खरंच आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारला आहे का ??(भाग:-२)

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

खरंच आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारला आहे का ??


Source: INTERNET
किरण पवार,
औरंगाबाद

        या विषयाच उत्तर द्यायला मला वाटतं की, एक नकार फक्त पुरेसा आहे. कारण विचाराल तर मी थेटपणे दैनंदिन जीवनातील आढाव्याद्वारे हे सिद्ध करु शकतो की, नव्वद टक्के पेक्षा जास्त आपल्या समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोनाची खरी जाणीव झालीच नाही. जर आपल्या समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन समजला असता तर मी मुद्दामपणे सांगू इच्छितो *बलत्कार, अंधश्रद्धा, प्रेमप्रकरणातून घडणारे गुन्हे* या गोष्टी झाल्याच नसत्या किंवा त्यांच प्रमाण हे कमी राहीलं असत. तुम्ही म्हणाल याचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंतर्भाव होतो कुठे? तर माझ्याजवळ याच उत्तर आहे ते म्हणजे, मुल-मुली ज्यावेळी एका विशिष्ट किशोरवयीन वयात असतात तेव्हा त्यांच्या *शरीरात घडणाऱ्या हार्मोन्सच्या सेक्रेशनमुळे प्रेम वगैरे सारखे प्रकार घडतात. खर तर ते फक्त आकर्षण असत. इथे फरक हाच खरं प्रेम हे मॅच्युरिटी आल्यानंतर होतं.* असो पण या गोष्टी पालक समजून घेत नाहीत. शक्यतो गावातील पालक या बाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ असतात.  त्यामुळे पुढच्या घटना कशा पद्धतीने किचकट होत जातात हे आपल्याला माहीत आहे.
           दुसरा मुद्दा असा की, आजही जेव्हा एखादया आठवी-नववी किंवा दहावी या वयातील मुलांसमोर लैंगिक शिक्षण देण्याची गरज भासते तेव्हा आपलाच समाज अशा गोष्टींना विरोध करतो. खर तर *लैंगिक शिक्षण देणे ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाची बाब आहे* अस मी मानतो. आपल्या समाजात *लपवाछपवी* फार चालते. जी की चुकीची तर आहेच त्याचबरोबर अन्यायकारक सुद्धा आहे. हो हे सत्य आहे. संपूर्ण स्वातंत्र्य आणि सकारात्मक विचारांनी जगणाऱ्यांना आमचा समाज नावं ठेवतो. आणि दुसरीकडे *संस्कारांच्या नावाने स्त्रियांवर अत्याचार करतो.* माझ किमान मत असं आहे की, जर तुम्ही मुला-मुलींना योग्य वयात आल्यावर लैंगिक शिक्षण दिल तर कदाचित बलात्कारासारख्या गोष्टींच प्रमाण कमी होईल.
          *अंधश्रद्धा* या एका गोष्टीने आजवर किती आयुष्य उध्वस्त केली हे सांगायलाच नको. पण त्याहीपेक्षा अधिक वाईट याच वाटतं की, *चांगले सुशिक्षित* लोक ज्यांना आपण संबोधतो तेही *कळत पण वळत नाही* अशा काहीशा प्रकारे अंधश्रद्धेच्या आहारी गेलेली आहेत. तुम्हाला इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो ते म्हणजे आपण *उच्च शिक्षणाच्या पदवीधरांना वा शिकून नोकरी करणाऱ्याला* सुशिक्षित वा *खूप चांगला* अस घोषित करून टाकतो. पण समजा जर मी स्वत: *बारावी पर्यंत शिकलो* आहे आणि आजवरच्या मिळवलेल्या ज्ञानातून मी माझ्या जीवनात कधीच *जातीभेद करत नसेल* परंतु माझा मित्र *इंजीनिअर* आहे आणि तो चांगला पगार मिळवतो पण *जातीभेद करतो* तर मला सांगा त्याच्या शिक्षणाने खरच त्याला *वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करण्याच ज्ञान दिलं का?*
             "वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे तंत्रज्ञानाला विचारांची जोड देऊन आयुष्याची प्रगती करण." ही व्याखा तेवढी आपण एकवेळ ध्यानात ठेवतोही. पण या व्याख्येत येणाऱ्या *विचार* या शब्दाचा अर्थ आपण काय घेतो? हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
धन्यवाद!
Source: INTERNET
ज्ञानेश्वर तात्या टिंगरे,
उस्मानाबाद

प्रथमतः सर्वाना विज्ञान दिनाच्या शुभेच्छा...
आपल्या शब्द वैभवाने भारतीय परंपरेची टिंगल करणारांना पण खूप खूप शुभेच्छा...

मुळात वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय किंवा तो कशा पद्धतीने अंगिकरला जावा यात मतभिन्नता असू शकते.

एखादा अध्यात्मातील व्यक्ती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचून ज्ञान प्रसाराचे कार्य करत असेल, लोकांना अंधश्रद्धा, गैरव्यवहार, गैरवर्तन अशा विकृतीपासून दूर नेत असेल त्याला तुम्ही काय म्हणाल, ( यात काही भामटे लोक घुसले आहेत पैसे कमावण्यासाठी ).

आजकाल अध्यात्मातील लोक म्हणजे पुरे लुटारू, भामटे असतात असा गैरसमज पसरवला गेला आहे , आणि या अध्यात्मिक विचारांच्या पूर्ण विरोधात वागणारा विज्ञानवादी म्हणून ओळखला जातो हे विशेष.

जर अध्यात्म आणि विज्ञान हातात हात घालून एकत्र चालू लागले तर देश प्रगतीपथावर जायला वेळ लागणार नाही हे मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांच्या वाक्याचा विसर बऱ्याच विज्ञानाच्या पुजार्याना पडतो किंवा याकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं जातं आणि दुसरं म्हणजे जिथं विज्ञान संपतं तिथून अध्यात्म सुरू होतं हे विवेकानंदांचे विचार पण लपवून दुसरे विचार पुढे आणले जातात हा खोडसाळ पणा भारतात खपवून घेतला जातो..
अंधश्रद्धा आणि श्रध्दा यात पुसटशी रेषा आहे हे काहींच्या गळीच उतरत नाही आणि तसेच विज्ञान आणि अध्यात्म यात एक पुसटशी रेषा आहे हे पण काहींना मान्य नाही.

भारतीय धर्मग्रंथाचे मुखपृष्ठ पण कधी बघितलेलं नसलेले लोक त्या ग्रंथाचे मूल्यमापन बिनधास्त करतात हे बघून आश्चर्य वाटते.
भुरटे लेखक, उतावळे पब्लिकेशन्स, विज्ञानाच्या नावाने अध्यात्मिक परंपरेवर प्रहार करणारे खोटे विज्ञानवादी यांचे विचार प्रत्यक्ष पडताळणी न करता गळी उतरवून खोटा विज्ञानवादी दृष्टीकोन पासरावणार्या लोकांनी रिकामा गोंगाट न करता अगोदर अध्यात्म काय आहे ते समजून घ्यावे आणि मग बोलावे अन्यथा त्यांच्या बोलण्याला कवडीची किंमत असणार नाही मग भले ही मला त्यांनी पारंपरिक विचारसरणी असणारा व्यक्ती म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं तरी चालेल, मी ते स्वीकारेन...

Source: INTERNET
संकेत.अ. पवार,
मुंबई

सर्व प्रथम आजच्या ह्या “जागतिक विज्ञान दिन” च्या दिवशी अश्या  विषयावर बोलणे मी माझ भाग्याच समजतो. खरच आम्ही वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारला आहे का? तर ह्याचं उत्तर आहे नाही.कारण भारतामध्ये जसे आज-काल वातावरण पसरत आहे त्याला पाहता आपण विज्ञानवादी आहो का धर्मवादी हेच समजत नाही.

विज्ञान म्हणजे नक्की काय? तर विज्ञान म्हणजे सत्य .भारतीय लोकांच्या अंगात अजून देव-देवी येतात.  महापुरुष का बरे येत नाही??. संशोधन केले असताना कळते कि अंगात येते हा मानसिक आजार आहे.परंतु ह्याचं आजाराचा  काही धूर्त लोकांनी बाजार केला आहे. एखादी व्यक्ती,सजीव ,निर्जीव ,दगड,पाषाण, कल्पना,गोष्ट  आपल्याला अतिशय मनापासून आवडली का मेंदू मध्ये विशिष्ट स्थान करते.आणि कळत न कळत आपण त्या गोष्टीला संमोहित होतो. विज्ञान सांगते ह्याला  *psychology Disorder, Spiritual Possession, or Social Psychology Enactment*  असे म्हणतात. ह्या मानसिक आजाराला आपण  *Schizphrenia* असे सुद्धा बोलतो.  अक्षय कुमार आणि विद्या बालन चा चित्रपट “भूल-भुलय्या”  ह्याचं जिवंत उदाहरण आहे. पण एवढा सर्व असताना आपण ह्या गोष्टीला कर्मकांडाशी जोडतो.  मागच्या महिन्यात  जेव्हा सूर्यग्रहण होते तेव्हा मला एक अजब गोष्ट आढळली. जवळ जवळ ९९%  मंदिरांना बंद केले केला काही मंदिरांना तर कपड्यांनी झाकले गेले. तेव्हा मनात अजीब विचार आला कि एकीकडे लोक बोलतात कि सर्व जगाची निर्मित अमुख अमुख देवांनी  केली. मग त्याच सूर्याच्या ग्रहणाला देव सुद्धा घाबरतो.

देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा काही लोकांनी विज्ञानालाच मात दिली. चक्क देशाच्या सुरक्षेसाठी  महायज्ञ करण्याचे ठरवले  गेले. जर महायज्ञा मुळे देशाचे भले झाले असते तर चीन-पाक आज नष्ट झाले असते. असे-असे प्रकार ऐकून मन एकीकडे घाबरत आहे कि खरच काय होणार आहे आपल्या भारतच. काही नेते बोलतात कि गोमुत्र आणि शेन खूप किमती आहे.पण खर पाहिलं तर गोमुत्रा मध्ये अनेक Bacteria सुद्धा असतात जे आपल्याला घातक असतात. तरी सुद्धा धर्माच्या नावाखाली विज्ञानला मारलं जात. अशोका राजाच्या ज्या भारतला सर्व “सोन्याची चिडिया” बोलत असत तेच  देश आपल्यावर हसत असतात.

मंगळ आहे म्हणून कुत्र्याशी लग्न, झाडाशी लग्न, असे अनेक प्रकार आपल्या  भारतात होत असतात. मुल होत नाही ,पैसा मिळावा ह्यासाठी नरबळी-पशुबळी  सुद्धा ह्याच भारतात होतात. हे पाहून मन जळते.  करणी-जादूटोणा  ह्याचे अनेक उदाहरण आपल्याला मिळते.   जपान हा आपल्या भारताहून १०० पटीने लहान असून  बुलेट-मेट्रो, विज्ञान,तंत्रज्ञान,मेडिकल, ह्या सर्वा बाबतीत पुढे आहे आणि भारतात सोमवारी  आपल्याला Whats App  वर येत कि “ ओम नमःशिवाय”  ११ जणांना पाठवा नाही तर अशुभ होईल.आणि आपल्या मधले खूप लोक हे share सुद्धा करतात.ह्यासर्व मध्ये मरते ते विज्ञान. आपण अजून मागे आणि मागे जात चालो आहे. हे भारताचे दुर्भाग्य आहे कि विज्ञान सांगणाऱ्या संत तुकाराम, संत कबीर, संत गाडगेबाबा, स्वामी विवेकानंद   आणि महान तथागत बुद्ध ह्यांना  आपण विसरलो. नाही तर आज आपण ह्या जगावर राज करत असतो. आणि २१ हून अधिक देशांनी बुद्द आणि विज्ञान स्वीकारले आणि आज ते जगात नावं कमवत आहे. जपान पेक्षा स्पष्ट उदाहरण काय असू शकेल.  भारताला धार्मिक राष्ट्र  बनवण्यापेक्षा एखाद वैज्ञानिक राष्ट्र बनवण्यासाठी साठी आपण का जोर देत नाही ह्याची खंत वाटते.

  

Source: Internet
करण बायस,
हिंगोली


आज जग प्रत्येक गोष्टीत प्रगत होत आहे. वेगवेगळ्या देशात स्वतःला प्रगत करण्यासाठी जणू एक शर्यत लागली आहे.वैज्ञानिक देशासाठी खूप प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या संशोधनासाठी भरीव तरतुद करणे गरजेचे आहे.

28 फेब्रुवारी हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो.भारताने पण आज या क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. इतर देशांप्रमाणे भारतात पण नवनवीन technology विकसीत झाल्या आहेत.


आपल्या देशातील लोकांना अस वाटते की ते खूप वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगतात.आमच्यात काहीही अंधश्रद्धा नाही.

आपले लोक पुजारी/गुरू/महाराज/बापू/साध्वी वर एवढा विश्वास ठेवतात की ते एवढ्या लिमिट पर्यंत की त्या गुरूंनी सांगितले ते आम्ही करू.लोकांना हे समजत नाही की तो गुरू/पुजारी…. स्वतःचे पोट भरण्यासाठी तिथं बसला आहे. काहीतरी सांगून समोरच्या व्यक्ती कडून पैसे घेणे त्याला थोडंस सांगणे की तुम्ही अस नाही केलं तर तुमच्या सोबत वाईट घडेल.आम्ही एखाद्या देवळात जाऊन पैसे टाकतो आणि घराबाहेर एखादा हात-पाय बरोबर काम न करू शकणाऱ्या वृद्ध माणसाला 2-4 गोष्टी बोलून हाकलून लावतो.

आम्हाला आणखी हेच नाही कळलं की ‘देव दगडात आहे की माणसात’?

आणि आजकाल या गुरू लोक जीवनात सगळ्यात खुश आहेत कारण 2-3 पुस्तक तोंडपाठ ठेवा आणि काही उदाहरणे द्या लोक म्हणतील तेव्हढा पैसा द्यायला तयार.

गुरू सांगतात अमावस्या च्या दिवशी एखाद्या काळ्या कुत्र्याला आम्ही दिलेलं यंत्र पोळी वर काढून टाका म्हणजे तुमचे पितृदोष निघून जातील आणि ते पण देवाच्या नावाने आणि लोक करतात म्हणजे आपल्या भल्यासाठी त्या मूक प्राण्यावर देव अन्याय करेल(हसू येईल अशा गोष्टींवर).

आपण कुठं जाऊ लागलो आणि कुणितारी विचारले की कुठं जातो?तर आम्ही थोड्या वेळ थांबतो आणि नंतर जातो कारण त्याने विचारलं म्हणून आपलं काम होण्याची शक्यता कमी आहे अस लोकांना वाटते.


आम्ही पाल अंगावर पडली किंवा तिचा स्पर्श झाला तर अंघोळ करतो.अरे काय चूक त्या प्राण्यांची तिचं शरीर तुम्हाला चांगलं नाही वाटतं हे तुमचे घाण विचार त्याला ती काय करणार.


आपल्या इकडे एक प्रथा आहे ती म्हणजे कुणाचं नवीन लग्न झालं किंवा काही तरी निमित्ताने देवाला पशुबळी दिल जाते आणि लोक स्वतःला धार्मिक म्हणून घेतात.


आणि आपण प्रत्येक वार हा कोणत्या न कोणत्या देवासाठी ठरवलेला असतो असे म्हणतात या वारीे खाऊ नये.


मला असं वाटतं की आपण आपल्या मनात एक चित्र तयार केलं ज्या प्रमाणे आपण वागतो. आणि एवढंच नाही पालक लोक हे सगळे त्यानाचे अंधश्रद्धेचे विचार त्यांच्या पाल्यांवर लावतात आणि तू आमचं एकलाच पाहिजे आणि नाही ऐकत असेल तर त्याला रागावणे/मारणे हा प्रकार चालतो.


मान्य आहे देवाचे देऊळ हे एक श्रद्धे च ठिकाण आहे पण याचा अर्थ हे नाही की लोकांनी त्याला स्वतःच income source बनवलं पाहिजे.

अरे विचार करा जर या गुरू/महाराज/बापू/साध्वी लोकांचं आपण जनता एवढं अंधश्रद्धेच्या गोष्टींना support करतो म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर या सगळ्या नि ठरवलं की आम्ही समजाला सुधारावण्यासाठी प्रयत्न करेन तर लोक किमान त्यांचं एकूण तरी सुधारतील. डॉ. नरेंद्र दाभोलकर,डॉ. पानसरे यांच्या सारख्याना जीव देण्याची गरज पडणार नाही.

विज्ञान आपल्याला कमीतकमी जी गोष्ट संगतो त्याबद्दल ते proof देतो पण हे गुरू/महाराज/साध्वी लोकांच आपण डोळे झाकून विश्वास करतो त्यांना जर बघितलं तर बसल्या बसल्या ते लोक श्रीमंत होत आहेत अमाप पैसा असतो त्यांच्या जवळ हे तर आपण पहिलच मागील काही वर्षात जेव्हा काही बापूना पकडलं तेव्हा,ते त्यांच्या ऐशोआरामत जगतात आणि म्हणतात की आम्ही खूप धार्मिक आहोत.

माझ्या एक डॉक्टर ला ओळखतो तो माणूस त्याचा हॉस्पिटल चालावे म्हणून काळा जादू करणाऱ्या महाराजांकडे जातो किंवा हॉस्पिटल मध्ये त्यांना बोलावतो, आपण जर घरी बोललो काय आहे हे सगळं ते म्हणतात आधी पासून चालू आहे आपण नियम तोडू शकत नाही काय होते विचारलं तर त्यांच्या कडे उत्तर नसतात मग ते रागावून चूप बसवतात,म्हणजे तुम्ही तुमचं आयुष्य असंच अंधश्रध्येत घाला आणि आम्हाला पण चूप करून नियम पाळायला लावा,आणि त्या ढोंगी महाराजांना पूजयला लावा.अरे लोक इथं पर्यंत जाता की त्या महाराजांचे पाय धुतलेले पाणी सुद्धा पितात का तर ते खूप धार्मिक आहेत,ते तुमच्या माघारी काय करतात तुम्हाला काय माहीत.


जास्त अंधश्रद्धेच्या गोष्टी परमेश्वराशी निगडित आहेत कारण हे जर नाही झालं तर महाराजांचा धंदा कसा चालणार??

ज्यांनी पण भगवतगीता, बायबल,कुराण इ. लिहिलं त्यांनी काही वाईट नाही केलं वाईट अर्थ लावला या लोकांनी. आणखी समजून घेण्याची यांची mentallity पण नाही काही तरी चुकीचा अर्थ लावून बसायचा.आणि काही आपण बोललो की म्हणायचं की तू खूप नास्तिक होत आहेस.अरे काय चालू आहे ?

लोक देवासमोर बसून तासनतास रोज रोज एकच पुस्तक वाचून वेळ घालतात, म्हणजे नवीन शिकण्याची mentallity पण नाही आमची अहो तिथेच राहणार आणि तुम्हाला पण सवय लावणार तिथंच राहण्याची.

आणि म्हणतो आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवतो.


Source: INTERNET
समीर सरागे,
नेर


आपला भारत देश हा अनादी काळा पासून सांस्कृतिक , वैदिक आणि धार्मिक  रूढ़ी परम्परेने व्यापलेला देश अशी याची ओळख आहे. यात सन, उत्सव ,त्योहार महत्वाची भूमिका बजवतात म्हणून याला वैदिक संस्कृतीचा वारसा देखील प्राप्त आहे. पूर्वीचे लोक उपचार पद्धति म्हणून मंत्र-तंत्र,
यांचा वापर करत असायचे कारण तेव्हा प्रगत वैद्यकीय उपचार पद्धति अस्तित्वात नव्हत्या  व आजही काही भागा मध्ये विंचु चावल्यास मंत्र पद्धतीने त्याचे विष उतरवून उपचार केल्या जाते .

तसेच देवी (Chiken pox)हा देखील रोग पूर्वी जास्त प्रमाणात होत असायचा यामुळे सर्व शरीररावर बारीक़ बारीक पुरळ येत असत , आपल्या पैकी बऱ्याच जनानी याचा प्रत्यय घेतला असेलच . तेव्हा समाजात अशी मान्यता होती कि दैवी प्रकोप मुळे हा आजार झाला मग रोग्याला विविध मंत्र-तंत्र पद्धतीने त्याचेवर उपचार केल्या जात असे खरे तर देवी ज्याला chiken pox म्हणतात हा रोग एक vericella zoster नामक virus मुळे होतो ज्याने शरीरावर पुरळ येऊन शरीरा मध्ये अशक्त पणा येतो, पुरळ मुळे खाज सूटते आणि जखम होते पुढे यावर लस (vaccene) उपलब्ध झाली  हळूहळू याबाबत समाजात जागृति निर्माण झाली आणि सोबतच याचा प्रभावी वैद्यकीय उपचार उदयास आला.

पूर्वी सती प्रथा , बाल विवाह, या सारख्या अनिष्ट आणि क्लेशदायक प्रथा  आपल्या हिंदु धर्मा मध्ये अस्तित्वात होत्या, त्याचे मुख्य कारण म्हणजे तेव्हा व्यक्ति स्वातंत्र्य हा विषय नव्हता,लोक  रूढ़ी परंपरेच्या नियमानुसारच  जीवन जगत असे कोणी एक  रूढ़ी , प्रथा सुरु केली की , मग त्याला इतरानी
फॉलो करायचे आणि समाजात जीवन जगत असताना कोणी आपली मर्यादा सोडू नए  तसेच कोणाचा धाक असने गरजेचे असायचे म्हणून या माध्यमातून इतरांवर वचक ठेवल्या जात असे. कारण तेव्हा कोणते कायदे वा नियम अस्तित्वात नव्हते  आणि या प्रथाचा प्रभाव जनमांनसात  जास्त असायचा म्हणून या प्रथा अस्तित्वात आल्या. आणि नेमका त्यांच्या याच स्वभाव आणि समजूतिचा फायदा काही संधिसधुनि घेऊन त्यांना आपले गुलाम बनवीने सुरु केले, किंबहुना आजही काही भागात आपल्याला अनिष्ट प्रथा  ज्या अंधश्रधेचे कवच असलेल्या आढळून येईल  जसे बळी प्रथा (कोण्या देवाला एखाद्या पशुची बळी देणे), अघोरी प्रथा (गुप्त धन मिळण्या करिता नरबळी देणे) भुत बाधा लागल्यावर रोग्याला मांत्रिका जवळ नेने आणि यातून त्याला अमानवीय वेदना देणे वैगरे  काही अनिष्ट  पद्धति आपल्या समाजात मोठ्या प्रमाणावर आहे.

केवळ भारत देशातच नाही तर जगातील बऱ्याच देशात आजही अंधश्रद्धा अस्तित्वात आहेत  , असो
आज आपन आधुनिक आणि वैज्ञानिक युगात जगत आहोत तरी देखील काही भागात या अमानवीय क्रुप्रथा अन्धश्रधेच्या जोरावर फार मोठ्या प्रमाणात  सुरु आहेत ही आपल्या करिता अतिशय लाजिरवानी आणि शरमेची बाब आहे.  आपल्याला  आज कायदयाचे सरक्षण
लाभले आहे. आणि समाजात सर्वच प्रथा ,परंपरा , रूढ़ी काही खराब नसतात.

परंतु अलीकडे स्वताला बुद्धिवादी म्हनवून घेणारे अंधश्रधेचे ठेकेदार एक विशिष्ट अजेंडा चालवून केवळ हिंदू धर्मातच अंधश्रद्धा शोधत आहे. त्यांना बुरका पद्धति , पशुहत्या , वैगरे त्यांच्या अन्धश्रधेच्या केक्षेत येत नाही. तो इतरांचा धार्मिक अधिकार असतो. शनि मंदिरात स्त्रियांना प्रवेश का दिला जात नाही हा स्त्रियांवर अन्याय आहे. वैगरे यांच्या आरडा ओरड करून वलग्ना सुरु होतात  आणि मीडिया यांचा तमाशा कवर करण्यासाठी आणि आपली  घसरलेली TRP वाढविन्यासाठी प्रयत्न करतात आणि या प्रसिद्धिच्या भुकेल्या काही महाभागाना स्त्रीमुक्ति , नारीशक्ति वैगरे बिरुदावले वापरून गौरवन्यात येते आणि हीरो म्हणून समोर करण्यात येते.  परंतु  हाजी अली दर्ग्यत स्त्रियांना प्रवेश नकारला जातो तेव्हा हेच प्रसिद्धिलोलुप  तीथे जाण्यास मज्जव करतात आणि तो इतरांचा धार्मिक अधिकार आहे म्हणून लाचारी पत्कारतात तेव्हा तुमची नारीशक्ति , स्त्रीमुक्ति सारखी बिरुदावले आणि प्रसिद्धिची लालसा कुठे विरुन जाते ? मागील  दोन वर्षा पूर्वीची घटना आहे एक स्टॅलिन नावाचा व्यक्ति येशु चे नाव घेऊन आणि रोग्याच्या आंगावर हाथ ठेऊन मि कोणताही रोग बरा करु शकतो अश्या प्रकारचे फसवे  आव्हान इतराना कारायचा , भोल्या भाबडया लोंकाना  
फसवायचा , तीथे त्याचे अनुयायी स्टेज वर आक्राल विक्राल नाचायचे आणि खाली पाडायचे आणि  बघा  मला स्पर्श करताच आम्ही बरे झालो अशे सर्वाना सांगायचे ,वैद्यकीय क्षेत्रातुन देखील या थोतंडा वर भरपूर टिका झाली, मग एका व्यक्तिने तीथे जाऊन चौकशी केली असता असे काहीच  नसल्याचे निष्पन्न झाले व तो रोग्याना बरे वैगरे करतो हे त्याचेच अनुयायी होते अशे सिद्ध झाले जे इतरांच्या डोळ्यात धूळ फेक करत होते जेव्हा मिडियाने दखल घेतली  तेव्हा हा ढोंगी व्यक्ति फरार झाला , मग तेव्हा कोण्या अन्धश्रधेच्या ठेकेदारांनि (नेहमी हिंदू धर्मातच अंधश्रधा शोधणारे)किंवा स्वताला विज्ञनवादी म्हनवून घेनारे यांनी या कृत्यावर ब्र देखील काढला नाही.
ना कोणी व्याख्याने चालविली, ना कोणी हैश टैग लाऊन प्रदर्शने केली!   हिंदू धर्मात काही अनिष्ट रूढ़ी अस्तित्वात होत्या या बद्दल दुमत नाही, कालांतराने समाजसुधारक लाभत गेले व त्यांनी समाजातील अनिष्ट रूढ़ी, चालिरीति विरुद्ध बंड पुकारला व समाजातिल लोंकाना या विरुद्ध उभे राहन्यास परावुत्त केले त्यांच्या या योगदानाचा, त्यांच्या कार्याचा प्रभाव  आजही सर्वत्र दिसून येतो आहे.

कालांतराने समाजात हळूहळू वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागला व अनिष्ट प्रथे विरुद्ध नियम कायदे बनविल्या गेल्याणे  तसेच समाजात प्रभोधन व जनजागृतिच्या माध्यमातून यावर बऱ्या पैकी आळा बसत आहे. परंतु  तरीही इतर धर्मातील अनिष्ट , प्रथा व रूढ़ी अजूनही जशाच्या तश्याच अस्तित्वात आहेत त्यावर निर्बंध लावल्या गेले तरच अखिल मानवजातिचे कल्याण होईल. कारण या प्रथा, रूढ़ी जरी वेगवेगळ्या धर्माशी निगडित असल्या तरी त्याचा विपरीत परिणाम अखिल मानवजातिवर होत असतो.

*🔷अध्यात्म आणि विज्ञान*

काही महाभाग विज्ञान आणि आध्यात्म यात तुलना करतात आणि अध्यत्म किती विकृत आणि विज्ञान किती श्रेष्ठ असे थोर तत्वज्ञ म्हणून स्वतःच ठरवून टाकतात , वास्तविक पाहता या दोन्ही बाबी भिन्न आहेत ,एक भौतिक सुखाची अनुभूति देते तर दूसरी आत्मिक समाधान व शांती देते. त्या करिता धार्मिक ग्रंथांचे वाचन, नामस्मरण , योगासने, ध्यान धारणा, भजन-कीर्तन ईत्यादी बाबी महत्वाच्या असतात.

ही सगळी चर्चा करण्याचे कारण असे की, आजच्या संघर्षमय जीवनात, मनशांती मिळवणे अधिकाधिक गरजेचे वाटू लागले आहे. सभोवताली अनेक भौतिक गोष्टींची प्रलोभने, जीवनात यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी स्पर्धा, अत्यंत धकाधकीचे आणि असुरक्षित दैनंदिन जीवन या सगळ्यात जीव मेटाकुटीस येतो. मनात निर्माण होणाऱ्या चिंता, विषाद, एखाद्या आपत्तीनंतर मनावर होणारा आघात या सर्वाचा यशस्वीपणे सामना करताना इतर अनेक गोष्टींप्रमाणे आध्यात्मिक दृष्टिकोनाचा खूप फायदा होतो.

कॅन्सरसारख्या विकाराचा सामना करताना किंवा हृदयरोग स्वीकारताना किंवा मज्जारज्जूच्या शस्त्रक्रियेतून बरे होताना जी अति चिंता निर्माण होते ती नियंत्रणात आणण्यासाठी आध्यात्मिकतेचा उपयोग होतो. आपत्तीनंतरच्या काळात आध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यांच्या उपदेश- प्रवचनांचा अतिशय सकारात्मक उपयोग होतो हे आपल्याकडच्या  या प्रक्रियेत सामूहिकतेची भावना आणि एकमेकांना मिळणारा मानसिक आधार महत्त्वाचा ठरतो. मानसिक विकारांची रुग्णाकडून माहिती घेताना त्याचा धार्मिक, आध्यात्मिक दृष्टिकोन समजून घेणे दिवसेंदिवस महत्त्वाचे बनले आहे. मानसिक उपचारांमध्येदेखील आध्यात्मिकतेचा उपयोग केला जाऊ लागला आहे.


असो
विज्ञनवादी झालो म्हणजे आम्ही खुप प्रगत किंवा पुरोगामी झालो आहे. कोणत्याही कार्याला चिकित्सक बुद्धिने बघण्याचे परवाना मिळाला आहे.  धर्म आणि विज्ञाना मध्ये आम्ही तुलना करून कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ यासारखे  फरक  करु लागलो आहे. आज जी प्रगत राष्ट्रे विज्ञानाच्या जोरावर आपली बिरुदावले मिरवू लागली आहेत तीच राष्ट्रे आज अनु बॉम्ब , हायड्रोजन बॉम्ब सारखी अनवस्त्रे एकमेकावर डाग्न्याच्या तयारित आहेत, विज्ञानाचा आविष्कारा हा जसा मानवाच्या उपयोगसाठी ,त्याचे जीवन समृद्ध व सूखकर करण्यासाठी जरी झाला असला तरी यातून काही अंशी मानवाच्या व जीवश्रुष्टिच्या विनाषा चे प्रतिबिंबच उटलेले दिसून येईल. म्हणून  विज्ञान हे शाप की  वरदान  हे आपणच ठरवायचे आहे.


Source: INTERNET
संगीता देशमुख,
वसमत


      माणूस म्हटलं की,त्याला प्रश्न पडायला हवेत. प्रश्न पडणे म्हणजेच  ती व्यक्ती विचार करते. कोणत्याही बाबीबद्दल तो जिज्ञासू असतो. आणि जिज्ञासेच्या लालसेतूनच तो संशोधन करू लागेल. संशोधनातून जो निष्कर्ष निघेल ते म्हणजे सत्य! जो कोणी सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करेल तो नक्कीच  चालत आलेल्या रुढीपरंपरा,अनिष्ट चालीरीती यामागचे शास्त्रीय कारण शोधेल आणि मग त्या स्वीकारायच्या की नाही,हे तो ठरवेल. पण आजची परिस्थिती पाहता असं वाटते,खरच आपली   "तेजाकडून तिमिराकडे" वाटचाल सुरू  आहे. आपला इतिहास पाहिला तर पूर्वी ग्रामीण भागात अज्ञानापोटी अनिष्ट रुढीपरंपरा,अंधश्रद्धा बळावत गेल्या. त्या लोकांच्या अज्ञानामुळे म्हणा अथवा दारिद्र्यामुळे म्हणा,त्या रुढीपरंपरा,अंधश्रद्धा त्यांनी स्वीकारणे,ही त्यांची गरज होती. पण हळूहळू त्यांच्यात जागृती होऊन आजारपण असेल,वास्तूशास्त्र असेल किंवा ग्रहताऱ्यांबद्दलचे गैरसमज असतील यात खूप फरक पडत चाललेला दिसतो. परंतु याउलट शहरी लोक,उच्चशिक्षित,लोक विशेषतः श्रीमंत लोक  दिवसेंदिवस अंधश्रध्देच्या आहारी जाताना दिसत आहेत.
              शिकलेल्या लोकांची आजकाल फार गोची झालेली आहे. त्यांना अजून श्रध्दा आणि अंधश्रद्धा यात फरकच करता आला नाही. ते अजूनही अंधश्रद्धानाच श्रध्दा समजून स्वतःची दिशाभूल करून घेत आहेत. एकीकडे ते जे वर्तन करतात त्यास अंध्दश्रद्धा म्हणावी तर मानगुटीवरचा  बागुलबुवा उतरत नाही. आणि श्रद्धा म्हणावी तथाकथित पदव्यांचे वाभाडे निघतील अशी भीती! म्हणून जुन्या रुढीपरंपराच सोडा पण त्यात त्यांनी धास्तीपोटी  अनेक नवीन परंपराही सुरू केलेल्या आहेत. दारासमोर काळी बांधून सोबतच कलिंगड लटकविणे,पायाला काळा दोरा बांधणे,वाहनांचे नंबर शुभाशुभ ठरविणे एवढेच नाहीतर यात कहर म्हणजे उद्याचे डॉक्टर,इंजिनिअर म्हणून आज  तयारी करणाऱ्या लेकरांच्या डोक्यावर पिरॅमिड ठेवून त्यास अभ्यासास बसविणे.ज्यांनी विज्ञानाचा हात धरून पद किंवा पदव्यांचा लाभ घेतला अशी शिक्षित पिढीच यामार्गाने जात असेल तर निरक्षर आणि ज्यांनी विज्ञान विषयच अभ्यासला नाही,त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करू शकतो?
         आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वस्तूंचा फार मोठ्या प्रमाणात उपभोग घेतो. पण तेव्हा आपण "जुनं ते सोनं" म्हणत नाही. आणि जेव्हा वर्तन करण्याची वेळ येते तेव्हा मात्र जुन्याच परंपरा 'सोन' म्हणून चालू ठेवतात. सगळ्यात जास्त मनाला सतावते ती बाब म्हणजे,विज्ञानात उच्चशिक्षण घेतलेले किंवा त्यात डॉक्टरेट केलेले लोक वास्तूशास्त्र पाळतात आणि अध्यात्माच्या नावाखाली सामान्य माणसाच्या बुध्दीलाही न पटणाऱ्या अंधश्रद्धा पाळतात. खरेतर अध्यात्माचा आधार घेणे म्हणजे धार्मिक दहशतच आहे. अनेकजण तर या दबावाखाली असतात की,अशा काही धार्मिक बाबी नाही पाळल्या तर त्यांच्यावर कुठलेतरी संकट येईल. नोकरी करणाऱ्या काही महिला  व्रतवैकल्ये करतात. त्यांच्याशी चर्चा केल्यावर असं लक्षात आले की,लेकरांचे शिक्षण असो,अथवा त्यांची लग्ने यासाठी त्या अजूनही कर्तृत्वापेक्षा चमत्कारावरच विश्वास ठेवतात.अशा अंधश्रध्देतून महिलांचे होणारे शोषण हा अतिशय गंभीर विषय आहे. वर्षानुवर्षे स्त्री याची बळी ठरत आहे.आपल्याकडे  भानामती,भूतबाधा या आजाराना अजूनही मानसिक आजार मानण्यात येत नाही,ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे!त्यातून महिलांचे शोषण हे अत्यंत हिनकस पध्दतीचे असते.  ज्या स्त्रीला मूलबाळ होत नाही त्या स्त्रिया भोंदूबाबाकडे जातात आणि त्यांचे कशाप्रकारे शोषण केले जाते याची ज्वलंत उदाहरणे म्हणजे रामरहिम बाबा,आसाराम,साईराम.... आणि असे अनेक  ज्यांचे कारनामे प्रकाशात यायची आहेत. महत्वाची बाब म्हणजे यात बळी जाणाऱ्या स्त्रियांची काही तक्रार नसते. त्यांना त्या व्यक्तीला होणाऱ्या शिक्षेपेक्षा स्वतःची बदनामी नको असते.यात महिलाच बळी ठरतात असे काही नाही तर राधेमॉचे पुरुषभक्तही आपल्याला दिसतात. तिच्या एका स्पर्शाने जीवनात यश मिळते म्हणून धडपडणारे तथाकथितभक्तांचाही गवगवा फार झालेला आहे. त्याचबरोबर सत्यसाईबाबांकडून तर सोन्याचांदीच्या साखळ्या,अंगठ्याही आपल्याच लोकप्रतिनिधींनी आशीर्वाद म्हणून मिळवलेल्या आहेत. "यथा राजा,तथा प्रजा"! म्हणून हा तिमिरवाटेकडे चालू असलेला प्रवास पुढे कुठेतरी मोठ्या खाईत नेऊन सोडणार,हे निश्चित! प्राणिमात्रावर दया म्हणून नव्हे तर अंधश्रध्देच्या नावाखालीच आईपेक्षा गाईला जपणारे लोक ज्या देशात आहेत,तोवर आपण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला म्हणण्याचे धाडस माझ्यासारखी सामान्य स्त्री निश्चितच करणार नाही!  त्यात मिडियावर सुध्दा अंधश्रद्धा पसरविणाऱ्या जाहिरातींचा पूर आलेला दिसतो. म्हणजे ज्यातून प्रबोधन व्हावं,तिथेच खीळ बसत आहे. अर्थातच कुंपण शेत खात आहे,म्हणावयास हरकत नाही.
       हे सर्व पाहिल्यावर संत तुकाराम,संत,गाडगेबाबा,डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे बलिदान व्यर्थ गेले असेच वाटते. वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्यासाठी व्यक्तीजवळ जिज्ञासूवृत्ती,डोळसपणा,चिकित्सक बुध्दी,प्रयोगशीलता असायला हवी. फाइनमन म्हणतो,कुठल्याही ललित कृतीपेक्षा विज्ञानाचा अभ्यास उत्कंठावर्धक ठरतो. भावी पीढी आपल्याला वैज्ञानिकदृष्ट्या डोळस,विवेकी बनवायची असेल तर आजच्या पालकांनी त्याप्रमाणे विचार आणि आचार बाळगायला हवेत. मग नक्कीच आपला प्रवास "तिमिरातुनी तेजाकडे" होईल.

Source: INTERNET
सोमनाथ,
अहमदनगर

नुकतचं गेल्या २८ ऑगस्टला गुरमीत रामरहीमला विशेष सी.बी.आय. कोर्टाने २० वर्षांची शिक्षा ठोठावली. या ‘पापा’जीवर २ मुलींवर बलात्काराचा गुन्हा सिद्ध झालाय, तर ३०० पुरुषांना नपुंसक केल्याचा आरोप सुद्धा आहे.

हे ऐकून अनेकांनी ‘ढोंगी बाबाला’ त्याच्या दुष्कृत्याची शिक्षा मिळाली, असं म्हणत सुस्कारेरे सोडले असतील तर काहींनी आपला बाबा त्यातला नाही म्हणत मनाचं समाधान करत,, आस्थ किंवा संस्कार चैनल लावला सुद्धा असेल. अनेक तथाकथित पुरोगाम्यांचा सुद्धा बोटचेपी भूमिका घेत ढोंगी बाबाच्या नावानं सोपस्काराचा शिमगा करून झाला असेल व त्यांच्या ढोंगीपणावर बोटं सुद्धा मोडली असतील. मुद्दा फक्त कुण्या ढोंगी बाबाचा नाह तर एकुणच या बाबा संस्कृतीच्या वाढत्या प्रभावाचा व त्यातून निर्माण होणाऱ्या अंधाराच्या साम्राज्याचा आहे.

बाबा किंवा मातांच्या साधना मार्गात चिकीत्सा, संशय किंवा तर्क पूर्णपणे हद्दपार असतात. बाबा उच्चारेल तेच वाक्य प्रमाण मानायला शिकवलं जातं. शंका उपस्थित करणं महापाप समजलं जातं, ज्याच्या परिणामी इप्सित साध्य होत नाही. या बाबा-मातांकडे जाणाऱ्या लोकांचे प्रश्न अध्यात्मिक सुखाचा शोध वगरे अजिबात नसतात. लग्न, मुलं, नोकरी व आर्थिक अस्थैर्य इ. अगदी भौतिक प्रश्न असतात. यांची सोडवणूक करून घ्यायला प्रत्येकजण आतूर असतो. वाढती बेकारी, कामगारांची कपात, नोकरीतील अस्थैर्य, रोजगाराची अनिश्चितता, वाढतं दारिद्रय त्यातून काठावर ढकललं गेलेलं जगणं,सावरण्याचीकुतरओढ, जीवघेणी स्पर्धा, अपेक्षांचं मोडून टाकणार ओझ या सगळ्यांतून बेजार झालेला माणूस मग सहजच रस्त्यावर शेंदूर लावून दगड ठेवला तरी नवस-सायास बोलू लागतो. ही “असुरक्षितता व भीती” या सगळ्यांच्या मुळाशी घर करून असते. याची कारणं सामाजिक-आर्थिक-राजकीय व्यवस्थेत शोधण्याची सवय नसणारी माणसं कुणी गुरू-माता भेटलेच तर त्यांनाच आपला उद्धारकर्ता बनवतात व मुक्तीच्या आशावादाने सुखावली जातात, जे खरं तर भ्रांतसुख असतं.

मग ही गर्दी वाट तुडवत निघते. अगोदरच करार झालेला असतो ‘प्रश्न विचारायचे नसतात’. कुठे पवित्र पाणी पजून, कुठे झाडाचा पाला खाऊ घालून, कुठे हातात राख टाकून, तर कुठे पाठीवर रट्टे देऊन मुक्तीचा आशिर्वाद दिला जातो. या मार्केटमध्ये पैसे घेऊन कुंडलीनी जागृत करण्याऱ्यां पासून हठयोग्यांपर्यंत अनेक व्हरायटीचे बाबा भारतात सापडतील. यांच्या जोडीला कैक आश्रम, डेरे व आखाडयांमधून हजारो पुण्यात्मे ठाण मांडून बसलेले आहेतच. तरीही कुपोषण व भूकबळीनं मरणारी बालकं भारतातच सर्वाधिक आहेत,दारिद्रयानं जनतेचे हाल आहेत, स्त्रीयां घराबाहेर सुरक्षित नाहीत, आतंकवादी हल्ल्यात माणसं मरतात तर चीन व पाकिस्तान सीमेवर “त्रास” देत असतो.

‘बाबा वाक्यम् प्रमाणं’ व ‘श्रद्धावानम् लभते ज्ञानम्’चा जप करणाऱ्या भारतीय मानसात, लोकांच्या तर्कबुद्धीची अशी कत्तल केली जाते की बलात्काराचा गुन्हा असणारा आसाराम व रामरहीम साठी त्याचे गुंड (अनुयायी?) जगातील “सर्वात मोठ्या लोकशाही” समोर अवघड प्रसंग उभा करतात. इतकंच नव्हे तर देशाचं अस्तित्वच मिटवण्याची भाषा केली जाते. बोलण्यावर निभावल तर बेहत्तर, पण प्रत्यक्ष सुनियोजित दंगल घडवली जाते व लोकशाहीच्या चारही खांबांची पळताभुई थोडी केली जाते. प्रसार माध्यमांची वाहने जाळतात, पोलिसांवर हल्ले होतात. या सगळ्यात ४५ माणसं मरतात, २५० हून अधिक जखमी होतात व हे सगळं धर्म आणि श्रद्धेच्या नावाखाली केलं जातं. एरवी पाच लोकं जमले तरी १४४ खाली अटक करणारे पोलीस २-३ लाख लोकांना ४-५ दिवस गोळा होण्याची संधी देतात. राज्यसरकार त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करतं,पण तरीही भारताच्या महान गुप्तचर यंत्रणेला हत्यारांचा सुगावा सुद्धा लागत नाही.

यापूर्वी सुद्धा बाबा रामपालला खुनाच्या गुन्हयात अटक करण्यासाठी पोलीसांची पाचावर धारण बसली होती. शेवटी ४,५०० लष्करी जवानांना ३० तासाहून अधिक काळ घाम गाळावा लागला. भक्तांशी तंडून पाच जणांच्या मृत्युचं ओझं घेऊन मगच बाबाला अटक करणं शक्य झालं. आसारामच्या गुलाबी चेहऱ्यामागचा हैवान उघडा होतो तरीही अनेक भक्त त्यांच्या भक्तीन लीन असतात. आशुतोष महाराजच्या मृत्युला समाधी समजून ३ वर्षे प्रेत सांभाळणाऱ्या भक्तांची पुनर्जिवीत होण्याची भाबडी आशा तोडायला कोर्टात जावं लागतं. बाबा काही  जिवंत होत नाही हे वेगळं सांगायला नको. चारसोबीसी करणारा चंद्रास्वामी, अनेक रहस्यमय हत्यांमागचा संशयित सत्यसाईबाबा, बलात्कारी नित्यानंद-भीमानंद, संभोगात समाधी लावणारा रजनीश, श्रीमंताचा बाबा रवीशंकर, निर्मलबाबा, राधेमा, कृपालु महाराज, मोरारी बापू, सारथी बाबा, प्रेमानंद, बिंदू बाबा, नरेंद्र महाराज, आठवले महाराज ते हवा आतबाहेर करायला लावून नूडल्स विकणारा रामदेव बाबा, ही यादी अजून वाढू शकते, अशी अनेकजणं लोकांची मती बधीर करत आपला जनाधार व धर्मश्रद्धेच्या जोरावर राजकीय वलय निर्माण करताहेत, ज्यामुळे त्यांच्या व्यापाराला बाधा येणार नाही व त्यांचं हे काळोखाचं साम्राज्य विस्तारत जाईल. या साठी आपण गुरमीत रामरहीमचच उदाहरण पाहू.

 हरियाणा व पंजाब मधे डेऱ्यांचं विशेष प्रस्थ आहे. डेऱ्याचा अर्थ ‘घर’असा होतो. शीख धर्मातील अनेक अपप्रथांच्या विरोधात टीकात्मक सुर ठेवत अशी घरे  निर्माण झाली जी मुलतः शीख धर्माचंच आचरण या डेऱ्यामधून करत राहतात. मुख्य धार्मिक प्रवाहात ज्या अनेक लोकांना असमान वागणूक मिळते ते या डेऱ्यांचे अनुयायित्व स्विकारतात. प्रामुख्याने जातीच्या प्रादुर्भावाने जी उतरंड शीख धर्मात सुद्धा उतरली आहे तिच्या विरोधाचं संकिर्तण करणारेही डेरे आहेत ज्यांचा मुख्य आधार दलित शेतमजूरातून येतो. आज रोजी एका अन्दाजानुसार नुसत्या उत्तर भारतात असे तब्बल ३००० डेरे आहेत जे भिन्न भिन्न अध्यात्मिक भुमिकांचं प्रवचन करतात. अश्या अनेक “देवाच्या दुतां”मार्फ़त  संदेश गोरगरीब जनतेपर्यत पोहचवले जातात. त्यातील प्रमुख डेरे म्हणजे सच्चा सौदा, राधास्वामी, सचखन्ड बल्लन, निरन्कारी व नामधारी हे हरियाणा व जवळच्या राज्यातील खास डेरे होय. गेल्या कैक वर्षात या डेऱ्यांचही भांडवलीकरण झाले आहे.वस्तुंच्या उत्पादनापासुन ते विक्री पर्यंत सगळ्य़ा गोष्टी या डेऱ्यांमधे होतात. सोबत या डेऱ्यामधुन येणाऱ्या भक्तांसाठी भांडवली व्यवस्थेने महाग करून ठेवलेली आरोग्य सुविधा  स्वस्तात उपलब्ध होते. अशा स्थितीत हे डेरे सत्तेची छोटी केंद्र बनून जातात. यातला ‘मेसेन्जर ऑफ़ गाॅड’ जो अगोदरच उद्धारकर्ता बनलेला असतो त्याच्या हातात निरंकुश सत्ता केंद्रित होते. बाहेरच्या जगातील अतीव शोषण व धार्मिक-जातीय भेदभावाच्या विपरीत या डेऱ्यामधींल प्रवचने, गुरु व परंपरांमध्ये लोकं मुक्तीचा मार्ग शोधु लागतात, कट्टर बनतात. प्रसंगी इतर डेऱ्यांशी माराकाटीचा संघर्षही होत असतो. डेऱ्याचं राजकारण न समजून घेता, रामरहीमच्या राजकीय प्रभावाची अन साम्राज्याची कल्पना येणार नाही.

सच्चा सौदा हा डेरा बलुचिस्तानच्या शाह मस्ताना यांनी १९४८ रोजी सिरसा, हरियाणा येथे सुरु केला होता. त्यांच्या मृत्यु नंतर शाह सतनामसिह हे १९९० पर्यन्त डेरा प्रमुख होते. त्या वेळी हा गुरमीत २३ वर्षांचा होता. त्याचा एक चुलत भाऊ खलिस्तानी आतंकवादी होता, ज्याचं नाव गुर्जन्तसिह राजस्थानी असे होते. असे म्हणतात  कि गुरमीतला प्रमुखपदी बसवण्यात त्याच्या पिस्तुलाने महत्वाची भुमिका निभावली आहे. प्रपंच सोडुन डेरा प्रमुख झालेल्या गुरमीतने डेऱ्याचा विस्तार वाढवला. डेऱ्याचा कायापालट केला. एक साधा प्रवचनकार न राहता गुरमीत तंत्रज्ञानप्रेमी(टेक्नोसाव्वीवी) पाॅपस्टार पापाजी बनला. त्यानं किरकोळ व्यापार केला, त्याच्या आंधळ्या अनुयायाना करोडो रुपयांच्या वस्तु विकल्या, १०० करोड खर्चुन स्वताला देवाच्या दुताच्या रुपानं प्रक्षेपीत करायला चित्रपटाची निर्मिती केली. इंटरनेटवर  व्यापार सुद्धा केला. चंगळवादात फसलेल्या तरुणाईला तिचा मसिहा सापडला होता. भक्तांनी सुद्धा गुरमीतला डोक्यावर घेतलं. जवळपास ५ कोटी पेक्षा अधिक अनुयायी असणारा बाबा गुरमीत रामरहीम इन्सा ज्या गुहेत राहत होता तिथं त्याच्या परवानगी शिवाय कुणालाही जाता येत नसे. पंचतारांकीत सुविधायुक्त घर, महागडे कपडे-गाडीचा शौकिन असलेल्या या बाबाच्या गुहेत २०९ स्त्रियांचा राबता होता. कांग्रेस सरकारच्या काळातच मिळालेली झेड प्लस सिक्युरिटी वगळता स्वत:ची स्वतंत्र हत्यारबंद सुरक्षा व्यवस्था होतीच. अशा अनेक बाबी तुम्ही सुद्धा टीव्हीवर व वृत्तपत्रातुन पाहिल्या असतील, त्यांच्या विस्तारात काही जात नाही.

भारतातल्या भांडवली लोकशाहीतील निवडणूकांच्या औपचारिकतेतही धर्म, जात व पैसा एक महत्वाची भूमिका बजावतात, या मतपेढीचा(व्होट बँकेचा) उपयोग करता यावा म्हणून या बाबांच्या उंबऱ्यावर डोकं टेकवायला आणि सौदा करायला सर्व भांडवली पक्षांचे नेते जातात. धर्माच्या नावावरचा व्यापार व भांडवली राजकारण परस्परांना पुरक असतं म्हणून कधीकाळी कांग्रेसला समर्थन करणारा रामरहीम वारं फिरताच पर्याय शोधू लागतो व भाजपाला पाठींबा देतो व त्या पाठींब्याच्या बदल्यात अमित शहा बरोबर सौदेबाजी करतो. याच निवडणूकांत ज्या पद्धतीने आसाराम-रामदेव पासून अनेक बाबांनी भाजपाला पाठींबा दिला त्यातून त्यांच राजकीय चरीत्र एकदम नागडं झालं आहे. या बाबाबुवांच्या उत्कर्षाचा एक धागा शासकवर्गाच्या राजकारणातही सापडतो. नाहीतर १९७८ साली एका छोट्याशा आश्रमांत ४-५ अनुयांयी असणारा आसाराम २००० साल उजाडता उजाडता ४२५ आश्रमांचा मालक कसा होतो व तब्बल १० हजार कोटी रूपयांची माया गोळा कसा करतो. सत्तेवर आलेल्या शासक वर्गाच्या सत्तेला मान्यता देण्याच्या बदल्यात या बुवांना हजारो एकर जमीन फुकटात दिली जाते. आता सुद्धा रामदेव बाबाला उत्तराखंडात दिलेल्या ३८७.५ एकर जमिनीचा मुद्दा ताजा आहे. मोदी सत्तेवर आल्यापासून या बाबाने २,००० एकर एवढी जमीन ताब्यात घेतली आहे. २०१४ च्या अखेरीस या रामदेवची संपत्ती तब्बल १,१०० कोटी रूपए इतकी होती. बाबा रामरहीमच्या सच्चा सौदाचं साम्राज्यसुद्धा १,००० कोटीपेक्षा जास्त आहे. नुसत्या शिरसाच्या मुख्यालयाचा विस्तार ९०० एकर जमिनीवर आहे. भारतातील एक खास प्रसिद्ध सत्यसाईबाबांची स्थावर जंगम मालमत्ता ४० हजार कोटी ऐवढी अवाढव्य आहे. नुसत्या बारा एकराच्या आश्रमांत राहणाऱ्या रामपालला बी.एम.डब्ल्यु व मर्सीडीज सारख्या अतीमहागड्या गाड्या दिमतीला होत्या. त्याच्याही डेऱ्याचा विस्तार १०० कोटीहून अधिक सांगता येईल. या सोबत भक्तांच्या रूपात दासदासीचा मोठा राबता कायम हजर असतोच. हे सगळे महान आत्मे सामान्य जनतेला त्याग, आत्मसुधार, विकारमुक्ती शिकवतात व स्वत:मात्र आरामात, सुखात, खुशालचेंडू जगणे पसंद करतात.

या बाबागिरीच्या उत्कर्षाचा काळ  १९८० पासून तपासला तर अनेक बाबांचा अवतार याच काळात भरभराटीला आल्याचे समोर येईल. त्यानंतर १९९१ स्विकारलेले जागतिकीकरणाचे धोरण व त्याचा जनतेवर होणारा परिणाम या सगळ्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडतोच. जागतिकीकरणाच्या वारूवर स्वार होण्याचं स्वप्न बघणारा मध्यमवर्ग व लाभारथी उच्चमध्यम वर्ग दोन्ही वर्ग भिन्न भिन्न कारणांमूळे या बाबांचा कट्टर समर्थक बनलेत, सोबत कष्टकऱ्यांची मोठी संख्याही याला बळी पडली आहे. प्रत्येक वर्गाची जशी काही खास कारणं आहेत, तसा प्रत्येक वर्गाचा असा एक खास बाबा सुद्धा आहे.

आज धर्माचं पूर्णता भांडवलीकरण झालं आहे. गुरमीत पासून राधेमा पर्यंत त्याचं हे रूप अतिशय विकृत व कुरूप आहे. भांडवली राजकारणाशी याचं असलेलं साटंलोटं समजायला व भांडवली व्यवस्थेनं निर्माण केलंलं दु:ख, दारिद्रय अनिश्चितता व भीतीचा ठाव घ्यायला सामान्य जनतेची वैज्ञानिक तर्कबुद्धी अजून तितकीशी सक्षम नाही. याची कारणं प्रबोधन व पुनरुज्जीवानाच्या न लाभलेल्या वारश्यात शोधता येतात. भांडवली व्यवस्थेला आरोपीच्या पिंजऱ्यात जनतेनं उभं करू नये म्हणून दैववादाचा उपयोग जनतेची मती बधीर करायला केला जातो. यासाठीच अशा बाबाबुवामाताचं पालनपोषण केलं जातं. सगळे बाबा एकजात धूर्त, प्रतिक्रियावादी, कट्टर फासीवादी प्रवृत्तीचे आहेत. निर्भया बलात्कारानंतर आसारामची भाषा असो की साक्षी महाराजाची  बेताल वक्तव्य असो, मग ते कुठल्याही धर्मातले असोत ते घोर स्त्री विरोधी, धर्मांध, तर्कदुष्ट व विज्ञानविरोधी आहेत यात शंकाच नाही. निश्चितच या बाबा बुवांच्या जाळ्यांतून सामान्य जनतेला सोडवायला तिचं प्रबोधन तर करायलाच हवं पण सोबत एक अशी जमिनही घडवायला हवी जीथं ही विषारी बीजं अंकुरणारचं नाहीत कधीही. मुद्दा फक्त ‘ढोंगी बाबाचा’ नाहीच.



जेव्हा धर्मशास्त्र नैतिकतेचे आधार असतील,जेव्हा अधिकार कोण्या दैवी सत्तेवर विसंबून असतील, तेव्हाच सर्वात अनैतिक, अन्यायी, कुख्यात गोष्टी योग्य ठरवल्या व प्रस्थापितही केल्या जाऊ शकतील
लुडविक फायरबाख (१८४०-१८७२)
(जर्मन तत्वज्ञानी)

जेव्हा विवेक झोपी जातो, तेव्हा राक्षस पैदा होतात
फ्रांसिस्को द गोया (१७४६-१८२८)
(विख्यात स्पॅनिश चित्रकार)

जर आपण मानवी इतिहासाच्या आरंभी जाऊन पहालं तर दिसेल कि अज्ञान व भीतीने देवांना जन्माला घातलंय, कल्पना, उत्साह वा भ्रमांनी त्यांच महीमामंडन वा त्यांना लांछीत केलंय, दौर्बल्याने त्याचं पुजन केलंय, अंधविश्वासांन त्यांच रक्षण केलंय आणि प्रथा, श्रद्धा आणि निरंकुशतेन त्यांच समर्थन केलं आहे जेणेकरून माणसाच्या आंधळेपणाचा फायदा आपल्या हितांच्या पुर्तीसाठी करता यावा
बैरेन द’होल्बाख (१७२३-१७८९)
(प्रबोधनकालीन फ्रान्सचे तत्वज्ञानी)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************