानेच पालक-पाल्य नाते मजबुत होईल. आणि त्याही पुढे जाऊन मित्रत्वाचे नाते निर्माण झाल्यास उत्तमच. आनंद येईल. संस्कार घडतील.आणि शेवटी संतती हीच तर संपत्ती.😊

                
प्राची कर्वे ,देहूरोड पुणे
            मुले आणि पालक यांच्यात संवाद राहिलेला नाही . उलटपक्षी विसंवाद जास्त दिसतो . याला कारणे बरीच आहेत .आजकाल पालकांना मुलासाठी वेळ नाही .ऑफीस ; वर्कलोड ; टेन्शन यामुळे ते मुलांना वेळ देत नाहीत आणि मुलांनाही त्यांचा अभ्यास आणि वेगवेगळे क्लास यांनी  त्रस्त केले आहे . एकमेकांसाठी वेळ नाही त्यामूळे संवाद नाही .
             मुलांच्या मागण्या लगेच पूर्ण केल्या जातात . त्यासाठी त्यांना जराहीआर्जव करावे लागत नाही .जसे मुलानी पेट्रोल साठी पैसे मागितले कि त्यांना  लगेच ते दिले  जातात त्यांनी आधी पैसे कधी व किती घेतले  किती पेट्रोल टाकले अगर पैसे दुसरीकडे खर्च झाले वगैरे गोष्टी पालक विचारत  नाहीत . त्यमुळे मुले मागितल्यावर लगेच मिळालेच पहिजे असेच समजतात .कधी हीशोभ मागितला तर चिडतात .अवास्तव खर्च करतात .मुलाना पालक वेळ न देता पैसे मात्र भरपूर  देतात .

               पालक मुलांचे म्हणणे नीट ऐकून घेत नाहीत .अर्थात त्यामुळे मुलेही पालकांचे  ऐकत नाहीत . म्हणूनच समजाऊन सांगणे व घेणे दोन्हीही दुरापास्त झाले आहे .पूर्वी हे काम घरातील आज्जी आजोबा करत गैरसमज बोलून दूर करण्याचे काम अगदी शिताफीने पार पाडत  पण आता आज्जी आजोबा घरी  नसतात त्यामुळे एकमेकातला  दुरावा मात्र वाढतो आहे.संवादच घडत नाही मग सुसंवाद कसा  घडेल .
याकरिता मुले व पालकांनी मिळून ऐकण्याची व समजाऊन घेण्याची गरज आहे . पालकांनी मुलांना अवास्तव स्वातंत्र  न देता प्रत्येक गोष्टीत मिळून चर्चा करून मार्ग काढण्याची गरज आहे .

सिमाली भाटकर,रत्नागिरी

आधुनिकीतेच्या जगात व्यस्त होते सगळे

बोलण्याचे साधन जिथे दूरध्वनी बनले

थकले जीव जेव्हा घरट्याकडे परतले

पिल्लांपाशी बागडण्या ऐवजी मोबाइलमध्ये गुंतले...१.

ममता- माया पाळणाघरे वा आयांपाशी थांबले

भक्कमतेच्या सावल्यांना वृध्दाश्रमात नेऊनी बसविले

आणी आधुनिक युगात कुटुंबाचे रुपच पालटले

आशा अन् अपेक्षाच्या ओझ्यानं कुणी प्राणास मुकले...२. दडपशाहीच्या भावनेनं विक्षिप्तावाणी एकटे होऊन पडले जुन्या सोबत नवं स्वीकारतांना बालपण हरवले

नात्यांचे पाश आता स्पर्धेत रंगले

जिंकण्याच्या आशेत आपलेपणाने खेळणं विसरले...३.

तू तू मी मी करता करता पाखरांच्या भांडणात पिल्लांचे अस्तित्व हरवले

स्वातंत्र्याचे अर्थ स्वैराचारात बदलले

आणी मोकळे पणाने जगण्यांचा आनंद घेणं विसरले...४.

माझ्या वरील कवितेच्या माध्यमातून मला एवढेच सांगायचे आहे,मुले ही देवाघरची फुले आहेत.त्यांना समजून घेणे आवश्यक आहे.त्यांच्या सोबत लहान होऊन जगा,त्यांच्याशी बोला.तुम्हांलाही तुमचे बालपण परत मिळेल.
धाक हा डोळ्यात असावा व प्रेम हे वाणीत असले पाहिजे.काही पालक आपल्या मुलात सुधारणा व्हावी म्हणून कधी कधी  त्यांना मारतात.मला कोणत्याही चुकीचे समर्थन करायचे नाही.पण मुलांना मारणे ही त्यांच्या चुकीची शिक्षा वा दंड नाही तर त्याने ती चुक का केली हे समजून घेऊन त्याला समजावून सांगणे जेणेकरुन तो चुक परत करणार नाही.जगण्याचं कौशल्य शिकणे हिच आजच्या काळाची गरज आहे.तरच तुम्ही आनंदाने सुख जीवन जगू शकता.

समीर सरागे ,यवतमाळ
आजकालच्या युगात पालक आणि पाल्ये यातील दरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या दोघांमधील संवाद(संवाद म्हणजे केवळ बोली नव्हे तर एक प्रकारची सकारात्मक वागणूक) कुठेतरी हरपत आहे अस चित्र दिसतय.

प्रत्येक पालकांच्या त्यांच्या पाल्या कडून फार मोठ्या प्रमाणात अपेक्षा असतात, त्याने जगाच्या तुलनेत काही वेगळ करावे ,प्रत्येक क्षेत्रात नाव कमवाव वैगरे त्यांच्या अपेक्षा मग  सतत अभ्यास कर म्हणून त्याच्या मागे लागने, त्याचेवर सतत पाळत ठेवायची  तुला  अमुक विषयात इतके कमी मार्क्स कसे मिळाले इतके  का नाही ? , तूला 10 वी 12 विला 98 टक्के मार्क्स मिळालेच पाहीजे त्याच्या कमी नकोच , तुला अमुक अमुक  विषयाचा शिकवनी क्लास लावून देतो वैगरे वैगरे.म्हणजे  आपण मुलांना सतत अपेक्षाच्या ओझ्या खाली ठेवत असतो आणि अपेक्षा देखील कोणत्या ज्याना सतत समाजात मिरवायच असतं आणि आपली प्रतिष्ठा जपायची असते!

आपल्या अश्या वागण्या बोलण्या आणि मार देण्या मुळे मुले सतत दड़पन आणि दबावाखाली राहत असतात यामुळे ति चीड़ चिड़ी तर होतातच आणि पालकाचा राग मनात घेऊन बस्तात व यामुळे मुले नेहमी पालकाना टाळायचा प्रयत्न करतात परिणामी ते मनमोकळे पनाने कोनशी बोलू शकत नाही , कोनाशी खेलु शकत नाही  एकलकोंडेपणा मुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होते व याचा वाईट परिणाम त्यांच्या मानसिक अरोग्या वर होत असतो  याकरणास्त्व मुले  भित्री बनतात व त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो.

म्हणजे वंरवार  मुलाना टोकने ,कोणतीही चांगली गोष्ट त्याने केल्यावर त्याचे कौतुक करायच्या ऐवजी किंवा तो चुकत असेल तर त्याला संमजवन्याच्या ऐवजी आपण त्याला चार चौघात हटकतो किंवा थोड्याशा चुकिवर त्याला मार देतो हे पूर्णतः चुकीचे आहे.

प्रत्येक पालकाने आपल्या मुलां कडून  काही चुक झाल्यास त्याला मारायच्या किंवा रागावयाच्या ऐवजी सुरुवातीला त्याची समजूत काढावी, समजून संगीतल्याने मुले समजतात ते पुन्हा तशी चुक करत नाही.

वडिलांनी  मुलाला आपला जास्तीत जास्त वेळ द्यायला हवा , ऑफीस मधून आल्यावर  संवाद साधन्याचा प्रयत्न कारायचा  त्याच्याशी गप्पा मारायच्या आज शाळेत क़ाय शिकविले, कोणता गृहपाठ दिला ,क़ाय खेळ खेळले  वैगरे या बाबत मुलाशी चर्चा करावी.

बरेचसे पालक मुलासमोर व्यसने  करतात (सिगरेट ,दारू ,व इतर तत्सम पदार्थांचे सेवन वैगरे) परंतु अशे करणे म्हणजे मुलाला वाईट सवय लावणे  या गोष्टी आपण सहसा लक्षात घेत नाही. कारण मुले है प्रत्येक गोष्टीचे अनुकरण करत असतात आणि पालकानी जर वाईट व्यसन मुलांसमोर केलीत तर ते देखील तशेच अनुकरण करतात कारण जे आई वडील  करतात  ते  चांगलेच अशी त्यांची भावना होउ शकते   
म्हणून नेहमी चांगल्या बाबी मुलांसमोर करायच्या.

बरेच पालक  बहुधा आपल्या मुलांकडे माझा मुलगा हा आमच्या म्हातारपनातील काठी आहे अश्या नजरेने पाहत असतात परंतु हे पूर्णत: चुकीचे आहे, उलट त्याच्या मधील सुप्त गुणानां ओळखून  त्याच्यात असलेल्या कला गुणानां  वाव द्या खेळ, कला, वैगरे मध्ये असलेले त्याचे छंद जोपासा. त्यांना इतरांचा मान सन्मान करायला शिकवा ,काही खरेदी करताना त्यांना सोबत घेऊन जा यामुळे त्यांच्या आवडी निवडी जोपासल्या जातील.

त्यांच्यावर संस्कार लादू नका उलट आपल्या चांगल्या बोलण्या ,वागण्यातुन व व्यवहारातून मुलांना संस्कार मिळत असतात
मुलांवर नेहमी अधिकार गाजवन्या एवजी त्यांच्याशी समरस व्हा आणि त्यांचे मित्र बनून त्यांच्याशी वागा हाच संवाद अपेक्षित आहे.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵



1 टिप्पणी:

  1. खूपच सुरेख आणि व्यापक विचार मांडला आहे यामुळे पालकांना नक्कीच मदत होईल आणि त्यातून खूपच चांगले रिझल्ट मिळतील अशी आशा वाटते.
    ----------
    संदिप सावंत
    बाॅर्न टॅलेंट इंडिया
    शैक्षणिक सल्लागार व मानसशास्त्र विश्लेषक
    8080904094

    उत्तर द्याहटवा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************