मराठी नाटकाला प्रेक्षक नाही की प्रेक्षकांना भावणारं नाटक ?

🌱वि४🌿 या व्हॉट्सअप ग्रुपवरून

               Source :Internet
मराठी नाटकाला प्रेक्षक नाही की प्रेक्षकांना भावणारं नाटक ?

         व्यंगचित्र:अभिजीत गोडसे,सातारा

संगीता देशमुख,हिंगोली:
पूर्वी करमणुकीची साधने नाटक,नृत्य हीच होती.दिवसेंदिवस त्यात बदल होऊन सिनेमा आला. खरेतर सिनेमा आल्यापासूनच प्रेक्षकांचे लक्ष नाटकाकडून कमी झाले होते. पण आजच्या एवढे परिणामकारक नव्हते. आज मात्र आपल्याकडे माहितीचा आणि मनोरंजनाचा अफाट सागर इंटरनेटच्या स्वरूपात उपलब्ध आहे. नाटक जेवढे करमणुकीचे साधन होते तेवढेच त्यातून सामाजिक विषय हाताळल्याने प्रबोधनही होत असे. वास्तविक पाहता आजच्या नाटकातूनही अनेक ज्वलंत विषय हाताळलेली आहेत. विनोदही आहे,प्रतिभाही आहे,कलाविष्कारही आहे परंतु मला वाटते,आज सर्वकाही घरबसल्या पहाण्याची सुविधा झाल्याने नाटके प्रेक्षकांना भावणारी असली तरी  प्रेक्षकवर्ग कमी झालेला आहे. हे नाटकाचे दुर्दैव म्हणावे लागेल.

           Source :Internet
डॉ.अजय N:
मराठी नाटक हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून तो गांभीर्याने घेणे गरजेचे आहे, मराठी नाटकांना राजाश्रय व लोकाश्रय मिळणं कठीण झाले आहे. बालगंधर्व येणाऱ्या पिढीला माहित असतील का ? हा माझा प्रश्न आहे.

          Source :Internet
राजश्री,मुंबई :
  मराठी रंगभूमीला शतकांचा इतिहास आहे . विष्णुदास भावे यांनी सादर केलेल्या पहिल्या नाटकापासून , बालगंधर्व , पणशीकर , आचार्य अत्रे , श्रीराम लागू , जब्बार पटेल , तेंडुलकर , एलकुंचवार अशी अनेक नावे ज्यांनी मराठी रंगभूमी आणि मराठी जगणं समृद्ध केलं .मराठी नाटक म्हणजे ' आशयघन' अशी ओळख खरतर दबदबा निर्माण केला . संगीत नाटक , पौराणिक , ऐतिहासिक , नर्म विनोदी , शोकांतिका अशी नवरस युक्त नाट्ये रंगभूमीवर अवतरत गेली . कीर्तन , दशावतार , राम लीला , जाखडी हे प्रकार अजून वेगळे . रात्र रात्र चालणारे खेळ .. पुन्हा पुन्हा आळवली जाणारी पदे  ( आजचे वन्स मोअर ) , पुन्हा दुसऱ्या दिवशी येऊन आस्वाद घेणे ..हा काळही रंगभूमीने अनुभवला .
यात कलाकारांच रंगभूमीवरील प्रेम , निष्ठा होती .

          Source :Internet
सखाराम बाईंडर ला कडवा विरोध होत असतांनाही आहे तेच नाटक पुढे सुरू ठेवण्याचा तेंडुलकरांचा आग्रह , स्त्री असून सुद्धा , जोखीम पत्करून सादरिकरण करणाऱ्या लालन सारंग , त्यांना पाठिंबा असलेले कमलाकर सारंग यांचे खरतर अनंत उपकार आहेत.. त्यांनी पुरोगामी विचार केला म्हणून आज आम्ही वैचारिकतेचा टेंभा मिरवू शकतो आहे . घाशीराम कोतवाल , हमिदाबाईची कोठी , पुरुष अशी कितीतरी नाटके त्या त्या कलाकारांनी जपली , प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे .
तेंडुलकरांची  नाटकं आणि वाद हे तर समानार्थी शब्द पण तरी प्रयोग तुफान चालायचे.. प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे नवीन काहीतरी लिहिण्यास लेखक उत्सुक असायचे , निर्माते नवीन प्रयोग रंगभूमीवर आणण्यास बिचकत नव्हते आणि कलाकार अभिनयाचा मनमुराद आनंद घेऊ शकत .
आज नाटके कसदार नाही असे म्हणताना आजच्या प्रेक्षकाच्या
मानसिकतेला  आपण विसरतो आहोत . पूर्वीसारखी आशयघन नाटके आणली तरी ते झेपणारा सुजाण प्रेक्षक आहे कुठे ? चेतन भगत पुढे ज्यांचे वाचन नाही , त्यांना आमचे तेंडुलकर कळणार कसे ? एलकुंचवारांचे वाडा चिरेबंदी बघून डोक्याला येणाऱ्या झिणझिण्या ज्यांना मान्य नाही किमान त्यांनी तरी नाटकाच्या आशयाबद्दल बोलू नये . रोजच्या रगाड्यातून सुटका हवी म्हणून नाटक बघणारा एक वर्ग आहे , किंबहुना मोठा वर्ग आहे , त्यांना विनोदी नाटक हवे असते . मुंबई बाहेर तर नाटक विनोदी असेल तरच थेटर लवकर मिळते . प्रेक्षकांच्या डोक्याला किक बसेल असं यात काही नसतं , मग त्याच त्याच विनोदावर बळजबरी हसायचे ( काय करणार , तिकीट महाग असतात..) आणि पूर्वीसारखी मजा नाही म्हणत परत यायचे .
 मी नथुराम गोडसे बोलतोय , या नाटकाला होणारा विरोध आता जरी मंदावला असला तरी तो नाहीसा झालेला नाही . असे असूनही या नाटकाचे १००० च्या वर प्रयोग करण्याचं धाडस त्या नाटकाची टीम करू जाणे . हि बाजू प्रेक्षकांसमोर जायला हवी असे मानणाऱ्या स्व. विनय आपटे यांना कोटी कोटी नमन . चौकात उभ राहून जर नथुराम गोडसे की जय म्हटलं तर संध्याकाळच जेवण कोठडीत अशी ' लोकशाही 'जिथे आहे तिथे नथुराम गोडसे ची बाजू मांडणं एव्हरेस्ट सर करण्यापेक्षा कमी नाही .
 घाशीराम कोतवाल ला झालेला विरोध , अगदी तयार झालेले सिनेमे आपल्याला त्या त्या समूहाला दाखवावे लागतात या अशा काळात प्रेक्षक म्हणून आपली जबाबदारी ओळखतो आहोत आपण ? पोलिसी बंदोबस्तात देखील लोक प्रयोग बघण्यास तयार नाहीत , आणि अशांसाठी जीवाची पर्वा न करता आशयघन नाटके का यावीत ?
         Source :Internet
 गावोगावच्या नाटय गृहांची अवस्था अतिशय दयनीय . ( प्रेक्षकांच्या सुजाणत्वाशी स्पर्धाच जणू ) . मेकअप रूम नाही , असलीच तर गळकी , खिडक्या तुटलेल्या , डास चिलटे , चोर यांचा सुळसुळाट , तुंबलेली स्वच्छतागृहे , रंगमंचावरील नसती उठाठेव करणारी मंडळी , गावात प्रयोग असेल तर कलाकाराला हैराण करून सोडणारी नेते मंडळी आणि त्यांची मंडळी या सगळ्यांचा सामना करत कलाकार कला सादर करतो तर तेव्हाही शिस्त किंवा सौजन्य म्हणून लोक पूर्ण प्रयोग बघत नाही , कुणाची मूल रडत आहेत , कुणाचा मोबाईल वाजतो आहे , कुणी घरगुती चर्चासत्र चालवत , कुणी चक्क ब्रम्हानंदी टाळी .. तरी कलाकारांनी नाटक मात्र आशयघन च दिले पाहिजे . तुमच्या गावात पाऊल  टाकल्यापासून गाव सोडेपर्यंत अशा अनुभवांचा सामना करावा लागला तर केवळ कलेवरील प्रेमाखातर म्हणून नाटक कंपनी कितीवेळा परत येईल ? कला सादर करणं , अभिव्यक्ती स्वातंत्र्य , कलाकाराला आवश्यक अशी स्पेस देणं या गोष्टी आपल्या खिजगणतीतही नाही , नाटक कसं होत या पेक्षा अभिनेता / अभिनेत्री सोबत फोटो काढला की खुश होणारे आपण , आपल्याला खरच आहे हक्क चांगली नाटके होत नाही म्हणून ओरडा करण्याचा ?
            Source :Internet
चला तर आधी प्रेक्षक म्हणून , माणूस म्हणून आपले वाचन वाढवू , मनाच्या कक्षा रुंदावू , कलाकृती समजून घेण्याआधी विरोध करणं टाळू  , कलाकाराला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देऊ , आणि माणूस म्हणून त्याला त्याच्या कर्मभूमीत पुरेशा सुविधा आहेत की नाही याची पोच घेऊ ...
असे झाले तर रंगभूमीचे सुवर्णयुग अगदी जवळ...
हे काय आलेच...
तिसरी घंटा झालीच..

        फोटो:जयंत जाधव

जयंत जाधव,लातूर:
विषय खुप छान आहे हा.आपल्यालापैकी बरेच जणांनी शाळा,महाविद्यालये इत्यादी मंचावर नाटकं पाहिली असतीलच किंवा काम केलेले असेलच.मी सुध्दा एक कलावंत आहे.शाळेत,महाविद्यालयात व सामाजिक कार्य करत वेगवेगळ्या विषयावर जनजागृती करताना माझा पथनाट्ये व नाटकं यांचे शी संबंध आला आहे.

Source :Internet
"नाटक म्हणजे एक ठरवून दिलेली चौकट किंवा संहिता नसते, कलाकाराने त्यात व्यक्त होणे अपेक्षित असते".नाटकाचा एक  संदेश-मुद्दा ठरलेला असतो.मग तो सामाजिक,आर्थिक,राजकीय कुठल्याही विषयावर असू शकतो.सध्या सगळीकडे ओरड सुरू आहे की मराठी नाटकांना प्रेक्षक नाही.मध्यंतरी परिस्थिती होती तशी.पण आता नाही सध्या मराठी नाटकं यांना चांगले दिवस आले आहे.मुळातच प्रेक्षकांना हवे हवे वाटणारे विषय जर आले तर पाहणारे प्रेक्षक आपोआप आकर्षित होतात.हे अलिकडच्या मराठी नाटकांना झालेल्या गर्दीवरुन दिसून येते.मुळात, नाटकांना प्रेक्षक नाही हा मुद्दाच नाही असं नाट्यनिर्मात्यांचं म्हणणं आहे.चांगली, दर्जेदार नाटकं असतील, नाटकात मोठे कलाकार असतील तर प्रेक्षक त्या नाटकांना गर्दी करतात.अनेक दर्जेदार नाटकं चांगली चालत असून, काहींनी तर ७५, १००, १५० प्रयोग असा पल्ला गाठला आहे.‘वाडा चिरेबंदी’ ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकांचे संयुक्तपणे सव्वादोनशे प्रयोग मे महिन्यातच पूर्ण झाले.सिद्धार्थ जाधवची धमाल कॉमेडी असलेल्या ‘गेला उडत’नं १५० प्रयोगांचा टप्पा अलीकडेच ओलांडला.मंगेश कदम आणि लीना भागवत या जोडीच्या ‘के दिली अभी भरा नही’चा शंभरावा प्रयोग  झाला होता.त्यानंतर सव्वाशेवा प्रयोग  पुण्यात झाला.म्हणजे १०० ते १२५ हा टप्पा या नाटकानं अवघ्या २८ दिवसांतच पूर्ण केला.
प्रेक्षक खुप चाणाक्ष असतात.जोपर्यत त्यांना नवीन काही पाहायला मिळत नसेल तर काय चांगले काय नाही हे कसे ठरवता येईल.त्यामुळे पारंपारिक प्रयोग सोडून नाटकांमधे नवीन प्रयोग होणे गरजेचे आहे.नाटकाचा प्रेक्षक सुजाण, चौकस असतो.जे चांगलं आहे त्याला लोक प्रतिसाद हमखास देतात.मनोरंजनाची माध्यमे बदलली पाहिजे.नाटकाचा प्रसार-प्रचार सोशल मिडियावरुन करणे,विविध विषयांना स्पर्श करणे,मुलांना नाटके दाखवण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन देणे इ.उपाय करण्यासारखे आहे.मराठी नाटकं पुढे यावं यासाठीच्या अनेक  पध्दती बदलल्या तरच  कलाका व प्रेक्षकांचं रंगभूमीवरचं प्रेम नाटकाला पुढे आणेल यात शंका नाही.

        Source :Internet
किरण पवार,औरंगाबाद:
            काही बाबतीत जर गांभीर्याने विचार केला तर वरील दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. मराठी नाटकाला प्रेक्षक नाही कारण स्वत: नाटककार सध्या तेवढ्या आत्मियतेने प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा दुसर महत्त्वाच कारण म्हणजे प्रेक्षकाला प्रत्येक वेळी करमणूकच हवी आहे. पुर्वीचा प्रेक्षक आणि सध्याचा प्रेक्षक यांच्या विचारांमध्ये आणि दृष्टिकोनामध्ये बरीच तफावत असलेली पहायला मिळते. सध्या आपण नाटकांकडून जी अपेक्षा ठेवतो ती अपेक्षा बऱ्याच वेळा अवास्तव असते.

             Source :Internet
आपण दिलेली प्रत्येक चांगली गोष्ट प्रेक्षकांना हमखास आवडते. *कधीकधी आपण नाटककार काही प्रमाणात चुकीचे असू शकतो, शेवटी प्रत्येक माणूस चुकतोच.* पण म्हणून प्रेक्षकांनी नाटकं चांगली राहिली नाहीत, असा शिक्का मारणही चुकीच आहे. *जर महाराष्ट्राचा विचार केला तर आजही कोकण विभागात छोट्या छोट्या गावांमध्ये नाटकं होत असलेली आपल्याला पहायला मिळतात आणि त्यांना प्रतिसादही उत्तम मिळतो. "दशावतार" हे आपल्याला परिचित असलेल उदाहरण आहे.* थोडक्यात जर दुसरी बाजू मांडली तर मराठवाडा, विदर्भ वा इतर भागात त्या प्रमाणात नाटकं होतच नाहीत. मग प्रश्न असा उभा राहतो की, *जर नाटक प्राथमिकतेच्या उभारल्या जात नसेल तर पुढे चालून नाटकांसाठीचा प्रेक्षक तयार होणार कसा?* त्यामुळे कुठेतरी कलाकारांच्या किंवा शाळकरी नाटकांची परिस्थिती बदलायला हवी. शाळकरी नाटकातही गावागावात कलाकारांची कमतरता भासते आणि बऱ्याच वेळा नाटकं रद्द करावी लागतात. या अशा गोष्टी नाटकाच्या भविष्यावर खूप मोठ संकट उभारतात.
               *सांगायचा मुद्दा एवढाच की, नाटकांसाठी व्यासपीठं तयार करा, संघटीत व्हा, पालकांनी मुलांना त्याकरता प्रोत्साहन द्या, गावातील बंद पडलेली नाटकं तरुणांनी पुढाकार घेऊन चालू करा आणि या गोष्टी कराल तर नक्कीच मराठी नाटकाला प्रेक्षक भेटेल आणि प्रेक्षकांना भोवणार नाटकही हमखास तयार होत राहील. नाटक केवळ संस्कृती म्हणून नाही तर जगण्याची नवी उमेद म्हणून त्याकडे पहा.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************