चहा (भाग 1) पहिला

चहा (भाग 1पहिला)




*१)अनिकेत कांबळे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर*

 चहा हे माझं पहिलं प्रेम म्हंटल तर अतिशयोक्ती होणार नाही,मागच्यावेळी विषय निवडला गेला नसला तर आज आपलं चहावरच प्रेम जिंकल्याचा मनस्वी आनंद झाला हे मात्र नक्की,
चहा मग तो घरात असो कॉलेज वर किंवा विद्यापीठात,एकवेळ सोबत गर्लफ्रेंड नसली तरी चालेल पण सकाळ पासून रात्री पर्यंत चहा हा हवाच,नुसतं चहा प्यायला चल म्हणायचा अवकाश मी एका पायावर तयार कायम.मध्यंतरी खूप ब्रेकअप झाले चहा चे आणि माझे, कारण संध्याकाळी जिम ला जाऊन आला की प्रोटीन म्हणून चहा प्यायचो, बॉडी काय खाक होईल मग अशाने,जाऊदे सोडून दिलं एक महिना वाऱ्यावर पण शेवटी पहिलं प्रेम सुखानं जगू तरी कसं देईल आणि दुःखात कस सोबत सोडेल....पुन्हा आमचं पेचअप झालं,आजपर्यंत तिचा पाठलाग सोडला नाही,आईच्या शिव्या मला पडायला चालू झाल्या की समजायचं साखर संपवली आपल्या चहाने, पण जास्त काळ घरी राहायला नाही मिळायचं हॉस्टेल वर अठरा विश्व दारिद्र्य ,कोण चहा देतोय का याची वाट बघायची नाहीतर एक तर उधार प्यायचा नाहीतर कधी कधी एक एक रुपया गोळा करून 6 रुपये जमले की चहा प्यायचा त्यात एवढा आनंद मिळायचा की स्वर्ग सापडतो तो इथंच,कधी कधी एकटपण सुखानं जागवणारा चहा एकटेपणात खंबीर बनवणारा चहा,चौकात एक कप चहा घ्यायचा येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांच्या गोंधळात एक शांतता मिळते ती चहानेच, असो हे चहाचं प्रेम दीर्घकाळ टिकणार आहे,हे माझं पहिलं प्रेम ...असंच अनंत राहो,भलेही चहा पिऊन आयुष्य कमी होईल पण कमी आयुष्यात खूप काही कस जगायचं हे ज्याला त्याला चहा पितानाच सुचत हे मात्र खरं.
*==============================*


*२)अर्जुन रामहरी गोडगे,
सिरसाव ता.परंडा जि.,उस्मानाबाद*

कित्येक माणसं आयुष्यात आली,
आयुष्य बेचव करून गेली तुझी मात्र अजूनही तशीच आहे...

आयुष्यात कधी कोणतेच व्यसन केलं नाही
तू मात्र मला कधी सोडलं नाही.....

जीवनाच्या या मुशाफिरीत जीव कधी कधी होतोय नकोसा पण
जोडीला तू असली की कधी एकटा वाटतं नाही....

आयुष्य झंड झाल्यासारखं वाटतंय
कंटाळालो आहे रोजरोजच्या कटकटीना पण तुझी साथ कायम आहे.....

विद्यापीठातील कॅन्टीनची तुझी चव बेचव आहे
दिवसातून चार पाच वेळा तरी भोगयचं हे चाललंय रोजच......

काही झालं तू मात्र माझी साथ सोडली नाही
वैतागलेल्या जीवाला विसावा देयला तू नेहमी तयार यातूनच बरं वाटतंय........

कित्येक ची आयुष्य तू वळणावर आणली
खूप बरं वाटतंय तुझाशीवाय कोणालाच करमत नाही आजकाल....
*==============================*

*३)जगताप रामकिशन शारदा
(बीड)*
'अण्णा एक चाय 'असा आवाज दिला की न एक पुसटसा हसण्याचा आवाज यायचा. सुरवातीला दुर्लक्ष केले पण पुन्हा पुन्हा अनुभव येताना पाहून एक दिवस विचारले असता मी *चहाला चहा* न बोलता *चाय* बोलतो हे त्यांना विचित्र वाटायचं. सुरवातीला काही नाही पण जस जस दिवस सरत होते रात्री अपरात्री दुपारी कधीही मी चहा पियायला गेलो की 'एक चाय' असा उपरोधिक आवाज यायचा. कधी कधी तो.ऐकून ओशाळल्यागत व्हायचे . चहाला चाय बोलण्याच्या सवयीने ती ओळख एवढी वाढली की ती कँटीन राहिली च नाही एक दुसर घर बनून गेली.
*==============================*

*४)संगीता देशमुख,
वसमत*
आम्हा भारतीय लोकांची दिवसाची सुरुवातच ही चहाने होते. चहाप्रेमी लोकं तर चहास पृथ्वीतलावरील अमृत असेही म्हणतात. रात्रभराच्या आरामनंतर आपण सकाळी शरीराने ताजेतवाने झालेलो असलो तरी मनाने मात्र जोवर पोटात चहा पडत नाही तोवर आपल्यातली मरगळ काही केल्या निघून जात नाही. दिवसभराचा उत्साह भरण्यासाठी चहा हे उत्तम पेय आहे. चहा हा पारंपरिक आहे. चहाऐवजी गरम पाणी पिऊन ती मरगळ जाईल,असेही नाही. काही लोकं चहाला पर्याय म्हणून कॉफी,दुध घेतात तर काहीजणांना आजकाल डॉक्टरलोक चहाऐवजी ग्रीन टी,ब्लॅक टी असे पर्याय सुचवतात. आमच्या मनात चहा इतका रुतून बसला आहे की, सकाळी चहा पिलाच पाहिजे,अशी आमची दृढभावना आहे. म्हणजे चहाशिवाय कोणी आपल्या दिनचर्येची कल्पनाही करू शकणार नाही. म्हणून तर मग चहा जेव्हा अनेक कारणानी  नको असतो तेव्हा चहाला पर्याय म्हणून ग्रीन टी,ब्लॅक टी,कॉफी हे घ्यावे लागते. हे कितीही आपल्या जीवनात शिरले तरी चहाची जागा मात्र ही पेये घेऊ शकलेली नाहीत. म्हणूनच सकाळी सकाळी कोणी भेटले तर "झाला का ग्रीन टी/कॉफी अथवा ब्लॅक टी?" असं कोणी विचारत नाही. अजूनही आपल्याला दिवसाच्या सुरुवातीला कोणी भेटले किंवा बायका एकमेकींना सकाळी भेटल्यावर विचारतात की,'झाले का चहापाणी?' जुन्या बायका दुपारी जांभया यायला लागल्या तर चार वाजले,चहाची वेळ झाली,असं सुचवायच्या. अनेकजण तर आधी चहा झाल्याशिवाय कोणत्या कामाला हातच लावत नाहीत. कोणाला हा चहा दिवसभरातून कितीही वेळा लागतो,कोणाला दोनदा लागतो, तर कोणाला सकाळचाही पुरेसा असतो. काहींना सकाळी उठल्याबरोबर लागतो,तसा तो काहीजणांना झोपतानाही लागतो. पण चहा लागतोच! चहा लागत नाही,अशी अगदी बोटावर मोजण्याइतके लोक असतील. अनेकांना सकाळचा चहा घेतल्याशिवाय पोट साफ होत नाही,इतकं चहा आणि माणसांचं नातं घट्ट आहे.
            मनुष्याच्या दिवसाची सुरुवात जशी चहा करतो,तसे तो माणसामाणसामधील ऋणानुबंधही घट्ट करतो. आपल्या घरी आलेल्या व्यक्तीला चहा विचारला तर त्या  व्यक्तीला योग्य मान मिळाल्यासारखा वाटतो. घरी आल्याबरोबर एखाद्याला जेवण विचारले नाही तर फारसे वाटणार नाही पण चहा जर विचारला नाही तर 'काय कंजूष माणूस,याला तर चहा विचारण्याएवढीही माणुसकी नाही,यांच्याकडे चहा विचारण्याचीही रीतभात नाही' ,अशी दुषणे आपल्याला येवून चिकटतात. किंवा 'त्या व्यक्तीकडे गेल्याबरोबर चहा विचारला,फार भला माणूस' म्हणून आपले कौतुकही होते. जुनी माणसं म्हणायची,बऱ्याचदा हजार रुपयाने जे काम होणार नाही ते काम एक कप चहाने होते,म्हणून आपल्या घरी आलेल्या माणसाला चहा विचारावा. अर्थात आपल्या घरी आलेल्या व्यक्तीच्या  स्वागताचे साधनच चहा हे आहे. चहा हा कोणताही भेद पाळत नाही. घरी आलेला व्यक्ती श्रीमंत असो गरीब असो अथवा तो उच्चशिक्षित असो की अडाणी त्याला आपण आल्याबरोबर चहा घेण्याबद्दल विचारतो. कितीही परका असो की जीवलग असो त्याच्या आदरातिथ्याचा मान मिळतो तो आधी चहालाच! पाहुणा कोणत्याही वेळेला येवो चहा विचारल्या जातोच. पाहुणे फारच उशीरा आले,त्यांचे जेवणाचा बेत ठरलेला असेल तरी त्यांना एवढे विचारले जाणारच की,आधी चहा घेता की ताट तयार करू? पाहुणचार कोणता आणि कसा द्यायचा,हा आदरातिथ्याचा चहानंतरचा टप्पा.
                     मराठवाड्यात मुलीला पहायचा कार्यक्रम म्हटलं की,फक्त चहा पोहे ठरलेले. मित्रामित्रांच्या गप्पा रंगायला सुरुवात चहाच्या टपरीवर. कोणत्याही कार्यालयात दिवसभर चहा सुरूच असतो.  कार्यालयातील गैरप्रकार भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आजकाल प्रत्येक कार्यालयात सी सी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पण आता सी सी कॅमेऱ्याच्या नजरेतून सुटण्यासाठी "असे" साहेब किंवा त्यांच्या  स्पेशल माणसाला समोरची व्यक्ती "चला साहेब,बाहेर चहा पिऊन येऊ " म्हणून चहा प्यायला बाहेर बोलावतात. "चहा पिणे" हा त्यांचा कोडवर्ड बनतो. अशावेळी हा "चहा" किती महागडा असेल,याची कल्पनाच न केलेली बरी!  असा चहा काही ठिकाणी बदनाम जरी असला तरी काहीजणांना मात्र अगदी राजमार्गाने राजरोसपणे त्याने श्रीमंत बनविले आहे. दवाखाना,शाळा,सरकारी,खासगी कार्यालये,रेल्वेस्टेशन,बस स्टेशन अशा सर्व ठिकाणी चहा आपले अस्तित्व टिकवून आहे म्हटल्यापेक्षा पसरवत आहे. एकदा असच  एका चहाविक्रेत्याशी बोलतांना त्याच्या चहाच्या व्यवसायाविषयी बोलणे झाले. तो म्हणाला,"मॅडम,माझी चहा लै फेमस हय. चहाच्या धंद्यावर मी दोनताळी घर बांधलं,पोरीचं धुमधडाक्यात लगन लावलं अन् दोन पोरायसाटी चार फ्लाट बी घेऊन ठिवले". अवाक् होऊन मी त्याचे उत्पन्न विचारले तर तो म्हणाला "दिवसाचा माझा  गल्ला पंधरा हजाराचा असतो". नुसत्या चहाने या आणि अशा माणसाना एवढे धनाढ्य बनविले हे ऐकून माझ्या मनात चहाची थोरवी अधिकच वाढली.थोडक्यात या चहाला कोणी नावबोटे ठेवली अथवा डॉक्टरने नको म्हणून सांगितले तरी अगदी प्राचीन काळापासून हा चहा आपले स्थान अबाधित राखून आहे.
*==============================*

*५)प्रदिप इरकर,
वसई*
चहा..अहो हा शब्द जरी उच्चारला तरी शाहरुख खानच्या 'फॅन' चित्रपटातील डायलॉग आठवतो. "वो सिर्फ चाय नही है,दुनिया है मेरी"
आमच्या कुटुंबात असलेलं चहाचे व्यसन हे माझ्या माहितीप्रमाणे 2-3 पिढ्यांपासून तरी नक्कीच आहे व ही परंपरा आमची आताची पिढी म्हणजे मी आणि भाऊ अगदी नित्यनेमाने पाळतो.
म्हणजे असा की दुसऱयांच्या घरात चहाची वेळ ठरलेली असते परंतु आमच्या घरी चहाची लहर ठरलेली असते म्हणजे एकाला जरी तलफ झाली की 5 कप चहा हे समीकरण ठरलेलंच आहे.
थकवा आणि चहा..
अभ्यास आणि चहा..
कामानिमित्त बाहेर जाणे आणि चहा..
रोज सकाळी घरातून बाहेर पडणे आणि चहा..
बाहेरून घरी येणे आणि चहा..
डोकं दुखले आणि चहा..
ही काही इतर चहाची समीकरणे.

मित्रही असे की भेटल्यावर मॅक्डोनाल्डस किंवा पिझ्झा नाही तर चहाची टपरी.
आणि नागोरी चहा असेल तर मग उत्तमच.

शेवटी एकच दारूचं व्यसन असण्यापेक्षा हे चहाचे व्यसन बरेच...
*=============================*

*६)अपेक्षा मानाजी,
मुंबई*
चहाची भारतासोबतची नाळ अतूट आहे.घरात एखादं मुल जरा जास्तीचं लाडकं असावं तस भारतीयांनी सर्व पेयांमध्ये चहाला जरा जास्तच लाडोबा केलं.मित्रांच्या कट्ट्यावर, ऑफिस मध्ये रस्त्याकडेच्या टपरीवर, घराघरांत सगळीकडे ह्याचीच हवा.परंतु भारत त्याची जन्मदात्री नाही बरं,ह्याची जन्मदात्री आई चायना.पण भारतानेही सख्खा मावशीप्रमाने त्याला जीव लावला.प्राचीन काळात चीन मध्ये म्यांडेरियन भाषेत चहा ला 'किया' बोललं जायचं त्यानंतर किया च रूपांतर चाय मध्ये झालं.युरोप मध्ये १५४१ च्या दरम्यान चहा ला 'टे' बोललं जायचं १६४४ मध्ये व्यापारी भाषेत 'टी' बोललं जाऊ लागलं. पहिल्यांदा चहाचे सेवन  केव्हा झाले ह्याबद्दल नेमकी माहिती उपलब्ध नसली तरी,चहाच्या सेवनाचे पुरावे ई.स. वी.पूर्व (७५०-५००) रामायणाच्या काळापासून चे आहेत.त्यानंतर जवळजवळ हजार वर्षे चहा लुप्त होऊन राहिला.त्यानंतर त्याच्या पूनरउगमाची माहिती पहिल्या शतकात बौद्ध भिक्षुंकडून सेवन केले गेल्याची आहे.त्यानंतर १५९८ मध्ये डच यात्रीने त्याच्या पुस्तकात भारतात चहाची भाजी,सूप होत असल्याची नोंद केली आहे.परंतु चहाच्या पुनरुज्जीवनाचे श्रेय जाते ते ब्रिटिशांना. चहाचं व्यावसायीकीकरण ब्रिटिशांनी केले.१७७४ मध्ये पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींग ने पहिल्यांदा चायानाच्या चहाच्या बियांचे नमुने भूटान ला शेतीसाठी पाठवले,इंग्लिश वनस्पतीशास्त्रज्ञ जॉन बक्स निरीक्षक होते,१७७७ मध्ये त्यांनी वॉरन ला भारतात चहाची लागवड करण्याबाबत सुचविले.
ब्रिटिश भूदल सेनेतले कर्नल रॉबर्ट ह्यांनी १७८० मध्ये हावरा येथे बोटनिकल गार्डन मध्ये चहा लावण्याचा प्रयोग केला.त्यानंतर १८२३ मध्ये स्कॉटिश यात्री रॉबर्ट ब्रूस यांनी ब्रम्हपुत्रा खोऱ्यातील स्थानिक चहा शोधला.आसामच्या मणीराम दिवाण ह्यांनी ह्या स्थानिक चहा ची महत्त्व पूर्ण माहिती रॉबर्ट ह्यांना दिली.मणीराम दिवाण हे आसाम मध्ये चहा ची शेती करणारे पाहिले भारतीय ठरले.१८३४ मध्ये भारतात आसाममध्ये पहिल्या चहाच्या बागा उभ्या राहिल्या.त्यानंतर १८३५ मध्ये टी बोर्डाची स्थापना झाली.१८३८ ला पहिल्यांदा आसामचा चहा लंडन ला गेला.नंतर आसाम ते दक्षिणेला केरळ पर्यंत बागा पसरत गेल्या.आज भारत चहाचा जगातील दुसरा सर्वात मोठा उत्पादक आहे.गेले शतकभर भारत जगातील अव्वल चहा उत्पादक होता,परंतु आता चीन ने आपल्यावर मात केलीय. आसाम, पच्छ्म बंगाल, तामिळनाडू, केरळ,त्रिपुरा, अरुणाचल भारतातील जास्त चहा उत्पादन करणारी राज्ये आहेत.आपल्या लाडक्या चहाचे ग्रीन टी,ब्लॅक टी, उलाँग टी, व्हाईट टी असे प्रकार आहेत.चहा ला संजीवनी मिळाली ते इथल्या बाजारपठांवर अधिराज्य गाजवण्यासाठी पण त्याने मात्र भारताच्या हृदयावर अधिराज्य गाजवले.
*==============================*

*७)हरीदास यादव,
मु.पो.मारापूर, ता.मंगळवेढा. जि. सोलापूर*

विषय चहाचा निघाला, अन् मन इतिहासातील बालपणात जावून पोहोचल, आमच सत्तेचाळीस जणांच एकत्र कुटुंब, लहान मुलांना चहा दिला की त्यांची वाढ खुंटते, असा आमच्या घरातील लोकांचा समज असल्याने, साधारण पंधरा वर्षाच्या आतील  मुलांना चहा द्यायचा नाही हा अलिखित नियम काटेकोरपणे पाळला जायचा.
परंतू मला चहा खुप आवडायचा, त्यामुळे मी आईकडे चहासाठी खुपच हट्ट करायचो. आणि मग आई दुधाच्या ग्लासमध्ये थोडासा चहा टाकून दुधाबरोबर प्यायला द्यायची, व माझी समजूत काढायची.

आमच्याकडे गुऱ्हाळ असल्यामुळे चहा गुळाचा असायचा. चुलीवर बनवलेल्या गुळाच्या चहाची चव मला खुपच आवडायची.

हळूहळू मजुरांच्या अडचणीमुळे गुऱ्हाळ बंद पडल आणि गुळाच्या डब्यात साखरेने घुसखोरी केली. चहाच्या चवीत आणि रंगात फरक पडला, तसाच चहाच्या गुणधर्मात ही बदल झला. शुद्ध, सात्त्विक व पौष्टिक गुळाच्या चहाची जागा रसायन व गंधक मिश्रीत साखरेच्या चहाने बळकावली, आणि आरोग्यासाठी घातक व हानिकारक पर्वाला सुरुवात झाली.

चारपाच वर्षापुर्वी मला साखरेच्या चहाचे दुष्परिणाम जाणवू लागले, म्हणून मी बाजारातून गुळ आणला व गुळाचा चहा घ्यायला सुरुवात केली, परंतू बाजारातील गुळामध्ये गुळ बनवताना मोठ्या प्रमाणात रसायनांचा वापर केला असल्याने तो चहा प्यायची ईच्छा होईना.

आणि मग खुप विचार करून व सेंद्रिय शेतीचा अभ्यास करुन  मी माझा स्वताःचा एक एकर ऊस नैसर्गिक पध्दतीने पिकवला व शेजारच्या गावातील गुऱ्हाळावरती फक्त भेंडीचा रस व चुना वापरून स्वताः समोर उभ राहून गुळ बनवून आणला. व तो घरी वापरायला सुरुवात केली, व बाजारी रसायनयुक्त गुळ आणि साखर घरातून हद्दपार केली, खुप समाधान वाटल.

तयार झालेला गुळ घरी संपेना म्हणून मग मित्रपरिवार व पाहुणे रावळे यांना वाटला, त्यांनाही तो खुप आवडला, त्यांनी परत विकत मागितला व घेवून गेले.

आता मी स्वताःचे नवीन गुऱ्हाळ सुरु केले असून, सेंद्रिय ऊसापासून तयार केलेला शुद्ध, स्वच्छ, स्वादिष्ठ गुळ व काकवी तयार करत आहे.आज माझ्या सेंद्रिय गुळाला व काकवीला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे,व तो माझा मुख्य व्यावसाय बनला आहे.

सांगण्याचे तात्पर्य येवढेच की एका चहाच्या आवडीमुळे मला नवीन व्यावसाय मिळाला.
हे सगळ चहाच्या आवडीमुळे झाल.
मी चहाचा शतशाः  आभारी आहे.
*==============================*

*८)वाल्मीक* *फड*
*महाजनपूर* *नाशिक*  
   चहा म्हटलं की आजही आईची आठवण येते आणि डोळे पाणावतात.कारण चहा म्हणजे साक्षात अमृत माझ्या आईचे.प्रसंगी जेवण नाही मिळाले तरी चालेल पण चहा पाहिजेच.काय होतं आमचं एकत्र कुटुंब होते त्यावेळी आमच्या आजिबाई म्हणजे मोठा दरारा,पाच सुना,पाच मुलं,एक दिड डझन नातवंडअसा मोठा परीवार .आईला चहा पिऊ वाटला तर स्वतः गुळ चहा पावडर आणायची आणि गुपचूप चहा बनऊन प्यायचा कारण म्हातारी फार कडक होती.                काही दिवस निघुन गेल्यावर आमचे कुटुंब विभक्त झाले आता आम्ही वेगळे राहू लागलो.आईचे चहाप्रेम इतके प्रबळ होते की,विभक्त झाल्यावर आई बिनधास्त होऊन चहा पिण्याच्या आनंद घेऊ लागली.जास्त चहा घेतल्याने पुढे आईला ञास जाणवू लागला.दवाखान्यात नेल्यावर डाॕक्टरांनी सांगितले आजी चहा बंद करावा लागेल तेव्हा बाकी आईला डॉक्टरांचा खुप राग आला.आईने डाॕक्टरला सांगितले तुला काय गोळ्या सूई द्यायची ती दे आणि मला जाऊदे घरी.आईला मुद्दाम म्हणायचो आपल्याला आता चहा बंद करायचा आहे त्यावर आई मला सांगायची ,चहा पिऊन मेले तरी चालेल पण मी चहा प्यायचा सोडणार नाही.आणि खरोखर एका गंभीर आजाराने आई गेली .इतके चहाप्रेम होते की,एकदा आई आणि मी मुंबईला एका जवळील नातेवाईकाकडे गेलो,तिथे काही चहा आला नाही आईने नात्याने भावजय असलेल्या बाईला जागेवर खसकून टाकले.                  आमच्या सौ सुद्धा आईला सामील झाल्या होत्या.आजही त्यांचे चहाप्रेम अतुट असं आहे.मि आई असतांना कायम एक ओवी म्हणायचो "अमृताची वाटी येता माझे हाती /तेणे मज चित्ती आनंद ".चहा हा आईचा जिव की प्राण होता.आजही चहा समोर आला की,आईची आठवण ताजी होते
*==============================*
(यातील सर्व संबंधीत छायाचित्रे गुगलवरून घेतलेली आहेत)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************