व्यक्तींचे पुतळे महत्वाचे की विचार



संदिप बोऱ्हाडे ,वडगाव मावळ, पुणे.
   आजकाल जिवंत माणसांपेक्षा पुतळ्यांचे महत्व जास्त वाढले आहे. चालती-बोलती हाडामांसाची माणसे नकोत पण निर्जीव पुतळे हवेत. कारण हे पुतळे बिचारे निषेधार्थ आवाज उठवू शकत नाहीत. त्यांची विटंबना करा, त्यांना चपलांचे हार घाला, त्यांच्यावरून राजकारण करा, त्यांची स्थापना करून कावळ्या-कुत्र्यांची सोय करा, त्यांचे काही म्हणणे नसते.

    सध्या महापुरुषांची स्मारक,पुतळे यांची अचानक कशीकाय गरज भासु लागली आहे हे काही समजत नाही आहे.
महापुरुषांचे विचार त्यांचा आदर्श घेण्यासाठी नक्कीच त्यांची स्मारक उभारावी नाही तर येणाऱ्या पिढीला यांची ओळख राहणार नाही,मात्र हे करतांना महापुरुषांचे पुतळे उभारण कितपत योग्य? फक्त पुतळे उभारून जर महापुरुषांचे विचार घराघरात,डोक्याडोक्यात गेले असते तर आज या भारतभुमीवर काहीच वाईट घडल नसत.

      स्टेचु ऑफ युनिटी भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचा भारताने जगातील सर्वात मोठा पुतळा 3 हजार करोड रुपये खर्च करून बांधला...
पण मला असे वाटते की , याच पैश्यांमध्ये जगातील सर्वात मोठे हॉस्पिटल बांधून देशाच्या वैभवात भर पाडता आली असती तर,
जागतीक दर्जाचे सर्वात मोठे शैक्षणिक संकुल उभारता आले असते तर ,
जगातील सर्वात मोठे उद्यान उभारुन वसुंधरा हिरवी करता आली असती तर, पण छे आमच्या राजकारणी लोकांना या गोष्टी अजिबात नकोच.

    स्टेचुच्या, पुतळ्यांच्या नावाने तिथं राहणाऱ्या हजारो स्थानिक त्यांच्या हक्काच्या जल, जंगल, जमीन पासून बेघर केले जातात, आज अनेक धरणे, पुतळे बांधून अनेक वर्षे होतात परंतु आजही तेथील गरीब जनतेचा पुनर्वसन मात्र होत नाही. तेथील स्थानिक लोकांच्या ज्या भावना दुखावल्या गेल्या त्याच काय..??
जस त्या ग्रामस्थांनी सांगितलं की येथील जंगल, धबधबे, शेती, वन्यजीव, नदी या सर्व नैसर्गिक साधनसंपत्ती आता धोक्यात आली खरच हे सरदार पटेलांना तरी पटलं असत का?

     छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने NDA खडकवासला सारखी स्कुल, काॅलेज काढायला पाहिजेत ,त्यांचे काही किल्ले जतन करायला पाहिजेत, भारतरत्न संविधानाचे शिल्पकार डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारण्यापेक्षा जर बाबासाहेब आम्हाला समजले असते तर आम्हि तिथे जगातील सर्वात मोठ ग्रंथालय काढु ही त्यांना खरी श्रद्धांजली राहणार कारण बाबासाहेबांचा जीव हा पुस्तकात होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक उभारण्यापेक्षा त्यांच्या नावाने भारतातील सर्वात मोठं व्यंगचित्र,कला क्षेत्रातील कॉलेज काढा, की जेथून आंतरराष्ट्रीय पातळीचे व्यंगचित्रकार तयार होतील ही खरी स्मारक त्यांची ठरतील. राष्ट्रपिता म. गांधीचा सत्याचे प्रयोग सोडून असत्यमेव जयते चालु आहे, पण आम्ही राजकारणी हे कदापी करणार नाही पण पुतळे मात्र हवे तेव्हढे उभारू. 

    देशातील कोट्यावधी गरीब जनता अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत सोयींपासून वंचित राहो,
दिवसेंदिवस महागाई अगदी गगनाला भिडो, लक्षावधी बेरोजगार नोकरीच्या शोधार्थ वणवण फिरोत, पाण्याचा तुटवडा, जागोजागी दिसणारे कचऱ्यांचे ढीग, उखडलेले रस्ते, उघडी गटारे, हॉस्पिटल्सची दुरावस्था, प्रदूषणाची सतत भेडसावणारी समस्या, गेल्या उडत आम्हाला पुतळे महत्वाचे आहेत. तो आमच्या जीवना मरणाचा प्रश्न आहे. पण त्या महापुरुषांचे विचार मात्र आम्ही अंगिकारणार अजिबात नऊ.

  शेवटी या निर्जीव पुतळ्यांमुळे किती जीव गेले याचा काही हिशोब आहे का? आयुष्यात मला कधीच कुठला पुतळा बघून मला स्फूर्ती आली नाही किंव्हा प्रेरणा मिळाली नाही एकच फायदा झाला पत्ता सांगण खूप सोप झालं. म्हणजे अमुक तमुक पुतळ्याचा बाजूला वगैरे वगैरे.
पुतळे आणि स्मारक फक्त दहशत पसरवण्याचे साधन झाले आहेत लोकांच्या धार्मिक भावना भडकावयाच्या आहेत ना मग करा विटंबना किंवा भरवा एखादा मेळावा द्या भडकावू भाषण होऊ दे मग हाणामारी मग हे पुतळे बांधणारे मोकळे आपल्या आपल्या सोयीच राजकारण करायला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गणेश पिसे, पंढरपूर.
Image result for great man statue in india
              परवाची गोष्ट सरदार पटेलांच्या एकात्मतेच्या स्मारकाचे अनावरण मा पंतप्रधानाच्या हस्ते झाले.जगातील 8वे आश्चर्य म्हणून ख्याती मिळवण्याच्या मार्गावर असणारे हे स्मारक तयार करण्यासाठी 5 वर्षाहून अधिक कालावधी लागला. करोडो रुपये खर्च आला अवाढव्य पुतळा उभा राहिला तो पण माता नर्मदेच्या कुशीमध्ये.पुतल्यावरून भाषावाद पण झाला असो पण प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने भरून आली की पुतळाचे शिल्पकार मराठमोळे होते.सरदारांचा पुतळा तयार करण्यासाठी हजारो गोर-गरीब मजूर रात्रंदिवस काम करत होते पण या सर्वांमध्ये एक फोटो सगळीकडे फिरत होता तो म्हणजे सरदारांच्या भव्य स्मरकाशेजारी एक आई आपल्या चिमुकल्याना उघडयावरती चुलीवर भाकरी करून त्यांची भूक शांत करत आहे . यावर कोणी म्हणाले की तयार केलेला फेक फोटो आहे पण फोटो जरी तयार केलेला असला तरी फोटो मधील दिसणारे दृष्य हे नक्कीच सत्य होते कारण या स्मारकाला आजूबाजूच्या खेड्यातील शेतकऱयांचा या स्मारकाला विरोध होता. जगातील सर्वात उंच पुतळा बांधला म्हणून सरदारांचे कार्य काही कमी किंवा जादा होणार नव्हते समजा तेच पैसे जर भूमिहीन, गोरगरीब, शेतकरी कल्याणासाठी वापरले असते तर आपल्या या भारतमातेच्या लोहपुरुषाला नक्कीच खूप समाधान वाटलं असते.सरदारांचा पुतळा उभा करण्यासाठी तत्कालीन गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकऱयांना आवाहन केल की जुनी लोखंडी अवजारे पुतळा उभारणीसाठी द्या सरदार पटेलांनी देशाची राष्ट्रीय एकात्मता अखंड ठेवली यामुळेच अखंड भारताची निर्मिती झाली ..त्यांच्यामुळे विशाल भारताची निर्मिती झाली म्हणून त्यांचा पुतल्यासाठी सर्व शेतकऱ्यांची लोखंडी अवजारे वितळून त्यांचा अखंड पुतळा उभा राहावा हे त्यानीं स्वप्नांत पण पाहिले नसेल.या महापुरुषांचे विचार बाजूला ठेऊन फक्त आणि फक्त राजकारण केलं जातंय    आज गुजरात मध्ये पुतळा उभा राहिला उद्या महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, इ मध्ये असेच पुतळे उभे राहतील करोडो रुपये खर्च होतील लांबचे कशाला जवळचं उदाहरण घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असेल पण ज्या गड-किल्यावर्ती  महाराज राहिले,ज्या ठिकाणची माती महाराजांच्या स्पर्शने पावन झाली आणि आपल्या मराठी शूरवीरांनी  आहुती दिली त्या गड किल्याचा विकास आधी झाला पाहिजे. किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल संविधान खूप महत्वाचे आहे ते प्रत्येक भारतीयाला माहीत असले पाहिजे त्यांचे विचार महत्वाचे आहेत त्यांच्या भव्य समारकापेक्षा   हे जेव्हा यंत्रणेच्या लक्षात येईल तेव्हा आपला देश जगातील विकसित देशाच्या यादीमध्ये असेल एवढ मात्र नक्की!!!🎂
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अर्जुन बर्गे,अहमदनगर

आताच सरदार पटेलांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले।।।लगेच मुद्दा वाद सुरू झाला।।।पुतळे महत्वाचे की त्यांचे विचार।।।


मला वाटत त्यांचे पुतळा उभारणं महत्वाचं आहे ।।।तेव्हढाच त्यांचे विचार लोकांच्या मनात रुजवण्यासाठी त्यांचे पुतळे उभारणं पण महत्वाचं आहे।।।1947 ला भारत स्वतंत्र झाला त्या वेळी भारत 565 संस्थानामधी विभागला गेला होता।।।565 पैकी 562 संस्थान विलीनीकरना मध्ये त्या व्यक्ती न सिव्हाचा वाटा उचलला त्या वलाभभाई पटेल यांचा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा उभारला तर बिघडल कुठं।।।।आज संपूर्ण जगात त्या व्यक्ती च नांव पोहचेल।।
ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानस्पदच आहे।।।।।


त्यांनतर छत्रपत्री शिवाजी महाराजांचा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा होतोय।।।।ज्या महाराजांनी वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी शपथ घेतली।।।प्लॅनिंग काय असत हे आपण त्या व्यक्ती कडून शिकलो।। महाराजांनी प्रत्येक चाल आणि प्रत्येक चाली साठी वेगळा माणूस वापरला।।।शेतकऱ्यांसाठी,, महिलांसाठी,,, सर्वसामान्य रायतेसाठी इ सगळ्यांसाठी कल्याणकारी निर्णय घेणारा राजा।।।म्हणूनच महाराजांना जाणता राजा म्हणून ओळखल जात।।।।


महाराजांनी प्रत्येक गोष्ट वेळेवर केली शाहिस्तेखान थांबलेल्या लाखाच्या सैन्यात मूठभर मावल्यानीशी लाल महालात जाऊन शाहिस्तेखानाची बोटे छाटली।।।अब्जलखानाचा वध ।।।आग्रा वरून सुटका एकही माणूस  औरंगजेबाच्या न गमवता👊।।।


या सर्व प्रवासात महाराजांकडून एक जरी सेकंदांने,, मिनिटाने चूक झाली असती तर होत्याच नव्हतं झालं असत।।।।


जर असा व्यक्तीच नाव जर जगातील घरा घरात या जगातील सर्वात उंचीवर पोहचणार असेल तर महाराजांचा पुतळा बांधला म्हणून अडलं कुठं।।।।
अहो आपल्या भारतातील कर्तृत्ववान माणसाचं नाव फक्त भारतातच नाही तर जगाच्या पाठीवर कोरल जातंय तर बिघडल कुठं।।।।
दुर्ग गडकोट किल्ले यांनला पण आपण जपतोच आहे।।।


काहीच मत आहे की देशात एवढ्या समस्या असताना पुतळे कशासाठी।।।पण मी म्हणतो पण हे पुतळे नाही बांधले ।।।।तर सगळ्या समस्या सुटणार आहेत का।।।मंग कशाला या गोष्टीचा बाऊ करायचा आपल्या भारतीय माणसांनी भारतीयांना मोठं केलं पाहिजे।।।।कुठं पर्यंत बाहेरच्याच गुणगान गायचं।।। देशाचा अर्थसंकल्प 16 लाख कोटींचा आहे।।।देशाची अर्थव्यवस्था 3 ट्रेलिअन ची आहे।।।देशात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होतोय।।।इथं एवढा मोठा देश आहे एवढया मोठ्या व्यक्तीचा ज्यांची महती पूर्ण जग गातय ।।।त्यांचे पुतळे उभारण्यासाठी विरोध करायला नको असं तरी मला वयक्तिक वाटत।।।।

बोलायला अजून पण खूप व्यक्ती बदल बोलण्यासारखं आहे आहे पण शब्द मर्यादेमुळे थांबतो।।।।

चुकल्यास क्षमस्व।।।🙏🙏प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते।।।।।

शब्दामध्ये काही लिहिताना चूक झाली असल्यास माफ करा।।।🙏🙏
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वाल्मीक फड ,महाजनपूर (नाशिक).
             बघा पुतळ्यांपेक्षा विचार निच्छीत चांगले रहाणार यात काहीच शंका नाही .काय झालय सामान्य जनतेला हे पुतळे वगैरे यात काही रस नसतो,परंतु एखादा महाभाग राजकारणी त्याचे धंद्यासाठी भांडवल काय? म्हणून दलित वस्ती असली की,आंबेडकरांचा पुतळा,मराठा वस्तीत शिवाजीराजांचा पुतळा,माळी वस्तीत फुलेंचा पुतळा असे यांनी प्रत्येक जातींमध्ये जे महापुरूष जन्माला आले त्यांचे पुतळे बांधणे किंवा बांधण्या स फुशारकी देणे हा यांचा धंदा आणी निवडणुका जवळ आल्या की, यांनीच रात्रिचे वेळेस त्या पुतळ्यांचे पावित्र्य मोडायचे आणी आपली राजकारणरूपी पोळी भाजून घ्यायची.समाजात अशी काही विक्रुत माणसे, अहो माणसे कसली जनावरांत सुद्धा त्यांची गणना करू नये असं मला वाटतं .हि माणसे काय करतात ?त्यांना जाती धमॅ यात काही रस नसतो फक्त एखादा म्हटला की,जा त्या पुतळ्याच्या गळ्यात माळ घाल ,हा लगेच करणार .हा विचार करणार नाही की,ह्याचे परिणाम काय होतील ते.मला तर वाटतंय पुतळे हवे पण ते कशासाठी तर महापुरूषांची प्रेरणा घेण्यासाठी परंतु त्याच पुतळ्यांच्या नावाने जर दंगल उसळत असतील तर ते पुतळे काय कामाचे?खर्या अथॉने महापुरूषांचे विचार हे मला आधिक महत्वाचे वाटतात.आम्ही वैकुंठवासी,आलो याची कारणासी तर कारण काय तर साचभावे वतॉया .संत कींवा महापुरूष हे फक्त आणी फक्त सामान्य जीवांचे रक्षण तसेच त्यांना तारण्यासाठी आलेले असतात म्हणून मला वाटतंय की,जेवढे संतांचे विचार महत्वाचे तेवढेच त्यांचे पुतळेही महत्वाचे कारण पुतळा पाहीला की,असे वाटावे की,असे कायॅ आपण केले तर?🙏🙏🙏✍
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
किशोर शेळके.लोणंद .

शिर्षक:- पुतळा कशाला....

चौकातला शिवाजी महाराजांचा पुतळा
घोड्यावरचा, ऐटीत उभा असलेला
आजवर खूप शांत होता, पण आज बोलत होता
निर्जीव पुतळा आज बोलत होता 
बोलत होते ते शिवाजी महाराज 

काल माझ्या समोरच दंगल झाली
माझ्या नावाखाली कत्तल केली 
तुम्हाला कुणी सांगितलं की,
मी मराठ्यांचा राजा होतो. 
ज्या स्वराज्यात जातीच्या नावाखाली
तूम्ही एकमेकांची डोकी उडवता, 
त्या स्वराज्याच्या मी सेवक होतो. 
माझे सगळे मावळे, सेवक होते
मी त्यांची जात कधी बघीतलीच नाही 
आमचा धर्म होता फक्त स्वराज्याचे रक्षण 
जो स्वराज्याचा वैरी, त्याचेच फक्त भक्षण 
नव्हतं मागितलं कधी कुणाकडं आरक्षण.
मला काय वाटायचं आपल्या स्वराज्याबद्दल
आणि आपण काय वागतोय,
असं वाटतं उगाच तळमळलो आपण
उगीच केली स्वराज्याची स्थापना, उगीच पुकारले बंड
मी जर जातीतच वाटणार होतो, तर का लढलो अखंड 
आता पुतळा उभा करून, काय हे मिळवणार 
आमच्याच नावाने भांडणार, आणि आम्हालाच जळवणार .....
पुतळ्यात आम्हाला उभं करण्यापेक्षा, मनात उभं केलं असतं, तर खुप बरं वाटलं असतं....

आली आंबेडकरांची जयंती, आले सगळेच भोवती
शिडी लावून हार घालती, अन् दुस-याच दिवशी संविधान जाळती. 
बाबासाहेबांचंही तेच म्हणनं, तुमचं बोलणं वेगळं अन् वेगळंच वागणं 
माझ्याच चौथ-यावर तुमची गुटख्याची पिचकारी, आणि अनुयायी म्हणवून घेता स्वतःला
मग माझ्या नावच्या सभागृहात, जुगार अन् मटक्याचा अड्डा कशाला.
माझ्याविषयी एवढाच आदर आहे, तर एकच करा 
स्वातंत्र्य, समता, बंधुता, यांचा जोर धरा 
'जातीव्यवस्थेचे निर्मूलन' यासाठी माझी ओढ होती
लोकशाही माझा 'भारत' असावा, अशी आस होती
मतांसाठी होईल तुमचं भांडण, असं माहित असतं
तर लोकशाहीसाठी नसती धडपड केली
म्हणून असंच वाटतं..
पुतळ्यात आम्हाला उभं करण्यापेक्षा, मनात उभं केलं असतं, तर खुप बरं वाटलं असतं....


हा आला महात्मा फुले चौक, कारण इथे वावरतात माळी लोक 
एकदा 'शेतक-याचे आसुड' वाचा, मग तुमच्याही काळजाला पडेल भोक
मला एकच वाटायचं, शिक्षणापासून कुणी लांब राहू नये
मी कधी माझी जात पुढे केली नाही, आणि तुम्हीही करू नये 
जात म्हणून माझा पुतळा, राहणार असेल उभा 
तर नका करू, नका करू ते सोंग अन् राजकारण जातीचे.
थोडी तरी कदर ठेवा, आपण ॠणी या मातीचे 
बायकोला घेऊन मी समाजाशी लढलो 
उभ्या आयुष्यात कधीच नाही रडलो
तुम्ही मात्र माझ्या पुतळ्याच्या उद्घाटनावरून भांडणार 
जातीच्या नावाखाली पुन्हा रक्त सांडणार 
मग थांबवा तो पुतळा..
पुतळ्यात आम्हाला उभं करण्यापेक्षा, मनात उभं केलं असतं, तर खुप बरं वाटलं असतं....

का वाटता आम्हाला जातीत, आम्ही जन्माला आलो तिथे, हा आमचा गुन्हा नव्हता
आम्हाला समाज सुधारणेचा ध्यास होता, हाच आमचा इतिहास होता.
अहिल्यादेवींचा असाच पुतळा, जयंतीदिवशीच आठवतो 
शुरपणा बाजूला ठेवून, जात आमची श्रेष्ठ यातच रक्त गोठवतो 
स्त्री असून कमी नव्हती, एवढंच मनात घेऊन टाका
जात का आणता मध्ये, आतातरी गिळून टाका
आण्णा भाऊ साठे असतील, किंवा असतील सरदार पटेल
पुतळा मोकळ्या मनाने होऊ द्या, का विचार करता मत वाढेल की घटेल 
इतिहासात यांच महत्त्व काय होतं, हे तुम्ही का जाणाल?
दोन तासाचा अभ्यास करून , भाषणात मात्र आणाल. 
राजकारण करण्यासाठी पुतळे उभे करू नका
पुतळ्यात आम्हाला उभं करण्यापेक्षा, मनात उभं केलं असतं, तर खुप बरं वाटलं असतं....

राष्ट्रपितांच्या नावाने प्रत्येक गावात, एक चौक एक पुतळा 
आणि खंडणीसाठी, भ्रष्टाचारासाठी वापरणा-या नोटावर मीच
मी कुठं सांगितलेलं, एवढं व्याप करायला, कुठं सांगितलेलं महात्मा म्हणायला 
फक्त खोटं बोलू नका, अहिंसेने वागा, आणि शिकवलं नितीमत्ता धरायला 

शाहू, कर्मवीर आणि कित्येक व्यक्ती, अगदी आईबापावर तेवढीच भक्ती
असावाच यांचा पुतळा, कुणी केली तुमच्यावर सक्ती 
बंद करा हे दिखाव्यापुरतं प्रेम, आणि ठरवून टाका एकदाच
पुतळ्यात यांना उभं करण्यापेक्षा, मनात उभं करू
विचार त्यांचे स्विकारू, त्यांच्यासारखेच जगू अन् त्यांच्यासारखेच मरू...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अर्चना खंदारे, हिंगोली.
               जगामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये एखादी व्यक्ती समाजासाठी थोर महान  कार्य  करून  गेली  असेल  तर आपण त्यांचा पुतळा /  स्मारक  समाजासाठी त्यांच्या कार्याबद्दल प्रेरणा देण्यासाठी निर्माण करतो/  मांडतो. या बाबींवर खूप गामभिर्याने आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे की,खरचं आजच्या  परिथितीमध्ये  असे घडताना  दिसत आहे का? आपल्या समाजामध्ये आज हि जाती बद्दल वाद  होतात. आणि आपल्या महान थोर पुरुषांनी  देशासाठी/समाजासाठी आपना सर्वांसाठी  जे कार्य केले आहे त्यांनाही  समाजातील  काही लोकांनी  त्यांना त्यांच्या जातीनुसार विभागले  आहे.उदाहरणार्थ  छत्रपती शिवाजी राजे -  मराठा  समाज, Dr.बाबासाहेब आंबेडकर -बुद्ध समाज, क्रांती  जोती मा.सावित्रीबाई  व महात्मा  जोतिबा  फुले - माळी समाज,पुण्यश्लोक  अहिल्यदेवी  होळकर - धनगर समाज,इत्यादी असे अनेक  उदा. पाहतो आणि जाणतो  सुद्धा.....
           
            आज हि खेडे गावामध्ये छ.शिवाजीमहाराज यांच्या  पुतळ्य समोर जास्त प्रमाणात मराठ्यांचीच माणसे-मुले दिसतात.Dr.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  पुतळ्या  समोर बुद्धांचीच  माणसे-मुले दिसतात.असे का तर त्यांचे विचार हे आपण तेवढ्या  समाजा पुरतेच  सीमित ठेवले आहेत. आणि एखाद्या  समाजातील एका थोर महापुरुषाची  जर दुसऱ्या  समाजाने  विटंबना  किंवा वाईट कृती केली तर त्या दोन समाजामध्ये जातीय  वादावरून  भांडणे-  कलह  होतात.उदा. 1 जानेवारी ला प्रकार म्हणजेच भीमा  कोरेगाव  येथील  घटना...

            मला एवढेच  म्हणायचे  आहे की,आपल्याला  आपल्या थोर महापुरुषाचे  विचार त्यांची  कार्यप्रणाली  हे येणाऱ्या  नवीन  पिढीमध्ये  रुजवायचे  आहे. पण आज हि आपण या महापुरुषाचे पुतळे /  स्मारके  बांधून  काय सिद्ध  करत  आहोत ?
 हा यक्ष  प्रश्न आपल्या समोर उभा  आहे.....
 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शीतल शिंदे _ दहिवडी जि .सातारा .

 महापुरुषांचे पुतळे आणी त्यांचे विचार हे फार महत्वाचे आहेत .आणी हे निपक्षपातीपणे आपण सर्वांनी स्वीकारले पाहिजे .

ज्यांनी आपल्या देशासाठी प्राणांचे  बलिदान दिले , प्राणांची आहुती दिली आणी प्रजेच्या कल्ल्यानासाठी आपले सम्पूर्ण आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांच्या विचारांची ठेवण आणी त्यांचे पुतळेहि आपल्यासाठी महत्वाचे आहेत .

जरी त्यांच्या पुतळ्यासाठी आव्हाडव्ह खर्च केला असला तरी काही फरक पडत नाही नाहीतर कोठे ते पैसे प्रजेच्या कल्यानासाठी मार्गी लगले असते ? 
त्यांच्या कार्यापुढे , बलिदानापुढे हा खर्च काहीच नाही .
खरेतर या समाज सुधारकांचे पुतळे बांधावेत अशी त्यांची अपेक्षा नसून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालावा , समाज सुधारावा , गुलामगिरी नष्ट व्हावी  अशी त्यांची इच्या ! पण आपल्याकडे सर्व उलटेच होते .त्यांचे विचार न घेता पुतळे उभारले जातात आणी जनतेला समाधानी केले जाते .

जातीयवादि , राजकारणी , बेअकली , समाज कण्ठक , बिन डोक्याचे , आणी दुसऱ्यांच्या विचारांवर चालणारे लोक पुतळ्यांची विटम्बणा करतात आणी करवून घेतात .
त्यात आपल्या देशातील  जतीप्रथा , राजकारण समाजवाद यामुळे पुतळ्यांची विटम्बणा केली जाते .याला शासनहि कडक करवाई करत नसल्याचे दिसते अर्थात पाठीशी घालते .

खरेतर समाज सुधारक, त्यांचे विचार आणी त्यांची ईछ्या हे सर्व निपक्षपाती पणे अभ्यासात दिले गेले पाहिजे मात्र तेथेहि पक्षपाती पणा केला जातो .जाणून बुजून अभ्यासातून वगळले जातात मग त्यांचे कार्य कसे कळणार आजच्या तरुण पिढीला ? आहेत का माहीत सर्व थोर समाज सुधारक , त्यांची नावे , कार्य आताच्या मुलांना ? मग हे जनतेने ओळखून त्याची मागणी केली पाहिजे .
आज जगात सर्वात चांगल्या प्रतीची ,लिखित स्वरूपात  लोककल्यानांसाठी , त्यांच्या हक्कासाठी , अधिकारासाठी भारताची राज्य घटना लिहिली आहे , जनतेला बहाल केली आहे  त्याचे महत्व  माहीत आहे काय या नवयुवकांना ? की माहीत करून दयायचे नाही , जागे करायचे नाही या नव युवकांना ? 

जेव्हा संविधानाचा , घटनेचा अभ्यास ह्या मुलांना अभ्यासात दिला जाईल तेव्हा  या देशातील पुतळ्यांची विटम्बणा , जातीयवाद , आतंकवाद , उच- नीचतेचा भेदभाव भोंदूगिरी , नष्ट होवून समानतेच्या पातळीवर भारत एक आदर्श आणी बुद्धीवादी तरुणांचा देश म्हणून सम्पूर्ण सर्व जग आपल्याकडे
पाहिल.पण यासाठी पालकांनी , जनतेने जग्रुत होणे गरजेचे आहे आणी तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या देशातील महापुरुषांचे पुतळे आणी स्मारके उभारल्या चे सार्थक होईल आणी ते  शोभून दिसतील .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************