तलाठी कार्यालयात आलेला अनुभव

किशोर शेळके.लोणंद.
            माझे वडील एक प्रामाणिक आणि कष्टाळू, होतकरू शेतकरी आहे. त्यांना कोणतेही काम कायद्याच्या चौकटीत राहून करायला आवडतं. तसेच त्यांचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे, कुणाचा एक रूपया बुडवायचा नाही, आणि आपलाही एक रूपया कुणाला सोडायचा नाही. आत्तापर्यंत खूप प्रामाणिकपणे त्यांना कष्ट, कष्ट आणि कष्टच करताना मी पाहिले आहे. कधीच आपला स्वाभिमान कुणाकडे गहाण टाकला नाही. स्वतःच्या फायद्यासाठी कधी चूकीचे काम त्यांनी आजवर केलेच नाही. 

काही दिवसांपूर्वी आम्ही शेतामध्ये एक नविन विहिर खोदली. आता नविन विहिरीवर नविन वीजकनेक्शनची नितांत आवश्यकता होती. पण ते कनेक्शन लगेच मिळत नाही, हे आम्ही जाणून होतोच. पण त्यासाठी हालचाल अन् धावपळ करणं गरजेचं. आणि ती धावपळीची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. मला ते नविन वीजकनेक्शन लवकरात लवकर मिळवायचे होते. आणि त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य. MSEB च्या अधिका-याने बरीच मोठी कागदपत्रांची यादी दिली, आणि ती सगळी कागदं लवकरात लवकर गोळा करायला सांगितली. त्यात 'विहीरपड' नोंद केलेला, ७/१२ चा उतारा, अशा एका कागदाचा उल्लेख केला होता. आता तो कागद तलाठी कार्यालयात मिळतो, एवढीच जाण होती मला. यापलिकडे तो कसा मिळवावा ही कल्पना मात्र नव्हती. 

तलाठी कार्यालयात गेल्यावर माननीय तलाठी महोदयांचे दर्शन एक दोन भेटीत थोडेच होणार? त्यासाठी पाच दहा चकरा खाल्ल्या नाहीत, तर त्या कार्यालयाला आणि त्या खुर्चीला काहीच महत्त्व नाही. मग महत्व लक्षात आल्यावर प्रत्यक्ष भेट... भेटीत विहिर नोंदीबाबत प्रस्ताव... आणि समोरून टाळाटाळ..
असं साधारण तिन ते चार वेळा घडलं. तलाठी साहेब खरंच इतर कामात व्यस्त होते, की त्यांनी मुद्दामहून माझ्या कामाला उशिर लावला, हे माझ्या खूप उशिरा लक्षात आलं. मी आपलं वडिलांनी सांगितलं, तेवढंच ऐकायचं. मी ज्यादा काही केलंच नाही. कार्यालयात ब-याच वेळा येणं जाणं झाल्यामुळे चार दोन चेहरे ओळखीचे झाले होते. त्यातलाच एकजण म्हणाला, "अजून दोन वर्षे हेलपाटे घातले, तरी नोंद होणार नाही. टेबलाखालुन दोन रूपये दे, काम होऊन जाईल". आता खरं तर वडिलांना ही गोष्ट सांगीतली तर या प्रकरणाला थोडं वेगळंच वळण लागेल. मग मी विचार केला की, हे माझ्याच पातळीवर हाताळलेलं बरं पडेल. मी त्या भल्या इसमाला विचारलं, " साधारण किती द्यावे लागतील "
" एक, हजार रूपये तरी द्यावे लागतील बघ.." तो गृहस्थ. 
"अहो, पण आण्णासाहेबांनी आधी तसं बोलायला पाहिजे ना? एक महिना झाला हेलपाटे घालतोय, चारपट पैसे खर्च झाले एवढ्यात माझे..." - मी.
" अरे, ही साधारण प्रोसेस आहे, यात बोलण्यासारखं काय आहे, ऑफर तू द्यायची असते. आण्णासाहेब कसे तुला डायरेक्ट मागतील. " ते गृहस्थ एवढे बोलून निघून गेले.
मी थोडा खटाटोप करून आण्णासाहेबांचा फोन नंबर लिहून घेतला....

आज सकाळी सकाळीच महोदयांना फोन केला, म्हटले की, " आण्णासाहेब थोडा वेळ असेल तर चहा घेऊयात का..?" सर्वसाधारण बोलणं झाल्यावर त्यांनी होकार दिला. आम्ही एका चांगल्या हॉटेलमध्ये भेटलो. चहा घेत घेत थेट विषयाला हात घातला. 
मी म्हणालो. - " आण्णासाहेब एक महिना झाला मी धावपळ करतोय. आणि तुम्ही माझं काम काहीच मनावर घेतलं नाही, मला आधीच माहीत असतं तर मी मागेच तुम्हाला हे पैसे दिले असते."
तलाठी महोदय इथेही शांतच. मी त्यांना मी एक हजार रूपये दिले. ते फक्त "फोन करतो," एवढेच बोलून गेले. 
मी ही माझ्या कामाने निघून गेलो. 

त्या हजार रूपयांची ताकद मला दुस-या दिवशी कळाली. जेव्हा तलाठी साहेब सकाळी सकाळीच घरी तो कागद घेऊन मला उठवायलाच आले....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पी.प्रशांतकुमार, अहमदनगर.
....एका माणसाच्या मागे एक कुत्रा लागला.घाबरून खूप लांब पळल्यावर तो एका खांबावर चढला आणि आवेशात कुत्र्याला म्हणाला, 'तू कुत्रा आहे म्हणून सोडून देतो.तुला काय माझी किंमत कळणार..एक गुंठा जरी असता ना तुझ्या नावावर तर मग तुला माझी..एका तलाठ्याची ताकद समजली असती..'
....भारतातल सर्वात भ्रष्ट सरकारी विभाग हा महसूल विभाग आहे..आणि त्यात तलाठी कार्यालयाचा वाटा खूप मोठा आहे..
...उत्पन्नाचा दाखला सोडला तर कुठलंही काम पैसे दिल्याशिवाय होतच नाही..
...साधं वारसनोंद वा इतर प्रकारे नाव लावण्याचं  काम घ्या.. आधी तर लक्षच देणार नाही..कुठल्याही कागदाची पोहोच देणं त्यांना अति जिकिरीचं वाटतं.. मग लवकर फेरफार नोंदवणार नाही.."फेरफार प्रलंबित" हा शेरा जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत जात नाही..
आता तर इमानदार तलाठी ह्याची व्याख्याच बदलली आहे. इमानदार तलाठी म्हणजे जो पैसे घेऊन कमीतकमी पटकन काम करतो..
..मला तर अजूनही तलाठी कार्यालयांचे नियम समजले नाहीत..दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या एकाच प्रकारच्या कामाला .. वेगवेगळी कागदपत्रे..वेगवेगळ्या पैशांची मागणी आणि काम होण्यासाठी वेगवेगळ्या दिवसांची वाट..
नवीन licence साठी RTO कार्यालयातला भ्रष्टाचार बराच कमी झाला तसं काही महसूल मधे होईल का?
... तुमचं काम करतो म्हणजे तुमच्यावर उपकार करतो हा जो त्यांचा आव आहे त्याच काय? ठिकठिकाणच्या खासकरून शहरातल्या Zero तलाठी लोकांचं काय.. नवीन जाणाऱ्यांना तलाठी कोण आणि झिरो तलाठी कोण हेच समजत नाही इतका त्यांचा रुबाब असतो..
...परिस्थिती वाईटच आहे..चांगले तलाठीही असतीलच पण आमच्या दुर्दैवाने ते आमच्या वाट्याला येतच नाही हे दुःख..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मनोज वडे,पंढरपूर.
           ✍🏻  सर्व Online होत ,चालले पण माणसाची मन मात्र Offline होऊ लागली दिसताना दिसतात कारण सर्व पार दर्शक होत आहे मन माणसाची वृत्ती मात्र नीट आजून पहावयास मिळत नाही ह्याच एक मेव कारण म्हणजे दर फलक ,तसेच कार्यलयाची माहिती तीत नीट नसणे ,सगळे आज ही लपून छपून चालेल दिसत आहे कारण कोणतीही सरकारी योजना असो पंच नामा असो तो नीट होत नसतानाचे चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे कारण म्हणजे तलाठी कार्य ,त्याच्या मर्यादा, त्याच्या फी ,त्याना मिळणार भत्ता , त्याचा खर्च हा जो पर्यंत लोकांना समजत नाही तो पर्यंत तलाठी कार्यलयाची दशा कायमस्वरूपी अशीच राहील अस मला वाटते,कारण माणूस तलाठी कार्यलयात जातो त्याव्हा तो वेगळाच अवतारात असतो ,त्यातील माझ्या मते 70% लोक गरीब म्हणून वागतात, कारण त्याला वाटत मला सरकारी योजना मिळाव्यात ह्या निंद्या पायी 70 %लोक दबावात वागताना दिसतात ,पण राहिलेलं 30%सरकारी कार्यालयात कौलर टाईट करून असतात जे मी बोलेल ते च होईल म्हणजे आशा लोकांना तलाठी राम राम करतो ,जेणे करून सुविधा ही ह्यांना च जास्त देण्याचा पर्यंत ही सरकारी कार्यालयात कामे ह्याची Fast होताना ही दिसतात.🤔म्हणजे आज ही दरी त्याचं पद्धतीने चालली आहे ,जी स्वतंत्र होण्यापूर्वी होती ,एवढंच बद्दल झाल्याला दिसतो की आज छाकुन बुक्का मारल्या  जातात .स्वतंत्र होण्यापूर्वी उघड होत्या ..हा माझा थोडक्यात विचार लिहण्यासारखे खूप आहे ,विषय थांबत नाही ,पण वाटत आता कृती होईला पाहिजे ,बास आता , किती सहन करायचे..     ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सचिन फड, नाशिक.
            मी काही वर्षापूर्वी नाशिक मध्ये एक जुने घर घेतले. घर जवळच्याच नातेवाईकाचे होते त्यामुळे खरेदी होऊन दहा वर्षे झाली तरी मी तलाठ्या कडे जाऊन सातबारा वर नाव लावुन घेतलं नव्हतं. एक दिवस वाटल आता खूप उशीर होईल नाव लावून घेऊया आधीच जे काम दोनशे त होणार होते त्याला पाचशे लागणार आहे. मग मी सर्व कागदपत्र तयार केले आणि तलाठी कार्यालयात गेलो माझ्या अंदाजा नुसार तलाठी पाचशे रुपये मागेल असे वाटत असतांना त्यांनी चक्क एक हजार रुपये मागितले. मग मी थोड थांबुन विचार केला आणि त्यांना म्हणालो "माझ्या कडे आत्ता पाचशेच रुपये आहे तुम्ही हे कागदपत्र जमा करून घ्या, मी घरी जाऊन लगेच पुर्ण हजार रुपये घेऊन येतो" असं म्हणून तिथून निघून आलो. मग मनात विचार केला की, आपण जर हे डॉक्युमेंट इथे ठेवून गेलो तर ते पेंडिंग कामाच्या गठ्यात जाऊ शकतात, तस झालं तर नंतर आपोआप नोंद होऊन जाईल आणि आपल काम ह्या भावात होऊन जाईल. आणि जरी नाहीच झालं तरी फक्त झेरॉक्स चा दहा रुपये खर्च वाया जाईल. आर्थिक शक्ती पेक्षा थोडीशी युक्ती लावून बघावी. आणि तसही एवढे दिवस नोंद केली नाहीये, तर अजून काही दिवस उशिरा करू, एवढे 1000 रुपये देण्यापेक्षा जाऊ द्या करू नंतर कधीतरी.
आणि गंमत काय बघा ना! माझी युक्ती काम करून गेली जिथे पाचशे रुपये देणार होतो तेथे त्यांनी एक हजार रुपये मागितले.
पण माझं काम तर 'फुकटातच' होऊन गेलं...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शीतल शिंदे, दहिवडी जि .सातारा.
     तसा आमचा तालुका नेहमीच दुष्काळी .पाऊस पाडला तर पिके नाहीतर काहीच नाही .पिण्याच्या पाण्याची बोंबाबोम्ब .
काय करायचे सगळ्याच गोष्टींनी दुष्काळ आमच्या नशिबाला .तालुक्याला अधिकारी दिले जातात ते पण अगदी हेरुणच.कोणाचा साइकॉलजीचा प्रॉब्लेम , तर कोणी व्यसन करणारा , तर कोणी आपलेच खरे म्हणणारा .
कुठल्याहि  कार्यलयात जा काहीतरी उणीव आहेच .दुष्काळ असल्यामुळे त्यांनाही दिलेली शिक्षाच म्हणा .पण पगार चालू आहेच की ओ .
असो गरज्वण्ताला अक्कल नाही म्हणतात तसेच म्हणायचे आणि पुढे चालायचे .
आपले तलाठी आण्णांचे कार्यालय हे हि याला सुटले नाही .खेडे गावात तर येतात की नाही माहीतच नाही .जरा गाव दादागिरी करणारे असेल तर असतात आठवड्यातून एक दोन दिवस .नाहीतर बाजीराव कोठे असतात माहीतच नाही .मोबाईलला तर ह्यांच्या कधीच रेंज नसते .मग यांच्या मागे यांना शोधायला तालुक्याला जायचे तेही 50+50 रुपए तिकीट  घालवून  .आणि तिथे गेल्यावर किती मागतात आणि आणखी परत यायला सांगतात की काय या विचारांनी काहूर माजते मनामध्ये .फक्त ऊताऱ्याची पुस्तकाची झेरॉक्स घ्यायची असते आणी त्यावर सही शिक्का 
म्रूत्यू नंतरच्या नोन्दिला पण काहीतरी द्यायची अपेक्षाच !

सातबाराला नाव लावायला पण मौजा काहीतरी .एकत्र आणेवारी लावताना काही काळात नसेल तर एक आणा मध्ये जास्त मेम्बर्स असतील तर " पै  "चा हिशोब जुळेना तर लावून टाकायचे कोणाच्या तरी नावावर जास्त .किंवा जो पैसे देईल त्याच्या नावावर लावून टाकायचे जास्त क्षेत्र .मग आपण बदलून गेल्यावर मागे एकमेकांची डोके फोड का होईना आपल्याला काय करायचे आहे .परत म्हणायला मोकळे अहो चुकून झाले असेल .
पीकपाणी भरताना , देताना सुद्धा तीच बोम्ब .ज्या मोठ्या शेतकऱ्याला माहीत असेल तोच लाभार्थी नाहीतर माहीत नसलेले राहिले तसेच .
असा आमचा डोळे उघडे ठेवून केलेला आंधळेपणा अथवा उघड उघड भ्रष्टाचार ! 
आणि गोरगरिबांची लूटमार !
 कधी होणार बंद हे ! आणि म्हणे 
आणि अच्छे दिन आनेवाले है !
लेकिन कब ?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(All images are taken from Internet)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************